Tuesday, March 1, 2011

'धोबीघाट' विश्वविजेतेपदाच्या दावेदारांचा - भाग # १ : भारत

टिप :
सदर लेखात क्रिकेट आणि भारतीय संघाविषयी काही टोकाची आणि प्रामाणिक मते आढळतील, ती वाचुन आपल्याला अस्वस्थ वाटत आहे असे वाटल्यास त्या क्षणी लेखाचे वाचन थांबवावे अशी आग्रहाची विनंती.
----------------------------
कबुल केल्याप्रमाणे आम्ही आमच्या 'धोबीघाट' लेखामालेचे दुसरे पुष्प घेऊन ह्या विश्वचषकाच्या मौहोलात दाखल झालो आहोत, गेल्या काही सामन्यातले भारतीय संघाचे प्रदर्शन पाहुन आम्ही पहिल्या भागात जे उत्साहाने 'दुसरा भाग टीम इंडियाला समर्पित' असे लिहले होते त्याचे बरे वाटले, निदान आम्ही शब्द मोडल्याचे पाप आम्हाला लागणार नाही आणि आम्ही आता ह्या लेखात टिम इंडियाचा फुल्टु धोबीघाट करणार आहोत, असो.

ह्यावेळेसही म्हणे भारतीय संघ विश्वविजेतेपदाच्या शर्यतीत आहे, मला हे ऐकुन आश्चर्य नाही वाटले, मला 'ह्यावर्षी पतंगराव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत' ह्या वाक्याची जितकी सवय झाली आहे तितकीच 'भारत ह्यावर्षी क्रिकेट विश्वचषकाचा दावेदार' ह्या वाक्याची झाली आहे. पतंगरावांच्या संदर्भातले वाक्य मी दर ५ वर्षांनी वाचतो आणि क्रिकेटचे ४ वर्षांनी एवढाच काय तो फरक, बाकी काय होतेय ते मी पाहिले आहे आणि तुम्हीही पहात आहात. माझा तर आजकाल 'महागाई कमी होणार', 'स्वतःच्या घराचे स्वप्न मध्यमवर्गाच्या आवाक्यात येणार', 'भारत अतिरेकी संघटनांच्या नाड्या आवळणार' ह्यापासुन ते थेट आत्तापर्यंतचे 'स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार देणार' ही वाक्ये जशी कायम जनतेच्या डोळ्यात धुळ फेकुन राज्यसत्ता भोगण्यासाठी वापरुन वापरुन गुळगुळीत झाली आहेत तसेच 'भारत यंदा विश्वचषक जिंकणार' हे वाक्य क्रिकेटवेड्या जन्तेच्या खिशातला पैसा काढण्यासाठी वापरुन वापरुन गुळगुळीत झाले आहे असे वाटते, रिझल्ट तर तुमच्यासमोर आहेत, नै का ?

तरी बघा ह्या विश्वचषकात आयोजकांनीच मस्त चालुपणा केला आहे, मागच्यावेळी जेव्हा भारत-पाकिस्तान प्राथमिक फेरीतच गारद होऊन बाहेर पडल्यावर ह्या आयोजकांचा जो सुफडा साफ झाला होता त्यातुन बाहेर पडण्यासाठी त्यांना थेट "२०-२०" नावाचे उत्तेजक घ्यावे लागले, असो ह्यावर आम्ही मागच्या भागात पुरेसे भाष्य केले आहेच. तर मी काय सांगत होतो की ह्यावेळी चालुपणा करुन एकुण १४ संघांचे २ गट पाडले ( प्रत्येक गटात साधारण ३ फालतु टिम ) आणि त्या-त्या गटातुन ४ संघ पुढच्या फेरीत दाखल होतील असा नियम काढला.
आहे की नै गंमत, म्हणजे ओढुन ताणुन का होईना टॉप संघाना ( माझा व्ह्यु बिझीनेसचा, बाकी क्वालिटी तुम्ही पहा ) पुढची फेरी सुलभ झाली की नै ? एखाद्या बांग्लादेशने भारताला आणि अजुन कुणी पाकिस्तानला हरवले म्हणुन उगाच कोट्यावधींचे लुस्कान नको. ह्याला राजकिय भाषेत "डमी उमेदवार" देणे असे म्हणतात, म्हणजे एखाद्या मतदारसंघात एखाद्या मातब्बर नेत्याच विजय शुअर शॉट फिक्स असेल तर इतर पक्ष समजुतदारपणे उगाच नगाला नग म्हणुन 'डमी उमेदवार' देतात अशी रित आहे राजकारणाची, त्यातुन चमत्कार घडवणारा आणि मोहिते पाटलांसारख्या दिग्गजाला बाहेरचा रस्ता दाखवणार्‍या 'भारत भालकें'सारखा एखादाच आणि तो चमत्कारही एकदाच, हे जर वारंवार घडत असेल तर मग खेळायचे नियमच बदलावे लागतात व तेच आता घडले आहे.
असो, आता भारतासाठी ( किंवा कुठल्याही नामवंत संघासाठी ) पुढची फेरी अलमोस्ट फिक्स आहे, बाकीचे लिंबुटिंबु इथे खेळतात ह्याचीच चैन आहे, काही जण 'का खेळतात' हा प्रश्नच आहे.

असो, सध्या भारतीय संघाच्या मजबुत बांधणीचा आणि भयंकर फॉर्मचा वारंवार वास्ताँ दिला जातो, हे अर्थातच स्वाभाविकच आहे की हे असावेच लागते, हे सगळ्यांचे असते. मला सांगा तुम्ही एखाद्या संघाच्या कर्णधाराला "जाऊ दे, एवढ्या वेळी आमची टिम काय फॉर्ममध्ये नाही, बॅटिंगची बोंबाबोंब आहे आणि बॉलर्स तर हातापाया पडुन आणले आहेत. बहुतेक आम्ही पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळू" असे बोलणे ऐकले आहे काय ? अहो विश्वचषकात खेळताय ना, मग चांगला फॉर्म आणि मजबुत बांधणी असणे अपेक्षितच आहे, अन्यथा संघ काय प्रतिस्पर्ध्यांच्या दाढ्या करायला पाठविला आहे की त्यांना मॉलिश द्यायला.
बाकी राहिली आकडेवारी, त्याचे कुणाला सांगताय ? मागच्यावेळी काय ही आकडेवारी नव्हती का ?

बाकी गेल्या काही दिवसात २ सामने थोडे थोडे पाहिले हो भारतीय संघाचे, भरुन आले बघा ह्या क्रिकेटचे बदलते स्वरुप पाहुन, च्यायला प्रत्येक डावात ३००+ ? अरे खेळपट्टी बनवता की गुळगुळीत पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे बांधता ? जरा तरी त्या 'गोलंदाज' नावाच्या एकेकाळी क्रिकेटचा महत्वाचा भाग समजले जाण्यार्‍या लोकांवर दया करा.
तर ते असो, आपण बोलु भारतीय संघाचे, तर भारतीय संघाने प्रत्येक सामन्यात ३००+ धावा ठोकल्या, सुरेखच आहे, फलंदाजांचे निर्विवाद यश आहे. अहो पण नंतर समोरचा संघही 'अलमोस्ट तेवढ्याच' धावा करतो ह्याला काय अर्थ आहे ? आपली बॉलिंग आहे का मजाक ? जर आपण 'असेच' खेळणार असु तर सर्वच गोलंदाजांचा घरी बसवुन ११ च्या ११ फलंदाज खेळवायला काय हरकत आहे ? एखाद्या ओव्हरमध्ये २-३ विकेट्स काढणे आणि उरलेल्यांमध्ये धु-धु धुतला जाणे ह्याला मी 'श्रेष्ठ गोलंदाजी' मानत नाही, त्या मिळालेल्या विकेट्स योगायोग आहेत. एखाद्याने टेचात १० पैकी २-३ ओव्हर्स मेडन टाकाव्यात, एकुणात जास्तीत जास्त ३५-४० धावा द्याव्यात आणि मग ज्या काही असतील त्या 'विकेट्स' घ्याव्यात, त्याला म्हणतात बॉलिंग. नाहीतर ह्या स्पेशॅलिस्ट बॉलर्स ( पक्षी : जहीर, नेहरा, मुनाफ वगैरे ) आणि पार्टटाईम बॉलर्स ( युवी, रैना आणि इतर ) ह्या गटांमध्ये फरक काय राहिला ?
फरक रहातच नसेल तर ह्यांना खेळवुन उगाच ३-४ चांगले फलंदाज आणि फिल्डर्स का कमी खेळवावेत, कारण एकदा का फलंदाजांकडुन खा-खा मार खाल्यावर ह्या बॉलर्सचा मैदानावर काय उपयोग असतो ? मुनाफला बॉलिंग झाल्यावर कुठे लपवावे हा प्रश्नच असतो कारण आपल्या स्पेशॅलिस्ट बोलर्सचे 'क्षेत्ररक्षण' हा सरकारी कारभारामधली 'पारदर्शता' इतकाच रोचक आणि संशोधनाचा विषय आहे.

असो, आता आम्ही काही निवडक खेळाडुंबद्दल ४ शब्द लिहणार आहोत.
१. विरेंद्र सेहवाग उर्फ नवाब :
खरे तर नवाब हे चुकीचे संबोधन आहे, सेहवागचे व्यक्तिमत्व जुळते ते सातारच्या राजे भोसल्यांशी. कृती आणि एकुणच वागण्यात तोच बेधडकपणा, तीच बेफिकिरी आणि तोच निडरपणा. मनापासुन खेळला तर समोरच्यांच्या चिंधड्या आणि मुड नसलाच तर 'तुमचा खेळ आणि तुम्ही गेलात चुलीत. मी मला वाटतो तसा शॉट मारणार, बाकी तुम्ही बघुन घ्या' ही वृत्ती.
क्षेत्ररक्षणात उगाच म्हणायचे म्हणुन चांगला फिल्डर, बाकी एखाद्या लग्नात जसा वरपक्षाकडच्या काकांच्या 'ताटे मोजायला मी इथे काय मोजणी कारकुन म्हणुन आलो आहे काय' सारखाच 'इथे क्रिकेटमध्ये मला काय डाय मारुन बॉल आडवायला आणले आहे काय, माझे काम बॅटिंग व तेच मी करणार' हा अ‍ॅटिट्युड.
चौकातला मवाली जसा परिणाम माहित असुन मोहल्ल्याबाहेरची पोरगी छेडतो आणि मार खातो तसेच हे नवाबसाहेबपण नेहमी 'ऑफ स्टंपबाहेरचा चेंडु छेडतात आणि विकेट टाकतात'. चालायचेच, मवाली आणि सेहवाग दोघेही सुधारणार नाहीत, सुधारले तर त्यांना अनुक्रमे मवाली आणि सेहवाग का म्हणावे बरं ?

२. युवराज सिंग :
स्वातंत्रसंग्रामाच्या काळात जसे चोरीसाठी तुरुंगात गेलेले काही लोक स्वातंत्र्यानंतर ताम्रपत्र घेऊन 'स्वातंत्रसैनिक' झाले आणि त्या तुरुंगवासाच्या पुण्याईवर आयुष्यभर 'मानाचे पान' घेऊ लागले तसेच 'नॅटवेस्ट सेरिजमधली एक खेळी आणि ६ चेंडुत ६ सिक्सर' ह्यांच्या पुण्याईवर युवराज किती दिवस संघात मिरवणार आहे ते गांधीबाबांना माहीत.
एकेकाळी हा तंदुरुस्त आणि चपळ होता, आता नुसता त्याचा ढोल झाला आहे तो ही खणखणीत वाजत नाही, मैदानावर धावतो तर असे वाटते मायला ह्याला पळताना धाप वगैरे लागुन मैदानावरच 'प्राणवायु' द्यावा लागेल की काय ?
त्याला एकेकाळी भारताचा 'जाँटी र्‍होड्स' असे म्हणत, आजकाल त्याला 'मुनाफ पटेल' असे टोपणनाव आहे व ते चारचौघात उच्चारायला बंदी आहे, मुनाफचा म्हणे अपमान होतो, होत असेल, आम्हाला जास्त माहित नाही.
सध्या महाराष्ट्रात रस्त्यांची जी हालत आहे तीच युवीच्या फॉर्मची आहे ... थर्डक्लास.
सध्या टिमच्या यशापयशात युवीचे काँट्रीब्युशन किती .... ( सुरेशजींच्या मते ) कॉमनवेल्थ घोटाळ्यात त्यांचाजेवढा सहभाग होता तेवढेच.
युवीकडुन अपेक्षा किती ठेवाव्यात ..... कांद्याकडुन ठेवता तितक्याच, डोळ्यात नक्की पाणी आणेल. कांदा जसा भाव चढले की ग्राहकांच्या आणि उतरले की उत्पादकांच्या डोळ्यात पाणी आणतो तसाच युवी खेळला तर समोरच्या संघाच्या आणि गंडला तर आपल्याच संघ आणि समर्थकांच्या डोळ्यात पाणी आणतो.

३. युसुफ पठाण :
कुणाच्याही एखाद्याच्या घरी जसे एखाद्या दिवशी इरेस पेटुन बाबा स्वतः संपुर्ण स्वयंपाक करतात आणि तो खरोखर उत्कृष्ट होतो तसेच युसुफचे आहे, एखाद्या दिवशी तो खरेच नजर लागेल असे खेळतो. पण शेवटी बाबा रोज स्वयंपाक करु शकत नाहीत आणि युसुफही प्रत्येकवेळी खेळु शकत नाही.
कित्येक वर्ष एकाच वर्गात काढलेल्या एखाद्या टग्याला (सध्याच्या अर्थाने दादा नव्हे, तो विषय नंतर कधीतरी ) लेक्चरला पाहुन एखादा नवा जॉइन झालेला मास्तर जसा गर्भगळित होतो तसे युसुफ मैदानात फलंदाजीला उतरल्यावर 'आता काय वाढुन ठेवले आहे' ह्या विचाराने समोरच्या संघाचेही तेच हाल होतात. पण दोन्हीतली साम्य आहे, टग्या कधीतरीच असे वर्गात घुसतो तसाच युसुफ 'कधीतरी' समोरच्या संघाला बडवतो, अन्यथा टग्या नेहमी कँटिनला पडिक असतो आणि युसुफ हातघाई करुन पुन्हा पॅव्हेलियनमध्ये जाऊन बसतो.
अजुन काय लिहणे, 'कधीतरी'च ह्या प्रसंगासाठी किती लिहावे ?
बाकी लोक त्याला फलंदाज मानत नाहीत, तो फलंदाज नाहीही, पण त्याने फरक पडत नाही.
आजकाल तो पार्टटाईम गोलंदाजीही करतो, करावी लागते, त्याच्याकडुन नेहमीच धावा निघत नसल्याने त्याला अशी इतर कामे करावी लागतात, एखाद्या दिवशी तो स्वतःच 'अंपायरची टोपी' घालुन मैदानात उभा राहिला तर आश्चर्य वाटुन घेऊ नका, एवढेच समजा की आज त्याचा 'बॅटिंग-डे' नाही व तो मैदानावर 'इतर' कामे करत आहे.

४. महेंद्रसिंग धोनी :
धोनी भारताचा कॅप्टन असणे आणि गडकरीसाहेब भाजपाचे राष्ट्रिय अध्यक्ष असणे ह्यातले विलक्षण साम्य तुमच्या लक्षात येत नसेल तर माय लॉर्ड यु नीड सम थरो स्टडी. दोघांनाही करायचे काहीच नसते, मात्र काहीही झाले की मिरवायचे मात्र असते.
झालच तर जणु सगळे काही माझ्यामुळेच घडते आहे हा मजेशीर अ‍ॅटिट्युडही असावा लागतो.
मधुन आधुन एखादे गंमतशीर आणि वादग्रस्त स्टेटमेंट द्यायचे असते हे ही त्यांचे एक्स्ट्रा काम.
असे म्हणतात की भाजपाचा अध्यक्ष नेहमीच कमनशिबी असतो, धोनीही नेहमीच 'टॉस हारतो' ( पुढेमागे त्याचा हा गुण त्याला भाजपाच्या अध्यक्षपदापर्यंत घेऊन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही ).
भाजपाचा अध्यक्ष शक्यतो थेट लोकसभा, विधानसभा वगैरे निवडणुका लढवत नाही, आपला धोनी पण शक्यतो 'न खेळण्याची' परंपरा पाळण्याची पुरेपुर काळजी घेतो.
एक काळ होता की गडकरींनी धडाडीने 'मुंबई-पुणे महामार्गाचे काम एकहाती संपवले होते' आणि धोनीही एकेकाळी 'एकहाती सामना संपवुन टाकायचा', आय रिपिट ... एकेकाळी !

५. जहीर खान :
तुम्ही कधी साऊथ इंडियन पिक्चर बघता का हो ?
त्यात की नै एक दणकेबाज व्हिलन असतो, त्याचे मस्त चालले असते, पुरेपुर दहशत असते व त्याला स्मरुन तो राडे घालत असतो व पब्लिक बर्‍यापैकी त्याला 'डरुन' असते. त्याने अलाण्या-फलाण्या दिवशी भररस्त्यावर एखाद्याला रक्तबंबाळ होईपर्यंत तुंबलेला प्रसंग लोकांमध्ये त्याचा 'खौफ' निर्माण करण्यास पुरेसे ठरत असते, तो ह्यावर आयुष्यभव सुखाने जगु शकत असतो.
पण एके दिवशी अशुभ मुहुर्तावर तो डोक्यात हवा जाऊन चुकुन सिनेमाच्या हिरोला 'ललकारतो' व मित्रांनो इथे त्या व्हिलनची 'कहानी खतम' होते.
जहीरचे सेमच आहे बघा, त्याचे यॉर्कर्स, त्याचा स्विंग, त्याचे बाउंसर्स आणि लाईन & लेन्थ सारे सारे पुरेपुर खौफ निर्माण करणारे आहे.
पण गंमत अशी आहे की जहीरच्या नेमके महत्वाच्या क्षणी डोक्यात हवा जाते व तो प्रतिस्पर्ध्यांच्या 'हिरो बॅट्समन्सना' खुन्नस वगैरे देतो व इथे रक्तपाताला सुरवात होते, आठवा २००३ ची भारत वि. ऑस्ट्रेलिया फायनल, बस बस आम्हाला जहीरबद्दल एवढेच लिहायचे आहे, पुर्णविराम

६. हरभजनसिंग :
भज्जी म्हणजे देवानंद, वाढत्या वयात आणि ढासळत्या क्वालिटीतही झळकण्याची हौस.
माय लॉर्ड, एक काळ होता की देवानंदच्या केसांच्या श्टायलीत आणि त्याच्या अदांमध्ये एक आख्खी पिढी वेडी झाली. भज्जीच्या चढत्या काळातही त्याच्या फिरकीच्या जादुने स्टिव्ह-वॉ च्या ऑसिजचे बलाढ्य साम्राज्य उध्वस्त केले.
पण जुनी पुण्याई किती दिवस पुरवुन खाणार महाराज ?
एके काळी ह्याचे बॉल वळत होते आणि ह्याला विकेट्स पडत होत्या. आता उगाच दुसरा पर्याय नाही म्हणुन पुर्वपुण्याईमुळे ह्याला स्टार्टिंग-११ मध्येखेळवणे म्हणजे वय होऊनसुद्धा करुणानिधींनी अट्टाहासाने स्वत:ला मुख्यमंत्री म्हणुन मिरवणे.
बाकी भज्जी हा 'नव-डे' चा गोलंदाज नाहीच. लावा बरं ३-४ क्लोजिंग फिल्डर्स, २ स्लिप्स आणि द्या ४ दिवस जुन्या खेळपट्टीवर ७० षटके वापरलेला चेंड्य भज्जीच्या हातात, फिर मॅजिक देखो साब !

७. श्रीशांत :
प्रत्येक वर्गात, प्रत्येक हापिसात आणि बहुतेक प्रत्येकच ठिकाणी 'च्यायला एकदा ह्याला कोपच्यात घेऊन बडवला पाहिजे, लै मस्ती आलीय ह्याला फुकटची' टाईपचा एक तरी मुलगा असतोच, टिम इंडियामध्ये 'श्रीशांत' आहे बॉस.
प्रत्येकाला जसा आपल्या मॅनेजर ह्या खुर्चीवर का बसतो हा प्रश्न पडतो तसेच मलाही 'श्रीशांत टिममध्ये का आहे' असा प्रश्न पडतो.
प्रत्येक ग्रुपमध्ये जसा एखादा फालतु कमेम्ट्स टाकणारा, उगाच लक्ष वेधुन घेणारा, आढ्यतखोर महामुर्ख मनुक्ष असतो तसा मेहरबान आपल्या टिममध्ये 'श्रीशांत' आहे.

८. मुनाफ पटेल :
अगदी प्रामाणिक, पापभिरु, कचखाऊ, दिवाभित पांढरपेशी मध्यमवर्गीय व्यक्ती, कुठल्याही महानगरात हटकुन आढणारी. रोजच्या कामात काडीचा उत्साह नसल्याने रडत-खुडत हापिसला जाणारी, तोंड वेडेवाकडे करुन काम करणारी आणि घरी परत आल्यावर संपुर्ण कंटाळुन कशातही रस न घेता अंथरुणावर अंग टाकणारी व हेच जीवन वर्षानुवर्षे जगणार्‍या एका मोठ्ठ्या समुदायाचा टिम इंडियातला प्रतिनिधी म्हणजे 'मुनाफ पटेल'.
गोलंदाजीचे काम जमेल तेवढ्याच प्रामाणिकपणे करणारा, त्यातही तोंड वेडेवाकडे न पडणारा, फिल्डिंग आणि बॅटिंग ह्यासारख्या समाजकार्यात अजिबातच रस न घेणारा आणि कुठल्याच बाबतीत स्वतःचे मत नसल्याने वादात न पडणारा हा नाकासमोर चालणारा 'मुनाफ'.
किती अपेक्षा ठेवायच्या तुम्हीच ठरवा, वाढत्या अनुभवामुळे जरा समंजस आणि समजुतदार वाटतो आहे तरी धडाडीची भयंकर कमतरता आहे.

९. आर. अश्विन :
केवळ आयपीएलच्या चेन्नै टिममध्ये खेळल्याने जर ( श्रीकांतच्या कृपेने ) इंडियन क्रिकेटमध्ये वर्णी लागत असेल बिलिव्ह मी ह्या रेटने आपल्या सपोर्ट स्टाफमधले निम्म्यांच्या वर चेन्नैच्या चेपॉक स्टेडियमबाहेर नारळ पाणी, इडली-वडा सांबार विकणे असा व्यवसाय करत असतील किंवा सरळ दणक्यात रजनीची गाणी लाऊन चेन्नैमध्ये रिक्षा पळवत असतील.
मला ह्याच्या निवडीतले लॉजिक समजले नाही तर मी काय कप्पाळ कमेंट करणार ?

असो, मजेमजेत बरेच काही लिहुन झाले.
भारत जिंकेल का वगैरे असल्या फालतु प्रश्नांना उत्तरे द्यायला आम्ही बांधिल नाही, कोणीही जिंको पण खेळाचा विजय होईल असे युसलेस इमोशनल ब्लॅकमेलही नका करु, बिझीनेसमात्र 'येकदम कडक' होणार ह्यात अजिबात वाद नाही.
तशी सेटिंग झाली आहे म्हणतात

तुम्हाला हे आवडो किंवा ह्याचा बेक्कार राग येवो, आम्ही ही स्पर्धा संपोस्तोवर मधुनाआधुन पिंका टाकत राहणारच.
अहो सध्याच्या 'भाजपा'चा आम्हाला जरी बेक्कार राग येत असला म्हणुन काय आम्ही 'राजकारण गेलं चुकीत' असे म्हणुन टिपीकल मध्यमवर्गिय होऊ का ?
सध्याचे क्रिकेट नाही आवडत, खुप राग येतो, बघवत नाही, तरीही मधुनाअधुन पाहणार आणि त्यावर उगाच असे खरडणार.

तळटिप :
ह्या सर्व हजेरीत 'सचिन तेंडुलकर' इसमास मुद्दामुनच नाही घेतले, घेऊ नये असे वाटले, त्याच्यावर बोलायला आमच्याकडे आता काही शब्द उरले आहेत असे वाटत नाही.

15 comments:

Prasad said...

छोटा डॉन,
काय जबरदस्त पिंका टाकता तुम्ही!
सातारचे राजे आणि सेहवाग: जाम आवडले बघा!
पटले तर घ्या नाहीतर खड्ड्यात जा हीच attitude दोघांची!
युवराज आणि मुनाफ ची पण टिप्पणी झकास.
मी फेसबुक वर शेअर करत आहे

Pankaj - भटकंती Unlimited said...

छोटा डॉनचा षटकार...

'ह्यावर्षी पतंगराव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत' ह्या वाक्याची जितकी सवय झाली आहे तितकीच 'भारत ह्यावर्षी क्रिकेट विश्वचषकाचा दावेदार' ह्या वाक्याची झाली आहे.

Deepak Parulekar said...

मस्तच ! काय षटकार लावलेत यार ! सचिनच्या मागच्या मॅचमधले सगळे सिक्स आठवले! खरचं मस्त लिहिलं आहेस !! :)

Suhas Diwakar Zele said...

छोटा डॉन,
शब्दनशब्द पटला... हा व्यवसाय आहे फक्त. प्रत्येक खेळाडूबद्दल केलेली टिप्पणी अफलातून.

खूप दिवसांनी आलोय तुमच्या एरियामध्ये, तुझी शब्दावरची दहशत अजुन तशीच. शुभेच्छा :)

छोटा डॉन said...

@ प्रसाद, पंकज आणि दिपक :
धन्यवाद मित्रांनो, लेख आवडल्याचे आवर्जुन कळवल्याबद्दल आभार :)
प्रसाद, माझे लेख शेअर करायला फुल्ल परवानगी आहे, नो इश्श्युज.

@ सुहास : कसा आहेस रे बाबा, मी सध्या जरा गायबच आहे.
मात्र पक्का भारतीय असल्याने निवडणुका, क्रिकेट वर्ल्डकप वगैरे आले की मी पेटुन उठतो आणि उगाच काहीबाही लिहीत बसतो, अन्यथा बाकी वेळी आम्ही 'शांत' असतो, चालायचेच, बोलुनचालुन भारतीयच आहे ना मी ;)
असो, आमच्या एरियात स्वागत आहे आणि आल्याबद्दल आभारही आहेत :)

- छोटा डॉन

विक्रम एक शांत वादळ said...

Bekar hay Boss

Bole to ekdum jabryaaa

सिद्धार्थ said...

शब्दन् शब्द पटला. एकेकाला मस्त फोडून काढले आहे. घणाणती बॅटिंग.

Yogini said...

jaam bharee..

सागर said...

एकदम मस्त लिहील आहे .
मूड फ्रेश झाला वाचून.

अपर्णा said...

षटकार कसले बाराकार आहेत...ग्रेट डॉन आहेस बाबा तू...

Vikram said...

amazing - he likhan fwd karaychi parwangi milel ka ? arthatch tumchyach navane.

Vikram

छोटा डॉन said...

@ Vikram :
Yes, u can forward this without any trouble.
Infact I an honoured, thanks

@ Vikram, Siddharth, jayanti & aparna :
Thanks a lot :)

- Chhota Don

इंद्रधनु said...

अन्यथा संघ काय प्रतिस्पर्ध्यांच्या दाढ्या करायला पाठविला आहे, मुनाफला बॉलिंग झाल्यावर कुठे लपवावे हा प्रश्नच असतो ... वाह मजा आली वाचताना...... खेळाडूंचे विश्लेषण तर अप्रतिम.....

Unknown said...

laych bhariiii

kaps said...

>>ह्याला पळताना धाप वगैरे लागुन मैदानावरच 'प्राणवायु' द्यावा लागेल की काय ?

yaachaa cancel pahilyanda tumhalach lakshaat aala bagha !!