Wednesday, February 24, 2010

काय म्हणता, तुम्ही देव पाहिला नाही ?

देवाशप्पथ ( पक्षी : सचिनशप्पथ ) सांगतो काल सकाळी उठल्यावर कालचा दिवस खुप भारी असेल असे अजिबात वाटले नव्हते, त्यात देवदर्शन होईल असे तर अजिबातच वाटले नव्हते. संध्याकाळच्या ५.३० ची वेळ, नेहमीप्रमाणे गडबडीत सर्व आवरुन घरी पळायच्या गतीतली आमची सवय. कामे फ़टाफ़ट उरकणे चालु होते, एका मित्राचा फ़ोन आला, तो नुकताच खाली कॊफ़ी प्यायच्या निमित्ताने ( पोरी पहायला ) गेला होता. तो म्हणत होता पटकन खाली ये, एक भारी घटना घडते आहे व ती पहायला भाग्य लागते.
जास्त आढेवेढे न घेता आम्ही हातातले काम सोडुन खाली मॊलमध्ये गेलो.

आणि काय सांगु दोस्तहो, काल चक्क देव पहायला मिळाला.
अगदी नक्की, तो देवच होता, त्याशिवाय काय अशा अचाट लीला तो इतक्या लिलया करु शकत होता.
ह्या देवाचे मायंदळ भक्त जमले होते दर्शनासाठी, जोरदार जयघोष चालु होता व देव आपल्या भक्तांना क्षणाक्षणाला काहीतरी नविन देऊन खुष करत होता.
शंकाच नाही, देवच होता तो.

काय म्हणता ?
देव कसा दिसतो ? तो कसा बोलतो ? तो कसा चालतो ? तो काय करतो ?
काय म्हणता ?
तुम्ही अजुन देव पाहिला नाही ?



अगदी जुनी घटना आहे पहा, काळ होता १९८८ चा, मुंबईच्या आझाद मैदानावर एका १४ वर्षाच्या तरुणाच्या रुपाने एका क्रिकेटमधल्या चमत्काराने ... छे छे देवानेच अवतार घेतला होता. त्याने व त्याच्या एका शाळकरी सोबत्याने मिळुन ह्या मैदानावर ६६४ धावांची रास रचली होती व ती ही नाबाद. भल्याभल्यांच्या तोंडात बोट घालायला लावणारी ही घटना होती व देवाच्या भावी चमत्कारांची ही फ़क्त एक झलक होती.
काय सांगता ? तुम्हाला आठवत नाही कोण होता तो ?
हे पहा जरा शेजारी कोण आहे ते ...



ही घटना आहे डिसेंबर १९८९, सियालकोट पाकिस्तान मधली एक कसोटी. १६ वर्षाचं एक कोवळं पोरं मैदानावर उतरतं. बेभान आणि टारगट पब्लिकची "दुध पिता बच्चा ... घर जा" नारेबाजी चालु, ह्या पोराचा त्याला खणखणीत फ़लंदाजीद्वारे तडाखेबंद प्रतिसाद. महान गोलंदाज अब्लुद कादिरचे ह्या पोराला उचकावणे व त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये ह्या मात्र १६ वर्षाच्या पोराने त्याला खणखणीत असे ४ षटकार आणि १ चौकार लगावणे.
काय म्हणता ? कोण होता तो मुलगा ?
अहो काय सांगु, सैतानांच्या असल्या गदारोळात धिरोदत्तपणे आपल्या टिमच्या मागे उभा राहणारा तो १६ वर्षाचा कोवळा मुलगा एक देवच होता.


सन १९९०, ऒगस्टचा महिना, भारताचा इंग्लड दौरा व त्यातली एक महत्वाची कसोटी. भारताच्या इनिंगची दुसरी वेळ, बरीच पडझड झालेली, भारत अलमोस्ट पराभवाच्या छायेत. एक पोरगा पुन्हा एकदा अफ़ाट धैर्याने एका भिंतीसारखा खेळपट्टीवर उभा राहतो व आपल्या नाबाद ११९ रनांच्या जोरावर भारताचा नक्की असलेला पराभव टाळुन कसोटी अनिर्णीत ठेऊन भारताची शान राखतो.
आख्ख्या गोकुळाचा डोलारा आपल्या बोटावर सावरणा-या भगवान कॄष्णासारखाच ह्या पोराचा करिष्मा !
आपल्या साथिदारांच्या मदतीसाठी धावुन येणारा व आख्खा डोलारा सावरणारा हा पोरगा देवासमच नव्हता का ?




नोव्हेंबर १९९३ मधल्या हिरोकपच्या पहिल्या सेमीफ़ायनलची गोष्ट, जवळजवळ ८० हजार प्रे़क्षकांसमोर भारत आणि द्क्षिण आफ़्रिकेची लढत, आफ़्रिकेला हव्या आहेत शेवटच्या शटकात ६ धावा त्या सामना जिंकुन दिमाखात फ़ायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी. कर्णधार अझरुद्दिन समोर यक्षप्रश्न ! संघात कपिल, प्रभाकर, कुंबळे, जवागल श्रीनाथसारखे दिग्गज गोलंदाज, चेंडु दिला जातो एका नवख्या बदली गोलंदाजाकडे. ना ह्याचा विकेट घेण्याबाबतचा दबदबा वा धावा रोखण्याचा लौकिक. पण एक महान आश्चर्य घडते, आफ़्रिकेला ह्या नवख्या गोलंदाजाच्या ६ चेंडुत केवळ ३ धावा काढता येतात व सामना भारत खिषात टाकतो.
कोण होता हा बदली जादुगर गोलंदाज ?
कुरुक्षेत्रावर कौशल्याने आपल्या रथाचे सारथ्य करुन पार्थाला योग्य त्या वेळेस योग्य त्या ठिकाणी न्हेण्या-या भगवान श्रीकॄष्णासारखेच कौशल्य ह्या बदली गोलंदाजाने त्या वेळी दाखवुन आपल्या संघाची नाव एकदम व्यवस्थितपणे किना-याला लावली ना ?


फ़ेब-मार्च १९९६ चा मोसम, वेळ होती ती वर्ल्डकपची. कौरवांच्या लक्ष लक्ष सेनेत अनिर्बंध संचार करणा-या, जो समोर येईल त्याला आपल्या अतुलनीय आणि नेत्रदिपक पराक्रमाने नेस्तनाबुद करणा-या, अपराजीत अशा अर्जुनाप्रमाणे क्रिकेटमधल्या एका योद्ध्याचा धुमाकुळ आख्ख्या स्पर्धेत चालु होता. कोणत्याच संघाच्या कोणत्याच कर्णधाराचे डावपेच त्याला रोखण्यात यशस्वी झाले नव्हते, त्याच्याकडुन अर्जुनाच्या गांडीव धनुष्यातुन निघणा-या अगणित बाणासारखीच धावांची बरसात चालु होती व त्याखाली कित्येक गोलंदाजांची कत्तल घडत होती. २ शतके आणि ३ अर्ध शतकांच्या मदतीने त्या शुर वीराने ८७.१६ च्या सरासरीने ५२३ धावांचा पाऊस ह्या स्पर्धेत पाडला.
दैवातीत कार्यच हे, यासम हाच !



सन १९९८, मार्च महिना. जगजेत्ता ऒस्ट्रेलिया संघ भारतात आपल्या विजयाच्या अश्वमेध यज्ञाचा घोडा घेऊन आला होता, त्यांना रोखण्यात आत्तापर्यंत कोणत्याच क्रिकेट साम्राज्याला यश आले नव्हते, जिकडे हे जातील तिकडे समोरच्या संघाने त्यांना ’शरणचिठ्ठी’ लिहुन दिलेली असते. मात्र भारतात त्यांचे साफ़ पानीपत होते व कांगारु खालमानेने परत जातात, टेस्टमॆचमध्ये त्यांचा २-१ असा सरळ पराभव झालेला असतो. जरी ही मालिका हरभजनसिंगच्या जादुई फ़िरकीमुळे गाजली असली तरी फ़लंदाजीत एक सुर्य अखंड मालिकाभर तळपत होता. १ द्विशतक, २ शतके आणि १ अर्धशतक ह्यांच्या मदतीने त्याने कांगारुंच्या नाकात दम आणला होता.






ह्यावेळची युद्धभुमी होती ती म्हणजे क्रिकेटची पंढरी, काशी, मक्का, मदिना जे काही पवित्र असेल ते असे इंग्लंड, काळ होता 1999 च्या विश्वचषकाचा. ह्या महानायकाने आपल्या बॆटचे असे काही पाणी प्रतिस्पर्धी संघाला दाखवले की प्रतिस्पर्धी गोलंदाज ह्या लाटेत अक्षरश: वाहुन गेले.
ह्यावेळची एक उल्लेखनीय घटना म्हणजे ह्या दरम्यान त्याच्या वडिलांचे निधन झाले असताना वैयक्तिक दु:ख स्वत:पुरते वैयक्तिकच ठेवुन संघासाठी पुढच्या सामन्यात शतक झळकावले व त्यानंतर हे शतक आभाळाकडे बघत आपल्या वडिलांना अर्पण केले. देवाशप्पथ सांगतो त्या दिवशी अनेक रसिक त्याच्या बरोबरीने २ थेंब का होईना जरुर रडले असतील.
हाच सिलसिला त्याने पुढच्या २००३ च्या आफ्रिकेच्या वर्ल्ड कपमध्येही चालु ठेवला.
ह्यावेळी त्याने तडाखेबंद फलंदाजी करत त्याने ६७३ धावांची रास रचली, भारताला फायनलमध्ये घेऊन गेला.
त्याच्या ह्या महान कामगिरीमुळे कांगारु विश्वचषक जिंकुनसुद्धा हा "मालिकावीर" म्हणुन गौरवण्यात आला.


कसोटीत सर्वाधीक धावांचे आधी १३००० मग १४००० त्यानंतर आता १५००० धावा असे स्वत:चेच विक्रम मोडत राहणारा हा आमचा देव, कसोटीमध्ये सर्वाधिक अशा ४७ सेंच्यु-या झळकावणारा हा आमचा हिरो, २० वर्षाच्या प्रदिर्घ कारकिर्दीत १६६ कसोटी सामने खेळुन ५०+ ची अविश्वसनीय सरासरी असणारा हा फ़लंदाजांचा फ़लंदाज, ४४२ एकदिवसीय क्रिकेट सामन्यात खेळल्याची ह्याच्य नावावर नोंद, त्यातली सलग १८५ सामन्यांमध्ये विना विश्रांती खेळण्याचा भीमपराक्रम, एक दिवसीय सामन्यांमध्ये ४६ शतकांच्या जोरावर ४५+ च्या सरासरीने १७००० ह्य्न अधिक धावांची रास, २ वेळा संघाचे नेतॄत्व कठिण वेळी संभाळण्याची कामगिरी, केवळ चौकारांच्या मदतीने शतक करण्याची जादुई कामगिरी ( एका सामन्यात २५ चौकार ) , ६१ वेळा सामनावीर आणि १५ वेळा मालिकावीर ठरण्याचा झंझावत, सौरव गांगुलीसोबत ६२७१ रनांच्या भागिदारीचा अशक्यप्राय विश्वविक्रम, २ पद्म पुरस्कार १ अर्जुन पुरस्कार १ विस्डेनचा सन्मान आणि राजीव गांधी खेलरत्न सन्मान अशा अनेक सन्मानांची रास, सभ्य माणसांच्या क्रिकेट खेळामधला सर्वात सभ्य माणुस अशी ख्याती ...
किती लिहायचे आणि किती वगळायचे ?

पण काल एक आश्चर्य घडले, असे कधी झाले नव्हते आणि असे कधी होणार नाही. हे मर्त्य मानवाचे कामच नव्हे, अशा कामगिरीसाठी काही दैवी शक्ती हव्यात अशी एक समजुत.
एका एकदिवसीय सामन्यात १४७ चेंडुंच्या मोबदल्यात २०० नाबाद धावांचा विश्वविक्रम....
जे स्वप्नातली पाहिले नव्हते ते याची देही याची डोळा अनुभवायास मिळाले.
भरुन पावलो, धन्य झालो !
आमच्या पुढच्या पिढीला "आम्ही सचिनची एक दिवसीय सामन्यामधली डब्बल सेंच्युरी पाहिली" ही आठवण सांगत आम्ही आयुष्यभर सुखी राहु ...!!!

"झाले बहु, होतील ही बहु,परंतु यासम हाच !!! "



आणि काय म्हणता ?
एवढे समळे पाहुन तुम्ही म्हणता तुम्ही अजुन देव पाहिला नाही ?
आम्ही काल देव पाहिला व त्याच्या दैवी चमत्काराने आम्ही भरुन पावलो, ह्या क्रिकेटप्रेमी जन्माचे सार्थक झाले !

वि.सु. : सर्व प्रतिमा आणि सांखिकी आंतरजालावरुन साभार .....

Wednesday, February 3, 2010

राजपुत्र बिहारात बहु बडबडला ....

राहुल गांधी हे एका फार फार मोठ्ठ्या घराण्याचे ( म्हणजे इतक्या मोठ्ठ्या की एका महान काँग्रेसी नेत्याने ह्या घराण्यातील एका महान पंतप्रधानांना "देशापेक्षा मोठ्ठे'" ठरवले होते। असो. ) वारस आहेत. मान्य !
सध्या ते काँग्रेस पक्षाचे युवराज असुन त्यांच्यापुढे आलेल्या कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर नाकारुन ( ह्या बातमीची काही चरणभाटांमार्फत लै पब्लिशिटी करण्यात त्यांचा वैयक्तिक काही स्वार्थ नव्हता हे उगाच जाताजाता नमुद करतो ) त्यांनी साधी "खासदारकी" स्विकारली. काँग्रेसी भाषेत ह्याला "अंतरात्म्याचा आवाज" की "आत्मसन्मानार्थ त्याग" असे काही तरी म्हणतात बॉ, आपल्याला त्यातले जास्त काही कळत नसल्याने तुर्तास मान्य एवढेच म्हणतो.
झालच तर लै शिकले वगैरे आहेत, शिक्षण फॉरीनात झाले ही हे आपल्यासारख्या अडाणी/अल्पशिक्षित मंत्री आणि खासदार निवडुन देणार्‍या देशात व्हॅल्यु अ‍ॅडिशन मानायला हरकत नसावी.


असो, आजकाल म्हणे ते ग्रामिण भारत पाहण्यासाठी आणि जनसामान्यांच्या हालअपेष्टा पाहण्यासाठी ( त्या दुर करणे ही कुठल्याच राजकारण्याची जबाबदारी नाही ) दौर्‍यावर निघाले आहेत म्हणे. ठिकठिकाणची गरिब, बेरोजगारी, रोज जिवंत राहण्यासाठी रोज संघर्ष करायला लागणारी उघडी-नागडी जनता आपला "राजपुत्र" पहायला हातातली कामे बाजुला सारुन अगदी उत्साहात येत आहे, अर्थात ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही कारण आपल्या जनतेला "नेता" हा जोवर आपला "मालक" वाटत राहणार तोवर हे असेच घडणार।
असो, इथे म्हणे युवराज राहुल मोठ्ठीमोठ्ठी भाषणे वगैरे देऊन काहीकाही वायदे वगैरे करत आहेत ( व त्यांचे चमचे त्यावर "लेका लेका पंतप्रधान का नाही झालास?" असा चेहरा करत टाळ्या वाजवत आहेत ). जोवर हे रुटिन ( म्हणजे ह्यांना दौरा केल्याचा आनंद व जनतेला राजपुत्र प्रत्येक्ष डोळ्यांनी पाहिल्याचा आनंद ) चालु आहे तोवर आमची काही तक्रार असण्याचे कारण नाही।

मात्र परवा युवराजांनी एक गंमतच केली बघा। हो, गंमतच.
ते बिहारातल्या कुठलाश्या गावी गेले होते आपले टोळके घेऊन, मस्त गावगन्ना गर्दी अणि मिडियाचा फौजफाटा वगैरे जमला होती त्यांना बघायला. ह्यासर्व वातावरणामुळे उत्साहित झालेले युवराज उत्साहाच्या भारात जे बोलु नये ते बोलुन बसले. आता युवराजच ते, मनात आले बोलुन टाकले, मॅटर खतम, ते काय महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे नेते किंवा मंत्री आहेत काय शब्दाशब्दाला हायकमांडची परवानगी मागायला ? सध्या ते काय करतात तर विवीध भागांचा दौरा करतात व तिथले प्रश्न असे चुटकीसरशी फटाफट सोडवुन टाकतात, नुकताच त्यांनी "मुंबई आणि युपी/बिहारी जनांच्या नविन लोढ्यांचा प्रश्न" असाच बसल्या बैठकीत सोडवला, ह्याला म्हणतात युवराज. आता ह्याच हिशोबाने नॉर्थ -ईस्टचे प्रश्न, कर्नाटक्-तामिळनाडु ह्यांच्यातला कावेरी वाद, आंध्रातला तेलंगाणाप्रश्न, कर्नाटक-महाराष्ट्रातला सिमाप्रश्न , गुजराथेतला सरदारसरोवर प्रकल्पाचा वाद, काश्मिर प्रश्न वगैरे दिर्घकाळ भिजत घोंगड्यासारखे पडुन असणारे प्रश्न आता युवराज एका बैठकीत सोडवणार ह्याबाबत आमच्या मनात अजिबात संदेह नाही, देरी आहे ती फक्त त्यांनी त्या त्या भागाचा दौरा करायची. दौर्‍यावर जायचे, गर्दी आणि मिडिया जमवायचा, बैठक घ्यायची की सोडवायचा प्रश्न अशी एकदम शिंपल प्रोसिजर आहे, तुम्ही पहात रहा आता अनेक प्रलंबित वाद आता कसे फटाफट सुटतात ते.
असो, फारच विषयांतर झाले.

बोलता बोलता युवराज राहुल म्हणाले की "२६/११ रोजी मुंबईवर भीषण हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान कुणी घातले? बिहार, उत्तर प्रदेशच्या एनएसजी कमांडोंनी. त्यामुळे दहशतवाद्यांशी लढायचे तर बिहारींना मुंबईतच राहू दे".
हम्म्, अशा बोलण्याला बालीश म्हणतात का हो ?
असो.
एनएसजीचे कमांडो हे राज्याच्या कोट्यानुसार निवडतात व त्यानुसारच त्यांच्या पलटणी तयार केल्या जातात ही नवी माहिती मिळाली.
तदनुसार मुंबई वाचवायला आलेल्या टीममध्ये युपी आणि बिहारी ह्या "कोट्यातल्याच तुकड्या" पाठवल्या गेल्याचेही नविनच समजले।
ह्याच युद्धात वीरमरण आलेला एनएसजीचा कमांडो शहिद संदीप उन्नीकृष्णन हा युपी/बिहारी होता ही बातमी कोणत्या उल्लुच्या पठ्याने युवराजांना सांगितली हो ?
तसेच ह्याच तुंबळ युद्धात ज्यांनी देश आणि मुंबई वाचवण्यासाठी आपल्या प्राण दिले ते हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे असे अधिकारी व इतर अनेक पोलीस तसेच कसाबच्या हातातली स्टेनगन आपल्या पोटावर धरुन त्याला जिवंत पकडवण्यात फार मोठ्ठी भुमिका बजावणारे तुकाराम ओंबाळे हे काय खास युपी/बिहारातुन मुंबई वाचवायला आले होते काय ?
शिवाय हे युद्ध लढत असताना देश आणि मुंबई वाचवायच्या प्रामाणिक भावनेतुन मैदानात उतरलेल्या "एनएसजी कमांडों"चा "युपी/बिहार" असा विशिष्ठ प्रदेश ठरवुन राहुलजींनी नक्की काय साधले ? म्हणजे ह्याच हिशोबाने देशाच्या सिमेवर लढणारा प्रत्येक जवान हा आपल्या देशाचे नसुन आपापल्या राज्याचे नेतॄत्व करतो की काय ?
रोज उठुन मनसे / शिवसेनेला झोडपण्याच्य निमित्ताने तमाम मराठी माणसाला "देश तोडणारे , विघटनवादी, प्रांतिक अस्मिता बाळगणारे" अशी शेलकी विशेषणे देणारे सो कॉल्ड देशप्रेमी मात्र राहुलजींच्या ह्या 'कमांडोंचा प्रदेश ठरवुन सैन्याचा अपमान करणार्‍या' विधानावर मात्र मुग गिळुन शांत आहेत.

असो, आता उगाच आपली राहुलजींना माहिती असावी म्हणुन देशासाठी लढलेल्या व योगदान दिलेल्या काही "मराठी" भाषिक जनांची आणि त्यांच्या कार्याची माहिती देतो, यादी अगदी संपुर्ण नाही पण जशी आठवेल तशी आहे, बहुदा तेवढी पुरेशी असावी.
१. जनरल अरुणकुमार वैद्य :
जेव्हा खलिस्तानवाद्यांनी पंजाबमध्ये रस्त्यांवर नंग्या तलवारी नाचवत सरकारविरुद्ध मोर्चे काढलेले आणि रक्तपातानी आख्खा पंजाब वेढीला धरुन अमॄतसरमधल्या 'सुवर्णमंदिरा'ला आपला लढाऊ गड बनवुन ठेवले होते तेव्हा जनरल वैद्यांच्या नेतॄत्वाखाली 'भारतीय सैन्य' तिकडे घुसले होते व 'ऑपरेशन ब्ल्यु स्टार' करुन देशाची वेशीवर टांगलेली लाग वाचवली होती.
ह्यामागे वैद्यांचा हेतु पुढेमागे मराठी माणसाला पंजाबात आरामात राहता यावे असा मुळीच नव्हता.
नंतर त्यांना ह्या प्रकरणाची किंमत सेवानिवॄत्तीनंतर एका हल्ल्यात आपले प्राण गमावुन द्यावी लागली होती.

२. एअर चिफ मार्शल प्रदिप नाईक :
त्यांनी २००९ मध्ये हवाईदळाचे नेतृत्व स्विकारले व समस्त देशाच्या हवाई संरक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली.१९७१ च्या युद्धात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता, मराठी असल्या कारणाने आपले विमान घेऊन मुंबईवर घिरट्या घालत केवळ मुंबईचे संरक्षण करण्याच्या फंदात ते पडले नाहीत.

३. राम रघोबा राणे :
हे कोकण मराठा रेजिमेंटचे एक लेफ्टनंट ऑफिसर होते. १९४८ च्या पाकीस्तानी घुसखोरीला उत्तर देण्यासाठी जाणार्‍या सैन्यात ह्यांच्या तुकडीचे नेतृत्व राणे ह्यांनी केले. घुसखोरांनी ठिकठिकाणी सुरुंग पेरुन आणि अडथळे उभारुन भरतीय सैन्याच्या हालचालीवर बंधने आणली तेव्हा राणे ह्यांच्या तुकडीनी अनेक भु-सुरुंग निकामी करण्यात महत्वाची भुमिका बजावली होती. त्यामध्ये त्यांच्या सहकार्यांना प्राण गमवावे लागले तर ते स्वतः जबर जखमी झाले होते.त्यांच्या ह्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना "परमवीर चक्र" देऊन सन्मानीत करण्यात आले होते.

४. अ‍ॅडमिरल विष्णु भागवत :ह्यांनी भारतीय नौसेनेचे नेतृत्व केले.

५. अनिल टिपणीस :भारतीय वायुसेनेचे माजी चीफ ऑफ एअर स्टाफ.

ह्याशिवाय इतर काही सामाजिक आणि राजकीय योगदाने,
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर :
ह्यांनी संपुर्ण स्वतंत्र भारताच्या घटना समितीचे 'अध्यक्षपद' भुषवले. स्वातंत्र्यानंतर अनेक नेत्यांमध्ये पदासाठी आणि सन्मानाच्या खुर्च्यांसाठी चढाओढ चालु असताना मात्र ह्यांचे निस्वार्थी योगदान लक्षात घेण्यासारखे आहे.

२. स्वातंत्रपुर्व काळात इंग्रजांविरुद्धच्या असंतोषाची मुहुर्तमेढ इथे महाराष्ट्रातच रोवली गेली. तेल्यातांबोळ्यांचे पुढारी म्हणवले जाणार्‍या लोकमान्य टिळकांना आख्खा भारत हा "भारतीय असंतोषाचे जनक" म्हणुन ओळखतो. त्यांच्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर, फडके बंधु, राजगुरु, आगरकर ह्यांच्यासारख्या अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान बजावले आहे.

३. स्वांतंत्र्यानंतर अधुनिक भारताच्या उभारणीत मोलाची भुमिका बजावल्याबद्दल "महर्षी धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संस्कॄतपंडित काणे" ह्यांचा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान "भारतरत्न" देऊन सन्मान करण्यात आला आहे.शिवाय ह्या यादीत आपल्या "लतादिदी आणि स्वरभास्कर भीमसेन जोशी" हे सुद्धा आहेत.

४. भारतात सिनेयुग आणि चलतचित्रपटाची सुरवात "दादासाहेब फाळक्यांनी" केली.

अशी उदाहरणे हजारो आहेत पण सगळीच यादी देण्यात मतलब काय ?
थोडक्यात सांगतो, ह्यातल्या एकानेही आपले कार्य पुढे न्हेताना ते फक्त महाराष्ट्र किंवा मराठी जनांपुरते मर्यादित ठेवण्याचा आपमतलबी करणे सोडा पण त्याचा कधी विचारही केला नाही, इतकेच काय पण नंतर कधी त्याचा साधा उल्लेखही केला नाही.

देशाच्या कल्याणासाठी आणि हिमायलाच्या संरक्षणासाठी नेहमीच धाऊन जाणार्‍या ह्या सह्याद्रीच्या मराठीच्या महाराष्ट्रादिकांना कुणी "देशप्रेम" शिकवायच्या आणि "राष्ट्रीय एकात्मतेचे धडे" शिकवायच्या भानगडीत पडु नये हेच खरे, ते आमच्या रक्तातच आहे....
अवांतर : युवराजांना कोणी महाभारतातल्या विराटपुत्र युवराज उत्तर ह्याची गोष्ट नाही का सांगितली ?