Tuesday, January 6, 2009

३१ डिसेंबरचा जल्लोश आणि तारतम्य ...!

सर्वात प्रथम आमच्या ब्लॉगच्या ( ज्या काहीं असतील त्या ) वाचकांना नव्या वर्षाच्या ( थोड्या उशीरानेच) शुभेच्छा. ह्यावेळी कसलेही सेलीब्रेशन अथवा शुभेच्छा देण्याचा मुडच नव्हता त्यामुळे लिहावे की नाही या वैचारीक द्वंद्वात होतो. असो.

एक किस्सा सांगतो, बर्‍याच मोठ्ठ्या सुट्टीनंतर हापीसात गेल्यावर एका "अ-भारतीय सहकार्‍याचे" मला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, माझे या बाबतीत थोडेसे मत वाईट/कटु असल्याने मी आपले कोरडेपणाने "हॅप्पी न्यु ईअर" केले. त्यानंतर त्याने पुढचा प्रश्न "सेलीब्रेशन कसे केले ?" हा विचारला.बराच वेळ मनात दाबुन ठेवलेल्या भावनांचा बांध फुटल्याने मी त्याला " मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ व मनालाच लाज वाटली असल्याने मी व माझ्यासारख्या अनेक भारतीयांनी ह्यावर्षी सेलीब्रेशन केले नाही" अशी त्याला नविनच असलेली न्युज सांगितली. त्यावर त्याने आश्चर्य वाटुन स्वतः बेंगलोरमध्ये अनेक ठिकाणी मोठ्ठ्या प्रमाणावर सेलीब्रेशन केले असल्याचे दाखले दिले. मला खिन्न मनाने अजुन अनेक भारतीय "मॅच्युअर" झाले नसल्याचे कबुल करावे लागले. त्याने अनेक ठिकाणी "पोलीस बंदोबस्तात सेलीब्रेशन" झाल्याचे मला सांगितल्यावर मी त्याला "ह्या परिस्थीतीत सेलीब्रेशन करणे तुला पटते का ?" असे विचारले.अंगात कठोर देशप्रेमाचे व कडव्या राष्ट्रभक्तीचे देशप्रेम वहात असलेल्या त्या जर्मन माणसाने "नाही, हे अयोग्य आहे. आम्ही सेलीब्रेशन करण्यापेक्षा ज्यांनी हा मुंबईचा हल्ला केला त्यांच्या पुढच्या ५ पिढ्या कसलेही सेलीब्रेशन करण्यासाठी सक्षम राहणार नाहीत असे प्रयत्न करणार्‍या कार्यात स्वतःला वाहुन घेतले असते " असे उत्तर दिले.
आता तुम्हीच ठरवा ....!

पण नाही, आम्ही भारतीयांना अत्यंत धडाक्यात हा " ३१ डिसेंबरचा उत्सव (?)" साजरा केला, वॄत्तपत्रांनी पानेच्या पाने बातम्या दिल्या तर इलेक्ट्रोनीक प्रसारमाध्यमांबाबत बोलायची सोय राहिली नाही. तसेही टीव्हीवर व वृत्तपत्रात वाचल्याप्रमाणे हे सेलेब्रेशन करण्यात प्रामुख्याने " धनदांडगे, नवश्रीमंत उच्च मध्यमवर्ग , कॉलेज स्टुडंट , आयटी /एम एन सी मध्ये काम करणारे व इतर व्हाईट कॉलर वर्ग " ह्यांच्या धडाक्यातल्या सेलीब्रेशनने डोळे दिपले. कॉर्पोरेट जगताने व फिल्मसृष्टीनेसुद्धा नेहमीच्याच जोषात हे साजरे केले.मनात एक किडा आला, च्यायला अतिरेकी हल्ल्यानंतर ताजसमोर "मेणबत्त्यांची आरास " करणारा हाच वर्ग होता ना ? ह्यांनीच फॉरीन कल्चरप्रमाणे पुचाट मेणबत्या पेटवत निषेध करण्याच्या कार्यक्रमात स्वतःला मिरवुन घेतले होते ना ? मग ३१ ला हे सर्व धाब्यावर बसवुन ग्लासाला ग्लास भिडवत, आरोळ्या ठोकत , एकमेकांच्या बाहुपाशात पडुन "मुंबई रॉक्स , हॅप्पी न्यु ईअर " असा गजर केला ना ? क्षणात विसरलात का ते निरपराध २०० बळी व त्यांना वाचवण्यासाठी शहीद झालेले १४ पोलीस अधिकारी ? डिस्कोमधल्या चकचकाटात बळी पडलेल्यांच्या घरात लावलेल्या पणत्यांची सोईस्कर विसर सर्वांनाच पडली का ? का स्वतःला मिरवुन घेण्यापायी मेणबत्या पेटवुन नाटकी देशप्रेमाच्या बाता करणारे नंतर ४-४ पेग अप होऊन गाण्याच्या तालांवर थिरकत सेलीब्रेशन करत होते ?
२६ डिसेंबरला ताजसमोर मोठ्ठ्या तडफेने हल्ल्याला १ महिना पुर्ण झाला म्हणुन श्रद्धांजली वाहताना मिरववलेला व वर उल्लेखला वर्ग फक्त ५ दिवसांनी सर्व काही धाब्यावर बसवुन मोठ्ठ्या मोठ्ठ्या क्लबात / पबात थिरकताना पाहुन मनस्वी राग आला. झोपलेल्या जागे करता येईल हो पण स्वतःच्या पुढारलेपणाचे, कल्चर्डपणाचे सोंग घेऊन निर्ढावल्यापणाचे कातडे डोळ्यावर ओढुन झोपेचे सोंग घेणार्‍यांसमोर आम्ही हतबल आहोत.सर्वसारासार विचारबुद्धी गहाण ठेवल्यासारखेच वागतात हे लोक. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांच्या प्रत्येक कृतीचा मिडीयाकडुन उदोउदो होत असल्याने ह्यांना कसल्याही घटना ह्या मिरवण्यासाठीच आहेत असे वाटते, मग ते आतंकवादी हल्ला असो वा ३१ चे सेलीब्रेशन ...काय बोलणार आम्ही ह्यांना, सर्व काही "राम भरोसे" चालु आहे हे नक्की ...

शो मस्ट गो ऑन हे जरी खरे असले तरी शो असा "धडाक्यात" नसतो करायचा हे कधी कळणार ?
मरु दे च्यायला, कुणाला काय पडले आहे ?हा नवा सो कॉल्ड सुशीक्षित उच्च मध्यमवर्गीय धनदांडगा वर्ग अजुन "मॅच्युअर" नाही हेच खरे , ह्यांना देव लवकर सुबुद्धी देवो.

या संदर्भात ९/११ नंतरची अमेरिका आठवा. जवळपास महीनाभर वर्तमानासंदर्भात विनोद करणारे अनेक टॉक शोज आणि "सॅटरडे नाईट लाईव्ह" सारखे कार्यक्रम बंद होते. नंतर चालू झाल्यावर पण त्यात बराचसा संयम होता. न्यू यॉर्कचा तत्कालीन महापौर रुडी ज्युलियानी हा सर्वांना सांगत होता की तुम्ही आनंदात रहा, परत पहील्यासारखे ("नॉर्मल") वागा, आपण तसे वागलो नाही तर अतिरेक्यांना तेच हवे आहे. लोकांनी ते ऐकले पण उस्फुर्त संयामाने.
याचा अर्थ सुतकी चेहर्‍याने बसा असा नक्कीच नाही. आणि त्यावर स्वतःच्या हातात असलेले नागरी कर्तव्यपण न करता जरी तसे बसलात तरी त्याचा काय उपयोग? मात्र आजचे वागणे हे वर म्हणलेल्या "जन पळभर म्हणतील हाय हाय" असे म्हणायच्या ऐवजी मला, "रोज मरे त्याला कोण रडे?" असे म्हणावेसे वाटते. असल्या सातत्याने होणार्‍या हल्ल्यांनी आणि त्यात "स्पिरीट ऑफ मुंबई" वगैरे सारख्या "ब्रेनवॉशिंग" वाक्प्रयोगांनी माणसे कळत नकळत "मुर्दाड" झाली आहेत असे वाटू लागले आहे.

कसल्याही आपत्तीनंतर पुन्हा उभे राहणे हे गरजेचेच नव्हे जगण्यासाठी आवश्यकच, पण ह्या कैफात आपण नकळत मुर्दाड, भावनाहीन, लाचार, मुकाट सहन करण्याची सवय असलेले होत चाललेले आहोत हे कुणाच्या लक्षात येत नाही का ?४ दिवस जोराजोरात चर्चा करुन, तावातावात मते मांडुन, मेणबत्या वगैरे लाऊन आपले देशप्रेम दाखवणारे पुन्हा तसेच वागतात ह्याने दु:ख झाले.

आमचे मिसळपाव.कॉम वरचे स्नेही विकासराव यांनी एक मस्त कविता दिली.
नाझी जर्मनी संदर्भातील एका कवितेतील डोळे उघडणार्‍या ओळी परत एकदा सांगतो - आपण, २६ नोव्हेंबरला, यातील चौथ्या ओळीपाशी जाऊन पोचलो आहोत असे वाटते.

"In Germany, they came first for the Communists, And I didn't speak up because I wasn't a Communist;
And then they came for the trade unionists, And I didn't speak up because I wasn't a trade unionist;
And then they came for the Jews, And I didn't speak up because I wasn't a Jew;
And then . . . they came for me
. . . And by that time there was no one left to speak up."
- Martin Niemöller

बघा काही शिकायला जमले तर अशी आमची कळकळीची विनंती.

माझ्या माहितीप्रमाणे मुस्लीमधर्मीयांनी ह्या हल्ल्याचा निषेध म्हणुन त्याम्चा धार्मीक सण "ईद" अत्यंत साधेपणाने साजरी केली असताना ह्या "३१ डिसेंबरचे" असे धडाक्यात सेलीब्रेशन करण्यात कसला शहाणपणा ?

अवांतर :
आजा जाता आवर्जुन उल्लेख करावा वाटतो ते "सोलापुर" शहरातल्या ३१ डिसेंबरच्या घटनेचा.
शिवसेनेच्या पुढाकाराने का होईना पण सुमारे १०००० पेक्षा जास्त लोकांनी काहीही सेलीब्रेशन न करता रात्री चौकात जमुन पोलीस अधिक्षक श्री. भुषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली "दहशतवादाशी लढण्याची शपथ" घेतली.
प्रत्येक्षात लढाई कितपत शक्य ही बाब जरी अलहिदा असली तरी इच्छाशक्ती महत्वाची. आम्हाला याचे कौतुक वाटते.
ह्या घटनेने स्वतःच्या प्राणांची बाजी लाऊन लढणार्‍या सैनिकांना आपले दु:ख समजणारे, पाठिंबा देणारे व सदैव साथ देणारे कोणी आहे हा विश्वास मिळाला तरी उत्तम.

अतिअवांतर : मी ३१ डिसेंबर साधी पोळी, बटाट्याची भाजी, मटकी उसळ, भात-आमटी खाऊन साधेपणाने पुढे ढकलला, साजरा केला म्हणण्याचा निर्लज्जपणा माझ्याकडुन होणार नाही. असो.

1 comment:

Trevor Wanderlusting said...

This was a lovely bblog post