Friday, January 20, 2012

ड्रिबल, टॅकल, किक & सेव्ह : फूटबॉल क्लब मॅनजर्स

भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीवर काढलेला 'चक दे' पिक्चर तुम्ही पाहिला आहे का ?
त्यात शाहरुख खानचा १ डायलॉक आहे ' हर एक टीम में बस एक ही गुंडा हो सकता है, और इस टीम का गुंडा मै हुं'.
पाहिला असेल तर लक्षात ठेवा, पाहिला नसेल तर पाहुन घ्या आणि मग लक्षात ठेवा, कशासाठी ते आपण पुढे कुठेतरी नक्की पाहुयात.

चवीने खाणे कुणाला आवडत नाही ?
पण एखादा पदार्थ 'चांगला' होण्यासाठी आणि त्याचा आस्वाद घेतल्यानंतर जो काही 'तृप्ती'ची अनुभुती होते ती साधण्यासाठी नक्की काय काय लागते हो ?
'बेस्ट इन क्लास' उपकरणे असलेले अद्ययावत स्वयंपाकघर ? जगभरातुन कष्टाने हुडकुन आणि मागेल ती किंमत मोजुन गोळा केलेला विविध प्रकारचा कच्चा माल ? का 'हे कसे करावे, ते कसे करु नये' ह्याच्या हजारो टिपा देणारे प्रकाशित साहित्य ?
केवळ हे एवढे सगळे आणि तत्सम 'अत्युत्तम' गोळा करुन पदार्थ बनवता येतो ?
का त्यासाठी लागतो तो प्रत्येक वस्तुची किंमत ओळखणारा आणि ती वस्तु कशी, किती, केव्हा व कुठे वापरता येईल ह्याची नेमकी जाण असणारा निष्णात 'बल्लवाचार्य' ?

पुन्हा एकदा असाच प्रश्न विचारतो. बर्‍याचदा आपल्याला एखाद्या गाण्याची एखादा सुरेल तुकडा आवडुन जातो, तो आपल्या कर्णपटलवर वारंवार रुंजी घालत असतो व सवयीने आपणही ते गाणे गुणगुणत असतो. तर ते गाणे एवढे 'नादमधुर' बनवण्यासाठी काय लागते हो ?
विविध प्रकारची वाद्ये वाजवणारे त्या त्या वाद्याचे जगभरातले दादा कलाकार ? काळजापर्यंत जाऊन भिडणारा मधुर आवाज असलेले गायक/गायिका ? रेकॉर्डिंगची 'बेस्ट इन क्लास' सुविधा असलेला रेकॉर्डिंग स्टुडियो ? अत्युच्च दर्जाचे काव्य लिहणारे गीतकार ?
ह्या सर्वांना एकत्र आणले तर प्रत्येक गाणे हे 'क्लास' होईलच का ?
का त्यासाठी आपल्याला लागतो तो हे प्रत्येक घटक कुठे, कसे वापरावे ह्याचे ज्ञान असलेला आणि ह्या सर्वांच्या ताळमेळातुन एक प्रकारची जादु करुन अजरामर गीत पेश करणारा एक जादुगार ?

भलेही कुठल्याही दैदिप्यमान यशामागे 'टीमवर्क'चे स्थान वादादीत असले तरीही ह्या 'टीम'ला सरळ वळण लाऊन, त्या टीममधल्या प्रत्येकाची किंमत आणि महत्व अचूकपणे ओळखुन वेळ येईल तशी त्याचा चाणाक्षपणे वापर करणारा 'टीम मॅनेजर' हा ह्यात सर्वात महत्वाचा घटक नाही का ?
'गुरुविण कोण दाखवेल वाट' ह्या वचनामध्ये ज्याची आवश्यकता सांगितली जात आहे तो गुरु म्हणजे टीम मॅनेजर नव्हे काय ? समजा हाच गुरु 'अपात्र' असेल तर त्या टीमवर 'गुरुविण कोण लावेल वाट' म्हणण्याची वेळ येणार नाही काय ?

असो, नमनालाच घडाभर तेल वाहुन झाल्यावर आपण आता मुळ मुद्द्याकडे वळुयात.
फूटबॉल हा आमचा आवडता खेळ आहे, ह्या खेळावर, ह्यातल्या प्रसिद्ध टीम्सबद्दल, त्यातल्या जिगरबाज खेळाडुंबद्दल आणि त्यांच्या खेळावर मनापासुन प्रेम करुन टीमसोबत त्यांची हार-जीत साजरी करणार्‍या लाखो खेळवेड्या रसिकांबद्दल अनेकांनी खुप काही लिहुन ठेवले आहे, आम्हीही बर्‍याचदा ह्यावर जमेल तसे लिहले आहे.
पण ह्या सर्वांपेक्षा एक वेगळाच आयाम असलेल्या 'टीम मॅनेजर्स'बद्दल काही लिहुन त्यांचेही आमच्यावर असलेले ऋण फेडायचा बर्‍याच दिवसापासुन विचार होता त्याला आता मूर्त स्वरुप देत आहोत. ह्या लेखात मी फूटबॉल टीम्सच्या काही नावाजलेल्या मॅनेजर्सबद्दल ४-४ वाक्ये लिहुन तुम्हाला त्यांचे थोडक्यात ओळख करुन देणार आहे.
अगदी सर्वांबद्दलच सर्वच माहिती लिहण्याचा अट्टाहास करणे हे आकाशाला गवसणी घालण्यासारखे आहे, ते जमणे शक्य नाही. पण ह्या निमित्ताने सध्याच्या काळात फूटबॉलमधले अगदी जरी देव नसले तरी अवलिये नक्कीच असणार्‍या काही महान व्यक्तींसमोर आमच्या फूटबॉलप्रेमात भिजवलेली सांजवात लावण्याच्या ह्या लेखाद्वारे प्रयत्न करतो आहे.


१. सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन - मँचेस्टर युनायटेडचा वास्तुपुरुष :


बायचान्स तुमचा देवावर विश्वास असेल तर एक श्रद्धा म्हणुन केवळ त्याच भावनेने तुम्ही कधी केरळमध्ये असलेल्या पद्मनाभ मंदिराला भेट दिली आहे का ? ह्या पद्मनाभ मंदिरातले नंबी (नंबुद्री) ब्राम्हण पुजारी पाहिले आहेत का ? निदान त्यांच्या भगवान पद्मनाभस्वामींवर असलेल्या श्रद्धेबद्दल आणि त्या सोपस्कार व कर्मकांडातुन त्यांच्यात येत असलेल्या कर्मठपणाबद्दल आणि ध्येयनिष्ठेबद्दल तुम्ही कधी काही पाहिले, वाचले, ऐकले आहे काय ?
ओके. पाहिले नसल्यास किंवा देवावर अथवा फारफारतर कर्मकांडावर विश्वास नसल्याने त्याची सत्यता जोखण्यास तुम्हाला त्रास होत असेल तर त्याचे समकक्ष उदाहरण म्हणुन तुम्ही अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांच्याकडे पहा असे सुचवेन.
फूटबॉल हा धर्मच मानला तर मँचेस्टर युनायटेडचे स्थानमहात्म्य, त्याचा इतिहास, त्याची भव्यता ही पद्मनाभ मंदिरापेक्षा तसुभरही कमी नाही. ह्यांचेही जगभरात लाखो भाविक आहेत आणि त्यांची 'मॅन-यु'वर अगदी भगवान पद्मनाभाएवढीच श्रद्धा आहे. ह्या मॅन-युची गेली २५ वर्षे अव्याहत सेवा करणारे सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांची श्रेष्ठताही कुठल्याही नंबीपेक्षा कणभरही कमी नाही.

किमान ७५००० ह्या संख्येने ओल्ड ट्रॅफर्डवर संघाच्या जर्सीचा रंग असलेल्या लाल रंगाचे कपडे घालुन 'रेड डेविल्स' म्हणवले जाणारे पाठिराखे "Glory glory glory Man United, And the reds go marching on, on, on..." चा जयघोष करत असतात आणि त्याच एनर्जीवर जेव्हा मॅन-युचे ११ खेळाडु मैदानावर कमाल करत प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडाला फेस आणत असतात तेव्हा मैदानाच्या टचलाईन म्हणवल्या जाणार्‍या रेषेवर उभा राहुन एक ब्रिटिशांच्या व्याख्येतला जंटलमन पोषाख केलेला सत्तरीच्या घरातला जख्ख म्हातारा अगदी शांतपणे हा खेळ बघत असलेला दिसला तर ती व्यक्ती अन्य कुणी नसुन खुद्द सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन आहे हे लक्षात ठेवा. भगवान पद्मनाभाचे सर्व पुजापाठ आणि विधी पद्धतशीरपणे झाले पाहिजेत ह्या चिंतेत नंबी लोक ज्याप्रकारे सर्व काही विसरुन आराधनेत मग्न असतात तोच आवेश सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांच्यामध्ये असतो. ह्या सोपस्कारादरम्यान जे जे काही रितीला सोडुन आणि पाठिराख्यांना अप्रिय असे काही घडत असेल ते ते टाळण्यासाठी कधी प्रेमाने, कधी धूर्तपणे तर कधी चिडचिड करुन जे जे शक्य आहे ते करण्यासाठी जी चिकाटी आणि जो कर्मठपणा अंगी असावा लागतो तो असातसा मिळत नाही, अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांनी तो कमावला आहे.
त्यांचा आवर्जुन सांगण्यासारखा एक गुण म्हणजे त्यांनी शब्दांतुन निर्माण केलेला दरारा. बाळासाहेब ठाकरे जसे विरोधकाला निवडणुकीच्या आधी आणि मग नंतर जसे कच्चे खाऊन टाकतात तोच आवेश ह्या सायबांचा 'प्री-मॅच कॉन्फरंस'ला असतो. साहेब शक्यतो मिडियाला नाराज करत नाहीत व कही ना काही 'न्युज' देतातच.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलेल्या दिग्गज खेळाडुंची नुसती नावे जरी लिहायची म्हटली तर ह्य लेखात इतर काही लिहण्याइतकी जागा उरणार नाही. इथे खेळुन अणि मग बाहेर जाऊन 'स्टार' झालेले तर ढिगाने आहेत पण मॅन-युचा हा अढळ ध्रुवतारा अजुनही अचलच आहे.
सलग २० वर्षे मॅन-युचे मॅनेजरपद संभाळताना अ‍ॅल्क्स फर्ग्युसन ह्यांनी जे जे उपलब्ध आहे ते ते सर्व कमावले आहे. 'Nothing left to prove' असे जर म्हणायचे झाले तर ते सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांच्याबाबत म्हणता येईल.
१२ वेळा प्रिमियर लीगची विजेतेपद, ५ वेळा एफ.ए. कप, १० वेळा कम्युनिटी शिल्ड, २ वेळा अत्युच्च चँपिय्सन्स लीग, एकदा क्लब वर्ल्ड कप ........... अजुन काय अपेक्षा असते एका मॅनेजरकडुन ?
ह्याशिवाय प्रिमियर लीगमधला सर्वश्रेष्ठ मॅनेजर हा सन्मान १० वेळा, एक युएफा मॅनेजर ऑफ द ईअर, बीबीसीकडुन क्रिडाक्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च सन्मान ३ वेळा, एक ब्रिटिश हॉल ऑफ फेम, एक युरोप हॉल ऑफ फेम, एक फिफा प्रेसिडेन्ट अ‍ॅवॉर्ड ह्याहुन जेष्ठ असा सन्मान म्हणजे ब्रिटिश सरकारकडुन 'सर' ही पदवी देऊन बहुमान व सर्वात महत्वाचे म्हणजे करोडो पठिराख्यांचे प्रेम.
लोक मॅन-युला कितीही शिव्या देत असले तरी जेव्हा सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांचे नाव येते तेव्हा समोरच्याच् शब्दातुन आणि वागण्यातुन 'आदर' हा दिसावा लागतो आणि तो दिसतोच.

शेवटी थोडक्यात सांगतो, आजच्या काळात जर 'दिग्वीजय आणि राजसुय यज्ञ' वगैरे संकल्पना असत्या तर सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांची १० वेळवेगळे संघ घेऊन प्रत्येकवेळी हे काम आरामात पुर्ण केले असते, हा माणुसच असा आहे .... दिग्वीजयी आणि श्रेष्ठ !

२. आर्सेन वेंगर - आर्सनेलचे गुरु द्रोण आणि इंग्लिश फूटबॉलमधला बनिया :

समजा आज महाभारताचा काळ असला असता आणि फूटबॉलला समजा राजाश्रय वगैरे मिळुन राष्ट्रखेळ असल्याचा दर्जा मिळाला असता आणि इथल्या राज्यकर्त्यांनी हस्तिनापुरात कुरुंनी जसे सर्व विद्या, अस्त्र, धर्म, निती शिकण्यासाठी 'गुरुकुल' स्थापन केले होते त्याच धर्तीवर फूटबॉल शिकण्यासाठी आणि त्याच्या प्रसारासाठी एखादी संस्था काढायचे ठरवले असते तर त्या शाळेचे नाव नक्की 'आर्सनेल' ठेवले असते आणि 'महर्षी आर्सेन वेंगर' तिथे कुलगुरु म्हणुन जाऊन बसले असते. इथे शिकलेल्या सर्व निष्णात खेळाडूंनी आपल्या कौशल्याने ह्या गुरुकुलाची किर्ती जगभर पोहचवली असती आणि त्याने 'आर्सेन वेंगर' व पर्यायाने आर्सनेलच्या जेष्ठतेत अजुन भर पडली असती.
पण सध्या महाभारताचा काळ नाही आणि राजाश्रय, गुरुकुल वगैरे संकल्पना अस्तित्वात नाहीत.
पण 'आर्सेन वेंगर' हा माणुस अशा परिस्थितीत हार खाऊन घाबरुन जाणार्‍यातला नाही, तो १९९६ पासुन ते थेट आजही आर्सनेलच्या टीमसाठी एकाहुन एक सरस खेळाडू घडवत आहे, जगभरातुन त्यांना हुडकुन आणुन त्यांच्या कौशल्याला आपल्या अनुभवाने पैलू पाडत आहे, हे पैलू पाडलेले हिरे आर्सनेलच्या कोंदणात लखलखुन त्यांना योग्य सन्मान मिळवुन देत आहेत व त्याबरोबर बाहेरच्या जगाचेही लक्ष वेधुन घेत ह्या हिर्‍यांसाठी मोठ्ठी किंमत मोजण्यास त्यांना भाग पाडत आहेत.

अ‍ॅलेक्स फर्ग्युसन ह्यांच्यासारखे ढिगभर कप जर आर्सनेलने वेंगर ह्यांच्यासोबत जिंकले नसले तरी त्यांनी गेली १५ वर्षे आर्सनेलला एक 'लढाऊ टीम' म्हणुन जी ओळख मिळवुन दिली आहे ती आजही टिकुन आहे. सध्या भयंकर फॉर्मात असलेली अजेय बार्सिलोना जर कुणाला घाबरत असेल तर ती आर्सनेलच्या खेळाला आणि त्याचे शिल्पकार आहेत ते आर्सेन वेंगर.

आर्सेन वेंगर ह्यांना इंग्लिश फूटबॉलचा 'बनिया' म्हणुन ओळखले जाण्याचे कारण म्हणजे जिथे चेल्सी, मॅन-सिटी, लिव्हरपुल, रियाल माद्रिद अशा टीम्स ट्रान्सफर विंडोमध्ये करोडो रुपये घालवुन चांगले स्टार्स विकत घेतात ते स्टार्स हे वेंगर ह्यांच्या आर्सनेल मधुन येतात. हे स्टार्स अगदी तरुण असताना व त्यांच्याभोवती एवढे वलय नसताना वेंगर त्यांना अगदी कवडीमोल म्हणावे अश भावात विकत घेतात, त्यांच्या खेळाला पैलु पाडतात, त्यांच्याकडुन मैदान गाजवुन घेतात आणि वेळ आली की अव्वाच्या सव्वा किमतीत त्यांना विकतात.
जेव्हा इतर टीम्स प्लेयर्सच्या खरेडी-विक्रीमध्ये करोडो रुपायांच्या बुडीत खात्यात असतात तेव्हा इकडे वेंगर तेच करोडो कमावुन एखादी नवी ट्रेनिंग अ‍ॅकेडमी उघडुन उद्याचे करोडो रुपये किंमत असलेले स्टार्स बनवण्यात मग्न असतात.
धिरुभाईंना यदाकदाचित फूटबॉलमध्ये रुची असली असती तर त्यांनी नक्की आर्सेन वेंगर ह्यांना घेऊन 'रिलायन्स फूटबॉल कॉर्पोरेशन' स्थापुन करोडोंचा बिजीनेस केला असता, हा माणुस त्यासाठी अगदी योग्य आहे.

३. आन्द्रे विया बोयास - चेल्सीचा ध्येयवेडा तरुण मॅनेजर :

वर वर्ष ३५ !
हे वय काही मॅनेजर वगैरे होऊन जवळपास आपल्याच वयाच्या प्लेर्यसना 'कसे खेळावे' हे शिकवण्याचे नाही. तूर्तास ह्याचे प्रतिस्पर्धी असलेले इतर टीम्सचे मॅनेजर हे तसे म्हटले तर वयोवृद्ध म्हणु शकता असे असताना आणि एकेकाचा अनुभव विया-बोयासच्या एकुण वयाएवढा असताना हा पठ्ठ्या त्यांच्या नाकावर टिच्चुन चेल्सीसारख्या लोकप्रिय, ग्लॅमरस आणि रशियन उद्योगपतीच्या धनाढ्य पाठबळामुळे मॅनजर ह्या पदासाठी 'हॉट सीट' ठरलेली जागा पटकावुन 'युरोपियन दिग्विजया'ची स्वप्ने बघतो ही घटना अचाट आणि अतर्क्य आहे. बाय द वे, कुठल्या प्लेयरसाठी किती ट्रान्सर मनी दिला आणि त्याला किती पगार मिळतो आदी बातम्या मिडिया चवीने चघळत असताना खुद्द मॅनेजरसाठी ट्रान्सफर मनी देऊन त्याची बदली करुन घेण्याचा व एवाढ्या कमी वयात सर्वात जास्त 'कमावणारा' मॅनेजर अशी विया-बोयास ह्यांची ख्याती आहे.
आजही फूटबॉलमध्ये त्याच्या वयाचे किंवा अगदी त्याच्यापेक्षा मोठ्ठे असणारे प्लेयर्स मैदान गाजवत असताना हा तरुण रक्ताचा बेरकी माणुस समोरच्याच्या प्रदिर्घ अनुभव आणि जाण ह्यावर स्वतःच्या असिम इच्छाशक्ती आणि काही करुन दाखवण्याची प्रामाणिक भावना ह्या जोरावर भल्याभल्या टीमसमोर मोठ्ठे आव्हान उभा करत आहे ही बाब आवर्जुन नोंद घेण्यासारखी नक्की आहे.
तिकडे सर अ‍ॅलेक्स फर्ग्युसन गेली २० वर्षे एकहाती मॅन-यु संभाळत असताना त्यांच्या प्रदिर्घ अनुभवासमोर हा पठ्ठ्या "Well, It comes with confidence and time" म्हणत उभा रहातो आणि त्याचा हाच कॉन्फीडंस अजिंक्य मॅनचेस्टर सिटीचा प्रिमियर लीगमधला पहिला पराभव घडवुन आणतो. त्यासोबतच हा "It was important for us to win, but it's not about me, it's about this club, and at the moment this club is fifth in the table" असे सांगुन पुढील आव्हानास तयार असल्याचे संकेतही देतो.
मागच्या वर्षीच कुणाच्या ध्यानीमनी नसताना 'एफ सी पोर्टो' ह्या त्याच्या मायदेशातल्या पोर्तुगीज टीमला घेऊन त्याने अनेक दादा क्लब्सना धूळ चारत 'युरोपा लीग' पटकावली तेव्हाच 'ये तो भाई लंबी रेस का घोडा है' अशी नोंद अनेकांनी करुन घेतली.

तसा म्हटला तर हा जुगार आहे, अपयश आल्यास गच्छंती अटळ आहे आणि त्याची संपुर्ण कल्पनाही विया-बोयासला आहे. पण 'ध्येयवेडे तरुण' इतिहास घडवतात असे म्हणतात, ते त्याने मागच्या वर्षी पोर्टोसोबत करुन दाखवले व म्हणुनच आज चेल्सी मॅनेजरच्या 'हॉट सीट'वर तरुणतुर्क आद्रे विया-बोयास दिमाखात आणि संपुर्ण आत्मविश्वासाने बसला आहे.
खेळात हार-जीत चालतच रहाते, पण जेव्हा काही अनपेक्षित घडवण्याची ठामपणे खात्री देणारा नव्या विचाराचा एखादा माणुस उभा रहातो तेव्हा त्याची दखल घ्यायलाच हवी, नाही का ?

------------------------------------------------------

थोडक्यात सांगायचे तर टीम कितीही मोठ्ठी असली, क्लबचा इतिहास कितीही दैदिप्यमान असला आणि त्यांनी गतकाळात कितीतरी ट्रॉफी जिंकल्या असतील, सध्या क्लबमध्ये जगातले बेस्ट टॅलेंटेड सुपरस्टार असले तर 'मॅनेजर' ही व्यक्ती महत्वाची आहे/असते.

आता कळाले का मी लेखाच्या सुरवातीला तो शाहरुखचा 'चक दे' मधला डायलॉक का लिहला ते ?
सामर्थ्य आहे टीमचे । जो जो खेळील तयाचे। परंतु तेथे मॅनेजरचे । अधिष्ठान पाहिजे।।

( क्रमशः)

Sunday, November 6, 2011

’देव’ नाही ’देवळा’त ...

सिनेमा पहाणे ह भक्तिभाव मानला तर सिनेमा थेट्राला 'देऊळ' मानायला हवे आणि आपण ज्या श्रद्धेने ह्या देवळात 'सिनेमाची स्टोरी, चित्रण, गीत-संगीत, नावजलेले कलाकार अणि त्यांनी समर्थपणे पेललेल्या भुमिका' पहायला आणि त्यांचा आस्वाद घ्यायला जातो त्यांना 'देव'च म्हणायला हवे.
आपल्या अपेक्षांप्रमाणे सिनेमात सर्व काही असेल तर थेटररुपी देवळात साक्षात 'देवदर्शन' झाल्याचे समाधान लाभते व ह्या देवळाची वारी एक उत्सव होऊन जातो.

उमेश कुलकर्णींच बहुचर्चित 'देऊळ' हा सिनेमा खास थेट्रात जाऊन पाहिला असता आम्हाला 'देव नाही देवाळात' असा अनुभव आला. ज्या अपेक्षेने आम्ही देवाचे दर्शन घ्याला गेलो तो देवच तिथे नव्हते, बाकी मंदिराची दिव्यभव्यता आणि जाहिरातीद्वारे सुरु असलेला भक्तीचा जागर मात्र डोळ्यात मावेना इतका प्रचंड होता.
हे आमच्यासारख्य भक्तीभावाने सिनेमा पाहणार्‍या पटण्यासारखे नाही, म्हणुनच 'देऊळ'बद्दल आमचे हे ४ शब्द ....



’देऊळ’ हा सिनेमा लोकांना शक्यतो आवडणार नाही.
१. लोकांना सत्य दाखवलेले आवडत नाही.
२. तगडी स्टारकास्ट घेऊन उगाच शास्त्रापुरते सत्य दाखवणे त्याहुन आवडत नाही.

मला ’दुस-या कारणा’मुळे देऊळ तितकासा आवडला नाही. पिक्चर बर्‍यापैकी जमला नाही असे मला म्हणावेसे वाटते.
वलयांकित असे मोठ्ठे कलाकार घेऊन आणि त्याचा भरपुर गाजावाजा करुन शेवटी यथातथाच असलेला चित्रपट असे मी ह्याचे वर्णन करेन.
पुर्वार्धात हा चित्रपट भयंकर संथ आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर रटाळ वाटला.
गाजावाजा करुन मोठ्ठे मोठ्ठे कलाकार घेऊन त्यांना ह्या सिनेमात अक्षरशः वाया घालवले आहे असे वाटते. त्या त्या कलाकाराच्या क्षमतेला न्याय देणारे एकही पात्र ह्या चित्रपटात नाही ... अपवाद गिरीश कुलकर्णींचा केशा आणि दिलीप प्रभावळकरांचा अण्णा.
त्यांच्या पात्राची पार्श्वभुमी अथवा घडण चित्रपटात कुठेच ठळकपणे दिसत नाही. वातावरण निमिर्ती आणि पात्र ओळखीसाठी अत्यावश्यक असलेले डिटेलिंग इथे भरकटले आहे, उलट त्या नादात ह्या विषयाशी अगदीच अनावश्यक असलेले प्रसंग उगाच घुसडले गेले आहेत असे वाटले. मी तर असे म्हणेन की ह्या बड्या नावाऐवजी अगदी कुणीही त्या त्या भुमिका सहजपणे करु शकला असता, असे असताना उगाच मोठ्ठी नावे वापरुन, त्यांना यथातथा भुमिका देऊन उगाच 'बिग बजेट' अशी जाहिरात करणे हे पटले नाही.
नाना पाटेकर, मोहन आगाशे, किशोर कदम ह्यांना अक्षरशः वाया घालवला आहे.
सोनाली कुलकर्णी ह्यांची भुमिका खास आहे म्हणण्यात अर्थच नाही, इनफॅक्ट त्यांच्या व्यक्तिरेखेला तसा वावच नाही, हेच कारण बहुदा सर्वच बड्या नावांबाबत घडते.
नसरुद्दिन शहाचे पात्र ह्या सिनेमात 'उगाच' घुसडल्यासारखे वाटते, उगाच २-३ डायलॉक आणि अनावश्यक प्रसंग रचना ह्याने काय मिळाले ते कळत नाही. हां, बड्या नावांची जाहिरात करायची असेल तर मात्रचे आमचे मौन बाबा, त्यातले आम्हाला जास्त समजत नाही.
चित्रपटाचे संगीत, गाणी आदी बाबत न बोललेलेच बरे. सध्या जरा वादग्रस्त असलेले 'दत्ताचे गाणे' हे बर्‍यापैकी सत्यपरिस्थीतीच्या जवळ जाणारे आहे आणि नादमधुर नसले तरी गुणगुण्यासारखे वाटले.

सिनेमात काही चांगल्या गोष्टी आहेत पण त्या पेलण्यात जरा गडबड झाली आहे.
'एका देवस्थानाचा जन्म' अशी एका व्याख्या करता येण्याजोगा हा चित्रपट आहे, विषयाच्या निवडीला आणि त्यात दाखवलेल्या बर्‍यापैकी डिटेलिंगला फुल्ल नसले तर उत्तम गुण.
मात्र ह्याच अनुषंगाने आम्ही वर केलेल्या 'लोकांना सत्य दाखवलेले आवडत नाही' ह्या विधानाबाबत २ शब्द न लिहणे हे ह्या सिनेमावर अन्याय ठरेल.
एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी जे जे घडते ते ते दिग्दर्शकाने जसे आहे तसे दाखवले आहे. स्थानिक ग्रामस्थांचा संपुर्ण बाजारपेठेवर कब्जा, देवस्थानाच्या निमित्ताने चालणारे अन्य उद्योग-धंदे व त्यालाही असणारी बरकत, सतत येणार्‍या पैशाचा ओघामुळे दिवसेंदिवस 'श्रीमंत' होत जाणारे देवस्थान आणि त्याचे व्यवस्थापक, ह्याच पैशाचा जोरावर देवळाला अजुन 'मोठ्ठे' करण्याची व त्यामार्गे अजुन पैसा कमवण्याची इच्छा, कालांतराने भक्तीभावाला बाजुला सारुन केवळ दिखावा, सारंजाम, भपकेपणा आणि त्यात कमी की काय म्हणुन स्थानिक राजकारणाचा हातभार आदी बाबींबर 'देऊळ' व्यवस्थित भाष्य करतो.
खरे तर हे सत्य सर्वांनाच माहित आहे, अशी 'उभारलेली' देवळंही अनेकजणांना माहित असतील, पण ही बाब स्पष्टपणे दाखवण्याचे धाडस केल्याचेही कौतुक आहे.
मुर्ती चोरीला गेल्यावर पहिल्यापेक्षा अधिक भारी मुर्ती आणुन येनकेनप्रकारे 'देऊळ' चालु राहिले पाहिजे हा सोसही मस्त दाखवला आहे.
ह्या
निमित्ताने दिग्दर्शकाने 'देवस्थानाचे बाजारीकरण' ह्यावर बर्‍यापैकी कठोर भाष्य केले आहे असे म्हणायला हकरत नसावी. ह्याच्या जोडीला ग्रामीण भागातले राजकारण, लोकांच्यातला बेरकीपणा, मिडियाची ताकद, ग्रामीण जीवनातला एकंदरीत संथपणा आणि रिकाम्या हाताचे व निवांत डोक्याचे लोक वेळ घालवण्यासाठी काय काय करत असतात हे चांगले दाखवले आहे.

उपरोक्त बाबींमुळे चित्रपट बर्‍यापैकी पाहण्यासारखा होतो, पण हे आणि इतकेच दाखवण्यासाठी बड्या नावांची अजिबात गरज नाही हे सत्यही पुन्हा ढळढळीतपणे समोर येते.
'कंचुकी तंग दाटली उरी, मट्रीअल आत मायीना... आनं माळावर प्रकटला दत्त, पर भाव मनी दाटना....' सारख्या संवाद/काव्याची ह्या लेव्हलला आणि चित्रपटात एवढे बडे कलाकार असताना गरज नव्हती, असली स्ट्रॅटेजी बी ग्रेडी चित्रपटाने वापरायची असते, ती तिकडेच शोभून दिसते, अन्यथा उगाच हसे होते, असो.

तर एकंदरीत चित्रपट एकदा पाहण्यासारखा आहे, आवर्जुन थेट्रात पाहण्याची गरज नाही, मराठी चित्रपटसृष्टीला मदत करायची असेल तर पाहु शकता, यथावकाश टिव्हीवर येईलच.
माझे ह्या चित्रपटाचे एका वाक्यात वर्णन .... बडा घर, पोकळ वासा. असो.

- (चित्रपटाबद्दल असामाधानी आणि स्ट्रॅटेजीवर नाराज) छोटा डॉन

रेटिंग वगैरे द्यायचे असल्यास : (विषयाची निवड आणि त्यासंदर्भातले काही प्रसंग इत्यांदीमुळे राउंडफिगर ) २ स्टार **

Sunday, October 16, 2011

अकिला & दी बी ...

शिक्षणातली गुणवत्ता आणि विद्यार्थ्याची कौटुंबिक्/सामाजिक्/आर्थिक पार्श्वभुमी ह्यांचे परस्परसंबंध आहे म्हटला तर आहे आणि नाही म्हटला तर नाही.
लाखा-लाखाने फिया घेऊन 'हमखास' यश मिळवुन देणार्‍या संस्था/क्लासेस आहेत, त्यात जाणारे विद्यार्थीही आहेत. आणि दुसर्‍या बाजुला अत्यंत कठिण आणि शिक्षणाला बिलकुल 'अयोग्य' अशा परिस्थीतीतही धैर्याने व चिकाटीने अभ्यास करुन गुणवत्ता यादीत झळकणारे गुणवंत आहेत.
वर्षानुवर्षे शिक्षणाचा अधिकार नाकारल्या गेलेल्या किंवा न मिळालेल्या समाजातुन दैनदिन जगण्यातला संघर्षही संभाळुन यश मिळवणार्‍यांची अनेक उदाहरणे आहेत.

'Akeelah and the Bee*' ही गोष्ट आहे अशाच एका लढ्याची आणि त्यात मिळवलेल्या दैदिप्यमान यशाची...





'अकिला अँडरसन', केवळ ११ वर्षाची, चारचौघींसारखीच म्हणण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा थोडी कमीच असलेली निग्रो वंशाची साधी मुलगी. घरात नवर्‍यापासुन वेगळी झालेली आई, २ बहिणी आणि १ उडाणटप्पु भाऊ असल्यावर कुटुंबाची सर्वसाधारण जी आर्थिक आणि सामाजिक स्थिती असेल अगदी तशीच ह्या कुटुंबाची असते. आपल्या मुलीने भरपुर शिकावे आणि एखादे मानाचे पद मिळवावे अशी अपेक्षा तिच्या आईची असते व म्हणुनच अशा हालाखीच्या परिस्थीतीतही अकिलाचे शिक्षण सुरु राहते.
मात्र अकिलाला वेड असते ते 'शब्दांचे स्पेलिंग पाठ' करण्याचे, ह्या वेडाच्या नादात तिचे अर्थातच इतर शिक्षणाकडे जरासे दुर्लक्षच होत असते व त्यानंतर आई नाराज होणे वगैरे सोपस्कार घडतात.
मात्र अकिलाची पॅशन एकच ... शब्दांचे स्पेलिंग अचुक सांगणे / घोकणे / पाठ करणे.

घरातल्या काही निमित्ताने ती टिव्हीवर चालु असलेल्या 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी' ह्या स्पर्धेचा शेवटचा भाग पाहते व आपणही हे बक्षिस मिळवु शकतो अशी एक इच्छा तिच्या मनात निर्माण होते.
अकिलाच्या शिक्षिका व खासकरुन त्या शाळेचे मुख्याध्यापक तिला शाळेतल्या शाळेत होणार्‍या 'दी बी( स्पेलिंग स्पर्धा)' मध्ये भाग घ्यायला लावतात.
ह्या शाळेच्या स्पर्धेत लाजणारी, जनसमुदायासमोर येऊन स्पेलिंग सांगताना आतुन घाबरलेली, समोर होणार्‍या टिंगलटवाळीला वैतागुन गेलेली आणि त्यामुळे थोडी नर्व्हस अन विचलीत होणारी 'अकिला'...
आणि त्या नंतर आधी शाळा, मग जिल्हा, मग राज्य अशा सर्व पातळ्या पार करत थेट 'राष्ट्रीय स्पर्धेला' धैर्याने, मोकळेपणाने आणि एका जबरदस्त आत्मविश्वासाने सामोरी जाऊन स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी अकिला ...
असा हा प्रवास आणि त्याचेच हे चित्रण असलेला 'Akeelah and the Bee' ...

ह्या प्रवासात आपल्याला भेटतात ते स्पेलिंग तज्ज्ञ आणि अकिलाचे कोच असणारे डॉ. लॅरबी, अकिलाबरोबर ह्या विजेतेपदासाठी झुंझणारे झेवियर आणि डिलन नावाचे परस्परांविरुद्ध अ‍ॅटिट्युड असणारे २ विद्यार्थी.
कुठल्याही शब्दाचे स्पेलिंग तयार करताना नुसते पाठांतर न करता त्यामागची पार्श्वभुमी, शब्दाचा उगम असलेली भाषा, जोडाक्षरांचे महत्व, शब्दाची व्याख्या आणि तो शब्द वाक्यात वापरताना त्यामागे असलेले साधारण नियम आणि त्यामागची भुमिका प्रथम समजावुन घेणे आवश्यक असते ह्या तत्वाला चिटकुन राहणारे डॉ. लॅरबी. शब्दाचे स्पेलिंग सांगताना एक लय प्राप्त व्हावी, एकाग्र व्हावे म्हणुन त्याचाही सराव करुन घेणारे डॉ. लॅरबी.
आणि ह्याउलट केवळ स्पेलिंग 'पाठ' करण्याच्या घोकमपट्टी पद्धतीवर विश्वास असणारा डिलन आणि त्याचे वडिल. ह्यासाठीच सर्व इतर छंद आणि विरंगुळा ह्यांना फाटा देणारे डिलन आणि त्याचे वडिल, मजेतल्या खेळातही एकदम खालच्या स्तरातुन आलेल्या अकिलाने चक्क २ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेता असलेल्या डिलनला चांगलेच झुंजावल्याने नाराज आणि अस्वस्थ असणारे डिलनचे वडिल.
ह्या आणि अशा इतर व्यक्तिरेखांद्वारे आपण ह्या संपुर्ण प्रवासात अकिलाबरोबर असतो.

राष्ट्रीय स्पर्धेत शेवटच्या फेरीतला अकिला आणि डिलनचा सामना पाहण्यासारखा आहे. डिलनला ह्यावेळी स्पर्धा जिंकणे आवश्यक असण्याचे प्रेशर समजलेली अकिला, त्यासाठी जी काही मदत करता येईल ते करु म्हणुन मुद्दाम स्पेलिंग चुकणारी अकिला आणि अकिला स्पेलिंग मुद्दाम चुकली आहे हे जाणुन स्वतःही पुढचा शब्द चुकीचा स्पेल करणारा डिलन आणि त्यानंतर दोघांच्यातला संवाद हे सर्व मजेशीर आहे.
अशा चित्रपटचा शेवट नक्की काय होणार हे सर्वांनाच माहित असेल, पण तो कसा होतो हे पाहणे रंजक ठरेल.

ह्या चित्रपटाचे गुणवत्तामुल्य, निर्मीतीमुल्य किंवा अन्य भव्यदिव्यता किती ह्यावर मला काही लिहायचे नाही, ते महत्वाचे नाही.
पण २ तास निखळ मनोरंजन करणारा आणि 'स्पेलिंग बी' सारख्या वेगळ्या विषयाला हाताळणारा हा चित्रपट पाहणे नक्कीच एक चांगला अनुभव असेल ...

टीप : छायाचित्र आंतरजालावर साभार

विकिपेडियावर असलेली ह्या चित्रपटाची माहिती
आयएमडीबीवर ह्या चित्रपटाचे परिक्षण

Monday, July 4, 2011

गंमतशीर बातमी - गंमतशीर निर्णय - गंमतशीर कनेक्टिव्हीटी - गंमतच गंमत ...

आज बर्याच दिवसांनी एक निखळ मनोरंजन करणारी बातमी वाचायला मिळाली ह्या बातमीची आम्हाला खुप गंमत वाटल्याने ती वाचकांसमोर ठेवण्याच्या मोह आम्हाला आवरला नाही.
गंमतच गंमत ...

http://72.78.249.107/esakal/20110704/4700594298586467547.htm

थोडक्यात सार असे ...

"कनेक्टिंग इंडिया'चा नारा देणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेडने आता "कनेक्टिंग ओबीसी मिशन' हाती घेतले आहे. राज्यातील ओबीसी समाजाच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क "ओबीसी टू ओबीसी अनलिमिटेड फ्री ग्रुप कॉलिंग'ची अभिनव योजना सुरू केली आहे, त्यामुळे "ओबीसी' असणाऱ्या सर्वांना अगदी फुकटात गप्पा मारता येणार आहेत. मंडल आयोगात समाविष्ट करण्यात आलेल्या ओबीसींच्या 357 जाती या योजनेत एकमेकांशी जोडण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

राज्यात ओबीसींच्या जातींचे संघटन करणाऱ्या ओबीसी सत्यशोधक परिषदेच्या मेंदूतून या योजनेने जन्म घेतला आहे. परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यानंतर बीएसएनएलच्या मुख्य महाव्यवस्थापकांसमोर ही योजना मांडली. अर्थात, त्यांनीही या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. सर्व कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर "ओबीसी टू ओबीसी' फ्री कॉलिंगची संकल्पना अस्तित्वात आली, असे सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्याचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी "सकाळ'ला सांगितले.

मंडल आयोगात समावेश असणाऱ्या महाराष्ट्रातील रंगारी, भावसार, शिंपी, साळी, तेली, परीट, नाभिक, सुतार, लोहार, आतार, बागवान, कासार, झुल्लीया, माळी, कोळी, धनगर, बंजारा, वंजारी, गुरव, गवळी, जैन, कोष्टी आदींसह 357 जातींचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
सत्यशोधक ओबीसी परिषदेमार्फत येत्या तीन महिन्यांत सहा हजार ओबीसींना या योजनेच्या माध्यमातून बीएसएनएल सत्यशोधक ओबीसी परिषदेशी "कनेक्' करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आहे की नाही गंमत ?
म्हणजे एकगठ्ठा मतांसाठी केले जाणारे राजकारण आणि त्यासाठी आणल्या जाणार्या योजना किती गंमतशीर असतात ह्याची उदाहरणे कित्येक आहेत, पण आज ह्या निर्णयाने सर्वांवर डायरेक्ट धोबीपछाड डाव टाकला आहे.
मला ह्यातले लॉजिक नाय समजले.
सध्या ओबीसी समाजाला किती आरक्षण आहे वगैरे ह्या भानगडीत पडता मी साधारणता भारतातले ३०% लोक ओबीसी आहेत असे मानतो ( अरे, ही फिगर तर 'बहुसंख्य' कडे चालली आहे, असो ). त्यांना 'संधी' उपलब्ध व्हाव्यात म्हणुन मदत, शिक्षणाच्या पद्धतीत सवलत, आर्थिक फायदे, नोकर्यात आरक्षण वगैरे समजु शकतो पण हे 'अनलिमिटेड बोला' ही सवलत म्हणजे नक्की काय ?

असो, मला टिका वगैरे करायची नाही, टिका करणारे आम्ही कोण त्याने काय फरक पडतो हे सत्य माहित आहेच.

पण लेट्स एंजॉय.
आपण काय करु की ह्या सरकारी संस्थांना अशाच 'सुपीक' आयडिया सुचवु, म्हणजे कसे विकासाचा मक्ता एकटा काय सरकारनेच घेतला नाही, आपणही मदतीचा हात देऊ शकतो अशी माझी प्रामाणिक भावना आहे.

असो, तर खालील उपाय मला 'पटकन' सुचले आहेत, पुढेमागे ह्याची अंमलबजावणी झाली तर माझा एखाद्या 'पद्मश्री' वगैरे पुरस्कारासाठी विचार व्हावा असा एक प्रस्ताव जाताजाता मांड्तो.

. 'अबक' ह्या जाती-जमातींवर खुप वर्षे अन्याय झाला आहे त्यांना आता ह्याबाबत बोलता यावे म्हणुन मोबाईल बीलात ५०% सवलत.
. 'क्ष' वर जरा जास्तीच अन्याय झाला किंवा त्यांना सुधारण्याची संधी दिली जावी म्हणुन संपुर्ण बील माफ.
. '' हे फारच मागास आहेत, त्यांना त्वरित 3G तंत्रज्ञान असलेला फोन फुकट दिला जावा आयुष्यभर बील माफ असावे.
. '' ला जास्त शैक्षणिक संधी मिळाव्यात म्हणुन अनलिमिटेड इंटरनेट उपलब्ध करुन द्यावे.
. '' वाले फार माजले आहेत, वर्षानुवर्षे ह्यांनी शोषण केले आहे म्हणुन त्यांचे मोबाईल हिसकावुन घ्यावेत किंवा त्यांना भरमसाट बील येईल व्यवस्था करावी किंवा त्यांना अत्यंत मर्यादीत अशी बँडविड्थ द्यावी.
. '' ह्यांचे आत्तापर्यंत खुप कौतुक झाले आहे, आता त्यांनी एकदम बेसिक हँडसेट वापरावेत दिवसातुन दोनच फोन्स करावेत, इनकमिंगला पैसे पडतील, एसेमेसचे लाड चालणार नाहीत
. '' ह्यांची कंडिशन आता सुधारली आहे, सबब त्यांनी आता येईल ते बील भरावे, भरल्यास निषेध खलिता पाठवीला जाईल.
. 'ज्ञ' हे लोक खुप धोकादायक आहेत, त्यांना मोबाईल वापरण्यास सोडा पण पाहण्यासही बंदी असावी, तसे आढळल्यास देशद्रोहाचा खटला भरण्यात येईल.
. '' लोकांचा संवाद वाढावा म्हणुन त्यांना 'व्हिडिओ कॉलिंग, कॉल कॉन्फरंस' वगैरे सुविध मोफत मिळाव्यात, वापरणे जमत नसल्यास खास 'प्रशिक्षक' पद निर्माण करुन त्यांच्या उपलब्ध संधीत वाढ केली जावी.
.
.
.
इथेच थांबतो ...

काय आहे, आत्ताच एक फोन आला आहे, ते मोबाईल कंपन्यांचे धोरण बिरण बदलायच्या आधी 'इनकमिंग फ्री' म्हणुन बोलुन घेतो, उद्याचे कुणी पाहिले आहे हो.
बाकी ते 'पद्मश्री'चे वगैरे विसरु नका बरं का सर्कारी बाबूलोकं, काही शंका वगैरे असतील तर 'मिस्स कॉल' द्या, मी फोन करतो, कसे ? Wink

एक उद्धट आणि अवांतर चौकशी :
बीएसएनएलकडे 'मुर्ख टु मुर्ख कॉलिंग फ्री' अशी बीलिंग स्कीम आहे का ?
असल्यास मी ह्यासाठी अर्ज करु इच्छितो, सदर चौकशी कुठे करावी हे कळावे. आवश्यक ती प्रमाणपत्रे सादर केली जातील ( सदर लेखही 'मुर्खपणा'चा पुरावा म्हणुन ग्राह्य धरला जावा ही नम्र विनंती )

Tuesday, March 1, 2011

'धोबीघाट' विश्वविजेतेपदाच्या दावेदारांचा - भाग # १ : भारत

टिप :
सदर लेखात क्रिकेट आणि भारतीय संघाविषयी काही टोकाची आणि प्रामाणिक मते आढळतील, ती वाचुन आपल्याला अस्वस्थ वाटत आहे असे वाटल्यास त्या क्षणी लेखाचे वाचन थांबवावे अशी आग्रहाची विनंती.
----------------------------
कबुल केल्याप्रमाणे आम्ही आमच्या 'धोबीघाट' लेखामालेचे दुसरे पुष्प घेऊन ह्या विश्वचषकाच्या मौहोलात दाखल झालो आहोत, गेल्या काही सामन्यातले भारतीय संघाचे प्रदर्शन पाहुन आम्ही पहिल्या भागात जे उत्साहाने 'दुसरा भाग टीम इंडियाला समर्पित' असे लिहले होते त्याचे बरे वाटले, निदान आम्ही शब्द मोडल्याचे पाप आम्हाला लागणार नाही आणि आम्ही आता ह्या लेखात टिम इंडियाचा फुल्टु धोबीघाट करणार आहोत, असो.

ह्यावेळेसही म्हणे भारतीय संघ विश्वविजेतेपदाच्या शर्यतीत आहे, मला हे ऐकुन आश्चर्य नाही वाटले, मला 'ह्यावर्षी पतंगराव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत' ह्या वाक्याची जितकी सवय झाली आहे तितकीच 'भारत ह्यावर्षी क्रिकेट विश्वचषकाचा दावेदार' ह्या वाक्याची झाली आहे. पतंगरावांच्या संदर्भातले वाक्य मी दर ५ वर्षांनी वाचतो आणि क्रिकेटचे ४ वर्षांनी एवढाच काय तो फरक, बाकी काय होतेय ते मी पाहिले आहे आणि तुम्हीही पहात आहात. माझा तर आजकाल 'महागाई कमी होणार', 'स्वतःच्या घराचे स्वप्न मध्यमवर्गाच्या आवाक्यात येणार', 'भारत अतिरेकी संघटनांच्या नाड्या आवळणार' ह्यापासुन ते थेट आत्तापर्यंतचे 'स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार देणार' ही वाक्ये जशी कायम जनतेच्या डोळ्यात धुळ फेकुन राज्यसत्ता भोगण्यासाठी वापरुन वापरुन गुळगुळीत झाली आहेत तसेच 'भारत यंदा विश्वचषक जिंकणार' हे वाक्य क्रिकेटवेड्या जन्तेच्या खिशातला पैसा काढण्यासाठी वापरुन वापरुन गुळगुळीत झाले आहे असे वाटते, रिझल्ट तर तुमच्यासमोर आहेत, नै का ?

तरी बघा ह्या विश्वचषकात आयोजकांनीच मस्त चालुपणा केला आहे, मागच्यावेळी जेव्हा भारत-पाकिस्तान प्राथमिक फेरीतच गारद होऊन बाहेर पडल्यावर ह्या आयोजकांचा जो सुफडा साफ झाला होता त्यातुन बाहेर पडण्यासाठी त्यांना थेट "२०-२०" नावाचे उत्तेजक घ्यावे लागले, असो ह्यावर आम्ही मागच्या भागात पुरेसे भाष्य केले आहेच. तर मी काय सांगत होतो की ह्यावेळी चालुपणा करुन एकुण १४ संघांचे २ गट पाडले ( प्रत्येक गटात साधारण ३ फालतु टिम ) आणि त्या-त्या गटातुन ४ संघ पुढच्या फेरीत दाखल होतील असा नियम काढला.
आहे की नै गंमत, म्हणजे ओढुन ताणुन का होईना टॉप संघाना ( माझा व्ह्यु बिझीनेसचा, बाकी क्वालिटी तुम्ही पहा ) पुढची फेरी सुलभ झाली की नै ? एखाद्या बांग्लादेशने भारताला आणि अजुन कुणी पाकिस्तानला हरवले म्हणुन उगाच कोट्यावधींचे लुस्कान नको. ह्याला राजकिय भाषेत "डमी उमेदवार" देणे असे म्हणतात, म्हणजे एखाद्या मतदारसंघात एखाद्या मातब्बर नेत्याच विजय शुअर शॉट फिक्स असेल तर इतर पक्ष समजुतदारपणे उगाच नगाला नग म्हणुन 'डमी उमेदवार' देतात अशी रित आहे राजकारणाची, त्यातुन चमत्कार घडवणारा आणि मोहिते पाटलांसारख्या दिग्गजाला बाहेरचा रस्ता दाखवणार्‍या 'भारत भालकें'सारखा एखादाच आणि तो चमत्कारही एकदाच, हे जर वारंवार घडत असेल तर मग खेळायचे नियमच बदलावे लागतात व तेच आता घडले आहे.
असो, आता भारतासाठी ( किंवा कुठल्याही नामवंत संघासाठी ) पुढची फेरी अलमोस्ट फिक्स आहे, बाकीचे लिंबुटिंबु इथे खेळतात ह्याचीच चैन आहे, काही जण 'का खेळतात' हा प्रश्नच आहे.

असो, सध्या भारतीय संघाच्या मजबुत बांधणीचा आणि भयंकर फॉर्मचा वारंवार वास्ताँ दिला जातो, हे अर्थातच स्वाभाविकच आहे की हे असावेच लागते, हे सगळ्यांचे असते. मला सांगा तुम्ही एखाद्या संघाच्या कर्णधाराला "जाऊ दे, एवढ्या वेळी आमची टिम काय फॉर्ममध्ये नाही, बॅटिंगची बोंबाबोंब आहे आणि बॉलर्स तर हातापाया पडुन आणले आहेत. बहुतेक आम्ही पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळू" असे बोलणे ऐकले आहे काय ? अहो विश्वचषकात खेळताय ना, मग चांगला फॉर्म आणि मजबुत बांधणी असणे अपेक्षितच आहे, अन्यथा संघ काय प्रतिस्पर्ध्यांच्या दाढ्या करायला पाठविला आहे की त्यांना मॉलिश द्यायला.
बाकी राहिली आकडेवारी, त्याचे कुणाला सांगताय ? मागच्यावेळी काय ही आकडेवारी नव्हती का ?

बाकी गेल्या काही दिवसात २ सामने थोडे थोडे पाहिले हो भारतीय संघाचे, भरुन आले बघा ह्या क्रिकेटचे बदलते स्वरुप पाहुन, च्यायला प्रत्येक डावात ३००+ ? अरे खेळपट्टी बनवता की गुळगुळीत पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे बांधता ? जरा तरी त्या 'गोलंदाज' नावाच्या एकेकाळी क्रिकेटचा महत्वाचा भाग समजले जाण्यार्‍या लोकांवर दया करा.
तर ते असो, आपण बोलु भारतीय संघाचे, तर भारतीय संघाने प्रत्येक सामन्यात ३००+ धावा ठोकल्या, सुरेखच आहे, फलंदाजांचे निर्विवाद यश आहे. अहो पण नंतर समोरचा संघही 'अलमोस्ट तेवढ्याच' धावा करतो ह्याला काय अर्थ आहे ? आपली बॉलिंग आहे का मजाक ? जर आपण 'असेच' खेळणार असु तर सर्वच गोलंदाजांचा घरी बसवुन ११ च्या ११ फलंदाज खेळवायला काय हरकत आहे ? एखाद्या ओव्हरमध्ये २-३ विकेट्स काढणे आणि उरलेल्यांमध्ये धु-धु धुतला जाणे ह्याला मी 'श्रेष्ठ गोलंदाजी' मानत नाही, त्या मिळालेल्या विकेट्स योगायोग आहेत. एखाद्याने टेचात १० पैकी २-३ ओव्हर्स मेडन टाकाव्यात, एकुणात जास्तीत जास्त ३५-४० धावा द्याव्यात आणि मग ज्या काही असतील त्या 'विकेट्स' घ्याव्यात, त्याला म्हणतात बॉलिंग. नाहीतर ह्या स्पेशॅलिस्ट बॉलर्स ( पक्षी : जहीर, नेहरा, मुनाफ वगैरे ) आणि पार्टटाईम बॉलर्स ( युवी, रैना आणि इतर ) ह्या गटांमध्ये फरक काय राहिला ?
फरक रहातच नसेल तर ह्यांना खेळवुन उगाच ३-४ चांगले फलंदाज आणि फिल्डर्स का कमी खेळवावेत, कारण एकदा का फलंदाजांकडुन खा-खा मार खाल्यावर ह्या बॉलर्सचा मैदानावर काय उपयोग असतो ? मुनाफला बॉलिंग झाल्यावर कुठे लपवावे हा प्रश्नच असतो कारण आपल्या स्पेशॅलिस्ट बोलर्सचे 'क्षेत्ररक्षण' हा सरकारी कारभारामधली 'पारदर्शता' इतकाच रोचक आणि संशोधनाचा विषय आहे.

असो, आता आम्ही काही निवडक खेळाडुंबद्दल ४ शब्द लिहणार आहोत.
१. विरेंद्र सेहवाग उर्फ नवाब :
खरे तर नवाब हे चुकीचे संबोधन आहे, सेहवागचे व्यक्तिमत्व जुळते ते सातारच्या राजे भोसल्यांशी. कृती आणि एकुणच वागण्यात तोच बेधडकपणा, तीच बेफिकिरी आणि तोच निडरपणा. मनापासुन खेळला तर समोरच्यांच्या चिंधड्या आणि मुड नसलाच तर 'तुमचा खेळ आणि तुम्ही गेलात चुलीत. मी मला वाटतो तसा शॉट मारणार, बाकी तुम्ही बघुन घ्या' ही वृत्ती.
क्षेत्ररक्षणात उगाच म्हणायचे म्हणुन चांगला फिल्डर, बाकी एखाद्या लग्नात जसा वरपक्षाकडच्या काकांच्या 'ताटे मोजायला मी इथे काय मोजणी कारकुन म्हणुन आलो आहे काय' सारखाच 'इथे क्रिकेटमध्ये मला काय डाय मारुन बॉल आडवायला आणले आहे काय, माझे काम बॅटिंग व तेच मी करणार' हा अ‍ॅटिट्युड.
चौकातला मवाली जसा परिणाम माहित असुन मोहल्ल्याबाहेरची पोरगी छेडतो आणि मार खातो तसेच हे नवाबसाहेबपण नेहमी 'ऑफ स्टंपबाहेरचा चेंडु छेडतात आणि विकेट टाकतात'. चालायचेच, मवाली आणि सेहवाग दोघेही सुधारणार नाहीत, सुधारले तर त्यांना अनुक्रमे मवाली आणि सेहवाग का म्हणावे बरं ?

२. युवराज सिंग :
स्वातंत्रसंग्रामाच्या काळात जसे चोरीसाठी तुरुंगात गेलेले काही लोक स्वातंत्र्यानंतर ताम्रपत्र घेऊन 'स्वातंत्रसैनिक' झाले आणि त्या तुरुंगवासाच्या पुण्याईवर आयुष्यभर 'मानाचे पान' घेऊ लागले तसेच 'नॅटवेस्ट सेरिजमधली एक खेळी आणि ६ चेंडुत ६ सिक्सर' ह्यांच्या पुण्याईवर युवराज किती दिवस संघात मिरवणार आहे ते गांधीबाबांना माहीत.
एकेकाळी हा तंदुरुस्त आणि चपळ होता, आता नुसता त्याचा ढोल झाला आहे तो ही खणखणीत वाजत नाही, मैदानावर धावतो तर असे वाटते मायला ह्याला पळताना धाप वगैरे लागुन मैदानावरच 'प्राणवायु' द्यावा लागेल की काय ?
त्याला एकेकाळी भारताचा 'जाँटी र्‍होड्स' असे म्हणत, आजकाल त्याला 'मुनाफ पटेल' असे टोपणनाव आहे व ते चारचौघात उच्चारायला बंदी आहे, मुनाफचा म्हणे अपमान होतो, होत असेल, आम्हाला जास्त माहित नाही.
सध्या महाराष्ट्रात रस्त्यांची जी हालत आहे तीच युवीच्या फॉर्मची आहे ... थर्डक्लास.
सध्या टिमच्या यशापयशात युवीचे काँट्रीब्युशन किती .... ( सुरेशजींच्या मते ) कॉमनवेल्थ घोटाळ्यात त्यांचाजेवढा सहभाग होता तेवढेच.
युवीकडुन अपेक्षा किती ठेवाव्यात ..... कांद्याकडुन ठेवता तितक्याच, डोळ्यात नक्की पाणी आणेल. कांदा जसा भाव चढले की ग्राहकांच्या आणि उतरले की उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणतो तसाच युवी खेळला तर समोरच्या संघाच्या आणि गंडला तर आपल्याच संघ आणि समर्थकांच्या डोळ्यात पाणी आणतो.

३. युसुफ पठाण :
कुणाच्याही एखाद्याच्या घरी जसे एखाद्या दिवशी इरेस पेटुन बाबा स्वतः संपुर्ण स्वयंपाक करतात आणि तो खरोखर उत्कृष्ट होतो तसेच युसुफचे आहे, एखाद्या दिवशी तो खरेच नजर लागेल असे खेळतो. पण शेवटी बाबा रोज स्वयंपाक करु शकत नाहीत आणि युसुफही प्रत्येकवेळी खेळु शकत नाही.
कित्येक वर्ष एकाच वर्गात काढलेल्या एखाद्या टग्याला (सध्याच्या अर्थाने दादा नव्हे, तो विषय नंतर कधीतरी ) लेक्चरला पाहुन एखादा नवा जॉइन झालेला मास्तर जसा गर्भगळित होतो तसे युसुफ मैदानात फलंदाजीला उतरल्यावर 'आता काय वाढुन ठेवले आहे' ह्या विचाराने समोरच्या संघाचेही तेच हाल होतात. पण दोन्हीतली साम्य आहे, टग्या कधीतरीच असे वर्गात घुसतो तसाच युसुफ 'कधीतरी' समोरच्या संघाला बडवतो, अन्यथा टग्या नेहमी कँटिनला पडिक असतो आणि युसुफ हातघाई करुन पुन्हा पॅव्हेलियनमध्ये जाऊन बसतो.
अजुन काय लिहणे, 'कधीतरी'च ह्या प्रसंगासाठी किती लिहावे ?
बाकी लोक त्याला फलंदाज मानत नाहीत, तो फलंदाज नाहीही, पण त्याने फरक पडत नाही.
आजकाल तो पार्टटाईम गोलंदाजीही करतो, करावी लागते, त्याच्याकडुन नेहमीच धावा निघत नसल्याने त्याला अशी इतर कामे करावी लागतात, एखाद्या दिवशी तो स्वतःच 'अंपायरची टोपी' घालुन मैदानात उभा राहिला तर आश्चर्य वाटुन घेऊ नका, एवढेच समजा की आज त्याचा 'बॅटिंग-डे' नाही व तो मैदानावर 'इतर' कामे करत आहे.

४. महेंद्रसिंग धोनी :
धोनी भारताचा कॅप्टन असणे आणि गडकरीसाहेब भाजपाचे राष्ट्रिय अध्यक्ष असणे ह्यातले विलक्षण साम्य तुमच्या लक्षात येत नसेल तर माय लॉर्ड यु नीड सम थरो स्टडी. दोघांनाही करायचे काहीच नसते, मात्र काहीही झाले की मिरवायचे मात्र असते.
झालच तर जणु सगळे काही माझ्यामुळेच घडते आहे हा मजेशीर अ‍ॅटिट्युडही असावा लागतो.
मधुन आधुन एखादे गंमतशीर आणि वादग्रस्त स्टेटमेंट द्यायचे असते हे ही त्यांचे एक्स्ट्रा काम.
असे म्हणतात की भाजपाचा अध्यक्ष नेहमीच कमनशिबी असतो, धोनीही नेहमीच 'टॉस हारतो' ( पुढेमागे त्याचा हा गुण त्याला भाजपाच्या अध्यक्षपदापर्यंत घेऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही ).
भाजपाचा अध्यक्ष शक्यतो थेट लोकसभा, विधानसभा वगैरे निवडणुका लढवत नाही, आपला धोनी पण शक्यतो 'न खेळण्याची' परंपरा पाळण्याची पुरेपुर काळजी घेतो.
एक काळ होता की गडकरींनी धडाडीने 'मुंबई-पुणे महामार्गाचे काम एकहाती संपवले होते' आणि धोनीही एकेकाळी 'एकहाती सामना संपवुन टाकायचा', आय रिपिट ... एकेकाळी !

५. जहीर खान :
तुम्ही कधी साऊथ इंडियन पिक्चर बघता का हो ?
त्यात की नै एक दणकेबाज व्हिलन असतो, त्याचे मस्त चालले असते, पुरेपुर दहशत असते व त्याला स्मरुन तो राडे घालत असतो व पब्लिक बर्‍यापैकी त्याला 'डरुन' असते. त्याने अलाण्या-फलाण्या दिवशी भररस्त्यावर एखाद्याला रक्तबंबाळ होईपर्यंत तुंबलेला प्रसंग लोकांमध्ये त्याचा 'खौफ' निर्माण करण्यास पुरेसे ठरत असते, तो ह्यावर आयुष्यभव सुखाने जगु शकत असतो.
पण एके दिवशी अशुभ मुहुर्तावर तो डोक्यात हवा जाऊन चुकुन सिनेमाच्या हिरोला 'ललकारतो' व मित्रांनो इथे त्या व्हिलनची 'कहानी खतम' होते.
जहीरचे सेमच आहे बघा, त्याचे यॉर्कर्स, त्याचा स्विंग, त्याचे बाउंसर्स आणि लाईन & लेन्थ सारे सारे पुरेपुर खौफ निर्माण करणारे आहे.
पण गंमत अशी आहे की जहीरच्या नेमके महत्वाच्या क्षणी डोक्यात हवा जाते व तो प्रतिस्पर्ध्यांच्या 'हिरो बॅट्समन्सना' खुन्नस वगैरे देतो व इथे रक्तपाताला सुरवात होते, आठवा २००३ ची भारत वि. ऑस्ट्रेलिया फायनल, बस बस आम्हाला जहीरबद्दल एवढेच लिहायचे आहे, पुर्णविराम

६. हरभजनसिंग :
भज्जी म्हणजे देवानंद, वाढत्या वयात आणि ढासळत्या क्वालिटीतही झळकण्याची हौस.
माय लॉर्ड, एक काळ होता की देवानंदच्या केसांच्या श्टायलीत आणि त्याच्या अदांमध्ये एक आख्खी पिढी वेडी झाली. भज्जीच्या चढत्या काळातही त्याच्या फिरकीच्या जादुने स्टिव्ह-वॉ च्या ऑसिजचे बलाढ्य साम्राज्य उध्वस्त केले.
पण जुनी पुण्याई किती दिवस पुरवुन खाणार महाराज ?
एके काळी ह्याचे बॉल वळत होते आणि ह्याला विकेट्स पडत होत्या. आता उगाच दुसरा पर्याय नाही म्हणुन पुर्वपुण्याईमुळे ह्याला स्टार्टिंग-११ मध्येखेळवणे म्हणजे वय होऊनसुद्धा करुणानिधींनी अट्टाहासाने स्वत:ला मुख्यमंत्री म्हणुन मिरवणे.
बाकी भज्जी हा 'नव-डे' चा गोलंदाज नाहीच. लावा बरं ३-४ क्लोजिंग फिल्डर्स, २ स्लिप्स आणि द्या ४ दिवस जुन्या खेळपट्टीवर ७० षटके वापरलेला चेंड्य भज्जीच्या हातात, फिर मॅजिक देखो साब !

७. श्रीशांत :
प्रत्येक वर्गात, प्रत्येक हापिसात आणि बहुतेक प्रत्येकच ठिकाणी 'च्यायला एकदा ह्याला कोपच्यात घेऊन बडवला पाहिजे, लै मस्ती आलीय ह्याला फुकटची' टाईपचा एक तरी मुलगा असतोच, टिम इंडियामध्ये 'श्रीशांत' आहे बॉस.
प्रत्येकाला जसा आपल्या मॅनेजर ह्या खुर्चीवर का बसतो हा प्रश्न पडतो तसेच मलाही 'श्रीशांत टिममध्ये का आहे' असा प्रश्न पडतो.
प्रत्येक ग्रुपमध्ये जसा एखादा फालतु कमेम्ट्स टाकणारा, उगाच लक्ष वेधुन घेणारा, आढ्यतखोर महामुर्ख मनुक्ष असतो तसा मेहरबान आपल्या टिममध्ये 'श्रीशांत' आहे.

८. मुनाफ पटेल :
अगदी प्रामाणिक, पापभिरु, कचखाऊ, दिवाभित पांढरपेशी मध्यमवर्गीय व्यक्ती, कुठल्याही महानगरात हटकुन आढणारी. रोजच्या कामात काडीचा उत्साह नसल्याने रडत-खुडत हापिसला जाणारी, तोंड वेडेवाकडे करुन काम करणारी आणि घरी परत आल्यावर संपुर्ण कंटाळुन कशातही रस न घेता अंथरुणावर अंग टाकणारी व हेच जीवन वर्षानुवर्षे जगणार्‍या एका मोठ्ठ्या समुदायाचा टिम इंडियातला प्रतिनिधी म्हणजे 'मुनाफ पटेल'.
गोलंदाजीचे काम जमेल तेवढ्याच प्रामाणिकपणे करणारा, त्यातही तोंड वेडेवाकडे न पडणारा, फिल्डिंग आणि बॅटिंग ह्यासारख्या समाजकार्यात अजिबातच रस न घेणारा आणि कुठल्याच बाबतीत स्वतःचे मत नसल्याने वादात न पडणारा हा नाकासमोर चालणारा 'मुनाफ'.
किती अपेक्षा ठेवायच्या तुम्हीच ठरवा, वाढत्या अनुभवामुळे जरा समंजस आणि समजुतदार वाटतो आहे तरी धडाडीची भयंकर कमतरता आहे.

९. आर. अश्विन :
केवळ आयपीएलच्या चेन्नै टिममध्ये खेळल्याने जर ( श्रीकांतच्या कृपेने ) इंडियन क्रिकेटमध्ये वर्णी लागत असेल बिलिव्ह मी ह्या रेटने आपल्या सपोर्ट स्टाफमधले निम्म्यांच्या वर चेन्नैच्या चेपॉक स्टेडियमबाहेर नारळ पाणी, इडली-वडा सांबार विकणे असा व्यवसाय करत असतील किंवा सरळ दणक्यात रजनीची गाणी लाऊन चेन्नैमध्ये रिक्षा पळवत असतील.
मला ह्याच्या निवडीतले लॉजिक समजले नाही तर मी काय कप्पाळ कमेंट करणार ?

असो, मजेमजेत बरेच काही लिहुन झाले.
भारत जिंकेल का वगैरे असल्या फालतु प्रश्नांना उत्तरे द्यायला आम्ही बांधिल नाही, कोणीही जिंको पण खेळाचा विजय होईल असे युसलेस इमोशनल ब्लॅकमेलही नका करु, बिझीनेसमात्र 'येकदम कडक' होणार ह्यात अजिबात वाद नाही.
तशी सेटिंग झाली आहे म्हणतात

तुम्हाला हे आवडो किंवा ह्याचा बेक्कार राग येवो, आम्ही ही स्पर्धा संपोस्तोवर मधुनाआधुन पिंका टाकत राहणारच.
अहो सध्याच्या 'भाजपा'चा आम्हाला जरी बेक्कार राग येत असला म्हणुन काय आम्ही 'राजकारण गेलं चुकीत' असे म्हणुन टिपीकल मध्यमवर्गिय होऊ का ?
सध्याचे क्रिकेट नाही आवडत, खुप राग येतो, बघवत नाही, तरीही मधुनाअधुन पाहणार आणि त्यावर उगाच असे खरडणार.

तळटिप :
ह्या सर्व हजेरीत 'सचिन तेंडुलकर' इसमास मुद्दामुनच नाही घेतले, घेऊ नये असे वाटले, त्याच्यावर बोलायला आमच्याकडे आता काही शब्द उरले आहेत असे वाटत नाही.