Sunday, November 6, 2011

’देव’ नाही ’देवळा’त ...

सिनेमा पहाणे ह भक्तिभाव मानला तर सिनेमा थेट्राला 'देऊळ' मानायला हवे आणि आपण ज्या श्रद्धेने ह्या देवळात 'सिनेमाची स्टोरी, चित्रण, गीत-संगीत, नावजलेले कलाकार अणि त्यांनी समर्थपणे पेललेल्या भुमिका' पहायला आणि त्यांचा आस्वाद घ्यायला जातो त्यांना 'देव'च म्हणायला हवे.
आपल्या अपेक्षांप्रमाणे सिनेमात सर्व काही असेल तर थेटररुपी देवळात साक्षात 'देवदर्शन' झाल्याचे समाधान लाभते व ह्या देवळाची वारी एक उत्सव होऊन जातो.

उमेश कुलकर्णींच बहुचर्चित 'देऊळ' हा सिनेमा खास थेट्रात जाऊन पाहिला असता आम्हाला 'देव नाही देवाळात' असा अनुभव आला. ज्या अपेक्षेने आम्ही देवाचे दर्शन घ्याला गेलो तो देवच तिथे नव्हते, बाकी मंदिराची दिव्यभव्यता आणि जाहिरातीद्वारे सुरु असलेला भक्तीचा जागर मात्र डोळ्यात मावेना इतका प्रचंड होता.
हे आमच्यासारख्य भक्तीभावाने सिनेमा पाहणार्‍या पटण्यासारखे नाही, म्हणुनच 'देऊळ'बद्दल आमचे हे ४ शब्द ....



’देऊळ’ हा सिनेमा लोकांना शक्यतो आवडणार नाही.
१. लोकांना सत्य दाखवलेले आवडत नाही.
२. तगडी स्टारकास्ट घेऊन उगाच शास्त्रापुरते सत्य दाखवणे त्याहुन आवडत नाही.

मला ’दुस-या कारणा’मुळे देऊळ तितकासा आवडला नाही. पिक्चर बर्‍यापैकी जमला नाही असे मला म्हणावेसे वाटते.
वलयांकित असे मोठ्ठे कलाकार घेऊन आणि त्याचा भरपुर गाजावाजा करुन शेवटी यथातथाच असलेला चित्रपट असे मी ह्याचे वर्णन करेन.
पुर्वार्धात हा चित्रपट भयंकर संथ आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर रटाळ वाटला.
गाजावाजा करुन मोठ्ठे मोठ्ठे कलाकार घेऊन त्यांना ह्या सिनेमात अक्षरशः वाया घालवले आहे असे वाटते. त्या त्या कलाकाराच्या क्षमतेला न्याय देणारे एकही पात्र ह्या चित्रपटात नाही ... अपवाद गिरीश कुलकर्णींचा केशा आणि दिलीप प्रभावळकरांचा अण्णा.
त्यांच्या पात्राची पार्श्वभुमी अथवा घडण चित्रपटात कुठेच ठळकपणे दिसत नाही. वातावरण निमिर्ती आणि पात्र ओळखीसाठी अत्यावश्यक असलेले डिटेलिंग इथे भरकटले आहे, उलट त्या नादात ह्या विषयाशी अगदीच अनावश्यक असलेले प्रसंग उगाच घुसडले गेले आहेत असे वाटले. मी तर असे म्हणेन की ह्या बड्या नावाऐवजी अगदी कुणीही त्या त्या भुमिका सहजपणे करु शकला असता, असे असताना उगाच मोठ्ठी नावे वापरुन, त्यांना यथातथा भुमिका देऊन उगाच 'बिग बजेट' अशी जाहिरात करणे हे पटले नाही.
नाना पाटेकर, मोहन आगाशे, किशोर कदम ह्यांना अक्षरशः वाया घालवला आहे.
सोनाली कुलकर्णी ह्यांची भुमिका खास आहे म्हणण्यात अर्थच नाही, इनफॅक्ट त्यांच्या व्यक्तिरेखेला तसा वावच नाही, हेच कारण बहुदा सर्वच बड्या नावांबाबत घडते.
नसरुद्दिन शहाचे पात्र ह्या सिनेमात 'उगाच' घुसडल्यासारखे वाटते, उगाच २-३ डायलॉक आणि अनावश्यक प्रसंग रचना ह्याने काय मिळाले ते कळत नाही. हां, बड्या नावांची जाहिरात करायची असेल तर मात्रचे आमचे मौन बाबा, त्यातले आम्हाला जास्त समजत नाही.
चित्रपटाचे संगीत, गाणी आदी बाबत न बोललेलेच बरे. सध्या जरा वादग्रस्त असलेले 'दत्ताचे गाणे' हे बर्‍यापैकी सत्यपरिस्थीतीच्या जवळ जाणारे आहे आणि नादमधुर नसले तरी गुणगुण्यासारखे वाटले.

सिनेमात काही चांगल्या गोष्टी आहेत पण त्या पेलण्यात जरा गडबड झाली आहे.
'एका देवस्थानाचा जन्म' अशी एका व्याख्या करता येण्याजोगा हा चित्रपट आहे, विषयाच्या निवडीला आणि त्यात दाखवलेल्या बर्‍यापैकी डिटेलिंगला फुल्ल नसले तर उत्तम गुण.
मात्र ह्याच अनुषंगाने आम्ही वर केलेल्या 'लोकांना सत्य दाखवलेले आवडत नाही' ह्या विधानाबाबत २ शब्द न लिहणे हे ह्या सिनेमावर अन्याय ठरेल.
एखाद्या देवस्थानाच्या ठिकाणी जे जे घडते ते ते दिग्दर्शकाने जसे आहे तसे दाखवले आहे. स्थानिक ग्रामस्थांचा संपुर्ण बाजारपेठेवर कब्जा, देवस्थानाच्या निमित्ताने चालणारे अन्य उद्योग-धंदे व त्यालाही असणारी बरकत, सतत येणार्‍या पैशाचा ओघामुळे दिवसेंदिवस 'श्रीमंत' होत जाणारे देवस्थान आणि त्याचे व्यवस्थापक, ह्याच पैशाचा जोरावर देवळाला अजुन 'मोठ्ठे' करण्याची व त्यामार्गे अजुन पैसा कमवण्याची इच्छा, कालांतराने भक्तीभावाला बाजुला सारुन केवळ दिखावा, सारंजाम, भपकेपणा आणि त्यात कमी की काय म्हणुन स्थानिक राजकारणाचा हातभार आदी बाबींबर 'देऊळ' व्यवस्थित भाष्य करतो.
खरे तर हे सत्य सर्वांनाच माहित आहे, अशी 'उभारलेली' देवळंही अनेकजणांना माहित असतील, पण ही बाब स्पष्टपणे दाखवण्याचे धाडस केल्याचेही कौतुक आहे.
मुर्ती चोरीला गेल्यावर पहिल्यापेक्षा अधिक भारी मुर्ती आणुन येनकेनप्रकारे 'देऊळ' चालु राहिले पाहिजे हा सोसही मस्त दाखवला आहे.
ह्या
निमित्ताने दिग्दर्शकाने 'देवस्थानाचे बाजारीकरण' ह्यावर बर्‍यापैकी कठोर भाष्य केले आहे असे म्हणायला हकरत नसावी. ह्याच्या जोडीला ग्रामीण भागातले राजकारण, लोकांच्यातला बेरकीपणा, मिडियाची ताकद, ग्रामीण जीवनातला एकंदरीत संथपणा आणि रिकाम्या हाताचे व निवांत डोक्याचे लोक वेळ घालवण्यासाठी काय काय करत असतात हे चांगले दाखवले आहे.

उपरोक्त बाबींमुळे चित्रपट बर्‍यापैकी पाहण्यासारखा होतो, पण हे आणि इतकेच दाखवण्यासाठी बड्या नावांची अजिबात गरज नाही हे सत्यही पुन्हा ढळढळीतपणे समोर येते.
'कंचुकी तंग दाटली उरी, मट्रीअल आत मायीना... आनं माळावर प्रकटला दत्त, पर भाव मनी दाटना....' सारख्या संवाद/काव्याची ह्या लेव्हलला आणि चित्रपटात एवढे बडे कलाकार असताना गरज नव्हती, असली स्ट्रॅटेजी बी ग्रेडी चित्रपटाने वापरायची असते, ती तिकडेच शोभून दिसते, अन्यथा उगाच हसे होते, असो.

तर एकंदरीत चित्रपट एकदा पाहण्यासारखा आहे, आवर्जुन थेट्रात पाहण्याची गरज नाही, मराठी चित्रपटसृष्टीला मदत करायची असेल तर पाहु शकता, यथावकाश टिव्हीवर येईलच.
माझे ह्या चित्रपटाचे एका वाक्यात वर्णन .... बडा घर, पोकळ वासा. असो.

- (चित्रपटाबद्दल असामाधानी आणि स्ट्रॅटेजीवर नाराज) छोटा डॉन

रेटिंग वगैरे द्यायचे असल्यास : (विषयाची निवड आणि त्यासंदर्भातले काही प्रसंग इत्यांदीमुळे राउंडफिगर ) २ स्टार **

Sunday, October 16, 2011

अकिला & दी बी ...

शिक्षणातली गुणवत्ता आणि विद्यार्थ्याची कौटुंबिक्/सामाजिक्/आर्थिक पार्श्वभुमी ह्यांचे परस्परसंबंध आहे म्हटला तर आहे आणि नाही म्हटला तर नाही.
लाखा-लाखाने फिया घेऊन 'हमखास' यश मिळवुन देणार्‍या संस्था/क्लासेस आहेत, त्यात जाणारे विद्यार्थीही आहेत. आणि दुसर्‍या बाजुला अत्यंत कठिण आणि शिक्षणाला बिलकुल 'अयोग्य' अशा परिस्थीतीतही धैर्याने व चिकाटीने अभ्यास करुन गुणवत्ता यादीत झळकणारे गुणवंत आहेत.
वर्षानुवर्षे शिक्षणाचा अधिकार नाकारल्या गेलेल्या किंवा न मिळालेल्या समाजातुन दैनदिन जगण्यातला संघर्षही संभाळुन यश मिळवणार्‍यांची अनेक उदाहरणे आहेत.

'Akeelah and the Bee*' ही गोष्ट आहे अशाच एका लढ्याची आणि त्यात मिळवलेल्या दैदिप्यमान यशाची...





'अकिला अँडरसन', केवळ ११ वर्षाची, चारचौघींसारखीच म्हणण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा थोडी कमीच असलेली निग्रो वंशाची साधी मुलगी. घरात नवर्‍यापासुन वेगळी झालेली आई, २ बहिणी आणि १ उडाणटप्पु भाऊ असल्यावर कुटुंबाची सर्वसाधारण जी आर्थिक आणि सामाजिक स्थिती असेल अगदी तशीच ह्या कुटुंबाची असते. आपल्या मुलीने भरपुर शिकावे आणि एखादे मानाचे पद मिळवावे अशी अपेक्षा तिच्या आईची असते व म्हणुनच अशा हालाखीच्या परिस्थीतीतही अकिलाचे शिक्षण सुरु राहते.
मात्र अकिलाला वेड असते ते 'शब्दांचे स्पेलिंग पाठ' करण्याचे, ह्या वेडाच्या नादात तिचे अर्थातच इतर शिक्षणाकडे जरासे दुर्लक्षच होत असते व त्यानंतर आई नाराज होणे वगैरे सोपस्कार घडतात.
मात्र अकिलाची पॅशन एकच ... शब्दांचे स्पेलिंग अचुक सांगणे / घोकणे / पाठ करणे.

घरातल्या काही निमित्ताने ती टिव्हीवर चालु असलेल्या 'स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी' ह्या स्पर्धेचा शेवटचा भाग पाहते व आपणही हे बक्षिस मिळवु शकतो अशी एक इच्छा तिच्या मनात निर्माण होते.
अकिलाच्या शिक्षिका व खासकरुन त्या शाळेचे मुख्याध्यापक तिला शाळेतल्या शाळेत होणार्‍या 'दी बी( स्पेलिंग स्पर्धा)' मध्ये भाग घ्यायला लावतात.
ह्या शाळेच्या स्पर्धेत लाजणारी, जनसमुदायासमोर येऊन स्पेलिंग सांगताना आतुन घाबरलेली, समोर होणार्‍या टिंगलटवाळीला वैतागुन गेलेली आणि त्यामुळे थोडी नर्व्हस अन विचलीत होणारी 'अकिला'...
आणि त्या नंतर आधी शाळा, मग जिल्हा, मग राज्य अशा सर्व पातळ्या पार करत थेट 'राष्ट्रीय स्पर्धेला' धैर्याने, मोकळेपणाने आणि एका जबरदस्त आत्मविश्वासाने सामोरी जाऊन स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी अकिला ...
असा हा प्रवास आणि त्याचेच हे चित्रण असलेला 'Akeelah and the Bee' ...

ह्या प्रवासात आपल्याला भेटतात ते स्पेलिंग तज्ज्ञ आणि अकिलाचे कोच असणारे डॉ. लॅरबी, अकिलाबरोबर ह्या विजेतेपदासाठी झुंझणारे झेवियर आणि डिलन नावाचे परस्परांविरुद्ध अ‍ॅटिट्युड असणारे २ विद्यार्थी.
कुठल्याही शब्दाचे स्पेलिंग तयार करताना नुसते पाठांतर न करता त्यामागची पार्श्वभुमी, शब्दाचा उगम असलेली भाषा, जोडाक्षरांचे महत्व, शब्दाची व्याख्या आणि तो शब्द वाक्यात वापरताना त्यामागे असलेले साधारण नियम आणि त्यामागची भुमिका प्रथम समजावुन घेणे आवश्यक असते ह्या तत्वाला चिटकुन राहणारे डॉ. लॅरबी. शब्दाचे स्पेलिंग सांगताना एक लय प्राप्त व्हावी, एकाग्र व्हावे म्हणुन त्याचाही सराव करुन घेणारे डॉ. लॅरबी.
आणि ह्याउलट केवळ स्पेलिंग 'पाठ' करण्याच्या घोकमपट्टी पद्धतीवर विश्वास असणारा डिलन आणि त्याचे वडिल. ह्यासाठीच सर्व इतर छंद आणि विरंगुळा ह्यांना फाटा देणारे डिलन आणि त्याचे वडिल, मजेतल्या खेळातही एकदम खालच्या स्तरातुन आलेल्या अकिलाने चक्क २ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत उपविजेता असलेल्या डिलनला चांगलेच झुंजावल्याने नाराज आणि अस्वस्थ असणारे डिलनचे वडिल.
ह्या आणि अशा इतर व्यक्तिरेखांद्वारे आपण ह्या संपुर्ण प्रवासात अकिलाबरोबर असतो.

राष्ट्रीय स्पर्धेत शेवटच्या फेरीतला अकिला आणि डिलनचा सामना पाहण्यासारखा आहे. डिलनला ह्यावेळी स्पर्धा जिंकणे आवश्यक असण्याचे प्रेशर समजलेली अकिला, त्यासाठी जी काही मदत करता येईल ते करु म्हणुन मुद्दाम स्पेलिंग चुकणारी अकिला आणि अकिला स्पेलिंग मुद्दाम चुकली आहे हे जाणुन स्वतःही पुढचा शब्द चुकीचा स्पेल करणारा डिलन आणि त्यानंतर दोघांच्यातला संवाद हे सर्व मजेशीर आहे.
अशा चित्रपटचा शेवट नक्की काय होणार हे सर्वांनाच माहित असेल, पण तो कसा होतो हे पाहणे रंजक ठरेल.

ह्या चित्रपटाचे गुणवत्तामुल्य, निर्मीतीमुल्य किंवा अन्य भव्यदिव्यता किती ह्यावर मला काही लिहायचे नाही, ते महत्वाचे नाही.
पण २ तास निखळ मनोरंजन करणारा आणि 'स्पेलिंग बी' सारख्या वेगळ्या विषयाला हाताळणारा हा चित्रपट पाहणे नक्कीच एक चांगला अनुभव असेल ...

टीप : छायाचित्र आंतरजालावर साभार

विकिपेडियावर असलेली ह्या चित्रपटाची माहिती
आयएमडीबीवर ह्या चित्रपटाचे परिक्षण

Monday, July 4, 2011

गंमतशीर बातमी - गंमतशीर निर्णय - गंमतशीर कनेक्टिव्हीटी - गंमतच गंमत ...

आज बर्याच दिवसांनी एक निखळ मनोरंजन करणारी बातमी वाचायला मिळाली ह्या बातमीची आम्हाला खुप गंमत वाटल्याने ती वाचकांसमोर ठेवण्याच्या मोह आम्हाला आवरला नाही.
गंमतच गंमत ...

http://72.78.249.107/esakal/20110704/4700594298586467547.htm

थोडक्यात सार असे ...

"कनेक्टिंग इंडिया'चा नारा देणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेडने आता "कनेक्टिंग ओबीसी मिशन' हाती घेतले आहे. राज्यातील ओबीसी समाजाच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क "ओबीसी टू ओबीसी अनलिमिटेड फ्री ग्रुप कॉलिंग'ची अभिनव योजना सुरू केली आहे, त्यामुळे "ओबीसी' असणाऱ्या सर्वांना अगदी फुकटात गप्पा मारता येणार आहेत. मंडल आयोगात समाविष्ट करण्यात आलेल्या ओबीसींच्या 357 जाती या योजनेत एकमेकांशी जोडण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

राज्यात ओबीसींच्या जातींचे संघटन करणाऱ्या ओबीसी सत्यशोधक परिषदेच्या मेंदूतून या योजनेने जन्म घेतला आहे. परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यानंतर बीएसएनएलच्या मुख्य महाव्यवस्थापकांसमोर ही योजना मांडली. अर्थात, त्यांनीही या योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. सर्व कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर "ओबीसी टू ओबीसी' फ्री कॉलिंगची संकल्पना अस्तित्वात आली, असे सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्याचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी "सकाळ'ला सांगितले.

मंडल आयोगात समावेश असणाऱ्या महाराष्ट्रातील रंगारी, भावसार, शिंपी, साळी, तेली, परीट, नाभिक, सुतार, लोहार, आतार, बागवान, कासार, झुल्लीया, माळी, कोळी, धनगर, बंजारा, वंजारी, गुरव, गवळी, जैन, कोष्टी आदींसह 357 जातींचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
सत्यशोधक ओबीसी परिषदेमार्फत येत्या तीन महिन्यांत सहा हजार ओबीसींना या योजनेच्या माध्यमातून बीएसएनएल सत्यशोधक ओबीसी परिषदेशी "कनेक्' करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आहे की नाही गंमत ?
म्हणजे एकगठ्ठा मतांसाठी केले जाणारे राजकारण आणि त्यासाठी आणल्या जाणार्या योजना किती गंमतशीर असतात ह्याची उदाहरणे कित्येक आहेत, पण आज ह्या निर्णयाने सर्वांवर डायरेक्ट धोबीपछाड डाव टाकला आहे.
मला ह्यातले लॉजिक नाय समजले.
सध्या ओबीसी समाजाला किती आरक्षण आहे वगैरे ह्या भानगडीत पडता मी साधारणता भारतातले ३०% लोक ओबीसी आहेत असे मानतो ( अरे, ही फिगर तर 'बहुसंख्य' कडे चालली आहे, असो ). त्यांना 'संधी' उपलब्ध व्हाव्यात म्हणुन मदत, शिक्षणाच्या पद्धतीत सवलत, आर्थिक फायदे, नोकर्यात आरक्षण वगैरे समजु शकतो पण हे 'अनलिमिटेड बोला' ही सवलत म्हणजे नक्की काय ?

असो, मला टिका वगैरे करायची नाही, टिका करणारे आम्ही कोण त्याने काय फरक पडतो हे सत्य माहित आहेच.

पण लेट्स एंजॉय.
आपण काय करु की ह्या सरकारी संस्थांना अशाच 'सुपीक' आयडिया सुचवु, म्हणजे कसे विकासाचा मक्ता एकटा काय सरकारनेच घेतला नाही, आपणही मदतीचा हात देऊ शकतो अशी माझी प्रामाणिक भावना आहे.

असो, तर खालील उपाय मला 'पटकन' सुचले आहेत, पुढेमागे ह्याची अंमलबजावणी झाली तर माझा एखाद्या 'पद्मश्री' वगैरे पुरस्कारासाठी विचार व्हावा असा एक प्रस्ताव जाताजाता मांड्तो.

. 'अबक' ह्या जाती-जमातींवर खुप वर्षे अन्याय झाला आहे त्यांना आता ह्याबाबत बोलता यावे म्हणुन मोबाईल बीलात ५०% सवलत.
. 'क्ष' वर जरा जास्तीच अन्याय झाला किंवा त्यांना सुधारण्याची संधी दिली जावी म्हणुन संपुर्ण बील माफ.
. '' हे फारच मागास आहेत, त्यांना त्वरित 3G तंत्रज्ञान असलेला फोन फुकट दिला जावा आयुष्यभर बील माफ असावे.
. '' ला जास्त शैक्षणिक संधी मिळाव्यात म्हणुन अनलिमिटेड इंटरनेट उपलब्ध करुन द्यावे.
. '' वाले फार माजले आहेत, वर्षानुवर्षे ह्यांनी शोषण केले आहे म्हणुन त्यांचे मोबाईल हिसकावुन घ्यावेत किंवा त्यांना भरमसाट बील येईल व्यवस्था करावी किंवा त्यांना अत्यंत मर्यादीत अशी बँडविड्थ द्यावी.
. '' ह्यांचे आत्तापर्यंत खुप कौतुक झाले आहे, आता त्यांनी एकदम बेसिक हँडसेट वापरावेत दिवसातुन दोनच फोन्स करावेत, इनकमिंगला पैसे पडतील, एसेमेसचे लाड चालणार नाहीत
. '' ह्यांची कंडिशन आता सुधारली आहे, सबब त्यांनी आता येईल ते बील भरावे, भरल्यास निषेध खलिता पाठवीला जाईल.
. 'ज्ञ' हे लोक खुप धोकादायक आहेत, त्यांना मोबाईल वापरण्यास सोडा पण पाहण्यासही बंदी असावी, तसे आढळल्यास देशद्रोहाचा खटला भरण्यात येईल.
. '' लोकांचा संवाद वाढावा म्हणुन त्यांना 'व्हिडिओ कॉलिंग, कॉल कॉन्फरंस' वगैरे सुविध मोफत मिळाव्यात, वापरणे जमत नसल्यास खास 'प्रशिक्षक' पद निर्माण करुन त्यांच्या उपलब्ध संधीत वाढ केली जावी.
.
.
.
इथेच थांबतो ...

काय आहे, आत्ताच एक फोन आला आहे, ते मोबाईल कंपन्यांचे धोरण बिरण बदलायच्या आधी 'इनकमिंग फ्री' म्हणुन बोलुन घेतो, उद्याचे कुणी पाहिले आहे हो.
बाकी ते 'पद्मश्री'चे वगैरे विसरु नका बरं का सर्कारी बाबूलोकं, काही शंका वगैरे असतील तर 'मिस्स कॉल' द्या, मी फोन करतो, कसे ? Wink

एक उद्धट आणि अवांतर चौकशी :
बीएसएनएलकडे 'मुर्ख टु मुर्ख कॉलिंग फ्री' अशी बीलिंग स्कीम आहे का ?
असल्यास मी ह्यासाठी अर्ज करु इच्छितो, सदर चौकशी कुठे करावी हे कळावे. आवश्यक ती प्रमाणपत्रे सादर केली जातील ( सदर लेखही 'मुर्खपणा'चा पुरावा म्हणुन ग्राह्य धरला जावा ही नम्र विनंती )

Tuesday, March 1, 2011

'धोबीघाट' विश्वविजेतेपदाच्या दावेदारांचा - भाग # १ : भारत

टिप :
सदर लेखात क्रिकेट आणि भारतीय संघाविषयी काही टोकाची आणि प्रामाणिक मते आढळतील, ती वाचुन आपल्याला अस्वस्थ वाटत आहे असे वाटल्यास त्या क्षणी लेखाचे वाचन थांबवावे अशी आग्रहाची विनंती.
----------------------------
कबुल केल्याप्रमाणे आम्ही आमच्या 'धोबीघाट' लेखामालेचे दुसरे पुष्प घेऊन ह्या विश्वचषकाच्या मौहोलात दाखल झालो आहोत, गेल्या काही सामन्यातले भारतीय संघाचे प्रदर्शन पाहुन आम्ही पहिल्या भागात जे उत्साहाने 'दुसरा भाग टीम इंडियाला समर्पित' असे लिहले होते त्याचे बरे वाटले, निदान आम्ही शब्द मोडल्याचे पाप आम्हाला लागणार नाही आणि आम्ही आता ह्या लेखात टिम इंडियाचा फुल्टु धोबीघाट करणार आहोत, असो.

ह्यावेळेसही म्हणे भारतीय संघ विश्वविजेतेपदाच्या शर्यतीत आहे, मला हे ऐकुन आश्चर्य नाही वाटले, मला 'ह्यावर्षी पतंगराव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत' ह्या वाक्याची जितकी सवय झाली आहे तितकीच 'भारत ह्यावर्षी क्रिकेट विश्वचषकाचा दावेदार' ह्या वाक्याची झाली आहे. पतंगरावांच्या संदर्भातले वाक्य मी दर ५ वर्षांनी वाचतो आणि क्रिकेटचे ४ वर्षांनी एवढाच काय तो फरक, बाकी काय होतेय ते मी पाहिले आहे आणि तुम्हीही पहात आहात. माझा तर आजकाल 'महागाई कमी होणार', 'स्वतःच्या घराचे स्वप्न मध्यमवर्गाच्या आवाक्यात येणार', 'भारत अतिरेकी संघटनांच्या नाड्या आवळणार' ह्यापासुन ते थेट आत्तापर्यंतचे 'स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार देणार' ही वाक्ये जशी कायम जनतेच्या डोळ्यात धुळ फेकुन राज्यसत्ता भोगण्यासाठी वापरुन वापरुन गुळगुळीत झाली आहेत तसेच 'भारत यंदा विश्वचषक जिंकणार' हे वाक्य क्रिकेटवेड्या जन्तेच्या खिशातला पैसा काढण्यासाठी वापरुन वापरुन गुळगुळीत झाले आहे असे वाटते, रिझल्ट तर तुमच्यासमोर आहेत, नै का ?

तरी बघा ह्या विश्वचषकात आयोजकांनीच मस्त चालुपणा केला आहे, मागच्यावेळी जेव्हा भारत-पाकिस्तान प्राथमिक फेरीतच गारद होऊन बाहेर पडल्यावर ह्या आयोजकांचा जो सुफडा साफ झाला होता त्यातुन बाहेर पडण्यासाठी त्यांना थेट "२०-२०" नावाचे उत्तेजक घ्यावे लागले, असो ह्यावर आम्ही मागच्या भागात पुरेसे भाष्य केले आहेच. तर मी काय सांगत होतो की ह्यावेळी चालुपणा करुन एकुण १४ संघांचे २ गट पाडले ( प्रत्येक गटात साधारण ३ फालतु टिम ) आणि त्या-त्या गटातुन ४ संघ पुढच्या फेरीत दाखल होतील असा नियम काढला.
आहे की नै गंमत, म्हणजे ओढुन ताणुन का होईना टॉप संघाना ( माझा व्ह्यु बिझीनेसचा, बाकी क्वालिटी तुम्ही पहा ) पुढची फेरी सुलभ झाली की नै ? एखाद्या बांग्लादेशने भारताला आणि अजुन कुणी पाकिस्तानला हरवले म्हणुन उगाच कोट्यावधींचे लुस्कान नको. ह्याला राजकिय भाषेत "डमी उमेदवार" देणे असे म्हणतात, म्हणजे एखाद्या मतदारसंघात एखाद्या मातब्बर नेत्याच विजय शुअर शॉट फिक्स असेल तर इतर पक्ष समजुतदारपणे उगाच नगाला नग म्हणुन 'डमी उमेदवार' देतात अशी रित आहे राजकारणाची, त्यातुन चमत्कार घडवणारा आणि मोहिते पाटलांसारख्या दिग्गजाला बाहेरचा रस्ता दाखवणार्‍या 'भारत भालकें'सारखा एखादाच आणि तो चमत्कारही एकदाच, हे जर वारंवार घडत असेल तर मग खेळायचे नियमच बदलावे लागतात व तेच आता घडले आहे.
असो, आता भारतासाठी ( किंवा कुठल्याही नामवंत संघासाठी ) पुढची फेरी अलमोस्ट फिक्स आहे, बाकीचे लिंबुटिंबु इथे खेळतात ह्याचीच चैन आहे, काही जण 'का खेळतात' हा प्रश्नच आहे.

असो, सध्या भारतीय संघाच्या मजबुत बांधणीचा आणि भयंकर फॉर्मचा वारंवार वास्ताँ दिला जातो, हे अर्थातच स्वाभाविकच आहे की हे असावेच लागते, हे सगळ्यांचे असते. मला सांगा तुम्ही एखाद्या संघाच्या कर्णधाराला "जाऊ दे, एवढ्या वेळी आमची टिम काय फॉर्ममध्ये नाही, बॅटिंगची बोंबाबोंब आहे आणि बॉलर्स तर हातापाया पडुन आणले आहेत. बहुतेक आम्ही पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळू" असे बोलणे ऐकले आहे काय ? अहो विश्वचषकात खेळताय ना, मग चांगला फॉर्म आणि मजबुत बांधणी असणे अपेक्षितच आहे, अन्यथा संघ काय प्रतिस्पर्ध्यांच्या दाढ्या करायला पाठविला आहे की त्यांना मॉलिश द्यायला.
बाकी राहिली आकडेवारी, त्याचे कुणाला सांगताय ? मागच्यावेळी काय ही आकडेवारी नव्हती का ?

बाकी गेल्या काही दिवसात २ सामने थोडे थोडे पाहिले हो भारतीय संघाचे, भरुन आले बघा ह्या क्रिकेटचे बदलते स्वरुप पाहुन, च्यायला प्रत्येक डावात ३००+ ? अरे खेळपट्टी बनवता की गुळगुळीत पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे बांधता ? जरा तरी त्या 'गोलंदाज' नावाच्या एकेकाळी क्रिकेटचा महत्वाचा भाग समजले जाण्यार्‍या लोकांवर दया करा.
तर ते असो, आपण बोलु भारतीय संघाचे, तर भारतीय संघाने प्रत्येक सामन्यात ३००+ धावा ठोकल्या, सुरेखच आहे, फलंदाजांचे निर्विवाद यश आहे. अहो पण नंतर समोरचा संघही 'अलमोस्ट तेवढ्याच' धावा करतो ह्याला काय अर्थ आहे ? आपली बॉलिंग आहे का मजाक ? जर आपण 'असेच' खेळणार असु तर सर्वच गोलंदाजांचा घरी बसवुन ११ च्या ११ फलंदाज खेळवायला काय हरकत आहे ? एखाद्या ओव्हरमध्ये २-३ विकेट्स काढणे आणि उरलेल्यांमध्ये धु-धु धुतला जाणे ह्याला मी 'श्रेष्ठ गोलंदाजी' मानत नाही, त्या मिळालेल्या विकेट्स योगायोग आहेत. एखाद्याने टेचात १० पैकी २-३ ओव्हर्स मेडन टाकाव्यात, एकुणात जास्तीत जास्त ३५-४० धावा द्याव्यात आणि मग ज्या काही असतील त्या 'विकेट्स' घ्याव्यात, त्याला म्हणतात बॉलिंग. नाहीतर ह्या स्पेशॅलिस्ट बॉलर्स ( पक्षी : जहीर, नेहरा, मुनाफ वगैरे ) आणि पार्टटाईम बॉलर्स ( युवी, रैना आणि इतर ) ह्या गटांमध्ये फरक काय राहिला ?
फरक रहातच नसेल तर ह्यांना खेळवुन उगाच ३-४ चांगले फलंदाज आणि फिल्डर्स का कमी खेळवावेत, कारण एकदा का फलंदाजांकडुन खा-खा मार खाल्यावर ह्या बॉलर्सचा मैदानावर काय उपयोग असतो ? मुनाफला बॉलिंग झाल्यावर कुठे लपवावे हा प्रश्नच असतो कारण आपल्या स्पेशॅलिस्ट बोलर्सचे 'क्षेत्ररक्षण' हा सरकारी कारभारामधली 'पारदर्शता' इतकाच रोचक आणि संशोधनाचा विषय आहे.

असो, आता आम्ही काही निवडक खेळाडुंबद्दल ४ शब्द लिहणार आहोत.
१. विरेंद्र सेहवाग उर्फ नवाब :
खरे तर नवाब हे चुकीचे संबोधन आहे, सेहवागचे व्यक्तिमत्व जुळते ते सातारच्या राजे भोसल्यांशी. कृती आणि एकुणच वागण्यात तोच बेधडकपणा, तीच बेफिकिरी आणि तोच निडरपणा. मनापासुन खेळला तर समोरच्यांच्या चिंधड्या आणि मुड नसलाच तर 'तुमचा खेळ आणि तुम्ही गेलात चुलीत. मी मला वाटतो तसा शॉट मारणार, बाकी तुम्ही बघुन घ्या' ही वृत्ती.
क्षेत्ररक्षणात उगाच म्हणायचे म्हणुन चांगला फिल्डर, बाकी एखाद्या लग्नात जसा वरपक्षाकडच्या काकांच्या 'ताटे मोजायला मी इथे काय मोजणी कारकुन म्हणुन आलो आहे काय' सारखाच 'इथे क्रिकेटमध्ये मला काय डाय मारुन बॉल आडवायला आणले आहे काय, माझे काम बॅटिंग व तेच मी करणार' हा अ‍ॅटिट्युड.
चौकातला मवाली जसा परिणाम माहित असुन मोहल्ल्याबाहेरची पोरगी छेडतो आणि मार खातो तसेच हे नवाबसाहेबपण नेहमी 'ऑफ स्टंपबाहेरचा चेंडु छेडतात आणि विकेट टाकतात'. चालायचेच, मवाली आणि सेहवाग दोघेही सुधारणार नाहीत, सुधारले तर त्यांना अनुक्रमे मवाली आणि सेहवाग का म्हणावे बरं ?

२. युवराज सिंग :
स्वातंत्रसंग्रामाच्या काळात जसे चोरीसाठी तुरुंगात गेलेले काही लोक स्वातंत्र्यानंतर ताम्रपत्र घेऊन 'स्वातंत्रसैनिक' झाले आणि त्या तुरुंगवासाच्या पुण्याईवर आयुष्यभर 'मानाचे पान' घेऊ लागले तसेच 'नॅटवेस्ट सेरिजमधली एक खेळी आणि ६ चेंडुत ६ सिक्सर' ह्यांच्या पुण्याईवर युवराज किती दिवस संघात मिरवणार आहे ते गांधीबाबांना माहीत.
एकेकाळी हा तंदुरुस्त आणि चपळ होता, आता नुसता त्याचा ढोल झाला आहे तो ही खणखणीत वाजत नाही, मैदानावर धावतो तर असे वाटते मायला ह्याला पळताना धाप वगैरे लागुन मैदानावरच 'प्राणवायु' द्यावा लागेल की काय ?
त्याला एकेकाळी भारताचा 'जाँटी र्‍होड्स' असे म्हणत, आजकाल त्याला 'मुनाफ पटेल' असे टोपणनाव आहे व ते चारचौघात उच्चारायला बंदी आहे, मुनाफचा म्हणे अपमान होतो, होत असेल, आम्हाला जास्त माहित नाही.
सध्या महाराष्ट्रात रस्त्यांची जी हालत आहे तीच युवीच्या फॉर्मची आहे ... थर्डक्लास.
सध्या टिमच्या यशापयशात युवीचे काँट्रीब्युशन किती .... ( सुरेशजींच्या मते ) कॉमनवेल्थ घोटाळ्यात त्यांचाजेवढा सहभाग होता तेवढेच.
युवीकडुन अपेक्षा किती ठेवाव्यात ..... कांद्याकडुन ठेवता तितक्याच, डोळ्यात नक्की पाणी आणेल. कांदा जसा भाव चढले की ग्राहकांच्या आणि उतरले की उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणतो तसाच युवी खेळला तर समोरच्या संघाच्या आणि गंडला तर आपल्याच संघ आणि समर्थकांच्या डोळ्यात पाणी आणतो.

३. युसुफ पठाण :
कुणाच्याही एखाद्याच्या घरी जसे एखाद्या दिवशी इरेस पेटुन बाबा स्वतः संपुर्ण स्वयंपाक करतात आणि तो खरोखर उत्कृष्ट होतो तसेच युसुफचे आहे, एखाद्या दिवशी तो खरेच नजर लागेल असे खेळतो. पण शेवटी बाबा रोज स्वयंपाक करु शकत नाहीत आणि युसुफही प्रत्येकवेळी खेळु शकत नाही.
कित्येक वर्ष एकाच वर्गात काढलेल्या एखाद्या टग्याला (सध्याच्या अर्थाने दादा नव्हे, तो विषय नंतर कधीतरी ) लेक्चरला पाहुन एखादा नवा जॉइन झालेला मास्तर जसा गर्भगळित होतो तसे युसुफ मैदानात फलंदाजीला उतरल्यावर 'आता काय वाढुन ठेवले आहे' ह्या विचाराने समोरच्या संघाचेही तेच हाल होतात. पण दोन्हीतली साम्य आहे, टग्या कधीतरीच असे वर्गात घुसतो तसाच युसुफ 'कधीतरी' समोरच्या संघाला बडवतो, अन्यथा टग्या नेहमी कँटिनला पडिक असतो आणि युसुफ हातघाई करुन पुन्हा पॅव्हेलियनमध्ये जाऊन बसतो.
अजुन काय लिहणे, 'कधीतरी'च ह्या प्रसंगासाठी किती लिहावे ?
बाकी लोक त्याला फलंदाज मानत नाहीत, तो फलंदाज नाहीही, पण त्याने फरक पडत नाही.
आजकाल तो पार्टटाईम गोलंदाजीही करतो, करावी लागते, त्याच्याकडुन नेहमीच धावा निघत नसल्याने त्याला अशी इतर कामे करावी लागतात, एखाद्या दिवशी तो स्वतःच 'अंपायरची टोपी' घालुन मैदानात उभा राहिला तर आश्चर्य वाटुन घेऊ नका, एवढेच समजा की आज त्याचा 'बॅटिंग-डे' नाही व तो मैदानावर 'इतर' कामे करत आहे.

४. महेंद्रसिंग धोनी :
धोनी भारताचा कॅप्टन असणे आणि गडकरीसाहेब भाजपाचे राष्ट्रिय अध्यक्ष असणे ह्यातले विलक्षण साम्य तुमच्या लक्षात येत नसेल तर माय लॉर्ड यु नीड सम थरो स्टडी. दोघांनाही करायचे काहीच नसते, मात्र काहीही झाले की मिरवायचे मात्र असते.
झालच तर जणु सगळे काही माझ्यामुळेच घडते आहे हा मजेशीर अ‍ॅटिट्युडही असावा लागतो.
मधुन आधुन एखादे गंमतशीर आणि वादग्रस्त स्टेटमेंट द्यायचे असते हे ही त्यांचे एक्स्ट्रा काम.
असे म्हणतात की भाजपाचा अध्यक्ष नेहमीच कमनशिबी असतो, धोनीही नेहमीच 'टॉस हारतो' ( पुढेमागे त्याचा हा गुण त्याला भाजपाच्या अध्यक्षपदापर्यंत घेऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही ).
भाजपाचा अध्यक्ष शक्यतो थेट लोकसभा, विधानसभा वगैरे निवडणुका लढवत नाही, आपला धोनी पण शक्यतो 'न खेळण्याची' परंपरा पाळण्याची पुरेपुर काळजी घेतो.
एक काळ होता की गडकरींनी धडाडीने 'मुंबई-पुणे महामार्गाचे काम एकहाती संपवले होते' आणि धोनीही एकेकाळी 'एकहाती सामना संपवुन टाकायचा', आय रिपिट ... एकेकाळी !

५. जहीर खान :
तुम्ही कधी साऊथ इंडियन पिक्चर बघता का हो ?
त्यात की नै एक दणकेबाज व्हिलन असतो, त्याचे मस्त चालले असते, पुरेपुर दहशत असते व त्याला स्मरुन तो राडे घालत असतो व पब्लिक बर्‍यापैकी त्याला 'डरुन' असते. त्याने अलाण्या-फलाण्या दिवशी भररस्त्यावर एखाद्याला रक्तबंबाळ होईपर्यंत तुंबलेला प्रसंग लोकांमध्ये त्याचा 'खौफ' निर्माण करण्यास पुरेसे ठरत असते, तो ह्यावर आयुष्यभव सुखाने जगु शकत असतो.
पण एके दिवशी अशुभ मुहुर्तावर तो डोक्यात हवा जाऊन चुकुन सिनेमाच्या हिरोला 'ललकारतो' व मित्रांनो इथे त्या व्हिलनची 'कहानी खतम' होते.
जहीरचे सेमच आहे बघा, त्याचे यॉर्कर्स, त्याचा स्विंग, त्याचे बाउंसर्स आणि लाईन & लेन्थ सारे सारे पुरेपुर खौफ निर्माण करणारे आहे.
पण गंमत अशी आहे की जहीरच्या नेमके महत्वाच्या क्षणी डोक्यात हवा जाते व तो प्रतिस्पर्ध्यांच्या 'हिरो बॅट्समन्सना' खुन्नस वगैरे देतो व इथे रक्तपाताला सुरवात होते, आठवा २००३ ची भारत वि. ऑस्ट्रेलिया फायनल, बस बस आम्हाला जहीरबद्दल एवढेच लिहायचे आहे, पुर्णविराम

६. हरभजनसिंग :
भज्जी म्हणजे देवानंद, वाढत्या वयात आणि ढासळत्या क्वालिटीतही झळकण्याची हौस.
माय लॉर्ड, एक काळ होता की देवानंदच्या केसांच्या श्टायलीत आणि त्याच्या अदांमध्ये एक आख्खी पिढी वेडी झाली. भज्जीच्या चढत्या काळातही त्याच्या फिरकीच्या जादुने स्टिव्ह-वॉ च्या ऑसिजचे बलाढ्य साम्राज्य उध्वस्त केले.
पण जुनी पुण्याई किती दिवस पुरवुन खाणार महाराज ?
एके काळी ह्याचे बॉल वळत होते आणि ह्याला विकेट्स पडत होत्या. आता उगाच दुसरा पर्याय नाही म्हणुन पुर्वपुण्याईमुळे ह्याला स्टार्टिंग-११ मध्येखेळवणे म्हणजे वय होऊनसुद्धा करुणानिधींनी अट्टाहासाने स्वत:ला मुख्यमंत्री म्हणुन मिरवणे.
बाकी भज्जी हा 'नव-डे' चा गोलंदाज नाहीच. लावा बरं ३-४ क्लोजिंग फिल्डर्स, २ स्लिप्स आणि द्या ४ दिवस जुन्या खेळपट्टीवर ७० षटके वापरलेला चेंड्य भज्जीच्या हातात, फिर मॅजिक देखो साब !

७. श्रीशांत :
प्रत्येक वर्गात, प्रत्येक हापिसात आणि बहुतेक प्रत्येकच ठिकाणी 'च्यायला एकदा ह्याला कोपच्यात घेऊन बडवला पाहिजे, लै मस्ती आलीय ह्याला फुकटची' टाईपचा एक तरी मुलगा असतोच, टिम इंडियामध्ये 'श्रीशांत' आहे बॉस.
प्रत्येकाला जसा आपल्या मॅनेजर ह्या खुर्चीवर का बसतो हा प्रश्न पडतो तसेच मलाही 'श्रीशांत टिममध्ये का आहे' असा प्रश्न पडतो.
प्रत्येक ग्रुपमध्ये जसा एखादा फालतु कमेम्ट्स टाकणारा, उगाच लक्ष वेधुन घेणारा, आढ्यतखोर महामुर्ख मनुक्ष असतो तसा मेहरबान आपल्या टिममध्ये 'श्रीशांत' आहे.

८. मुनाफ पटेल :
अगदी प्रामाणिक, पापभिरु, कचखाऊ, दिवाभित पांढरपेशी मध्यमवर्गीय व्यक्ती, कुठल्याही महानगरात हटकुन आढणारी. रोजच्या कामात काडीचा उत्साह नसल्याने रडत-खुडत हापिसला जाणारी, तोंड वेडेवाकडे करुन काम करणारी आणि घरी परत आल्यावर संपुर्ण कंटाळुन कशातही रस न घेता अंथरुणावर अंग टाकणारी व हेच जीवन वर्षानुवर्षे जगणार्‍या एका मोठ्ठ्या समुदायाचा टिम इंडियातला प्रतिनिधी म्हणजे 'मुनाफ पटेल'.
गोलंदाजीचे काम जमेल तेवढ्याच प्रामाणिकपणे करणारा, त्यातही तोंड वेडेवाकडे न पडणारा, फिल्डिंग आणि बॅटिंग ह्यासारख्या समाजकार्यात अजिबातच रस न घेणारा आणि कुठल्याच बाबतीत स्वतःचे मत नसल्याने वादात न पडणारा हा नाकासमोर चालणारा 'मुनाफ'.
किती अपेक्षा ठेवायच्या तुम्हीच ठरवा, वाढत्या अनुभवामुळे जरा समंजस आणि समजुतदार वाटतो आहे तरी धडाडीची भयंकर कमतरता आहे.

९. आर. अश्विन :
केवळ आयपीएलच्या चेन्नै टिममध्ये खेळल्याने जर ( श्रीकांतच्या कृपेने ) इंडियन क्रिकेटमध्ये वर्णी लागत असेल बिलिव्ह मी ह्या रेटने आपल्या सपोर्ट स्टाफमधले निम्म्यांच्या वर चेन्नैच्या चेपॉक स्टेडियमबाहेर नारळ पाणी, इडली-वडा सांबार विकणे असा व्यवसाय करत असतील किंवा सरळ दणक्यात रजनीची गाणी लाऊन चेन्नैमध्ये रिक्षा पळवत असतील.
मला ह्याच्या निवडीतले लॉजिक समजले नाही तर मी काय कप्पाळ कमेंट करणार ?

असो, मजेमजेत बरेच काही लिहुन झाले.
भारत जिंकेल का वगैरे असल्या फालतु प्रश्नांना उत्तरे द्यायला आम्ही बांधिल नाही, कोणीही जिंको पण खेळाचा विजय होईल असे युसलेस इमोशनल ब्लॅकमेलही नका करु, बिझीनेसमात्र 'येकदम कडक' होणार ह्यात अजिबात वाद नाही.
तशी सेटिंग झाली आहे म्हणतात

तुम्हाला हे आवडो किंवा ह्याचा बेक्कार राग येवो, आम्ही ही स्पर्धा संपोस्तोवर मधुनाआधुन पिंका टाकत राहणारच.
अहो सध्याच्या 'भाजपा'चा आम्हाला जरी बेक्कार राग येत असला म्हणुन काय आम्ही 'राजकारण गेलं चुकीत' असे म्हणुन टिपीकल मध्यमवर्गिय होऊ का ?
सध्याचे क्रिकेट नाही आवडत, खुप राग येतो, बघवत नाही, तरीही मधुनाअधुन पाहणार आणि त्यावर उगाच असे खरडणार.

तळटिप :
ह्या सर्व हजेरीत 'सचिन तेंडुलकर' इसमास मुद्दामुनच नाही घेतले, घेऊ नये असे वाटले, त्याच्यावर बोलायला आमच्याकडे आता काही शब्द उरले आहेत असे वाटत नाही.

Tuesday, February 22, 2011

'धोबीघाट' विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा ...

सध्या म्हणे क्रिकेटचा विश्चचषक सुरु आहे आणि त्यात "भारत" म्हणे आघाडीचा दावेदार आहे, आम्ही हे क्रिकेट वगैरे पहातो अशातला काही भाग नाही पण उगाच काहीबाही ४ लोक बोलतात ते आमच्या कानी पडते व त्यावर आम्ही ( कधीमधी ) भाष्य करत असतो. मुळात इन मीन ८-१० (रिकामटेकडे) देश आपला वेळ जात नाही म्हणुन दिवस दिवस जो निरर्थक खेळ खेळतात त्याच्या चक्क विश्वचषक स्पर्धा ?
नाही, मी मान्य करतो की एकुण १०० च्या आसपास देश म्हणे ह्या "आय सी सी ( ही आमच्या पवारकाकांची बरं, नाद नाय करायचा )" शी संलग्न आहेत, पण त्याने कुठे खेळ मोठ्ठा होतो का ? बरं, ह्या १०० तले किती देश नुस्ते नाममात्र क्रिकेट खेळतात हा दुसरा मुद्दा, उरलेल्या मन लाऊन खेळणार्‍या देशांमध्ये ( बरं का, ह्या देशांमध्ये जनरली पॉलिटिशियन जन्तेला चुना लावत असतात व त्यांचे लक्ष ह्या मुद्द्यांकडे जाऊ नये म्हणुन क्रिकेटसारख्या रिकामटेकड्या खेळाला इथे उगाच प्रमोट केले जाते ) मेन ४ देश आशियातलेच ( किंवा भारतीय उपखंडातले, त्यातले ३ म्हणजे स्वातंत्र्यापुर्वीचा भारत, आता बोला) आहेत आणि एकुण उत्पन्नामधला निदान ८०% भाग इथुनच येतो, आता पैसा आला की प्रमोशन आलेच व म्हणुन असल्या स्पर्धेचा गाजावाजाही आला, असो हरकत नाही.

आता तुम्ही म्हणाल की काही आफ्रिकन आणि इतर अरबी देश क्रिकेट खेळतात आणि शिवाय ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड आणि खुद्द इंग्लंडचा पण संघ इथे खेळतो.
अरबी देशांचे काय हो, त्यांच्याकडे मनोरंजन व्हावे म्हणुन कोंबड्यांच्या झुंजी, उंटांच्या शर्यती पासुन ते थेट माणसांच्या ( पक्षी : विकत घेतलेल्या गुलामांच्या ) झुंजी लावतात, मग मला सांगा क्रिकेट खेळवणे ही काय त्यांना अवघड बाब आहे का ?
बाकी त्या शारजाच्या मैदानात मॅच पहायला जमलेले ( काळा गॉगलवाले) रसिक पाहुन आजही आम्हाला ह्या 'जंटलमेन गेम'चे आश्चर्य वाटते बरं.
( बाकी सध्या काही लक्ष्मीपुत्रांनी "आय पी एल" नामक स्पर्धेत असेच प्लेयर्स 'विकत' घेऊन ते आपापल्या गावात मनोरंजनासाठी खेळवणार असल्याचा घाट घातला आहे, ह्यावरुन एका कॅबिनेट मंत्र्याला आणि बीसीसीआय मधल्या एका दिग्गज आसामीचा गुल्ल व्हावे लागले ह्यावरुन आम्हाला ह्या स्पर्धेच्या 'स्पिरीट्'ची अंधुकशी कल्पना येते आहे, असो पण सध्या विषय तो नाही, नंतर ह्यावर सविस्तर भाष्य करु )

असो, भारताने म्हणे १९८३ साली ही स्पर्धा जिंकुन हा विश्वचषक भारतात आणला होता, नाही नाही, ही गोष्ट अभिनंदन करण्यासारखीच आहे त्याबद्दल वाद नाही, त्या संघाचे अभिनंदन आहेच.
अहो पण त्यानंतर त्या स्पर्धेत खेळलेले खेळाडु, मैदानात बाटल्या उचलायला असणारा दुय्यम खेळाडु, सपोर्ट स्टाफ, त्यावेळी मैदानाबाहेर गोळ्या-बिस्कीटे विकणारे ह्यापासुन ते थेट तो सामना झाडावर बसुन फुक्कट पाहणारे हे सगळेच आजकाल मिशीला तुप लाऊन 'क्रिकेट एक्सपर्ट' म्हणुन हिंडतात व काहीही मुक्ताफळे उधळतात ह्याचे आम्हाला मनोसोक्त हसु येते.
आणि बरं का, सन १९८३ नंतर दर ४ वर्षांनी आपल्या इथल्या जनतेला "विश्वचषक विजेते" होण्याची स्वप्ने दाखवुन जो बेमालुम चुना लावण्याचे कार्य इथल्या 'इव्हेंट मॅनेजर्स'नी हाती घेतले आहे त्याला तोड नाही.
असो, पैसा म्हटले की हे आलेच नै का ...
अजुन एक किस्सा सांगु का, मागच्यावेळी की नै आपण ना ( पक्षी : भारत ) पहिल्या फेरीतच धुळ खात गारद झालो ( भेंडी काय दमदार वाक्य होते हे ) असे एका पेप्रात वाचले होते, मग काय हो, धंदाच बसला की ह्या क्रिकेटवाल्यांचा. कारण ह्या पराभवानंतर भारत आणि पाकीस्तान ( ते ही आपले भावंड, पडले पहिल्याच फेरीत बाहेर ) मधले तमाम रसि भयंकर निराश झाल्याच्या बातम्याही आम्ही वाचल्या.
मग काय झाले तर एक गंमतच घडली, २०-२० नामक ह्या क्रिकेटचे एक छोटेसे पिल्लु जन्माला घालण्यात आले, त्याचाही अचान्क विश्वचषक भरवण्यात आला आणि त्यात ना भारत-पाकिस्तान ही 'फायनल' खेळवण्यात आली ( हो हो, खेळवण्यात आली हे बरोबर आहे ) आणि बरं का त्यात ना भारत जिंकला, पुन्हा इथे क्रिकेटचे रोपटे जोमाने फोफावले व पुन्हा पैशाच ओघ सुरु झाल. कालांतराने मग लोकांना हा '२०-२० नशेचा डोस' फार आवडला असे उत्पादकांचे मत झाले व त्यासाठी खास त्यांनी 'आय पी एल' नामक स्पर्धा दरवर्षी भरवण्याचे ठरवले, बघा लेको किती क्रिकेट बघताय ते................................. परफेक्ट बिझीनेस, नै का ?

असो, आम्ही एकदा लिहीत गेलो मी मुळ विषय हरवुन काहीतरी तिसरेच लिहण्याची आम्हाला ( राऊतांसारखी ) सवय आहे, सबब आता आम्ही 'बॅक टु विषय' येतो.
सध्या म्हणे क्रिकेटचा विश्चचषक सुरु आहे आणि त्यात "भारत" म्हणे आघाडीचा दावेदार आहे,पुन्हा असोच.
आमचा तसा ह्याला विरोध वगैरे नाही बरं का पण ह्या निमित्ताने जे 'रान पेटवले' गेले आहे ते पाहुन आम्हाला अंमळ काळजी वाटत आहे की ह्या आगीत आपले किती महत्वाचे विषय उगाच भक्षस्थानी पडणार आहेत.
ह्या महान देशातले लोक आता कामंधंदे सोडुन जिथे मिळेल तिथे क्रिकेट बघत बसणार आणि बाकीचे विषय आपोआप फाट्यावर मारले जाणार.

- आता युनियन बजेट, रेल्वे बजेट आणि अन्य घटना ह्याच कालावधीत घडतील व आपण आणि मिडिया (ह्यांना क्रिकेटचेही देणे नाही आणि बजेटशीही घेणे नाही, पैसा बोल्ता है साब ) ह्याकडे चक्क दुर्लक्ष करु.
- आता सरकारी कार्यालये, खासगी कचेर्‍या, इतर महत्वाच्या सेवा इथले कर्मचारी 'ऑनड्युटी' मॅच बघत बसणार व कामे तुंबणार
- जे लोक आधीच रिकामटेकडे आहेत ते आता चौकाचौकात टीव्ही लाऊन किंवा एखाद्या दुकानासमोर रस्त्यावर उभे राहुन मॅच बघणार, आरडाओरडा करणार व त्यामुळे काय नुकसान होते ते तुम्हीच सांगा, आम्हाला सांगण्याची इच्छा नाही.
- मार्च / एप्रिल म्हणजे परिक्षांचा सिझन हो, आता कसला अभ्यास आणि कसल्या परिक्षा ? मारुन मुटकुन अभ्यासाला बसवणे म्हणजे त्रासच ना ?
- मेन म्हणजे आता ह्या कालावधीत 'वेळ आणि सेवेची गणिते' धडाधड चुकणार
( ( आमची तक्रार नाही, आम्हाला केवळ गंमत वाटते हे आधीच कबुल करतो ) किस्सा पहिल्या दिवशीचा, शनिवारी दुपारनंतर आमच्या भागातली बहुसंख्य दुकाने उगाच बंद किंवा इनअ‍ॅक्टिव्ह झाली, इतर सेवापुरवठादारांनी हक्काची 'मॅच बघायची सुट्टी' घेतली, बाहेर निघालो असतो २-३ ठिकाणी रस्त्यावरच टीव्ही लाऊन भारत्-बांग्लादेश ह्यांच्यातले महायुद्ध(?) पाहण्याचा उत्सव अत्यंत उत्साहात आणि जोशात चालु होता, त्यामुळे झालेल्या ट्रॅफिकच्या गमतीत आम्हाला उशीर झाला, नंतर एका हॉटेलात जेवायला गेलो असता तिथे चक्क मोठ्ठी स्क्रीन लाऊन सामने पहाणे चालु होते व सर्व सेवापुरवठा करणारे कर्मचारी ते पाहण्यातच व्यस्त होते, सामने पाहण्याचा त्यांचा मुलभुत हक्क मान्य केला तरी 'ऑनड्युटी' हे असे वर्तन आता अजुन ४० दिवस चालणार आहे का ? हे राम ! )

असो, उगाच जास्त वितंडवाद घालत नाही !
क्रिकेट हा एकेकाळी 'बघण्यालायक' खेळ होता, आम्ही बघयचो व तो आता 'बघवेना' असा झाला म्हणुन ही ४ वाक्ये.

बाकी ही सुरवात आहे.
आम्ही आमच्या ह्या आवडत्या खेळावर असेच भाष्य करत राहु, स्पर्धा अजुन ४० दिवस आहे म्हणतात

मध्यंतरी 'धोबीघाट' हा अत्यंत प्रगल्भ, सामाजिक जाणिवा असणारा, आंतरिक संवेदनांना हात घालणारा, आधुनिकोत्तर साहित्यात मानाचे पान असणारा असा लै भारी अभिजात सुंदर चित्रपट आहे असे ऐकले होते ( व म्हणुनच आम्ही तो पाहिला नाही हा भाग वेगळा ).
म्हणुनच आम्ही ही आमची लेखमाला "धोबीघाट" ह्या संकल्पनेच्या स्वरुपात सादर करणार आहोत व एकेका विषयाची मनोसोक्त धुलाई करणार आहोत.

पुढचे आकर्षण : 'धोबीघाट' विश्वविजेतेपदाच्या दावेदारांचा - भाग # १ : भारत

धन्यवाद !

Monday, February 7, 2011

चांगला चित्रपट / वाईट चित्रपट

गेले काही दिवस एका विचित्र प्रश्न कम समस्येने आम्हाला भयंकर छळले आहे. ह्या विषयात आमचे ज्ञान जरा कमीच आहे, पण ह्यामुळे लफडा असा होतो की कुठे काय पॉलिटिकल करेक्ट मतप्रदर्शन करावे ह्यासंबंधी आमचा फार घोळ होऊ लागला व आम्हाला लोकांचे 'तुला चित्रपटातले काय कळते, मुर्ख आहेस, तु चित्रपट पाहुच नकोस' वगैरे टोमणे ऐकावे लागत आहेत.

आम्ही माठ आहोत व आम्हाला कशातलेच काही कळत नाही हे मान्य आहे, पण आता चारचौघात निदान चित्रपटांविषयी मतप्रदर्शन करताना आपली झाकली मुठ सव्वा लाखाची कशी असावी ह्यासंबंधी मार्गदर्शन हवे आहे.

चित्रपट 'चांगला' असतो म्हणजे नक्की काय आणि चित्रपट 'वाईट, फालतु, भिकार, थर्डक्लास' असतो म्हणजे नक्की काय ? तसेच कुठल्या चित्रपटाला चांगले का म्हणावे किंवा त्या चित्रपटाला वाईट का ठरवावे ह्यासंबंधी काही सर्वसाधारण समज असतील तर ते नक्की कोणते असे प्रश्न मला पडले आहेत..
गेले काही वर्ष मला समजणारा चित्रपट आणि मिडिया, मित्र, संबधित ह्यांना कळणारा चित्रपट व आम्ही दोघांनी केलेले त्यांची मुल्यांकन ह्यात जमिन-आस्मानाचा फरक पडत आहे.

१. बर्‍याच लोकांनी नाके मुरडलेला आणि 'अब्राम्हण्यम' ठरवलेला 'दबंग' हा चित्रपट वाईट कसा असु शकतो तेच मला कळत नाही. चित्रपट बनवताना त्यांनी डिफाईन केलेली कक्षा आणि तो बघायला जाताना माझ्या असणार्‍या काही 'किमान अपेक्षा'ह्यांचे समिकरण व्यवस्थित जुळत असेल आणि तो चित्रपट जर मला पुरेपुर आनंद देत असेल तर त्याचा 'फालतुपणा' मी कुठल्या खात्यावर मोजायचा ?
मनोरंजन ही किमान अपेक्षा ठेऊन जर मी दबंग पहात असेन आणि त्यात मी पुर्ण समाधानी असेन तर त्यामध्ये 'प्रकाश झा, सत्यजीत रे, (आजकाल ) आमीर खान, अमोल पालेकर ( ही मंडळी एका पंक्तीत बसवल्यामुळे काही जणांच्या भावना दुखावल्या सतील तर क्षमस्व हो बाबांनो )' ह्यांच्या चित्रपटात असलेले तथाकथित 'मुल्य' घेऊन मी त्याची तुलना दबंगशी का करावी ?
भली त्यातली गाणी रेहमानच्या सुरेल गाण्यासारखी सफाईदार नसतील पण म्हणुन का ती फालतु गाणी होतात ?
दबंगमध्ये मख्ख चेहर्‍याचे अभिनेते, काही केल्या घंटा कळत नाही असा त्यांचा अभिनय व त्याचा अर्थ, जडबंबाळ संवाद, अगम्य कॅमेरा अँगल्स आणि प्रकाशयोजना वगैरे नाहीत म्हणुन त्याला 'फालतु' ठरवावे का ?
पण बहुतेकांच्या मते 'दबंग' हा तद्दन टुकार, फालतु सिनेमा आहे व त्याच्याशी आम्ही साफ 'असहमत' आहोत.

२. आजकालचा भरमसाट चर्चा झालेला 'उडान' ... मला नाही आवडला.
इनफॅक्ट मला बोअर आणि बर्‍यापैकी कंटाळवाणा वाटला. त्यातली जमली म्हणावी अशी पात्रनिवड आणि त्यांनी केलेला निखळ अभिनय सोडला तर त्या चित्रपटात काय आहे ते मला अजिबात समजले नाही. १० मिनिटाची स्टुरी उगाच २ तास आणि ७ मिनिटे लांबवली आहे, त्यासाठी अगदीच अनावश्यक, रटाळ, बाळबोध आणि बर्‍यापैकी पुनरावृत्ती होणारे सिन्स घुसडले आहेत. काही पात्रांची उगाच युसलेस एंन्ट्री आणि समावेश. शेवटचा एक दणका सीन सोडला आणि १-२ गाण्यातली काही कडवी सोडली तर ह्या चित्रपटाचा 'महानपणा' मी कोणत्या खात्यावर मांडायचा ?
अभिनय चांगला मान्य !
अहो पण नुस्ता अभिनय जर तुम्हाला २ तास एका ठिकाणी बसवुन ठेऊ शकत नसेल, स्टोरी आणि पटकथेचे एकमेकांशी जुळत नसेल, पात्रे एकमेकांशी अगम्य व्यवहार करत असतील, तेच तेच (रटाळ) सीन्स पुन्हापुन्हा येत असतील तर मी हा चित्रपट उगाच का 'आवडुन घ्यावा' ?
असो, पण पण बहुतेकांच्या मते 'उडान' हा अत्यंत सुंदर, सफाईदार, क्लासिक आणि उच्च निर्मीतिमुल्य असलेला सिनेमा आहे व त्याच्याशी आम्ही साफ 'असहमत' आहोत.

ही केवळ उदाहरणे झाली, पण असेच काहीसे सर्वच बाबतीत आढळते.
मग चांगल्या चित्रपटाची व्याख्या काय आणि एखादा चित्रपट वाईट आहे असे मत कोणत्या चाचणीनंतर बनवावे ?

१. केवळ चांगली ( पक्षी : फेमस, स्टारडम असलेली ) स्टारकास्ट, एखादा मोठ्ठा बॅनर, गाजलेला नामवंत संगीतकार, दिग्गज दिग्दर्शक वगैरेंनी बनलेला सिनेमा इन जनरल 'चांगलाच' असतो का ?
२. अचाट स्टोरीलाईन , अगम्य कॅमरा अँगल्स, रटाळ आणि अगम्य संवाद, साबणछाप अभिनेते व त्यांचा तसलाच अभिनय आणि सोबत 'समांतर सिनेमा'च्या नावाखाली उच्चभ्रु आणि मिडियाने ओढुनताणुन चालवलेला उदोउदो ह्यामुळे तो तद्दन टाकावु सिनेमा 'चांगला' कसा ठरतो ?
३. दे दणादण मारामारी, मस्तपैकी अ‍ॅक्शनदृष्ये, खुसखुषीत ( पण कमी साहित्यमुल्य असलेली टपोरी म्हणता येईल अशी ) डायलॉकबाजी, मस्त मस्त लोकेशन्स आणि डान्स वगैरे, त्या वेळेपुरती खुष करुन टाकणारी उडत्या चालीची गाणी ( क्वचित आयटम साँग ) आणि ह्यासोबत इतर प्रेक्षकांचा जल्लोश, हिरोच्या एंट्रीला पडणार्‍या कचकचीत शिट्ट्या, एखाद्या कमेंटनंतर प्रेक्षकांचे खळखळुन हसणे, गाण्याच्यावेळी आरोळ्या / शिट्ट्यांचा गदारोळ आदी बाबी मला मस्तपैकी मनोरंजन देत असतील तर तो चित्रपट 'फालतु' कसा होतो ?
४. 'गरम मसाला' सारख्या सिनेमात असलेला मस्त सावळागोंधळ, पळापळ, टायमिंगवाले डायलॉक्स, छान छान हिरॉईन्स,माफक कॉमेडी, १-२ गरमागरम आयटम साँग्स, काही फारिन लोकेशन्स आदी मला २ तास मस्त करमणुक देत असतील तर त्यांचा 'फालतुपणा' मी कोणत्या खात्यात मांडायचा ?

असो, अशी अनेक उदाहरणे देता येतील ...
माझा एकच प्रश्न आहे, एखादा चित्रपट चांगला का असतो किंवा तो वाईट का असतो व ते कसे किंवा कोणत्या चाचण्यांच्या आधारे ठरवावे ?

अवांतर :
आजकाल अत्यंत हेटाळणीच्या सुरात खिजवण्यासाठी "पिटातले प्रेक्षक" हा शब्दप्रयोग करणार्‍यांचेही मला आजकाल ज्याम आश्चर्य वाटते. बाय द वे, एकुण व्यवसायापैकी किमान ७०% व्यवसाय ह्याच पिटातल्या प्रेक्षकांकडुन होतो व बहुतेक सिनेमे त्यांच्यासाठीच निघतात असा माझा अंदाज आहे.
बाकी तथाकथित समांतर, उच्च अभिरुचीमुल्य असणारे, कलात्मक सिनेमांना किती प्रेक्षक असतात हे ज्यांचे त्यांना पहावे, कमी प्रेक्षक असण्याला मी कमीपणा मानत नाही पण जे हा चित्रपट पहात नाही किंवा ज्यांना असे चित्रपट कळत नाहीत असा तद्दन खोटा प्रचार चालवणार्‍या सिनेमातील उच्चभ्रुंचे मला कौतुकमिश्रित आश्चर्य वाटते. त्यांनी असे चित्रपट जरुर कौतुकाने आपापला कंपु जमवुन व शक्य तितके आंबट तोंड करुन पहावेत, आमचे अजिबात लुस्कान नाही, मात्र ह्या चित्रपटांचे कौतुक करताना बिचार्‍या त्या 'पिटातल्या प्रेक्षकां'ना हिणवुन त्यांच्या नसलेल्या कमीपणाच्या जोरावर स्वतःचा नसलेला महानपणा सिद्ध करणार्‍या पातक करु नकात एवढेच आमचे मत आहे.
दोन्हीहा गटांचे क्लास वेगळे आहेत, वेगळेच रहावेत ह्यात शहाणपण आहे. जो तो आपापल्या जागी ग्रेट आहे !

Tuesday, January 18, 2011

मिसळपाव.कॉम - क्रिकेट विश्वचषक २०११ - आवाहन ...

मित्रांनो, बर्‍याच दिवसात ( खरं तर महिन्यात ) ब्लॉग अजिबात अपडेट केला नाही, आम्ही ब्लॉगला सोडचिठ्ठी दिली की काय अशीही शंका काही जणांना आली असल्यास त्याचे मला आश्चर्य वाटणार नाही, मनापासुन दिलगीर आहे.
जॉब चेंज आणि इतर काही बाबींमुळे मध्यंतरी लिखाणास अजिबात वेळ मिळाला नाही ...

मात्र आता आम्ही पुन्हा ब्लॉगविश्वात दाखल होत आहोत ते ... क्रिकेट विश्वचषक २०११ चा मुहुर्त साधुन.
सध्या मिसळपाव.कॉमवर आम्ही ह्या विश्वचषकाचा पुर्ण आढावा आणि क्षणचित्रे सादर करण्याचे योजले आहे, आम्ही हेच काम आधी 'फिफा वर्ल्डकपलाही' केले होते.
त्यासंबंधीचे हे निवेदन इथे देत आहे.
तुमच्यातल्या कुणाला ह्यात सामिल होण्याची इच्छा असल्यास मिपावर तुमचे स्वागत आहे :)

आता इथुन पुढे माझा ब्लॉग आणि मिपाचे 'क्रिकेट विश्वचषक सदर' हे नेहमी अपडेट होत राहिल असे विश्वासाने सांगतो.
लोभ आहेच, तो कायम रहावा हीच इच्छा, धन्यवाद :)

======================================================

नमस्कार मंडळी,

तयार आहात ना जल्लोशाला ?
तयार आहात ना ढोल-ताशे, टाळ्यांचा कडकडाट, आरोळ्या आणि जयजयकाराला ?
तयार आहात ना एखाद्या चुकलेल्या फटक्यावर, सुटलेल्या झेलावर आणि न दिलेल्या विकेटीवर खडाजंगी चर्चा करायला ?
तयार आहात ना विजयानंतर डोक्यावर घेऊन नाचायला आणि लाजिरवाण्या पराभवानंतर हक्काने संघाला ४ खडे सुनवायला ?

काय म्हणता ?
कशाची तयारी करायची ?

अहो 'क्रिकेट हा धर्म' असलेल्या आपल्या देशात अजुन महिन्याभरात क्रिकेटचा कुंभमेळा भरतो आहे. जगातले दिग्गज खेळाडु, चाणक्याची कुटिल रणनितीने समोरच्या संघाचे मनोधैर्य नेस्तनाबुत करणारे अनुभवी दिग्गज प्रशिक्षक आणि त्यांच्याबरोबर त्यांचे हजारो पाठिराखे इथे डेरेदाखल होत आहेत.
निमित्त आहे ..... आयसीसी विश्वचषक २०११ !!!

मग झाली का तुमची तयारी ?
सुट्ट्यांचे प्लानिंग केले असेलच, काही उत्साहींनी आपल्या 'मेन इन ब्ल्यु' संघाच्या जर्सीजही मागवल्या असतील, कुठे आणि कुणाबरोबर बसायचे आणि सामना एंजॉय करायचा ह्याचे प्लानिंगही झाले असेल.
अहो एक ना दोन अशा हजारो गोष्टी आहेत, सगळ्यांचे सेटिंग करायचे आहे, वेळ कमी आणि कामे ढीगभर राहिली आहेत, काहीही झाले तरी ह्या विश्वचषक जल्लोश आणि उन्माद अनुभवायचाच आहे.

बरोबर ना ?
तुमचेही अगदी हेच मत असेल तर तुमचे आमच्या क्लबात स्वागत आहे, आम्ही अगदी तुमच्याच शोधात होतो.
आम्हाला हवे आहेत अगदी तुमच्यासारखेच निस्सिन क्रिकेटवेडे आणि 'मेन इन ब्ल्युज' चे खंदे समर्थक.

कारण ....
हेच क्रिकेटचे महायुद्ध इथे मिपावर आपल्याला इथल्या मराठी रसिकांसाठी खास मराठीतुन सादर करायचे आहे, भले अनेक दिग्गज वेबसाईट्स, न्युज चॅनेल्स, प्रिंट मिडिया आपापल्या पद्धतीने हे सर्व कव्हर करणार असतील, करु द्यात त्यांना, पण इथे आपल्याला आपल्या ढंगात, आपल्य मस्तीत आणि आपल्या शैलीत हा 'क्रिकेट महोत्सव' साजरा करायचा आहे.

ह्यापुर्वी आपण साजरा केलेल्या 'फिफा फुटबॉल विश्वचषक-२०१०' चा अनुभव आणि त्यातुन मिळालेले गुंजभर शहाणपण आपल्या सोबत आहेच. पण ह्यावेळी आपला प्लसपॉइन्ट आहे तो तुमच्यासारखे क्रिकेटला धर्म मानणारे क्रिकेटचे निस्सीम चहाते, अहो तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर काय अशक्य आहे ?

आपण इथे काय करणार आहोत ?
१. अहो इथे तुम्हाला ह्या घनघोर युद्धातल्या प्रत्येक संघाची अगदी हटके शैलीत ओळख करुन दिली जाईल, त्यांचे खंदे वीर, बलस्थाने आणि कच्चेदुवे ह्यावर घनघोर चर्चा केली जाईल.
२. प्रत्येक गटाची बळाच्या तोलामोलाची चवीने चर्चा केली जाईल.
३. महत्वाच्या आणि रंगलेल्या सामन्यांचे इथे आपल्या शैलीत विश्लेषण सादर केले जाईल, फोटोफिनिश दिले जाईल.
४. जर-तर च्या अफाट चर्चा बेभानपणे रंगतील.
५. गुणतक्ता, क्रमवारी, सांख्यिकी अगदी अवघे अवघे इथे सादर होईल.
६. सर्वात महत्वाचे, इथे ह्या जल्लोशात 'तुम्ही' असणार आहात, इथे तुम्हाला हव्या त्या पद्धतीने जल्लोश केला जाईल, अहो खेळ आपला तर त्याचा जल्लोश आपल्या पद्धतीने नको का ?


मग आहात ना तुम्ही आमच्याबरोबर ?
तुमच्या सहभागाने ही मैफिल अजुन रंगीन होईल व त्यात अजुन मजेदार गहिरे रंग भरले जातिल हा आमचा विश्वास आणि अनुभव आहे ...

नेहमीप्रमाणे आपल्या बरोबर आहेत गतवेळचे तज्ज्ञ, ज्ञानी आणि निपुण क्रिडामित्र, आपल्यासोबत आहे त्यांचा अनुभव आणि त्यांची क्रिकेटवरची भक्ती, आपल्यासोबत आहे इतर मान्यवरांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या आपल्याकडुन असलेल्या अपेक्षांचा डोंगर.
तर मग लागा तयारीला, येऊ देत तुमच्या कल्पना, कळवा तुमचा सहभाग आम्हाला, होऊ ह्यात मिपाचा हा क्रिकेट महोत्सव एकदम दणक्यात आणि जोशात !!!
येऊदेत तुमच्या सहभागाची सुचना आम्हाला, तुमच्याही रसिकतेची पेशकश मिपावर होऊद्यात ....

चला, साजरा करुयात 'मिपा - क्रिकेट विश्वचषक २०१ १ महासंग्राम' खास आपल्या शैलीत, आपल्या मस्तीत आणि आपल्या सहभागाने !!!!

टीप :

१. ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी कृपया आपला सहभाग मला 'व्यनीने' कळवावा, सोबत तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे ह्याचे थोडक्यात स्पष्टीकरण असावे.
२. माझे आणि इतर संबंधितांचे सध्या बॅकराउंडला ह्या सदरासंबंधीत इतर काम चालु आहे, आपल्या सुचना, आपले सल्ले आणि आपला अनुभव आम्हाला निश्चितच मोलाचा आहे.
३. आम्हाला नुसते टेक्निकल हवे आहे असे अजिबात नाही, तुम्ही अगदी जनरल जल्लोशाबद्दलही लिहु शकता. ऑफिसात, घरात, रस्त्यावर, क्लबात, पबात किंवा कुठेही अनुभवलेल्य रोमांचात तुम्हाला आम्हाला सामिल करुन घ्यायचे असेल तर तुमचेही स्वागत आहे.

बाकी सगळेच इथे देणे शक्य नाही, जशा जशा गोष्टी पुढे सरकतील तशी भर घालत जाऊ ...
चला, पटकन तुमचा सहभाग आणि सुचना / सल्ले / सुचवण्या कळवा, अहो हा तुमचाच महोत्सव आहे आणि तो तुमच्याच श्टायलीत झाला पाहिजे, नै का ? :)

तळटीप :
जे मिपावर नविन आहेत त्यांच्यासाठी आम्ही पुर्वी केलेल्या 'फिफा विश्वचषक २०१०' स्पर्धेच्या जल्लोशाची लिंक खाली देत आहे, त्यावरुन तुम्हाला ह्या महोत्सवाची जराशी कल्पना येईल ...

http://www.misalpav.com/tracker?page=1&title=&uid_touch=&type_1=fifa2010&tid=All&tid_1=All&tid_2=All

धन्यवाद !!!