Tuesday, June 30, 2009

संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे ....


टीप : लेखात आलेले विचार अथवा असंबद्ध विधाने ही केवळ वैयक्तीक माझ्या वैचारीक कल्लोळामधुन आली आहेत, त्याचा कुणी सर्वसंमत अर्थ काढुन कॄपया गैरसमज करुन घेऊ नये. तसेच लेखातला बराच भाग हा विस्कळीत वाटण्याची शक्यता आहे, पण ते मनातले विचार आहे तसे उतरवले असल्याने त्याला पर्याय नाही.

"तुम्ही ना भौ पक्के स्युडो सेक्युलर लोकं, आपला धर्म,
संस्कॄती आणि देव मानणार नाहीच पण त्यावर टिका करायची म्हणलं ना की सर्वात पुढे" -
इति : एक आंतरजालीय मित्र
"अरे ३ महिन्यातुन आज घरी आला आहेस, सकाळी १५-२० मिनीटे काढुन जर
घरातल्या देवाची पुजा वगैरे केली तर काय तुला पाप लागणार आहे का ? " इति : आई
"चल आज रात्री तुला विठ्ठलाचे पायाचे दर्शन घेऊन
आणतो २० मिनीटात, तसाही तु दिवसात रांगेतुन जाणार नाहीसच"- इति : गावाकडचा देवभोळा मित्र
"समोर दिसणार्‍या आणि जाणवणार्‍या अशाच गोष्टींवर विश्वास ठेवणे हे
भुमिका फारच टोकाची आहे, नव्हे मुर्खपणा आहे. देवाचे अस्तित्व ह्यापलिकडे आहे" -
इति : बाबा
" पुण्यात आलाच अहेस तर माह्या समाधानासाठी माझ्याबरोबर दगडुशेठला
जाऊन येऊयात, तुझी व्ह्युव्ह्स आपण नंतर सविस्तरपणे बोलु" - पुण्यातले मित्र
"पुढच्या वेळी सुट्टी काढताना १ दिवस जास्त काढ, तु
आणि हा शिर्डीला जाऊन या. सारखं टाळाटाळ करणे बरोबर नाही" - इति : काकु/काका
" आज तुझा वाढदिवस आहे ना, मग सकाळी देवळात गेला होतास का
? ते नसेल जमले अजिबात" - इति : असेच कुणीतरी
" भोसडीच्या विकेंडला रुमवर सकाळी सकाळी टीव्हीवर
गाणी बघत बस पण देवळात नको येऊस " - इति : असाच एक कोणीतरी अजुन एक मित्र.
" तुमची कशावर अंधपणे श्रद्धा नाही हीच तुमची अंधश्रद्धा
आहे" - इति : अजुन एक आंतरजालीय मित्र

??
????
म्हणजे काय ?

म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ह्या सर्वांना ? मी काय ठार नास्तिक आहे ? ह्या विश्वातल्या सुप्रिम पॉवर वर माझा विश्वास नाहीये ? का मी चक्क ढोंगी आहे असे त्यांचे मत आहे ? किंवा मी हे न करुन माझ्या शिकलेल्या शहाणपणाचे कौतुक करुन घेतो असे तर त्यांचे मत नाही ?

तसे लहानपण अतिशय देवभोळ्या, देवाचे अधिष्ठान असलेल्या व कर्मकांडाधिष्ठित समाज असलेल्या एका छोट्याश्या गावात गेले. कुटुंब आणि शेजारपाजारचे ही म्हणाल तर पक्के धार्मिक पण देवदेव आणि कर्मकांडाचा अतिरेक नसलेले, पण कसल्याश्या पुराण रिती आणि रुढींच्या कल्पना मनात घेऊन सर्वच गोष्टी अगदी मनोभावे करणारे. सर्वच वातावरण असे असल्याने व गावात १२ ही महिने "इश्वरनिष्ठांची मांदियाळी" असल्याने लहानपणातच अनेक स्त्रोत्रे, प्रार्थना, ष्लोक, ऋचा, स्तुत्या वगैरे तोंडपाठ झाल्या होत्या, तेव्हा अर्थ कळत नव्हता ह्या सर्वांचा पण म्हणताना अतिशय छान वाटायचे. इनफॅक्ट लहानपणी सगळीकडेच "मला सर्व पाठ आहे" हे दाखवण्याचा अट्टाहास झाल्याने आणि आज अगदी त्याच्या विपरीत असे काहीच औत्सुक्य न राहिल्याने स्वभाविकपणे सर्वांचा " मी नास्तिक होत चाललो आहे" हा काळजीचा विषय बनला आहे. लहानपणी जेव्हा आजोबा सकाळी सकाळी शुचिर्भुत होउन एखाद्या ध्यानस्त ॠष्यासारखे पुजेला बसायचे, तो फुला-उदबत्यांच्या सुगंध आणि आजोबांची धीरगंभिर आवाजात चाललेली विवीध संस्कॄत स्लोकांची आवर्तने ह्याने वातावरणच असे व्हायचे की मी सुद्धा स्वाभाविकपणे ह्यात ओढला जाऊन कधी आजोबांच्या मांडीला मांडी लाऊन रोजच्या रोज नियमाने पुजेला बसायला लागलो हे मलाच समजले नाही, मग मला नंतर "आवड आहे हो त्याला देवदेवाची, रोज सक्काळी पुजा केल्याशिवाय बाहेर जात नाही हो" वगैरे कौतुक ऐकुन मनातुन गुदगुल्या व्हायच्या.
पुढे मग शिक्षणाचे, नोकरीचे व्याप मागे लागले, घर ही सुटले. ह्या काळात आडवेतिडवे वाचन आणि चर्चाही बर्‍याच झाल्या. लहानपणी असलेल्या संस्कारामुळे म्हणा अथवा आंतरीक ओढीमुळे म्हणा पण "धर्म नक्की काय सांगतो" ह्यावर बरेच काही ढुंढाळले व पचवुन घेतले. "अहं ब्रम्हास्मी, तत्वमसी. मी सर्व चराचरात आहे" वगैरे वाक्ये भुरळ पाडु लागली. हा काळ बराच मोठ्ठा होता, यादरम्यान वेळ न मिळाल्याने म्हणा अथवा तसे पुर्वीसारखे वातावरण न जमल्याने पुर्वीसारखी "पुजेला बसण्याची" गोडी राहिली नाही. शिवाय देवाच्या जवळ जायला पुजाच करायला हवी व त्यासाठी संस्कॄत श्लोकच म्हणायला हवे हा जो गोड गैरसमज होता तो आता पुर्ण संपला होता. मात्र देवाच्या अस्तित्वाची आणि त्याच्या जवळ जाण्याची ओढ होतीस, इनफॅक्ट जास्तच तीव्र झाली होती.मग जेव्हा केव्हा घरी जायचो तेव्हा हे तात्विक वाद नक्की असायचे, घरी फक्त लोळुन आराम करु वाटत असायचा व घरच्यांचा आग्रह वेगळाच. मात्र कधी कधी माझ्या "पुजा न करण्याचे" लॉजीक जेव्हा इथे " मी नास्तिक झालो" असे लावले गेले तेव्हा हमखास तात्विक चर्चा घडायच्या. शेवटी "तुझ्याशी वाद घालण्यात अर्थ नाही" ह्या ब्रम्हवाक्यात झाली की मी निमुटपणे उठुन पुजेला बसायचो, आजही बसतो ...
म्हणजे "मी एका जागी बसुन केलेया मंत्रोच्चाराच्या घोषात केलेल्या पुजेवर माझी "अस्तिक असणे वा नास्तिक असणे" अवलंबुन आहे" हा विचार माझ्या मनाला त्रास देऊन जातो....

आमची लहानपणीची शाळाही सांस्कॄतीक वारसा वगैरे सांभाळणारी, इथेही कर्मकांडांचे प्रस्थ फार. अर्थात हे सर्व चुकच असते असे नव्हे पण समजा हे केले नाही तर मात्र समोरचा कोणीतरी पापी आणि अपवित्र प्राणी आहे हे मात्र अवश्य ठासुन मनात भरले जायचे. लहानपणी मी इर्ष्येने " इदं तु ते गुह्यतमं, प्रव्यक्षाम्यनं सुयवे. ज्ञानं विज्ञानं सहितम्, यज्ञात्वा मोक्षसे शुभात" असे गीतेचे अध्याय वगैरे पाठ केले होते व स्पर्धाही गाजवल्या होत्या. थोडक्यात शाळेच्या दृष्टीकोणातुन मी एक "आदर्श असा संस्कारी विद्यार्थी" वगैरे होतो.
मग हळुहळु मोठ्ठा झालो, शाळा सोडुन बाहेरच्या जगात आलो. "गीतेच्या तत्वज्ञानाची" हळुहळु ओळख पटु लागली, गीता किती महान गोष्टी शिकवते हे ही लक्षात येऊ लागले.पण मन पुन्हा भुर्रकन मागे गेले, अरे आमच्या शाळेने आमच्याकडुन ४-४ अध्याय पाठ करुन घेण्यापेक्षा २ श्लोक व्यवस्थित अर्थासह सांगितले असते तर तेच उत्तम होते हे ही उमगले. आजही मला "इदं तु ते गुह्यतमं..." अशी सुरवात करुन दिली की आख्खा अध्याय म्हणता येतो पण त्याचा अर्थ नाही सांगता येत. मग असे पांगळे "पाठांतर" व ते ही "संस्काराच्या नावाखाली" जे लहानपणी माझ्यावर ठासवले गेले त्याला आज माझ्या दॄष्टीने काहीच किंमत उरत नाही. आमची शाळा खरेतर "तमसो मा ज्योतिर्गमय" हे ब्रीद घेऊन चालणारी, पण खरे आवश्यक ज्ञान देण्यात शाळेची नक्की गल्लत होत आहे असे आज वाटते.आजही तेच चालु आहे, कधीमधी गावाकडे गेले आजही तसेच गीतेचे अध्याय तोंडपाठ म्हणुन दाखवणारे विद्यार्थी दिसतात, ह्याबद्दल खेद व्यक्त केला आणि माझे विस्तॄत म्हणणे मांडले की "लहानपणी असा नव्हतास रे तु, आता अचानक असा का संस्कारांना तुझा विरोध आहे ?" असा संपुर्ण चुकीचा अर्थ लावतात ....
माझा विरोध खरोखर संस्कारांना आहे ? की संस्काराच्या नावाखाली नुसते अंध पाठांतर करुन घेण्याला ? संस्काराचा जर अर्थच समजत नसेल तर ते संस्कार काय कामाचे असे माझे म्हणणे चुक आहे ?

तेच पुन्हा येते ते वैश्विक शांती आणि बंधुतेचा संदेश देणार्‍या माउलींच्या "पसायदाना"बद्दल, आयुष्यभर इतरांकडुन पसायदानाची रोजची १०८ आवर्तने घोकुन घेणारे महाभाग जेव्हा मी दाराशी आलेल्या गरिब वारकर्‍यांना त्रास देतात तेव्हा "भुता परस्परे पडो, मैत्र जिवांचे" हे पसायदानाचेच तत्वज्ञान सोईस्करपणे विसरतात तेव्हा त्यांनी केलेया संस्काराला काय अर्थ उरतो ? मग तेच मात्र संस्कारी आणि आम्ही स्पष्ट बोलतो म्हणुन सम्स्कारविरोधी असा जो आमच्यावर अन्याय होतो त्याचे काय ?

लहानपणी गावाकडे पुजापाठ, व्रतवैकल्ये, याग, यज्ञ वगैरेंची बरीच रेलचेल, सत्यनारायणपुजा वगैरे तर अगदी नेहमीचेच. लहानपणीही कधी कसलीशी कथा वाचली म्हणुन बुडलेले जहाज वर येते ह्यावर मी अंधविश्वास कधी ठेवला नाही, मात्र ते वातावरण आणि जे काही घडते आहे त्यातुन ती पुजा घालणार्‍याच्या चेहर्‍यावर दिसणारे समाधान मात्र बरोबर वाचता यायचे. मग मोठ्ठेपणी पेशवाई आणि सत्यनारायणाची पुजा हा इतिहास समजला व लहानपणी आपण जे काही समजत होतो ते अगदीच चुक नव्हते ह्याचे समाधान वाटले. पण आजही मला सत्यनारायणाची पुजा आणि त्याचे धार्मिक महत्व काही केल्या समजत नाही, नपेक्षा मला स्वतःला कधी अशी पुजा घालावी वाटेल असे वाटत नाही. अर्थात मी हे बर्‍याच वेळा उघडपणे बोलुन दाखवल्याने समोरच्याच्या चेहर्‍यावरचे माझ्यबद्दल असणारे "धर्मबुडवेपणा"चे भाव मी सहजच वाचतो.
पण मी आजही जेव्हा केव्हा आमंत्रण येईल तेव्हा प्रसादाला जातो, पुजेच्या सारंजामापाशी बसलेले त्या घरातले कर्ते अथवा एखाद्या वयोवॄद्ध आजी/आजोबांना पाहुन मला कसेनुसेच होते, मी आपला मुकाटपणे नतमस्तक होतो व प्रसाद घेतो. त्यावेळचे त्यांच्या चेहर्‍यावरचे "अवघे सार्थक झाले" हे समाधान वाचताना त्यांच्या समस्यांचे जहाज हाच विश्वास वर आणेल ह्याचीही खात्री असते.मात्र तरीही मला माझा सत्यनारायण पुजेच्या महत्वावर विश्वास नसणे व म्हणुन मी "धार्मिक नसणे" हा संबंध कळत नाही...

देवाला भेटण्यासाठी अथवा त्याच्याशी तादात्म्य पावण्यासाठी खास देवळातच जावे लागते हा गोड गैरसमज कधीच नव्हता. मात्र लहानपणी देवळातले वातावरण भारुन टाकत असल्याने देवळात जायची ओढ मात्र जरुर होती, अर्थात इथे देवळातल्या देवाच्या मुर्तीसमोर किती वेळ बसलो ह्याला तेव्हाही काही अर्थ नव्हता आणि आजही नाही. मात्र तेव्हा तेव्हा बरोबरच्या कंपनीमुळे म्हणा अथवा तेव्हाचे पवित्र, शांत आणि कमर्शियल न झालेले देऊळ मला जरुर खुळवत असायचे व देवळाकडे ओढला जायचो. हां, आता देवळात जाऊन तिथल्या मोठ्ठ्या पटांगणात आम्ही लहानपणी खेळायचो वगैरे ही माझी वैयक्तीक बाब झाली, इथे मी खास करुन देवाला भेटायला जात आहे असे केव्हाच नव्हते, पण समाजाच्या दॄष्टीने मात्र मी "रोज नेमाने देवळात जाणारा मुलगा" असे होतो.
आज मात्र तितकीशी ओढ नाही, देवळातल्या मुर्तीची तर कधीच नव्हती. मात्र पुर्वी जे हवेहवेसे वाटायचे ते वातावरणही आज न राहिल्याने मला आज देवळात जाणे ह्या उपचाराला तितकेसे महत्व देऊ वाटत नाही. देवावरची श्रद्धा तर तितकीच आहे जितकी पुर्वी होती. मात्र आज देवळात गेल्याने तिथले अवडंबर आणि प्रस्थ पाहुन संताप आणि चिडचिड वाढते, ज्या हेतुसाठी मी कधीकाळी देवळात जात होतो तो हेतुच आता उरला नसेल तर मला देवळात जाणे तितकेसे प्रशस्त वाटत नाही. शिवाय देवळात जाणे म्हणजेच देवावर श्रद्धा असणे हे गुणोत्तर कधीच पटले नाही, तेव्हाही नाही आणि आता तर मुळीच नाही.
जातायेताना रस्त्यावर दिसणार्‍या कोपर्‍याकोपर्‍यातल्या मंदिरापाशी थांबुन दर्शन घेणे, सकाळी कितीही गडबडीत असलो तरीही दर गुरुवारी साइमंदिराची आरती गाठणे, दर चतुर्थीला ट्राफिक ज्यॅम करुन गणपतीची आरती करणे वगैरे गोष्टींचे मला कधीच आकलन झाले नाही व ह्या गोष्टी कधीही करु वाटल्या नाहीत.मग सध्याच्या देवळातल्या कमर्शियलायझेशन, गर्दी, आरडाओरड वगैरेला कंटाळुन तिकडे जायला खुष नसलेला मी अचानक "नास्तिक" कसा ठरतो ?
देवावरची म्हणजे सुप्रिम पॉवरवर असलेली मनातील श्रद्धा ह्याला काहीच किंमत नाही का ?पण,पण आजही मी कोणी मनापासुन आणि तळमळीने देवळात चलण्याचा आग्रह करीत असेल तर जरुर देवळात जातो, बरोबरच्याच्या चेहर्‍यावरच्या दिसणार्‍या समाधानातच मला बर्‍याच वेळा देव दिसतो व माझ्या देवळातल्या देवाच्या दर्शनाचे सार्थक होते...

आमच्या गावातल्या वाळवंटात आपला सर्व अहंकार बाजुला ठेऊन लक्ष-लक्ष संत कुळे "विठ्ठल विठ्ठल" चा जयघोष करत नाचली व ह्या गावाची मातीच त्यांनी पवित्र करुन टाकली, इथल्या प्रत्येक गोष्टीत एक पावित्र्य भरभरुन वहाते. तर आमच्या अशा ह्या गावात एकमेकांच्या "पाया पडण्याची" एक फार महान आणि पवित्र पद्धत आहे. लहानपणी हा काहितरी महान सोहळा आहे असे वाटायचे व मी त्यात कधी सामिल व्हायचो हे कळायचे नाही. कधी दुसर्‍या गावाला गेलो तर तिथले लोक "विठुमाऊलीची पाऊले" म्हणुन माझेच पाय धरायचे तेव्हा फार अवघडल्यासारखे व्हायचे आणि मनात काहितरी उच्च वाटायचे. तर सांगायचा मुद्दा हा की "पाया पडणे" ह्या संस्काराचे महत्व माझ्या लहानपणी खुप होते.
मग मोठ्ठा झालो, मी कुणाच्या का व कशासाठी पाया पडतो आहे व ते तरी माझ्या का पाया पडत आहेत वगैरे प्रश्न पडु लागले.ह्यांची उत्तरे जरी वर दिल्यासारखी असली तरी ती मनाला पटेनात. मी जरी त्या गावचा असलो तर मी असा काय तीर मारला आहे की लोकांनी माझ्या पाया पडावे ? उलट मी तर ऑलरेडी गावाकडे "नास्तिक, धर्मबुडवा, वरच्या वार्‍याला लागलेला" वगैरे म्हणुन बदनाम आहे, मग ही लोकं माझ्या का पाया पडत आहेत ?पाया न पडण्यामागे "अहंकार" वगैरे अजिबात नाही पण बुद्धीला पटेल असे कारण मिळत नसल्याने मला आजकाल हे नकोसे वाटत आहे, निदान केवळ मी त्या गावचा आहे म्हणुन वयाने मोठ्ठ्या लोकांनी माझे पाय धरणे तर साफ नामंजुर आहे. माझ्या वैयक्तीक बाबतीत म्हणाल तर तडजोड म्हणुन जास्त वाद न वाढवता मी आपला समोरच्याला मान देऊन वाद संपवतो, मनात काय आहे हा भाग अलहिदा.तर लोकांच्या मते इथेही मी माझे "संस्कार विसरत चाललो आहे" , चालायचेच ...

खरोखर मी संस्कार विसरत चाललो आहे का ?
कुणाला एखाद्याला चुकुन पाय लागला तर मी पटकन रिफ्लेक्स अ‍ॅक्शनने त्याच्या पाया पडुन घेतो हे संस्कार नव्हे का ? इथे मला आपण त्याला चुकुन लाथ मारली आहे व त्याची आपण दखल घेऊन माफी मागितली आहे हे दाखवणारे "पाया पडणे" हे जर संस्कार असतील तर मी का ते विसरलो आहे ?
आजही कुठल्या महत्वाच्या कामाला बाहेर निघायच्या आधी पुर्वी आई जे हातावर "दही-साखर" द्यायची त्याची आठवण होते, हे काय फक्त वरवरचे आहे का ?
रोज सकाळी आन्हिके उरकताना आपोआप "गणपतीस्तोत्र" मुखातुन बाहेर पडते, त्यामागचे देवदेव वगैरे सोडले तर ते म्हणताना त्या तालातुन व ध्वनीतुन मला मिळणारा आनंद व सुख मला दिवसभरासाठी एनर्जी देते हे खरेच आहे.
कुठलाही नवा कपडा घेतला तर त्याला आधी पाणी दाखवुन मगच तो अंगावर चढवावा ह्या संस्कारामागचे शास्त्रिय कारण मला पटल्याने ते नाकारण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही, मग मी सध्या जे करतो ते संस्कार नव्हेत काय ?
असो.
अशी उदाहरणे ढिगाने देता येतील, त्याला तरी काय अर्थ आहे ?
कारण, ऑलरेडी इथे समाज आणि आमच्या आसपासचे आम्हाला "नास्तिक, धर्म न मानणारा, देवावर श्रद्धा नसणारा" वगैरे ठरवुन मोकळे झाले आहेत ...

थोडक्यात काय तर आम्ही म्हणजे एक नंबरचे "नास्तिक, धर्म न मानणारे, देवावर श्रद्धा नसणारे" असे संस्कार विसरलेले विक्षिप्त इसम आहोत ...
चालायचेच ...!!!!

धन्यवाद ...!!!
जाता जाता : ह्याच अनुषंगाने मेघना आणि संवेद ह्या दोघांचेही पोस्ट आणि त्यावरची चर्चा वाचण्यासारखे आहे.
सध्या "मिसळपाव.कॉम"वर ह्याच लेखावर घडत असलेली चर्चा आपल्याला
इथे पाहता येईल ...

Thursday, June 25, 2009

पिझ्झा हटमधली एक संध्याकाळ ... भाग-२

टीप : ह्या लेखात कसलेही साहित्यीक मुल्य वगैरे सापडणार नाही, वेळोवेळी मनात आलेले व्यक्त/अव्यक्त भाव शक्य तितके शब्दात मांडण्याचा प्रयत्न आहे, काही ठिकाणी जमेल तितकी टवाळकी केली आहे.
तो त्याच्या "उद्योगाला" लागला व आम्ही शांतपणे समोरचे निरीक्षण करु लागलो.

या आधीचा भाग आपल्याला इथे पहायला मिळेल .....

*******************************************************

समोरच एका टेबलावर एक मस्त "हम २ हमारे २" वाले कुटुंब बसले होते, त्यांची ऑर्डर अजुन आली नव्हती त्यामुळे त्यांचा मस्त टाईमपास चालु होता. ते २ छोटुले मस्तपैकी (काटेरी चमच्याने) अपडाथपडी खेळत होते, त्याआधी बहुतेक त्यांनी "नॅपकिन्सची सुलभ कस्पटे" हा छोटासा वर्कशॉप केला होता असे दिसते आहे. कारण त्याचे छिनविछीन्न अवशेष टेबलावर दिसत होते. नवरा-बायको दोघेही आपापल्या मोबाईलमध्ये डोके घालुन बसले होते, बहुतेक एकमेकांना "समस" करत असावेत, सॉफ्टवेअर इंजिनीयर असावेत लेकाचे, समोरच बसलेल्या व्यक्तीशी पिंग करुन बोलणे ही तिकडचीच सवय.

एका मोठ्ठ्या टेबलावर एक मस्तपैकी "कॉलेज ग्रुप" बसला होता, बहुतेक पार्टी असावी अन्यथा एका दमात एवढे लोक (स्वखर्चाने)"पिझ्झा हट"ला येणे शक्य नाही. त्यांच्यातला "होस्ट" मी लगेच ओळखला, कारण त्याच्या चेहर्‍यावर जे बॉसने हापीसात अनैतिक काम करताना पकडल्यासारखे भाव असतात ते लगेच ओळखु येतात. मित्रांना पार्टी देणे ह्या प्रसंगाची तुलना एक तर "पगार देऊन स्वतःला शिव्या देण्यासाठी एखादा कोल्हापुरी माणुस नोकरीला ठेवणे" अथवा "उदयनराजेंना आपल्या पक्षात घेणे व रोज त्यांच्याकडुन शिव्या खाणे" ह्यांच्याशीच होऊ शकते, धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही असा हा पार्टीचा प्रकार आहे. गॄपमधल्या काही मुलांचा नैसर्गिक गुणधर्माने पोरींवर इंप्रेशन मारण्याचा प्रयत्न चालु असल्याचे दिसले, बहुदा मग त्यासाठी काही पाचकळ विनोद ( पक्षी : जे आम्ही करतो ते ) करुन हास्यफवारे उडवणे चालु होते. बहुतेक मुलीही आपले (कॄत्रीम)सौंदर्य बेदाग कसे राहिल ह्याची काळजी घेताना दिसत होत्या, हो ना, नाहितर तोंडाने त्या पिझ्झाच कोरडा तुकडा खाऊन नंतर सारखे इवलाश्या नॅपकीनने व (आपल्याच) कोमल हातांनी सारखे आपलेच नाक, कपाळ व गाल साफ करणे ह्याला काय म्हणावे ?
छे, बर्‍याच आठवणी जाग्या होतात अशी दृष्ये दिसली की, अशा पार्ट्यांवर एक स्वतंत्र लेखच टाकु असे म्हणत एक दिवस माझा ट्रकभर लेख लिहतो असे ( नुसतेच ) म्हणणारा डाँ. न्या. खैरनार होणार असे दिसतेय.

तिकडे एका जराश्याच लांब असलेल्या टेबलावर "३ देवियाँ किंवा चार्लिज एंजल्स" बसल्या होत्या. त्यातली एक मुलगी खुपच सुंदर आहे असे आमच्या मित्राचे मत झाले. ( अर्थात त्याच्या सुंदरतेच्या संकल्पना ह्या "बिपाशा बासु, कोयना मित्रा, राखी सावंत, तनुश्री दत्ता" इथंपर्यंतच मर्यादीत असल्याने मला त्याचे जास्त आश्चर्य वाटले नाही. अर्थात कुणाला कशाचे आकर्षण वाटावे ह्याचेही काही लिखीत नियम नाहीत, हवे असल्यास तुम्ही "शायनी आहुजा"चे उदाहरण घेऊ शकता). मात्र त्या ज्या पद्धतीने समोरचे अन्न खात कम चिवडत होत्या ते मात्र नक्की रोचक होते, काट्यावर (वजनाच्या नव्हे, तो विषय वेगळा. इथे फोर्क ह्या अर्थाने ) अडकवलेला पिझ्झा आपल्या मानेची, हाताचे, डोळ्यांची आणि केसांची किती कमाल हालचाल करीत किती नाजुकपणे खावा ह्याचे ते एक उत्तम उदाहारण होते. मला त्यातल्या एका मुलीची दर घासानंतर समोरच्या आरश्यात पाहुन केलेली "लिपस्टीकची अ‍ॅडजेस्टमेंट" हा प्रकार फारच मनोरंजक वाटला, किती जपतात हो मुली ह्या लिपस्टीकला, पण आवडले ( लिपस्टिक नव्हे तर तो प्रकार, अर्थात लिपस्टिक आवडले असल्याचे आम्ही कबुल करणार नाही हे ही आहेच). खरेतर " ((दिवसा)महत्वाची कामे करताना) लिपस्टिक कसे जपावे?" ह्याचे कोर्सेस निघाले पाहिजेत, खुप फायदा होईल त्याचा ( मला नव्हे, माझ्याबद्दल बोलत नाही मी, मी लिपस्टिक वापरत नाही पण माहिती असलेली काय वाईट हो ?). ज्ञान कधी वाया जात नाही म्हणतात, कुठे ना कुठे त्याच्या "योग्य वापर" होईलच की.

तेवढ्यात आमच्या मित्राने "अरे, हिला पाहिलेस का ? ( येडाच आहे लेकाचा, पाहिल्याशिवाय काय आम्ही सोडतोय का ? ) मी ना हिला क्ष ठिकाणी य बरोबर पाहिले होते. च्यायला बहुतेक आपल्याच ब्लॉकमध्ये रहाते" अशी बहुमोल आणि बिन-उपयोगी माहिती दिली.आता माझ्या ह्या रुममेट मित्राबद्दल ४ शब्द सांगणे महत्वाचे आहे ( ओ अ‍ॅडी जोशी, तुमच्या रुमवर झोपायला जागा आहे ना ? मी ८ दिवस तिकडे रहायला येईन म्हणतो ). तो उभा असलेल्या ठिकाणीपासुन १ किमी त्रिज्येच्या परिसरात असणारी प्रत्येक पोरगी त्याने कुठेना कुठे कुणा ना कुणा बरोबर पाहिलेली असते असा त्याचा दावा आहे व दिवसातुन कमीत कमी २० किमी गाडी पळवणे हा त्याचा प्रण आहे. थोडक्यात आख्ख्या बेंगलोरमध्ये त्याने "क्ष" मुलगी व ती पण "य" ह्या ठिकाणी पाहिली नाही ह्या दोन्हीही शक्यता शुन्य आहेत कोणी असा दावा करत असल्यास सरळसरळ तो झरदारी अमेरिकेला मारतात तशा बिनबुडाच्या थापा मारतो आहे हे लक्षात घ्या. आम्हाला फक्त काळजी जेव्हा तो स्वतःच्या लग्नासाठी "मुलगी पहायला" जाईल त्या वेळची आहे कारण खासकरुन आपण "वेगळ्याच कारणासाठी" मुलगी पहात आहोत हे जर त्याच्या लक्षात नाही तर मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. असो, खुप विषयांतर ( केले किंवा ) झाले.

इथे आम्हाला एक सुपरिचीत दृष्यही दिसले, आपल्या पुण्यात कसे सणासुदीला लोक पारंपारिक पोषाख घालुन, नटुन थटुन सहकुटुंब सहपरिवार असे जे.एम. रोड अथवा तत्सम ठिकाणी हॉटेलात जेवायला जातात व "पंजाबी डिशेस" खातात तसेच इथे एक "कुटुंब" पिझ्झा पार्टी झोडायला आलेले दिसले. कुटुंब हे अक्षरशः कुटुंब होते, म्हणजे पार आजोबा-आजींपासुन ते नातवापर्यंत. काळ फारच वेगाने बदलत चालला आहे खरा, बेंगलोरसारख्या सायबर सिटीत तर फारच वेगाने. आश्चर्य म्हणजे आजोबा मस्तपैकी ऑथेंटिक पद्धतीने पिझ्झा काटा-सुरी वापरुन खात होते, आमची अपेक्षा होती की ते राईस-रस्सम सारखे मस्तपैकी काला करुन खाणार. आज्जीची थोडी पंचाईत झाल्यासारखी दिसत होती पण नातु तिला मदत करताना दिसला व हे दॄष्य फारच आवडले , खरेतर हेवा ही वाटला, खोटे कशाला बोला ?त्यांना घेऊन येणार्‍या त्या घरातल्या "कर्त्या पुरुषाच्या" चेहर्‍यावरच्या भावांची शब्दात ओळख करुन देणे मला शक्य नाही, माझ्यापुरता प्रश्न म्हणजे " त्या सुखी माणसाचा सदरा त्याने कुठुन घेतला" असा होता. ह्याचेही उत्तर खचितच एवढे सोपे नाही.

बाकी काय इतर दृष्ये नॉर्मल होती, बहुसंख्य पिझ्झा खाण्याच्या कम (लिमीटेड) एकांतात गप्पा मारण्याच्या हेतुने आलेली कपल्स होती, ते आपल्या सुखात दंग होते. त्यांच्या भावनांचा लिखाणाद्वारे बाजार मांडुन त्यांच्या ज्या काही असतील त्या भावनांचा अपमान करण्याचा माझा इरादा विचार नाही ( न जाणो त्या घोळात मी ते अनुभव माझ्या शब्दात लिहताना गाफीलपणे एखादे नाव घेउन बसायचो व नंतर पंचाईट होऊन बसायची ).
बाकी इतर "आम्ही पिझ्झा हटमध्ये येऊन पिझ्झा खातो, आय कॅन अ‍ॅफोर्ड इट ...!" असे आव आणुन बसलेले महाभागही होते, ह्या भावनाही पटकन चेहर्‍यावरुन व बॉडीलँग्वेजवरुन वाचता येतात. वारंवार वेटर्सना त्रास देणे, मोबाईल खेळवत बसणे, चेहर्‍यावर कुत्रे खाल्यासारखे किंवा शिष्ठ भाव ठेऊन समोरच्याला उत्तरे देणे वगैरे कॉमन लक्षणे.त्यांचेही काही खास नाही.
अजुन एक म्हणजे "जाहिरातीतील कुटुंबे" सुद्धा दिसतात, वयाच्या मानाने जरा जास्तच अवखळ आणि अल्ट्रा मॉडर्न लहान मुली, त्यांचे डोक्यात जाणारे फालतु लाड व कौतुके, जणु त्या लहान मुलीची मोठ्ठी बहिणच आहे असा आव आणणार्‍या व इतरांचे लक्ष वेधुन घेण्याच्या पराकाष्ठा करणार्‍या अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या त्यांच्या आया व त्यांचे कॄत्रीम लाडेलाडे बोलणे आणि हे सर्व हतबलतेने अथवा कौतुकाने पाहणारा त्यांचा हतबल अथवा मुर्ख नवरा ...
चालायचेच.

मात्र एका गोष्टीचे जरुर कतुक करु वाटते ते म्हणजे तिथल्या "टेक अवे काउंटरवरचा डिलेव्हरी बॉय ( तोच तो , आम्हाला फुक्कट पेप्सी दिलेला)", ज्या चपळाई व सहजतेने तो बर्‍याच गोष्टी अगदी सफाईने हाताळत होता ते पाहुन कौतुक वाटले. रांगेत उभे असलेल्यांच्या ऑर्डरी देणे, नव्या ऑर्डरी घेणे, फोनवरची ऑर्डर व त्यांची लफडी ( पक्षी : आमच्यासारखी ) निस्तारणे, पैशाचे हिशिब संभाळणे, कुणालाच दुर्लक्षीत न करता सर्वांना महत्व देणे, कंटाळलेल्या एखाद्या लहान मुलीला फुगा फुगवुन देणे, जाणार्‍या येणार्‍या गिर्‍हाईकांना योग्य ट्रिटमेंट देत अभिवादन करणे ...
क्लासच, त्याचे जरुर कौतुक आहे...

एकंदर संध्याकाळ मस्त गेली, फार नाही पण जास्तीत जास्त २० ते २५ मिनीटांची कथा आहे ही.
गर्दीतला स्वतःच्या विश्वात मग्न असणार्‍या, काही वेळा आपल्या भोवतालच्या विश्वात आपण कसे दिसु याची काळजी घेणार्‍या, गाफील असणार्‍या किंवा कमालीचा सावध असणार्‍या, लहान मुलाची निरागसता घेऊन वावरणार्‍या तर कधी पराकोटीचा धुर्तपणा बाळगणार्‍या, एखाद्या मोठ्ठ्या गॄपमध्ये एकटे असणार्‍या तर कधी एकटेच बसुन स्वतःच्या मनातल्या आठवणींच्या गर्दीत भान विसरुन हरवुन गेलेल्या अशा सर्व "सामान्यातल्या असामान्य क्षणांची व भावनांची" ही कहाणी.....
"गर्दीतला माणुस" हे फारच अतर्क्य आणि अनप्रेडिक्टेबल रसायन आहे असे आमचे मत आहे ...

जाता जाता हे सर्व करत असताना ऐकलेले "राहत फतेह अली खान" चे एक अप्रतिम गाणे

" कहने को साथ आपने एक दुनियाँ चलती है,
पर छुपके इस मन मे एक तनहाई पलती है ...."
बासच ...!!!!
शेवटी ( वाचकांच्या दृष्टीने काडीइतकी किंमत नसलेला ) आमचा पार्सल पिझ्झा आला व ते घेऊन आम्ही परत आमच्या फ्लॅटवर आलो ...

अवांतर :
जाता जाता पिझ्झा हट प्रशासनाला काही मुलभुत प्रश्न :
१. पिझ्झा हटमध्ये "इंग्रजी" न बोलल्यास शिक्षा म्हणुन पैसा डब्बल घेऊन पिझ्झाच्या बदल्यात आमटी-भात खाऊ घालण्याची शिक्षा आहे का ?
२. नोकरभरती करताना "त्यांचे बोलणे आम्हाला कळत नाही व आम्ही काय म्हणतोय ते त्यांना कळत नाही" अशी नॉर्थ्-इस्टची पोरं भरती करण्यामागचे रहस्य काय आहे (अर्थात माझा मुद्दा हा प्रांतिक विरोधाचा नाहीच )? कमीत कमी त्यांना स्थानिक भाषा अथवा कमीत कमी इंग्रजी/हिंदीचा स्थानिक अँक्सेंट यांचे ट्रेनिंग कधी देणार ? का ह्या सर्व गोष्टी आपल्या "ग्राहक समाधान व सोईसुविधा" ह्यांच्या कक्षेत येत नाहीत.
एक किस्सा : मागे पुण्यात असल्याच एका प्रकाराला वैतागुन आमच्या एका मित्राने त्या नॉर्थ-इस्टच्या मुलीशी चक्क शुद्ध मराठीतुन प्रश्नोत्तरे करायला सुरवात केली, तीने "तुम्ही काय म्हणताय ते मला समजत नाही" हे सांगितल्यावर त्याने " बरोबर आहे तुझे, माझेही काहीसे असेच होते आहे" असे सुनावले होते ।
३ . गर्दीच्या वेळी दारात उभा असणारा पिझ्झा हटचा कर्मचारी हा लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी नेमला असतो की गोंधळ वाढवण्यासाठी ?कमीत कमी २ वाक्ये त्याला व्यवस्थित बोलता यावीत हे महत्वाचे नाही का ?

कैच्या कै अवांतर :
एका गोष्टीसाठी वाचकांची माफी मागतो, लिहण्याच्या ओघात "टवाळकी" मधुन मध्येच लेख "सिरीयस" कसा झाला ते कळालेच नाही. अर्थात माझ्या मते ह्यात चुक काहीच नाही, हा परफेक्ट शेवट आहे. पण जर कुणाचा अपेक्षाभंग झाला असेल तर माफी असावी ...
आजकाल बर्‍याच वेळा "हास्य ओठात साठलेले, जाते कुठे सांग ना.. आश्रु नजरेत साचती कसे सांग ना!!" असे होत आहे, कशामुळे ते माहित नाही, बहुतेक काहीतरी बिघडलेले आहे नक्की.असो.
धन्यवाद ..!!!

Monday, June 22, 2009

पिझ्झा हटमधली एक संध्याकाळ ....

.
आमचा एक अनोखा छंद आहे, गर्दीतला गडबडीत आणि धांदलीत स्वतःच्या विश्वात मग्न असणारा सामान्य माणुस न्याहाळण्याचा. आता ह्यात आम्ही स्त्री, पुरुष, लहान, थोर, गरिब , श्रीमंत असा कुठलाही भेदभाव करीत नाही. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकवेळा गर्दीच्या ठिकाणी जावे लागते, थोडे थांबावे लागते, थोडा काळ व्यतीत करावा लागतो आणि मग इथे आम्ही आमचा छंद पुरवुन घेतो. अर्थात हे करत असताना समोरच्याला त्रास अजिबात त्रास होणार नाही अथवा अवघडल्यासारखे वाटणार नाही ह्याची पुर्ण काळजी आम्ही घेत असतो, हो ना, नाहितर "कसा टक लाऊन पाहतो आहे बघ मेला, घरात आई-बहिणी नाहीत वाटतं, मुडदा बशिवला ह्याचा ...." वगैरे मुक्ताफळे ऐकण्याची हौसही नाही व सोसही नाही.


गेल्या काही दिवसापुर्वी इकडे भयानक पाऊस झाला व तो ही विकांताला, त्यामुळे नेहमीचे व्यस्त कार्यक्रम सोडुन झक मारत घरातच बसावे लागले ( व रुममेट्सचे टोमणे ऐकुन न ऐकल्यासारखे करावे लागले ) . नेमका हाच मुहुर्त साधुन आमच्या कुक-बुवानेही मस्तपैकी टांग दिली , ऐनवेळी असा घोळ घालण्याच्या बाबतीत त्याने अगदी धोनीच्या हातावर हात मारला आहे . संध्याकाळच्या जेवणाचा काहीच सर्वमान्य तोडगा निघण्याची चिन्हे न दिसल्याने मी ( मनमोहनसिंग साहेबांसारखा ) सर्वसंमती होऊ शकणारा "पिझ्झा ऑर्डर करु" हा उपाय सुचवला, सहाजिकच पुढची सर्व कार्यवाही करण्याही जबाबदारी माझ्यावर आली. "३० मिनीटात पिझ्झा घरपोच" ह्या सुविधेला आम्ही फोन केला, त्यावरच्या सुंदर व मोहक ( आवाजाच्या ) कन्येने आमची सर्व माहिती व्यवस्थित विचारुन घेतली व शेवटी पडलेल्या आवाजात "पावसामुळे आम्ही होम डिलीव्हरी करणे तात्पुरते स्थगित केले आहे" असे अत्यंत दु:खद आवाजात आम्हाला सांगितले व रुममधले टोळभैरव पुढच्या कार्यक्रमाचा अंदाज आल्याने खदाखदा हसले . शेवटी त्या कन्येने अजुनच दिलगिरीच्या सुरात त्यांच्या अडचणींचा पाढा वाचायला सुरवात केल्याने आता ही स्वतःच आपल्या रुमवर येऊन पटकन राईस्-रस्सम बनवुन देते की काय ह्या शंकेने घाबरेघुबरे होऊन आम्ही स्वतःच तिथे जाऊन ऑर्डर आणायचे ठरवले.

आता बाबासाहेब पुरंदर्‍यांच्याच भाषेत सांगायचे तर अर्जुनाच्या धनुष्यातुन सुटणार्‍या तीरांचा कहारीपणा घेऊन पाऊस संततधार कोसळत होता, रणदुंदभींच्या कल्लोळासारखाच पावसाचा व रस्त्यावर धावणार्‍या गाड्यांचा आवाज अवघे आसमंत भरुन टाकत होता, पोतराजाच्या कडाडणार्य आसुडासारखी वीज कडाडत होती आणि विद्युल्लतेच्या चपळाईने लख्खकन चमकत होती, नुकतीच जुलमी मोगलाईची टोळधाड येऊन गेल्यासारखे रस्ते शांत आणि निर्मनुष्य दिसत होते, सह्याद्रीच्या बेलाग कड्यावरुन बेदुंधपणे कोसणणार्‍या पाण्याच्या अवखळ लोटासारखे रस्त्यावरुन पावसाचे पाणी आपली वाट काढत मुक्तपणे वहात होते, (लाईट गेल्याने ) किर्र अंधार होता. अशातच २ निघड्या छातीचे वीर ( पक्षी : मी आणि माझा मित्र ) अंगावर कांबळे ( पक्षी : रेन जॅकेट्स ) पांघरुन हळुवारपणे पावले उचलत ( चिखल उडु नये म्हणुन ) गुपचुपणे गड ( पक्षी : आमची रहाती इमारत ) उतरले, त्यांनी इकडेतिकडे बघुन अंदाज घेत घोड्यावर ( पक्षी : दुचाकीवर ) मांड ठोकली व औरंगजेबाच्या तंबुवर चमकणारा सोन्याचा कळस कापुन काढायला धावणार्‍या संताजी/धनाजींच्या अधिरतेने त्यांनी "पिझ्झा हट" ह्या गडाकडे सुसाटपणे धाव घेतली.
( हा हा हा, लै भारी वाटते असे लिहायला, आता बास झाले पण )

पोहचल्यावर आत गेलो तो ही ऽऽऽऽ गर्दी , पुण्याची शनिवार्-रविवारची चुल न पेटवण्याची परंपरा ह्यांनीही बरोबर उचलली आहे, त्यामुळे तिथे "अवघा हिंदु एकवटला ... च्च च्च .. अवघे जन एकवटले" असे झाले होते ( च्यामारी, सामना पेपर वाचणे जरा कमी केले पाहिजे ). थम्ब रुलप्रमाणे आमची जी ऑर्डर फोनवरुन घेतली गेली होती ती मध्येच पावसात विरघळुन गेल्याने इथपर्यंत पोहचली नव्हती, पिझ्झा हटवाल्यांनी अनेक मधुर शब्दांची पेरणी करत झालेली चुक मान्य करत लांबड लावायला सुरवात केली व वाट पहायची विनंती करायला सुरवात केली (बुद्धुच आहेत लेकाचे, असल्या पडत्या पावसात हातचे सोडुन पळत्याच्या पाठीमागे बाहेर निघुन जायला आम्ही काय तेलगु देसमचे नेते वाटलो की त्यांना ? ) . शेवटी त्यांचे तुपात घोळवुन बडबड एवढी वाढली की आम्ही त्यांना समाजवाद्यांच्या आवेशात " भुकेल्यांना ४ प्रेमाच्या शब्दांपेक्षा पटकन मिळालेल्या भाकरीच्या तुकड्याचे (पक्षी: पिझ्झा पीसेसचे) महत्व आणि कौतुक जास्त असते" असे सडेतोड बोल सुनावणार होतो ( पण हे आंतरजाल नव्हे असे लक्षात आल्याने ) व त्यांनी फुक्कटची पेप्सी ऑफर केल्याने आम्ही ( लाच घेतलेल्या कस्टम अधिकार्‍यासारखे ) हसत " हॅ हॅ हॅ, होते असे कधीकधी, त्यात काय एवढे, आम्ही वाट पाहु " म्हणत तिथेच वाट पहाणे पसंत केले ...

पुन्हा त्यांनी नमनालाच घडाभर तेल घालुन आमची "ऑर्डर घेतली" व आम्हाला एक कोपर्‍यात असणारा एक मस्तपैकी कोच दाखवला व तिथे बसुन वाट पहाण्याची विनंती केली. ( तिथे असलेल्या सुंदर कन्या पाहुन ) आमचा मित्र आमच्या आधीच तिथे पोहचला ( आणि सगळीकडचाच "चांगला व्ह्युव्ह मिळेल" अशी ) जागा पाहुन त्याने तिथे ठाण मांडले. आम्ही आपले मुंबईतल्या लोकलच्या चौथ्या सीटवर बसणार्‍या मनुक्षाचा अवघडलेलापणा घेऊन उरलेल्या जागेत बसुन घेतले.समोर पाहिले तर अनेक लोक दिसत होते ( हो हो, अनेक सुंदर कन्याही दिसत होत्या (कॄपया फोटोंचा आग्रह करु नये, अपमान होईल ) पण तो महत्वाचा मुद्दा नाही ) , आमच्या "व्यक्तिनिरीक्षणाची" हौस भागवण्याची सुयोग्य जागा ह्याहुन दुसरी सापडली नसती. आम्ही आपले स्वतःवरच " यही है राईट प्लेस ( राईस प्लेट नव्हे ) बेबी, आहा ..." म्हणत खुष झालो. मित्राची काळजी करण्याची गरजच नव्हती, "अशा ठिकाणी" कसा टाईमपास करावा हे त्याला सांगणे म्हणजे साबा करिमने गांगुलीला ऑफसाईडला गॅप कसा काढावा हे शिकवण्यासारखे आहे.
तो त्याच्या "उद्योगाला" लागला व आम्ही शांतपणे समोरचे निरीक्षण करु लागलो ....

* क्रमश : *
( आजकाल वय झाल्याने ( गैरसमज नको, एका जागी न बसवण्याच्या तारुण्याबद्दल कैफाबद्दल ( कत्रिना नव्हे, पुन्हा अजुन गैरसमज नकोत ) बोलतो आहे मी ) एका बैठकीत पहिल्याएवढे लिखाण होत नाही.

Monday, June 8, 2009

एंजल्स & डेमन्स ...

डॅन ब्राऊनच्या गाजलेल्या व अत्यंत आवडलेल्या "दा विंची कोड" ह्या चित्रपटानंतर ज्याची आतुरतेने वाट पहात होतो तो "एंजल्स & डेमन्स" काल चित्रपटगॄहात जाऊन पाहिला, त्याच्या आधीच पुस्तक मिळवुन पुर्वाभ्यास केला होता त्यामुळे चित्रपट पहाताना जास्त मज्जा आली ...जरुर आणि जरुर पहावा असा हा चित्रपट आहे.

टीप : स्पॉयलर्स नाहीत, बिनधास्त वाचा ... ***********************************************
चित्रपटची सुरवात होते ती २ अत्यंत वेगळ्या जगातल्या आणि वेगळ्या पातळीवरच्या घटनांमधुन, धर्म आणि विज्ञान ह्यातल्या महत्वपुर्ण घडामोडींवर प्रकाश टाकुन चित्रपट सुरु होतो.

रोममध्यल्या "व्हॅटिकन सिटी"मध्ये सध्या पदावर असलेल्या "पोप"चे निधन होते व त्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व प्रथा पाळुन पुढील धर्मसत्ता सांभाळणार्‍या एका नव्या पोपची निवड करणार्‍या "कॉन्क्लेव्ह" ह्या कार्यक्रमाची आखणी केली जाते. जुन्या पोपचा वैयक्तीक आणि सर्वात जवळचा सेवक असलेला धर्मगुरु ज्याला "केमरलिंगो" ह्या नावाने ओळखले जातो तो कार्लो व्हेन्ट्रेसा ह्या विधीची सुरवात करतो. ह्या विधीसाठी संपुर्ण जगातुन ख्रिश्चन धर्माचे अत्युच्च असे १६५ कार्डीनल्स हे व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल होतात, आख्ख्या जगभरातला मिडिया ह्या संपुर्ण विधीचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी रोममध्ये हजर असतो व त्यांना सोबत असते ती लाखो श्रद्धाळु ख्रिश्चन धार्मिक लोकांची.
ह्या घडामोडींपासुन अत्यंत दुर व अत्यंत तटस्थ अशा एका "सर्न (European Organization for Nuclear Researc)" नावाच्या जिनेव्हामधल्या संस्थेमध्ये मात्र वेगळीच धांदल उडाली असते. "हे विश्व देवाने बनवले आहे, मर्त्य मानवाला शुन्यापासुन नविन काही ( Creation of Something from Nothing ) बनवणे शक्य नाही " ह्या संकल्पनेला तडा देणारे काम इथे चालु असते, शात्रज्ञ लिओनार्डो व्हेट्रा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली "अँटीमॅटर" तयार करण्यात येतो, ही मानवाची नवीच झेप. ज्या देवाने घडवलेल्या "बिग बँग" प्रक्रियेतुन विश्व निर्माण झाले त्यावेळी तयार झालेल्या अँटीमॅटरचे यशस्वी उत्पादन मानव पुन्हा करतो हीच महत्वाची घटना. मात्र हा अँटीमॅटर अत्यंत किमती, अत्यंत जोखमीचा व अत्यंत स्फोटक अशी त्याची ख्याती.
ह्या घटनेनंतरच काही तासांमध्ये ह्या कडेकोट सुरक्षा असलेल्या प्रयोगशाळेतुन डॉ. व्हेट्रांची अत्यंत गुढ हत्या होते व हत्या करणारा खुनी बहुमुल्य आनि धोकादायक असे "अँटीमॅटर" त्याच्या सुरक्षा करणार्‍या कॅनिस्टरसह घेऊन तिथुन गायब होतो.

ह्या दोन्ही घटनांपासुन मानसीक व शरिरीकपणे अत्यंत दुर असलेल्या हॉवर्डमधील सिम्बोलॉजिस्ट ( मराठी शब्द ? ) व इतिहासतज्ज्ञ प्रा. रॉबर्ट लँग्डन यांना स्वीस गार्डकडुन ( व्हॅटिकन सिटीचे रक्षक ) "अत्यंत आणिबाणीची परिस्थीती" असे सांगुन तातडीचे बोलावणे येते.

इकडे व्हॅटिकनमध्ये दाखल झालेल्या कार्डिनल्सपैकी अत्यंत महत्वाचे आणि भविष्यातले पोप होऊ शकणार्‍यापैकी ४ कार्डिनल्सचे अत्यंत गुढ पद्धतीने "अपहरण" झालेले असते. अजुन एक गोष्ट म्हणजे सुरक्षेसाठी लावलेल्या एका कॅमेर्‍यामध्ये सर्नमधुन चोरी गेलेले "अँटीमॅटर" दिसलेले असतात. अपहरणकर्त्याने फोन करुन ४ कार्डिनल्सच्या दर तासाने एक ह्या पद्धतीने त्यांच्या सार्वजनिकस्थळी खुनाची व सर्वात शेवटी अँटीमॅटरचा वापर करुन संपुर्ण व्हॅटिकन नष्ट करण्याची धमकी दिली असते. अपहरणकर्ता स्वतःची ओळख "इल्युमिनाटी * ( खाली थोडे विस्तारीत स्पष्टीकरण देतो ) गटाचा सदस्य" म्हणजे "व्हॅटिकन चर्चचा महान,अत्यंत जुना परंतु ताकदवान आणि हुशार शत्रु" अशी करुन देतो.

मागण्या ???
मागण्या काहीच नसतात व काही तडजोड ही तो नाकारतो, त्याच्या मते जे चर्चने ४०० वर्षापुर्वी ४ शास्त्रज्ञांच्या हत्या करुन व त्यांच्या मॄतदेहाची सार्वजनिकस्थळी विटंबना करुन जे क्रौर्य दाखवले त्याचा हा सरळसरळ "सुड" आहे, सुड घेताना त्यात कसलीही तडजोड अथवा सौदा होऊ शकत नाही.

ह्याच परिस्थीतीची उकल करण्यासाठी, अपहरणकर्त्याचा व अँटीमॅटरचा शोध घेण्यासाठी प्रा. रॉबर्ट लँग्डन आणि सर्नमधील शात्रज्ञ "व्हिटोरिया व्हेट्रा" हे व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल होतात. ह्या सर्व शोध सत्राची व व्हॅटिकनमध्ये घडणार्‍या इतर धार्मिक घटनांचे नेतृत्व स्वतः "केमरलिंगो" हा धार्मिक अधिकारी करत असतो.

आता सुरवात होते अनेक गुढ, धक्कादायक, अंगावर रोमांच आणणार्‍या घटनांना ....
रॉबर्ट लँग्डनच्या मते जर अपहरणकर्ते खरोखर इल्युमिनाटी गटाचे सदस्य असतील तर त्यांची स्वतःची अशी एक पद्धत आहे आणि ती काटेकोरपणे पाळण्याबद्दल इल्युमिनाटींची ख्याती आहे. ह्या जगाची निर्मीती "पंचतत्वांमधुन" झाली ह्यावर अत्यंत गाढा विश्वास असणारे‍या इल्युमिनाटी त्यांच्या संदेशात व कार्यक्रमात ह्या पंचतत्वांचा जरुर वापर करत असल्याने त्या दिशेने शोध घेतल्यास आपण नक्की त्यांना पकडु असे लँग्डनला वाटते. इल्युमिनाटींच्या पद्धतीनुसार ४ खुन व अँटीमॅटर्चा स्फोट ह विवीक्षित ठिकाणीच होणार व ते शोधण्यासाठी अपल्याला एक "कोडे सोडवावे" लागेल असा लँग्डनचा विश्वास असतो, एका खुणेवरुन दुसरी, त्यावरुन तिसरी असे शोधत जाऊन आपण त्या अपहरणकर्त्यापर्यंत जरुर पोहचु असे लँग्डन सर्वांना पटवुन देतो.


ह्या शोधसत्राचा पहिला दुवा हा "व्हॅटिकन अर्काईव्ह्ज"मध्ये असलेल्या महान खगोलतज्ज्ञ गॅलेलियोच्या "सत्याचा नकाशा (Diagramma della Verità : Diagram of Truth)" ह्या पुस्तकात मिळणार असल्याने सर्व नियम, रुढी, गुप्तता झुगरुन देऊन केमरलिंगो लँग्डनला ते पाहण्याची परवानगी देतात.त्यात मिळालेल्या कोड्याची उकल केल्यावर त्यांना खुनाच्या पहिल्या जागेचा अंदाज येतो व ते धावत तिकडे पोहचतात, पण इथे मात्र त्यांच्या शत्रुने त्यांच्यावर सरळसरळ मात केलेली असते. पंचतत्वांमधल्या पहिले तत्व असलेल्या "जमिन" याचा उपयोग करुन पहिल्या कार्डिनलची हत्या करण्यात आली असते व त्याचा मॄतदेह तिथे पडला असतो.
इथे असलेले "एंजल्सचे पुतळे" आणि "पंचतत्वे" ह्यांच्यातील संबंधच आपल्याला पुढचा दुवा देतील ह्या धारणेतुन लँग्डनचे शोधकार्य चालुच राहते ते मिळालेल्या संकेतांनुसार एका जागेवरुन दुसरीकडे धाव घेत असतात.मात्र त्यांचे नशिब त्यांना साथ देत नाही, अजुन २ कार्डिनल्सची पंचत्त्वांनुसार "हवा व अग्नी" ह्यांचा वापर करुन अत्यंत निर्घुण हत्या होते व खुनी पळुन जाण्यात यशस्वी होतो.
चौथ्या आणि शेवटच्या कार्डिनल बॉजियांना वाचवण्यात लँग्डन यशस्वी ठरतो मात्र अत्यंत धोकादायक असा खुनी आणि त्याच्याबरोबर असलेले "अँटीमॅटर" ह्यांचा अजुन अजिबात पत्ता नसतो, ते गुढ अजुन कायमच असते.

इकडे चर्चच्या रुढीनुसार नव्या पोपच्या निवडीसाठी आवश्यक असणारे "कॉन्क्लेव्ह" त्या ४ कार्डिनल्सच्या अनुपस्थिती सुरु झालेले असते व स्वतः केमरलिंगो सर्व परिस्थीतीवर बारीक लक्ष ठेऊन असतो. त्याच्या व्हिट्टोरिया व्हेट्राबरोबर झालेल्या चर्चेत आलेल्या शंकानुसार मरण पावलेल्या पोपच्या शरिराची पुन्हा तपासणी करण्यात येते व इथे आश्चर्याचा धक्का म्हणजे हा पोप नैसर्गिकरित्या मरण पावला नसुन त्यांची हत्या झाली आहे असा निष्कर्ष निघतो. हे एकुण प्रकरण गंभीर आहे, इल्युनाटींचा अजुन पत्ता नाही, अँटीमॅटरचा धोका अजुन आहे ह्या सर्व शक्यता लक्षात घेऊन केमरलिंगो कॉन्क्लेव्ह चालु असलेल्या "सिस्टीन चॅपेल" इथे धाव घेऊन, परंपर मोडुन, विधी थांबवुन तिथे असलेल्या सर्व कार्डिनल्सना सध्या घडत असलेल्या घटनांची कल्पना देऊन विधी थांबवण्याची विनंती करतो. "देवावरची श्रद्धा मोठ्ठी की विज्ञानाचे अस्तित्व खरे ? संकटातुन तुम्हाला विज्ञान वाचवते की देवावरची श्रद्धा ? विज्ञान हे देवाच्या विरुद्ध आहे की ते परस्परांना पुरक आहेत ? न जाणो अजुन विज्ञान बाल्यावस्थेत असल्याने अत्यंत गहन असलेल्या देव आणि धर्माला समजण्यास नालायक ठरत असेल तर तो त्यांचा अक्षम्य गुन्हा मानायचा का ? ह्य विज्ञानप्रेमींना धर्माच्या प्रवाहात समावुन घेतले तर ते बरोबर नव्हे का ?" असे एक भावुक व तात्विक भाषण करुन तिथे जमलेल्या सर्व काडिनल्सना विधी थांबवण्यची व इल्युमिनाटीबरोबर ( विज्ञानप्रेमी ) समझोता करण्याची घोषणा करण्याची विनंती करतो. पण त्याच्या हाती निराशा पडते, देवाच्या ताकदीवर गाढ श्रद्धा असलेले व देवच आपले रक्षण करेल ह्यावर प्रगाढ विश्वास असलेले "स्कुल ऑफ कार्डिनल्स" आपला कॉन्क्लेव्ह हा विधी पुढे चालु ठेवतात ...

काही वेळानंतर खुद्द "केमरलिंगो"वर खुनी हल्ला होतो, करणारा त्याच्या जवळचाच माणुस निघतो व तो "इल्युमिनाटीचा हस्तक" आहे असे ठरवुन त्याला ठार मारले जाते, खुद्द केमरलिंगो जखमी होतो.
इकडे खुनावरुंन खुणा, दुव्यावरुन दुवे शोधत असलेल्या लँग्डनला अखेरीस येश मिळते. ते अँतिमॅटर हुडकण्यात यशस्वी ठरतात, ते अँटिमॅटर असलेले कॅनिस्टर त्यांना सापडते व खुन्याचाही बंदोबस्त होतो ....

पण इथे अजुन एक नवा टर्न ...
अँटिमॅटर संभाळनार्‍या कॅनिस्टरची बॅटरी फक्त ५ मिनीटे शिल्लक राहिली असते, ते संपल्यावर आतल्या अँटिमॅटरचा व बाहेरच्या मॅटरचा संपर्क होऊन एक महाविस्फोट होण्याची शक्यता निर्माण होते, हातात असतात फक्त ५ मिनीटे व पणावर लावले असते अख्खे व्हॅटिकन सिटी, ख्रिश्चन धर्मातले सर्वोच्च अधिकारी, लाखो लोक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लोकांचा धर्मावरील विश्वास ...

ही आव्हान पेलायला उपस्थित असतात स्वीस गार्डचे काही कडवे रक्षक, प्रा. लँग्डन, व्हिट्टोरिया व्हेट्रा आणि स्वतः केमरलिंगो ....

पुढे ???
पुढे काय होते ???
अँटीमॅटर संभाळले जाते की त्याचा स्फोट होतो ? स्कुल ऑफ कार्डिनल्सचा पोपसंबंधी काय निर्णय होतो ? आत्त्तापर्यंत अखंड कष्ट व परिश्रमाची उच्च पातळी गाठलेल्या प्रा. लँग्डन आणि केमरलिंगो यांचे काय होते ?धर्मावरील श्रद्धेचा विजय होतो की विज्ञानातील सत्याचा ???

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला थेटरमध्ये चित्रपट पहुनच मिळतील. आत्ता मी इथे काही लिहणे म्हणजे "मिस्टरी स्पॉईल" करण्यासारखे होईल, तेव्हा आपण हा चित्रपट जरुर थेटरमध्येच पहावा.
माझ्याकडुन इतकेच....

शौर्य आणि क्रौर्य , धर्म व धर्मातील रुढीवरील विश्वास आणि विज्ञान , धोकेबाजपणा आणि पराकोटीची स्वामीनिष्ठा , सत्तापदांचा मोह आणि निरिच्छपणे केलेली सेवा, कमालीची गुप्तता आणि त्यांची उकल ह्या सर्वांचे सुम्दर मिश्रण असणारा हा एक नितांतसुंदर चित्रपट म्हणजे "एंजल्स आणि डेमन्स ", जरुर पहा आणि कसा होता ते मला आवश्य कळवा ...
धन्यवाद ...!!!!

* इल्युमिनाटी :

हा ख्रिश्चनिटीमधल्या चर्चया विरोधात असणार्‍या काही कडव्या लोकांच्या म्हणजे मेसन्सच्या गटामधला एक लहान गट, प्रामुख्याने ह्या गटात त्या त्या काळातले महान शात्रज्ञ, शिल्पकार, कलाकार, तंत्रज्ञ लोक वगैरे असत. ब्रदरहुड ह्या अजुन एका चर्चविरोधी गटाकडुन मिळणार्‍या मदतीमुळे अनेक नव्या संकल्पना ह्या इल्युमिनीस्ट लोकांनी मांडल्या. बव्हेरियन राजाच्या आर्थीक मदतीचा स्त्रोत अखंड चालु असल्याने ह्यांनी बरेच संशोधनात्मक कार्यही केले.हे सर्व "विज्ञानवादी" लोक होते.मात्र ह्यांचे संशोधन हे "बायबलमधल्या संकल्पनांच्या विरोधात" गेल्याने व्हॅटिकन चर्चच्या रोषास हे इल्युमिनाटिस्ट बळी पडले, ह्यांच्यावर बंदी आली व सदस्यांचे प्रचंड छळ झाले व अनेक हत्याही झाल्या ..."गॅलालियो, केपलर, न्युटन,लिओनार्ड दा विंची, व्हिस्टन चर्चिल" वगैरे इल्युमिनीस्ट होते असा एक समज आहे ...


( वाचकांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असल्यास मी एक "मेसन्स आणि इल्युमिनाटी" ह्यांच्यावर सखोल भाष्य करणारा लेख टाकेन, अर्थात वेळ आणि गरज ह्यावर सर्व अवलंबुन असेल. मात्र खरोखर जाणण्याची इच्छा असेल तर जरुर लिहीन )