Wednesday, August 27, 2008

सिंग इज किंग : शुद्ध व निखळ मनोरंजन नव्हे तर "फसवणुक" !!!


.
समजा तुम्ही अतिशय पट्टीचे खवय्ये आहात. चवदार व लजीज अन्न हा तुमचा विक पॉइंट आहे. बाजारात आलेली नवी "चटपटीत डिश" चाखण्यासाठी तुम्ही पैशाचा विचार करत नाही. तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकुन खास "हॉटेलात" जाऊन त्या डिशचा आस्वाद घेता, कुठेतरी नेटवरुन त्याची पाककॄती उतरवुन हेऊन त्याचे घरगुती प्रयोग करुन पैसे वाचवण्याचा नतद्रष्टपणा तुम्ही करत नसता. योग्य मालाच्या व लायकीच्या पदार्थासाठी पाहिजेतेवढा पैसा मोजण्याची तुमची दानत व तयारी असते. पण तुम्ही सध्या आयुष्याच्या कंटाळवाण्या कालखंडातुन मार्गक्रमण करत आहात. काहीच तुमच्या मनासारखे होत नाही. जाईल तिकडे निराशा पदरी पडत आहे. दिवसेंदिवस रटाळ, टाकाऊ, बोगस, बेचव अन्नपदार्थ तुमच्या नशिबी येत आहेत, त्यामुळे जिभेला व मनाला एक प्रकारची बाभळी आली आहे.

त्यात आशेचा किरण म्हणजे गेले काही दिवस एका "प्रसिद्ध हॉटेल" कडुन "लज्जतदार, चवदार व जिभेचे पांग " फेडु शकणार्‍या एका भुतोनभविष्यती अशा "फुडफेस्टीवलची जाहिरात" पेपरातुन प्रसिद्ध होत असते. तुम्ही दररोज त्याची चवदार वर्णने पेपरातुन वाचत असता, त्या जाहिरातीत सांगितल्याप्रमाणे खास झणझणीत पंजाबी स्टाईलचे, मराठमोठ्या साजाचे, मसालेदार मोगलाई पद्धतीचे, चायनीज चस्क्याचे व गुजराती मधुरपणाचे अनेक उत्तमोत्तम पदार्थ येथे तुमचे चोचले पुरवण्यासाठी उपलब्ध असणार आहेत। तुमच्या नजरेत एक वेगळीच चमक येते, मनाला एक उत्साह वाटु लागतो, शरिराला एक तरतरी येते व तुम्ही त्या "खाद्यमहोत्सवात " आपले सीट बुक करण्यासाठी धाव घेता, तुमच्या समव्यसनी मित्रांना पण तुम्ही पटवता व तुमच्या भाग्याने तुम्हाला बुकिंग मिळते सुद्धा. तुम्ही छाती वीतभर जास्तच फुगवुन त्या "बुकिंगची" आपल्या मित्रपरीवारात व इतर ओळखीच्या लोकात जाहीरात करता। काही लोक तुमच्याकडे "तुमची काय बाबा ऐश आहे, आमचे एवढे भाग्य कुठले " असे आसुयेचे उद्गार काढुन त्यांच्या दुर्भाग्याची हळहळ व्यक्त करतात तर काही जाणकार लोक "त्यात काय दम नसतो बाबा, आपली घरची मीठभाकरी बरी" असा निराशेचा सुर काढतात। पण तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रीयेकडे लक्ष द्यायला वेळ नसतो व तुम्ही त्या मानसीक स्थीतीतही नसता. आता तुमच्या रक्तात त्या "खाद्यमहोत्सवाचे खुन सवार झाले असते" व डोक्यात त्याची नशा चढलेली असते.

मग तो सुदीन उजाडतो, तुम्ही अतिशय उत्साहाने त्या "कार्यक्रमस्थळी" जाता. वातावरण एकदम भारलेले आहे. आधी जाहीरात केल्याप्रमाणे सर्व पदार्थांची रेलचेल आहे. अनेक प्रतिष्ठीत व मोठ्ठी मंडळी जेवणासाठी रांगा लाऊन शिस्तीत उभी आहेत. तुमचाही नंबर येतो, तुम्ही तुमच्या जागेवर बसता व तोंडाला पाणी सुतलेल्या अवस्थेत आपल्या समोर डिश येण्याची वाट पाहता. शेवटी तो "सोनीयाचा क्षण" येतो, राजेशाही पोशाख केलेले वाढपी तुमच्यासमोर झाकलेली "सो कॉल्ड लज्जतदार डिश " आणुन ठेवतो। तुम्ही आधाशीपणाने त्याचे झाकण काढुन फेकता व वखवखलेल्या नजरेने त्या डिशकडे पाहता ....

पण हाय रे कर्मा ऽऽऽऽऽ

त्या गाढवांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे अन्नपदार्थ एकाच ताटात वाढण्याचा मुर्खपणा केल्याने त्याच्या चवीचा पार बँड वाजला असतो. सरमिसळ झाल्याने त्याची वेगळी चव अशी लागत नाहीच. जाहीरात केल्याप्रमाणे झणझणीत पंजाबी स्टाईलचे, मराठमोठ्या साजाचे, मसलेदार मोगलाई पद्धतीचे, चायनीज चस्क्याचे व गुजराती मधुरपणाचे अनेक उत्तमोत्तम पदार्थ खरेच तेथे असतात पण त्यांची सरमिसळ झाल्याने तुमचा अपेक्षाभंग होतो. तुम्ही पट्टीचे खाणारे असल्याने असल्या "भेसळीची" तुम्हाला सवय नसते त्यामुळे " श्रीखंड, चायनीज मंचुरीअन, पंजाबी पराठा व तंदुरी चिकन, खमणठोकणा, मटनाचा तांबडा रस्सा, हक्का न्युडल्स, वांग्याचे भरीत" असे उत्तमोत्तम पदार्थ एकाच बैठकीत एकाच ताटात व एकाच वेळी खाण्यास तुमचा तात्वीक विरोध असतो। खल्लास ऽऽऽऽऽ . तुमच्या मुडचा पार बोर्‍या वाजला असतो, आता भरल्या ताटावरुन उठण्यास तुमची तयारी नसते कारण "मोजलेले बक्कळ पैसे व जनलज्जा", त्यामुळे तुम्ही कशीबशी डिश संपवता व आयोजकांना शिव्या देत बाहेर पडता. त्याच तीरमिरीत आयुष्यात पुन्हा कधी असल्या कार्यक्रमाला जाण्याची [ व न पाळली जाणारी ] शप्पथ तुम्ही घेता. त्यानंतर ह्या अनुभवानंतर मित्रात झालेले तुमचे हसे वेगळेच ...एकंदरीत खिशाला चाट बसवणारा व मनोसोक्त मनस्ताप देणारा हा अनुभव ठरतो ...

नक्की चुक कोठे झाली ?
तुमच्या साईडने तर तुम्ही अगदी अचुक आहात, मग नक्की बिघडले काय ?
ह्याचे उत्तर आहे "कुटलीही पुर्वचौकशी न करता अन्नपदार्थावर भुलुन आयोजकांवर ठेवलेला अंधविश्वास" ....
ह्याला काही उत्तर नसते तुमच्याकडे कारण हा तर तुमचा "वीक पॉईंट" !!!

नेमके हेच "सिंग इज किंग" नामक सध्या "सो कॉल्ड गाजत असलेल्या व यशाचे अनेक विक्रम उद्धवस्त " करणार्‍या चित्रपटाबाबत घडते। त्यातल्या कलाकारांच्या पुर्वपुण्याईला भुलुन व प्रचंड जाहीरात होत असलेल्याने व त्यात दाखवलेल्या दॄष्यांना भुलुन तुम्ही पदरमोड करुन पिक्चरला जाता हीच ती "घोडचुक" ...

आता थोडेसे स्टोरी बद्दल, मुळात सगळ्यात मोठ्ठी बोंबाबोम्ब इथेच असल्याने मी काय लिहणार हा प्रश्न आहे।तरीपण जनरीती प्रमाणे काही तरी लिहावेच लागेल ...

तर त्याचे असे आहे की चित्रपटाचा नायक "हॅप्पी सिंग [ अक्षयकुमार ] " पंजाबातल्या एका कुठल्याश्या खेड्यात रहात असतो. तो लहानपणापासुनच थोडासा अर्धवट, महामुर्ख, अडाणी, बालीश, लाडोबा व तरीही इतरांच्या मदतीला धावून जाणारा, गावकऱ्यांच्या खोड्या करणारा काहीसा साधाभोळा, थोडास बनेल, मोकळा ढाकळा शीख तरुण आहे. आता एवढ्या भुमीका तो एकाच वेळी कशा सांभाळतो हा एक प्रश्न आपल्याला पडतो पण दिग्ददर्शक असल्या मुलभुत भावनेतुन दुर जाऊन अतिशय उच्च पदाला पोहचल्याने त्यांना हा प्रश्न पडला नसावा. त्याचा एक मित्र "रंगीला [ ओम पुरी ] ", हा हॅप्पी पेक्षा किंचीत कमी पण तसाच अर्धवट, महामुर्ख, अडाणी, बालीश. ह्या दोघांनी आपला " महान कॄत्यांनी" गावकर्‍यांना पुरते हैराण केले असते व ते बिचारे हतबल झाले असतात। पण मुळात हे दोघे "लाडोबा" असल्याने त्यांना कुणी समजावुन सांगण्याचा वा समज देण्याचे दुष्कॄत्य करत नाही व ह्यांचे चाळे चालु राहतात. ह्यांच्या हाताला काम व डोक्याला ताण नसल्याने ह्यांना अनेक अफाट कल्पना सुचत असतात, त्यातल्या एका प्रसंगात हॅप्पी सिंग एक कोंबडी पकडण्यासाठी निम्मे गाव खाली झोपवतो व त्यांच्या नुकसानीची पर्वा न करता " कोंबडी पकडली की नाही" असा आव आणुन ताठ मानेने फिरक असतो. गावकरी ह्यांना काहीतरी कारण काढुन गावाबाहेर हकलुन देण्याच्या संधीच्या शोधात असतात. त्यच्यामध्ये ह्यांचे चाळे चालुच असतात व इकडे आपली कवटी सरकत असते. कारण कुठल्याही अंगविक्षेपाला वा पाचकणाला पोट धरुन हासायला आपण काही युपी/बिहारचे भैय्या प्रेक्षक किंवा नवज्योतसिंग सिद्धु नसतो.असो.

त्याच्यादरम्यानच त्यांच्यांच गावचा एक सुपुत्र "लकी सिंग [ सोनु सुद - चांगला कलाकार आहे बिचारा ] " हा ऑस्ट्रेलियात जाऊन डॉन बनला असतो व त्याचे तिकडे ११ भाई गँग्स व ११ देशातल्या पोलीसांशी चांगलेच वाजले असते। त्यातुनच त्याच्यावर एक "खुनी हल्ला" होतो, तो जखमी होतो, ती खबर एकडे पंजाबातल्या गावात येते, त्याचे वडील आजारी पडतात व लकीला परत आणा असा हट्ट धरतात. गावकर्‍यांनी ही चांगली संधी वाटते, ते "हॅपी व रंगीला" यांना ह्या कामगिरीवर पाठवतात व आयुष्यात कधीही गावाची वेस न ओलांडलेले दोघे डायरेक्ट ऑस्ट्रेलियाला निघतात...

इथपर्यंत आपण पिक्चर कसाबसा सहन करु शकतो ...
त्यानंतर जो मुर्खपणाचा कळस सुरु होतो त्याला तोड नाही आणि उत्तर तर नाहीच नाही ...

त्या प्रवासाच्या दरम्यान ह्या २ अर्धवट गाढवांचे तिकीट दुसर्‍याशी अदल्याबदल झाल्याने ते इजिप्तला जातात व तिकडे "पटकथेच्या मागणीनुसार" त्यांना "सोनिया [ कतरिना कैफ ] " भेटते. आता हे इजिप्तला कसे जातात? त्यांना सोडते कोण ? तिकडे त्यांची व्यवस्था काय ? व्हिसाचे काय ?असले मला पडनारे क्षुल्लक त्यांना पडत नाहीत व ते त्याची काळजीही करत नाहीत। असो. त्यानंतर त्यांना मधीच आठवते की आपल्याला तर ऑस्ट्रेलियाला जायचे होते, मग पुन्हा गाडी ऑस्ट्रेलियात पोहचते व ह्यापुढचा समस्त गाढवपणा, हैदोस, पाचकळपणा हा ऑस्ट्रेलिया ह्या देशी घडतो [ व आपल्याला मस्त "देशी" पिऊन शांत झोपावे अशी इच्छा होते ]....
तर होते काय की ह्या गडबडीत त्या खर्‍या "किंग उर्फ लक्की" वर पुन्हा एक हल्ला होऊन तो जायबंदी होतो व त्यांच्यासमोर आता आपला नेता कोण हा प्रश्न पडतो. दुसरे कोणी "लायक" न सापडल्याने पुन्हा एकदा "पटकथेच्या मागणीनुसार" हे लोक "हॅप्पी सिंग उर्फ अक्षयकुमारला" नवा किंग म्हनुन घोषीत करतात. मला नाही झेपला हा प्रकार. ४ शब्द सरळ बोलता येत नसलेला, अक्षरश : अर्धवट, महामुर्ख, अडाणी, बालीश हा "हॅप्पी सिंग" कुठल्या कर्तुत्वाने "किंग" होण्यास लायक होतो. फक्त डोक्यावर पगडी हा नॉर्म असेल तर "हरभजसिंगने" काय घोडे मारलेय ? [ तसा तो पण थोडा अर्धवट आहे म्हणा पण तो आपला विषय नाही.]

आता आम्ही सावरुन बसतो, डोक्याने अधु ब बुद्धीने अर्धवट असलेला "हॅप्पी" त्याच्या अंगच्या गुणामुळे काही तरी धमाल उडवुन देणार व ज्यासाठी आपण एवढे रुपडे मोजले तो "अफाट विनोदी शिन्स" पहायला भेटणार ...
पण नाही। सगळे मुसळ शेवटी केरातच !

पण मुळात गुंडगिरीला विरोध असणारा हॅप्पी हा किंग झाल्याझाल्या एकदम "बापु, भय्या, अम्मा, महाराज" टाईप वागायला लागतो व कुत्र्याचे वाकडे शेपुट सरळ [ म्हणजे त्या गुंडांना सुधरवायच्या ] करायच्या मागे लागतो। त्याला संधीही तशी मिळते. आरंभीच्या त्याच्या ऑस्ट्रेलियात हलाखीच्या काळात म्हणजे जेव्हा " लक्की खाऊ घालीना व पगडी भीक मागु देईना" अशी परिस्थीती असते तेव्हा त्याला मदत करणार्‍या [ फुलाचे दुकान चालवणार्‍या ] एका बाईच्या पोरीच्या सुखासाठी एक नवे नाटक तो उभारायचे ठरवतो. त्याच्या सुदैवाने [ व आपल्या दुर्दैवाने] ती कन्या म्हणजे खुद्द "सोनिया" निघते। आता बोला ! काय बोलणार, ती तर पटकथेची मागणी, आपण हाताची घडी आणि कपाळावर बोट. त्यात भर म्हणुन ती बरोबर आपला बॉयफ्रेंड "पुनीत [ रणवीर शौरी , तोच तो थप्पडखाऊ अभिनेता. आठवा "अग्ली & पग्ली ". जाऊ दे, कशाला आठवताय, फुकट डोक्याला शॉट ] यालाही बरोबर आणते. मग त्या [ पुर्वाश्रमीच्या श्रीमंत ] बाई ची इज्जत जाऊ नये म्हणुन हा नवा किंग अख्ख्या गँगला एका पोरकट खेळात ओढतो व अख्ख्या पिक्चरचा खेळखंडोबा करतो.

इथुन पुढे मी माझे [ पगडी नसलेले ] डोके चालवण्याचा व वापरण्याचा निष्फळ प्रयत्न सोडला व "दाखविले किंगे तैसेची पहावे, चित्ती असु द्यावे असमाधान" ह्या उक्तीनुसार पुढचा चित्रपट पाहिला ...

नंतर जो प्रेमाचा त्रिकोण आणि त्यासाठीचा त्याग असा भंपक ड्रामा, जिकडे तिकडे फक्त सिंगच , किंग म्हणून कोणीच नाही, सोनिया आणि पुनितचं प्रेमप्रकरण व त्यात हॅप्पीच्या हितचिंतकांची लुडबुड व त्याला हॅप्पीने फटकारणे, काही अगम्य आणि अतर्क्य घटनातुन किंगच्या इरसाल आणि अस्सल गुंड साथ्यांचे मानसीक परिवर्तन, सोनियाला सच्च्या प्रेमाचा साक्षात्कार व तिच्या लग्नाच्या वेळी गोंधळात तिचे गडबडीने तिचा हॅप्पीशी होणार विवाह व तिनेही खेळकरपणे याला दिलेली मान्यता हे विनोद, प्रसंग मला नाही झेपले। मात्र ह्या घोळात पिक्चर "झोपला" हे नक्की ...शेवटी तर असा गोंधळ उडतो की "किंग" कुठेच दिसत नाही , सगळीकडे फक्त आणि फक्त पगडीवाले "सिंग" च दिसतात.त्यामुळे आपली डोक्याची पगडी सटकुन सिनेमागॄहात कुठेतरी हरवते ...

शेवटी एकदाचा [ कसाबसा ] सिनेमा संपल्यावर आपण आपली अकलेची पगडी जी तिकीट काढताना मोठ्ठ्या सन्मानाने घातली होती ती आता कुठे हरवली याचा विचार करत चित्रपटगॄहाच्या बाहेर पडतो।

माझा चित्रपटाच्या दिग्दर्शकाला, निर्मात्यांना व कलाकारांना एकच छोटा प्रश्न आहे की " एवढा टाकाऊ, टुकार, भंगार पत्रा लोखंड, पाचकळ, पुचाट सिनेमा तुम्ही कशाच्या जोरावर हिट म्हणता ? पगडी न घालणार्‍या बिनडोक मिडीयाला हाताशी धरुन अवाढव्य उत्पन्नाचे आकडे तोंडावर फेकले की सिनेमा चांगला कसा ठरु शकतो ? पब्लिकचे [ विना पगडेआवाले ] डोके काय पेंड खायला जाते का एवढे उत्पन्न मिळवुन द्यायला ?"

तात्पर्य : हा "सिंग" नावाचा "किंग" आपल्याला चांगलाच "हिंग" लाऊन जातो ...

---[ विना पगडीवाला किंग ] छोटा डॉन

Tuesday, August 5, 2008

प्रसिद्धी : जालकवींच्या कविता: एक आवाहन

ह्या कार्यक्रमाची मुळ संकल्पना " श्री. मिलिंद भांडारकर व श्री. चक्रपाणी चिटणीस" ह्यांची आहे.त्याला पाठिंबा व शक्य ती मदत म्हणुन आम्ही त्यांचे "निवेदन" जसे आहे तसे आमच्या ब्लॉगवर प्रकाशित करत आहोत ह्याची नोंद घ्यावी ....

धन्यवाद !

*******************************************************************

प्रसिद्धी : जालकवींच्या कविता: एक आवाहन

आरंभ: १४/०२/२००९ - ०९:००
समाप्ती: १६/०२/२००९ - २२:००
ठिकाण: सॅन होजे, कॅलिफोर्निया
माहितीचा स्रोत: मिलिंद भांडारकर व चक्रपाणी चिटणीस
.
सॅन फ्रान्सिस्को बे एरिया या आंतरजालाच्या उगमस्थानी होणाऱ्या पहिल्यावहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात "काहीतरी वेगळे" स्वरूपाचा एखादा मराठमोळा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने आंतरजालीय साहित्याशी रसिकांची ओळख करून देणे या हेतूने मिलिंद भांडारकरांना सुचलेल्या एका कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याच्या उद्देशाने हे आवाहन करीत आहे. याबाबतीत संमेलनाच्या संयोजकांशी प्राथमिक बोलणे झाले असून तुमच्याआमच्यासारख्या हौशागवशा जालकवी,जालसाहित्यिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावर कार्यक्रमाचे यश अवलंबून असणार आहे.


कार्यक्रमामागील भूमिका:
आंतरजाल लोकप्रिय झाल्यानंतर प्रकाशनाच्या विविध संधी सहज उपलब्ध झाल्याने साहित्याची लोकाभिमुखता वाढली. मुद्रित साहित्याबरोबरच आणि प्रसंगी त्यापेक्षाही अनुदिन्यांवर प्रकाशित केलेले साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत सहज पोहोचू शकते. अद्याप मराठी साहित्यात हे आमूलाग्र परिवर्तन जरी दिसत नसले, तरी मराठी प्रकाशनाची वाटचालही त्याच दिशेने होत आहे, हे स्पष्ट आहे. मराठी अनुदिन्यांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांत झालेली अमाप वाढ ही त्या वाटचालीचीच निदर्शक आहे. याकडे दुर्लक्ष करणे, किंवा ही वाटचाल थांबवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नवीन युगातील मराठी साहित्याच्या प्रसाराला खीळ बसण्यासारखे असेल. हा कार्यक्रम म्हणजे, मराठी साहित्याच्या भविष्याची नांदी.


कार्यक्रमाची रूपरेषा:
एकूण २-३ तास. काव्यवाचन आणि काव्यगायन. फक्त त्यातल्या कविता कुठल्याही पुस्तकांत, मासिकांत, किंवा वर्तमानपत्रात - अर्थात मुद्रित स्वरूपात - प्रसिद्ध झालेल्या नाहीत/नसतील. ह्या कविता फक्त अनुदिन्यांवर आणि इतर मराठी संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या असतील.कवींची नावे / टोपणनावे देखील जालाबाहेर फारशी प्रसिद्ध नसतील.काव्यवाचन आणि काव्यगायन करणारे, आणि संगीत दिग्दर्शक देखील व्यावसायिक - "प्रोफेशनल" - नसतील.विडंबने चालतील. मात्र मूळ कविता आणि विडंबन दोन्ही जालप्रकाशितच हवे. तसेच, मूळ कवितेची निवड झाली, तरच तिच्या विडंबनाचीही निवड होईल; जेणेकरून दोन्हींचे एकत्र सादरीकरण व त्यायोगे अपेक्षित परिणाम साधता येईल.मदत हवी आहे:
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे.


आम्ही सर्व "जालकवींना" आवाहन करतो, की आपल्या ज्या कवितांचा ह्या कार्यक्रमात अंतर्भाव व्हावा असे आपल्याला वाटते, त्या आम्हाला विरोपाने (ई-मेल)पाठवावे (ई-मेल कृपया युनिकोडमध्येच ठेवा. कवितेसोबतच, तुमचे जाहीर करण्याचे नाव -टोपणनावही चालेल-, संपर्काचा ईमेल-पत्ता, आणि स्वत:बद्दल एक-दोन ओळी)जे जालकवी नाहीत, त्यांनी आपापल्या ओळखीच्या, आवडत्या जालकवींकडे हे आवाहन पाठवावे, इतर मराठी संकेतस्थळांवर, आणि स्वत:च्या अनुदिन्यांवर हे आवाहन प्रकाशित करावे, ही नम्र (पण आग्रहाची) विनंती.ह्या कार्यक्रमासाठी एखादे समर्पक नावही सुचवावे.आपापल्या कविता आम्हाला खालील पत्त्यांवर पाठवाव्यात.


मिलिंद भांडारकर (milind [DOT] bhandarkar [AT] gmail [DOT] com)चक्रपाणि चिटणीस (chakrapani [DOT] chitnis [AT] gmail [DOT] com)
([dot] ऐवजी ". ", आणि [AT] ऐवजी "@" वापरावे. )


आपल्या सर्वांच्या भरघोस प्रतिसादाची अपेक्षा आहे.
धन्यवाद!