Saturday, May 2, 2009

रिक्षावाले, संप आणि आम्ही ...

आज सकाळी (जरासे अंमळ उशीरानेच) उठलो, नेहमीच्या सवयीनुसार आधी लॅपटॉप चालु करुन नेट चालु केले व काय चालु आहे ह्याची चाचपणी केली. सकाळ-सकाळ एका महत्वाच्या बातमीने आमचे लक्ष वेधुन घेतले(काळजी नको, अजुन कोण नवा चप्पल्/बुट फेकीचा नवा बकरा झाले नाही. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.) ते म्हणजे "दरकपातीच्या निषेधार्थ पुण्यातले २५००० रिक्षावाले संपावर ....".
हीच बातमी जवळपास सगळ्या पेपरमध्ये आणि सोशल वेबसाईटवर दिमाखात झळकत आहे. बरोबर आहे ना, अहो हा प्रश्न "पुण्याशी" निगडीत आहे ना, मग त्याला "वैश्विक प्रश्नाचा" दर्जा नको द्यायला ? आज ही बातमीकडे दुर्लक्ष केल्याची गुस्ताखी पुणेकरांनी माफ केली तर उद्या "पुण्यात ह्यावेळी कडाक्याची थंडी" ही बातमीही तुम्ही लेको मिडीयावाले छापणार नाही,नरकात जाल, कुठे फेडाल असली पापं ?
असो. तर मुद्दा पुणेकर हा नसुन पुण्यातल्या रिक्षावाल्यांचा संप असा आहे ...

बातमी वाचुन आमचे अंमळ मनोरंजन झाले व धक्काही बसला, रिक्षावाल्यांनी आम्हाला धक्का देण्याची ही दुसरी खेप. मागे एकदा आम्हाला बेंगलोरमध्ये रात्री ८.३० वाजता एक रिक्षावाला चक्क यायला तयार झाला, हिंदीतही व्यवस्थित बोलला, मीटर प्रमाणेच भाडे घतेल, उरलेले सुट्टे मात्र ३ रुपये परत केले व वर जाताना "गुड नाईट सर" असे म्हणाला तेव्हा असाच धक्का बसला होता, त्या धक्क्याने आम्ही एवढे अंतर्बाह्य हादरुन गेलो होतो की रिक्षातुन उतरल्यावर आजुबाजुच्या माणसांचा आम्ही फुल्ल टल्ली होऊन कसेबसे रिक्षातुन घरापर्यंत परत आलो आहोत व अजुन लटपट लटपट चालत आहोत असा (कन्नडमधुन) गैरसमज झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 बातमी सविस्तर वाचल्यावर आमच्या असे लक्षात आले की " रिक्षाच्या भाड्यामध्ये (पक्षी : दरामध्ये, मी रिक्षावाल्याला भाड्या असे म्हटलो नाही, तो शब्दच तसा आहे.) प्रति किमी मात्र १ रुपायाने कपात करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (बापरे, काय अवघड शब्द आहे, च्यायला असल्या जड सरकारी शब्दांविरुद्ध एकदा संप पुकारावा लागणार ) दिल्याने त्याच्या निषेधार्थ पुण्यातल्या सुमारे २५००० रिक्षावाल्यांनी (सुमारे म्हणजे अंदाजे, रिक्षाच्या "सुमार दर्जाशी" ह्याचा काही संबंध नाही) बेमुदत संप पुकारला आहे. "
मला नाही कळाले.
रिक्षावाल्यांचा संप म्हणजे काय व तो कसा जस्टिफाईड असु शकतो ?

रिक्षा ह्या व्यवसायावर पोट कुणाचे अवलंबुन आहे ? 
गरज कुणाला आहे ?
ह्याच चालीवर उद्या समजा भिकार्‍यांनी कमीत कमी मात्र १० रुपये भीक मिळावी म्हणुन, पुण्यातल्या दुकानातल्या ग्राहकांनी त्यांना दुकानात सन्मानजनक वागणुक मिळावी म्हणुन, दारुड्यांनी एका बाटलीबरोबर सोडा/थम्सप फ्री मिळावे म्हणुन ,अन्नछत्रातल्या यात्रेकरुंनी जेवणात ताटात तुपाची धार कमी पडते आहे म्हणुन्,भंगार गोळा करणार्‍यांनी भंगार वस्तुतल्या खालावत्या क्वालिटीचा निषेध म्हणुन संप पुकारावा हे जस्टिफाईड आहे का ?
तसा जर ह्यांना हक्क नसेल तर मनमानी करुन वागणार्‍या, अडवणुक करणार्‍या,ग्राहकांना कस्पटासमान वागणुक देऊन त्यांच्याशी उद्धट व्यवहार करणार्‍या, मनाला येईल ते भाडे मागणार्‍या, ग्राहकाची गैरसोय न पाहता एखाद्या रुटवरचे भाडे नाकारणार्‍या ह्या डोईजड रिक्षावाल्यांना "मात्र १ रुपये/किमी" च्या दरकपातीसाठी संप करणे बरोबर वाटते का ?

रिक्षा पंचायतीच्या पदाधिकार्‍यांच्या मते ... जाऊ दे, आधी ह्या "पंचायत" वाल्यांना पाहु. हे लोक नक्की कोण ? भाषणबाजी आणि आडवणुक सोडली तर ह्यांचा रिक्षा ह्या व्यवसायाशी संबंध काय ? हे नक्की काय करतात ? ह्यांचा पोटापाण्याचा धंदा हा रिक्षा अथवा तत्सम आहे का ? वर्षातुन एकदा चौकात भलामोठ्ठा मंडप टाकुन सत्यनारायण घालणे व त्यावेळी रिक्षांची मिरवणुक काढणे ह्याव्यतिरीक्त ही पंचायत रिक्षावाल्यांसाठी नक्की काय करते ? एखाद्या पक्षाच्या मंचावर ह्यांच्या नेत्यांनी जाणे व रिक्षावाल्यांनी त्या पक्षाचे झेंडे रिक्षांवर लाऊन मग्रुरी करत गुंडागर्दी करणे हे कलम रिक्षा पंचायतीच्या अधिकॄत घटनेत लिखीत स्वरुपात आहे का ? नसल्यास मग पंचायत अशा समाजविरोधी तत्वांच्या विरोधात का संप करत नाही ?
जसे १ रुपायाने भाडे कमी होणे हा मुद्दा रिक्षावाल्यांसाठी महत्वाचा ठरतो तसेच रिक्षाच्या ग्राहकांसाठी " सन्मानजनक वागणुक, शुद्ध व सज्जन आचरण असणारे व कमीत कमी उर्मट आणि शिव्यागाळी न करणारे रिक्षावाले, मीटरप्रमाणे भाडे, सर्व मार्गांवर हव्या त्या वेळी सेवा , एखाद्या विशिष्ठ मार्गावर सेवा न नाकारणे, रिक्षामध्ये मद्यपान धुम्रपान आणि इतर व्यसने न करणे, रिक्षांचा दर्जा सुसह्य राखणे" ह्याविषयी पंचायतीकडे काही कार्यक्रम आहेत का ? का ह्या गोष्टी त्यांच्या "रिक्षाकुलाला बौलु लागेल" अशा कॅटॅगिरीत येतात ?

मुळात ५ रुपयाने डिसेल कमी झाले असताना १रु./किमी दरकपात कशी अन्यायकारक ठरते हेच मला समजेना, हे लोक आता सुटे भाग व ऑईलची दरवाढ, दंडाच्या रकमेत वाढ वगैरे सांगत आहेत. योगायोगाने मी ह्याच क्षेत्रातला असल्याने (१ मिनीट, मी रिक्षावाला नाही, वाहननिर्मीती उद्योगातला म्हणत आहे) ह्या गोष्टींची महागाई किती वाढली व ह्याचा दरसाल कितपत खर्च येतो ह्याची मला व्यवस्थित कल्पना आहे. हे सरळसरळ वडाची साल पिंपळाला लावण्यासारखे आहे. हां, इथे जर सर्व जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किमतींचा विचार केला तर आपला रिक्षावाल्यांना सॉफ्ट कॉर्नर असु शकतो.
पण हे सगळे केव्हा ?
जेव्हा रिक्षावाले शुद्ध आणि सरळ "मिटरप्रमाणे" भाडे आकारतील तेव्हा ....
आयला दर भाड्यामागे १०-१५ रुपये जास्त मागायचे, मिटर फास्ट करुन ठेवायचे, डिसेलच्या जागी रॉकेल मिश्रीत इंधन वापरायचे आणि वरुन "१ रुपया दरकपातीविषयी" बोंबाबोंब करायची हा कुठला न्याय ?

पुण्यतल्या सो कॉल्ड २५००० रिक्षांपैकी किती रिक्षा मात्र "डिसेल्"वर चालतात ? कारण आम्ही "सी एन जी"वर चालणार्‍या रिक्षा रस्त्यावर धावत असल्याच्या बातम्या वाचतो. रिक्षावाल्यांच्या व्याख्येनुसार शहराच्या आउटसाईडला ( म्हणजे अख्ख्या पुण्यात ) मिटरप्रमाणे भाडे चालत नाही, मग हा १रु/किमी दर येतोच कुठे ? जर ६-आसनी रिक्षावाले ह्यात सामिल असतील तर त्यांनी कॄपया मिटरवर चालणारी ६-आसनी रिक्षा दाखवावी, आम्ही स्वखर्चाने त्यांचा "महावस्त्र(पक्षी:शाल) व श्रीफळ" देऊन सत्कार करु व मिटरपेक्षा १० रुपये जास्त बक्षिशी देऊ.किती रिक्षांचे मिटर योग्य मापकाप्रमाणे रिडिंग दाखवातात ? कारण आम्ही शि. नगर ते स्वारगेट ह्या मार्गावर "२२ रुपये ते ४० रुपये ह्याप्रमाणे कितीही मिटरप्रमाणे भाडे" दिल्याचे आठवते.
मग असे असताना १रु/किमी दरकपातीची एवढी बोंबाबोंब करुन पब्लिकला वेठीस का धरत आहेत हे रिक्षावाले ?
प्रामाणीकपणे कष्ट करुन जगणारे रिक्षावाले ह्यात भरडले जातात हे मान्य आहे पण तरीसुद्धा त्यांना मिळणारा पैसा हा तितकासा अन्यायकारक नाही हे सत्य आहे ...

मग हा एवढा माज आणि मस्ती कशासाठी ???
त्याचे कसे आहे की आज्-उद्या सुट्टी आहे म्हणुन आपण घरी बसुन आरामात "माजले आहेत हे रिक्षावाले भ**, एकेकाला चाबकाने फोडुन काढायला हवे, हवे तर घरी बसा म्हणावं, गेले उडतं" अशा आरामात प्रतिक्रिया देऊ, सध्या कसे सगळे गारगार आहे.
पण सोमवारी जेव्हा रणरणत्या उन्हात सकाळी हापीसाला जाताना गच्च भरलेली बस ३ वेळा सोडावी लागेल तेव्हा साहेब तुम्हाला "ए भैय्या, हिंजवडी चलेगा क्या ? " असे रिक्षावाल्यालाच विनवावे लागेल हे सत्य आहे. कितीही नाकारले तरी पुण्यातले "सार्वजनिक परिवहन" हे अत्यंत भिकार आहे हे सत्य आहे, ते तुम्हालाही माहित आहे आणि रिक्षावाल्यांनाही. तुम्ही त्याचा दर्जा सहन करत फार वेळ प्रवास करु शकणार नाही हे रिक्षावाल्यांना व्यवस्थित माहित असल्याने त्यांचा हा माज आहे ...

असो, त्यालाही पर्याय नाही..
एवढीच अपेक्षा करु की ह्याची पुढची पायरी ही रिक्षावाल्यांच्या आंदोलनात न होऊन दगडफेक, जाळपोळ, प्रवाश्यांची अडवणुक वगैरे प्रकारात होऊ नये ...
नुकत्याच निवडणुका झाल्याने अशा गोष्टी अशक्य नाहीत अशी शक्यता वाटते ...

"जे जे होईल ते पहावे, न्हेले रिक्षावाले तरच हापीशी जावे ..."

बाय द वे, रिक्षावाले हा लेख वाचण्याची शक्यता नाही ना ? नायतर पुढच्या पुणे वारीत मला रिक्षावाल्यांच्या माझ्यावर संभाव्य बहिष्कारामुळे पदयात्रा करण्याची पाळी येईल. तसे असेल तर सांगा, लगेच नाव बदलुन "रिक्षावाल्यांच्या समर्थनार्थ " अजुन एक खणखणीत लेख लिहायला बसतो. काय करणार बाबा, सवाल पुणे मे प्रवास का है...

* पुर्वप्रकाशित : मिसळपाव.कॉम ... 
ह्या लेखाला तिथे आलेल्या प्रतिक्रिया आपण "इथे" पाहु शकता ...

Wednesday, April 8, 2009

देवांचे भांडण आणि "आय पी एल" ...

सध्या आम्ही विवीध मराठी संकेतस्थळांवर लिहताना एक स्वाक्षरी करतो, त्याचा तजुर्मा "एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो" असा आहे. तात्पर्य काय की माणसाने कुठल्याही "सजिव" व्यक्तीला देव मानु नये, कारण पुढेमागे ह्या देवाने काही चुका अगर अपराध केला मग त्याच्यावर होणार्‍या चौफेर टिकेन आपणही दुखावलो जातो व शिवाय आपलाही वैचारीक गोंधळ होतो. सबब "कुणालाच देव मानु नये" असे आम्ही बर्‍याच वेळा ठरवतो ...पण आमच्या अनेक पालथ्या धंद्यापैकी एक म्हणजे उठसुठ कुणालातरी "देव मानणे" हा आहे ...
आता हा विषय निघायचे कारण म्हणजे सध्या आम्हीच देव मानलेल्या २ देवांची भांडणे. सध्या "शाहरुख खान" आणि "सुनील गावसकर (लोकांनी आडनावाचे एवढी विडंबने केली आहेत की गावसकरही गोंधळात पडणार नक्की)" ह्या आमच्या २ देवांचा वाद गाजतो आहे. पहिल्यांदा ही २ नावे एकत्र वाचुन आम्हाला वाटले की स्वतः सुनील गावसकर हा (रोहन गावसकरला काही केल्या क्रिकेट जमत नसल्याने जसे थोरल्या बच्चननी धाकल्या बच्चनचे करियर सावरायला जसा ऍक्टिव्ह सहभाग घेतला तसा) "कोलकता नाईट रायडर्स" कडुन खेळणार की काय ? पण तसे नव्हते, त्याचे काय झाले की गावसकरांनी जॉन बुकाननच्या ( शाहरुखच्या टीमचा कोच) निर्णयांविरुद्ध आपल्या लेखणीतुन तोफ डागली. कारण काय तर गावसकरचे क्रिकेटप्रेम. पण विषय इथे संपला नाही कारण शाहरुखने एक पत्रकारपरिषद घेऊन गावसकरांविरुद्ध "त्यांना काय टी-२० क्रिकेट कळते ? ते कधी खेळले नाहीत तर मग त्यांनी बोलणे योग्य नाही. हवे तर स्वतःचा संघ बनवुन (पक्षी पैसे मोजुन) काय हवे ते करा" असे अकलेचे तारे तोडले ...मुद्दा असा की त्यांच्या भांडणात त्यांचे काहीही जात नाही मात्र हे दोघेही आम्हाला "देवासमान" असल्याने कुणाची बाजु घेऊन लिहावे हा प्रश्न आहेच.


(शाहरुखच्या मते) शाहरुखचे असे म्हणणे आहे की गावसकर टेन्टी-टेन्टी क्रिकेट खेळले आहेत का ? मग ते त्याच्या डावपेचाबद्दल का बोलतात ? शाहरुखची गोष्ट वेगळी आहे. लोक कसे जाहीरपणे "गुप्तदान" देतात तसा तो आयुष्यभर जाहीरपणे "गुप्त २०-२० क्रिकेट" खेळत आला आहे. त्याच्या मनात आले तर आजही तो "२०-२० चा बादशहा" म्हणुन स्वतःला जाहीर करु शकतो व शिवाय भारताच्या टीमचा कोच म्हणुन भारताला विश्वकप जिंकुन दिला असा चित्रपटही तो काढु शकतो. गरज पडल्यास त्यात तो स्वतः शर्ट काढुन भर मैदानात पीचवर "कोरबो कोरबो कोरबो रे, जितबो जितबो जितबो रे" सारखे आयटम्स सॉन्ग काढुन त्यात विंचु डसल्यासारखे बेफाट नाचु शकतो. त्याला कोण आडवणार ?

(शाहरुखच्या मते) गावसकरांनी त्या टेस्टमध्ये काय ज्या असतील त्या १०००० रन्सा काढुन काय तीर मारला का ? मनात आणले तर शाहरुख प्रत्येक देशात १०००० रन करणारे प्लेयर पगार देऊन नोकरीला ठेऊ शकतो. त्यांनी परदेशात "शतके" वगैरे काढली पण त्यात काय मोठेसे ? शाहरुखही परदेशात "स्टेज शो" करत असतोच की, उलट क्रिकेटच्या १० पट जास्त गर्दी व पैसा हे स्टेज शोज खेचतात.गावसकर हे स्वतः मैदानाच्या गॅलरीत उभारुन माकडउड्या मारु शकतात का ? ते सिनेसॄष्टीतल्या "पडेल नटांचा/नट्यांचा जथ्था" घेऊन ग्राउंडवर "पेज-थ्री" पार्टी करु शकतात का ? आपल्या संघाने केलेल्या संधीच्या मातीचे समर्थन ते चाचरत पाचकळ विनोद करुन करु शकतात का ?ते करोडो रुपये देऊन विकत घेतलेले खेळाडु गल्लीतल्या पेक्षा टुकार खेळत असताना आनंदाने उड्या मारु शकतात का ? ते क्रिकेटचा फायदा घेऊन आपल्या चित्रपटांचे प्रमोशन व जमल्यास लगेहाथ प्रतिस्पर्ध्यांची (बरोबर ओळखलेत, बच्चन आणि आमीर शिवाय आहेच कोण ?) " टांग ओढु शकतात का ?ह्या प्रश्नांची उत्तरे "नाही" अशी असतील तर मग "गावसकरांना २०-२० क्रिकेट कळते" असे कसे म्हणता येईल ?


मुळात गावसकरांची तर काय चुक. हा सद्गॄहस्थ बिचारा आयुष्यभर प्रामाणेकपणे क्रिकेट खेळला, देश्-विदेशात हजारो धावांची रास रचली. त्यावेळी कसलीही शिरस्त्राणे नसताना तोफखान्यासारख्या वेगवान गोलंदाजीसमोर टिच्चुन उभा राहिला. अनेकवेळा एकहाती भारताची क्रिकेटमधली अब्रु संभाळली. त्यानंतर त्यांनी क्रिकेट ऍकॅडमी वगैरे काढुन सेवा करण्याचा प्रयत्न केला. आजही ते एक अभ्यासु आणि विचारशील समिक्षक म्हणुन जमेल तसा क्रिकेटच्या प्रगतीला हातभार लावायचा प्रयत्न करतात ...


मग चुक झाली कुठे ?

उत्तर आहे की त्यांनी २०-२० व ते ही "आयपीएल" सारखी सर्कस ह्यात लक्ष घालले.

गावसकरसर इथेच तुम्ही चुकलात ? ह्या असल्या जत्रेतल्या तमाशावर तुमच्यासारख्या महान व्यक्तीने बोलवे हेच चुकले ? मनमोहनसिंग कधी तासगावच्या पतसंस्थेच्या अपहाराबद्दल बोलतात का ? सर अब्दुल कलाम कधी तालुकापातळीवरच्या विज्ञानस्पर्धेच्या निकालात झालेल्या वशिलेबाजीविषयी आपले मत मांडतात का ? लता मंगेशकर कधी "चिंचपोकळीची गानकोकीळा" ह्या सोसायटीच्या कार्यक्रमावर टिका करतात का ? संजीव कपुर कधी ताथवडे खुर्द गावातल्या जत्रेच्या वेळी भाजीत पडलेल्या जास्तीच्या मिठाबद्दल बोलतो का ? ओबामा कधी आझमगढच्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांतील गैरप्रकाराचा निषेध करतात का ?नाही ना ? मग सर आपण कशाला असल्या "तमाशाकडे" लक्ष दिलेत ? जाऊ द्यात ना, काय करायचे ते करु द्यात ना त्यांना ...

सिंपली ईत्स नन ऑफ युवर बिसनेस ...!!!


मुळात हे "इंडियन प्रिमीयर लीग" हे डोईजड झालेल प्रकरण आहे. पॅकर सर्कसने जसे क्रिकेट बाजारु केले होते ही त्याची पुढची पायरी आहे. आता तर हे लोक ह्या देशातल्या "निवडणुकांना" ही जुमानायला तयार नव्हते, मग त्याची नक्की "लायकी" आपण काय समजायची? पैशाच्या राशी ओतुन देशोदेशीची क्रिकेटपटु इकडे आणलेत , आता त्यांच्या टकरा लावायच्या अगदी माजलेल्या वळुंच्या चालीवर, त्याची प्रचंड जाहिरात करुन ही माती सोन्याच्या भावात विकायची आणि आपल्या तुंबड्या भरुन घ्यायच्या असा हा सरळसरळ धंदा आहे. ह्यात इतके "सिरीअसली" घेण्यासारखे काही नाही. वाटले तर फारफार तर टीव्हीवर खातखात हा तमाशा बघण्याचा लायकीचा आहे ...मुळात आपण क्रिकेट बघतो का कारण त्यात खेळाडु देशप्रेमाने भारुन वगैरे खुन्नस लाऊन खेळतात असा आपला एक सर्वसाधारण समज आहे (क्रोनिये आणि अझर कंपनीने आपल्याला कधीच वेड्यात काढले आहे हा भाग वेगळा, आता तर अझर निवडणुक लढवतो आहे, म्हणजे तो क्रिडामंत्री होऊन खेळाडुंनी कसे देशासाठी खेळावे ह्यावर बौद्धिके देणार तर. चालायचेच). पण इथे "देश" आहेच कुठे ? शहरांची नावे गुंफुन ह्या देशातल्या धनदांडग्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विकत घेतलेले संघ आहेत हे. मग त्याच्यासाठी सर तुम्ही कशाला स्वतःला त्रास करुन घेताय ? खेळाडुंचे तरी काय "जिकडे खोबरे तिकडे चांगभले" असे असल्याने त्यांना कोलकल्त्याकडुन खेळले काय किंवा मुंब्राकडुन खेळले काय, काहीही फरक पडत नाही ? पुढेमागे समजा भर मैदानातच एखाद्या फलंदाजाला नोटांचे पुडके दिले तर तो बॅट फेकुन फिल्डींगला उभा राहणार नाही ह्याची गँरेंटी पुढे देणे शक्य नाही ? सगळा पैशाचा बाजार हा. त्यात अजुन लोकप्रियता कमी पडते की काय असे वाटल्याने "हरभजन" चक्क "श्रीशांतच्या" मस्तपैकी श्रीमुखात भडकावुन देतो व ह्याची व्यवस्थित जाहिरात होऊन टकरांना अजुन जास्त लोक येतात ...


आता राहता विषय राहिला ह्या संघांच्या मालकांचा.

ते कोण आहेत ?ते आहेत पक्के व्यवसायीक. जरा ह्यांची नावे तर पहा विजय मल्ल्या, शाहरुख खान, अंबानी, शिल्पा शेट्टी, नेस वाडीया + प्रिती झिंटा ...

ह्यांनी खणखणीत पैसे मोजुन संघ विकत घेतले आहेत, त्यामुळे ह्यांना वाटेल ते ते करणार. आहे कुणाची ह्यांना आडवायची हिंमत आणि नैतीक जाणीव ?

समजा उद्या विजय मल्ल्याला वाटले की द्रविडमध्ये काय दम नाही म्हनुन त्याने देवेगौडानां कर्णधार करुन सलामीला उतरवले आणि त्यांच्या जागेवर द्रविडला डुलक्या घ्यायला लावल्या तर मल्ल्यांना कोण रोखणार ?

समजा प्रिती अगर शिल्पाला आपल्या मैत्रिणींचा संघ खेळावायची इच्छा झाली तर शेन वॉर्नला शिल्पाच्या मैत्रिणींशे गुलुगुलु गप्पा माराव्या लागतील (तसा ह्याचा अनुभव ह्यात "दांडगा" आहे बरं) आणि युवराज ह्यांचे फोटो काढत हिंडेल. आहे कोणाची टाप ह्यांना जाब विचारण्याची ?

उद्या अंबानीला वाटले की आपल्या टीमने स्पोर्ट्स वेअर न घालता "सफारी" घालुन क्रिकेट खेळावे तर ह्यांना खेळावे लागेल. हरभजनला सफारी घालुन बॉलिंग करताना पहायची तुमची हिम्मत आहे का ?

समजा शाहरुखने गांगुलीला "नॉन प्लेयिंग कॅप्टन" केले आणि मैदानात फरहा खान, अर्जुन रामपाल, करन जोहर,करिना कपुर, दिपीका पदुकोणे वगैरेंची तीम मैदानात उतरवली आणि मॅच चालु असताना मध्येच करिना आणि समोरच्या तीमची प्रिती ह्यांनी भर मैदानात "झिम्मा-फुगडी" खेळायला सुरु केले तर त्यांना विचारणारे आपण कोण ?

समजा कुणी "मंदिरा बेदीला" करारबद्ध केले आणि ती तिची जगप्रसिद्ध "चोळी ( की जी प्रेक्षकांचे अंग अंग जाळी )" घालुन समजा "अंपायर" म्हणुन उभी राहिली तर का म्हणुन विचारणारे आपण कोण ?
थोडक्यात, ह्याला सिरीअसली क्रिकेटचा दर्जा दिला जावा का ?

नसल्यास, गावसकर सर तुम्ही कशाला असल्या फालतु गोष्टीत लक्ष घालता ?

सिंपली इट्स नन ऑफ युवर बिसीनेस. यु आर नॉट कर्न्सर्न्ड टु इट ऍट ऑल ...!!!


त्यामुळे शाहरुखला ४ कर्णधार खेळवु दे, नॉन प्लेयिंग कॅप्टन करु देत, गांगुलीला स्टंम्प म्हणुन उभे करु देत अथवा स्वतःचा कर्णधार होऊन मैदानात झेंडु फुटल्यागत नाचु देत. शेवटी हा "धंदा" आहे व तो कसा करायचा हे शाहरुख नक्की जाणतो व आपल्याला हे न लक्षात आल्याने व आपण क्रिकेटच्या प्रेमापोटी बोलत असल्याने असे झोल झाले आहेत ...

असो, तुर्तास; पप्पु ... सॉरी सॉरी .. किंग खान कान्ट रॉन्ग साला ...!!!

Monday, April 6, 2009

आमची गध्धेपंचविशी आणि थोडी बाष्कळ बडबड ...

परवाच म्हणजेच मागच्याच आठवड्यात (च्यायला, बघता बघता ८ दिवस झाले. अख्खे आयुष्य असेच झटपट निघुन जाणार असे दिसतेय. जाऊ देत, आयुष्यात खंत तरी किती गोष्टींची बाळगायची) बर्‍यापैकी उत्साहात आणि आनंदात आमचा वाढदिवस "घडुन" गेला. एकदाचे आम्ही २५ वर्षाचे झालो. (आयला वय जाहीर केल्याने ब्लॉगचे वाचक कमी होणार नाहीत ना ? "छोटा डॉन" हा "स्त्री आयडी" वाटत नसल्याने तशी शक्यता कमीच आहे म्हणा. असो). ह्यालाच आम्ही "गध्धेपंचविशीत आलो" असेही म्हणता येईल. आता इथे "घडुन जाणे" ह्या क्रियापदाला एक नैतिक अधिष्ठान (म्हणजे काय कोण जाणे, पण एकदाचा हा शब्द वापरला, द्या टाळी) आहे. त्याचे कसे आहे की आपले वाढते वय लपवणे हा (प्रामुख्याने) स्त्रियांचा व (आजकाल शाहरुखने फेअर & हँडसम क्रीमची ऍड केल्यापासुन) पुरुषांचासुद्धा (आयुष्यातल्या अनेक पालथ्या धंद्यापैकी एक प्रमुख) धंदा आहे. त्यामुळे वाढत्या वयाची आठवण करुन देणारा "वाढदिवस" हा बर्‍याच जणांना नकोसा झाला आहे असे आमचे विचारांती, अनुभवांती, व्यासंगांती मत झाले आहे (हा, मात्र ह्यादिवशी अभक्ष्यभक्षण व अपेयपेयपान ह्याला प्रत्यवाय नसावा). तर मुद्दा असा की वाढदिवस साजरा करणारे आपण कोणी नसतो, तो सत्यनारायणाच्या पुजेसारखा घडुन जातो. असो.

वाढदिवस नेहमीप्रमाणे चांगला थाटामाटात साजरा झाला (ह्याचा आदल्या दिवशी आमच्या गावाजवळ सापडलेल्या हजारो लीटर अवैध देशी-विदेशी मद्याच्या साठ्याशी काहीही संबंध नाही). सर्व काही सोपस्कार पुर्ण करुन आम्ही दुपारी (जेवणामुळेच्या)अंमळ सुस्तीत "चिंता करितो विश्वाची "असा चेहरा करुन बसलो होतो (ह्यालाच काही दुष्ट लोक "असा काय शुंभासारखा चेहरा करुन बसला आहेस ?" म्हणुन हिणवत होती, चालायचेच). मनात (भलत्यासलत्या) विचारांचा ( की अविचारांचा ? ) कल्लोळ उडाला होता (कदाचित ह्या "कल्लोळाचा" आवाज हा सामान्य जनांना "घोरण्यासदॄष्य" वाटत असल्याने मातोश्रींनी आम्हाला "घोरु नकोस, शांतपणे झोप" असा आमचा मुड घालवणारा सल्ला दिला असावा. चालायचेच) . बरेच काही मनात येत होते आणि विचारांचा प्रवाह हा धीरगंभीर नाद करीत आमच्याच मस्तकावर कोसळत होता. आम्ही एका निर्वाणीच्या क्षणी लॅपटॉप घेऊन ह्या उदात्त विचारांच्या निर्मळ झर्‍याला लेखणीवाटे वाट करुन द्यायचा विचार केला. पण ह्या कॄतीचा "पुर्वेतिहास" हा तेवढा प्रेरणादायी नसल्याने आम्ही हा बेत त्वरित डाव्यांच्या/मायावतींच्या पाठिंब्यासारखा मागे घेतला ( आता नको ती आठवण, मागे एकदा आम्ही आमचा ब्लॉग आमच्या आप्तांना वाचायला दिल्यावर त्यांच्या कुजकट कमेंट्समुळे आम्हाला २ दिवस रुमालात तोंड लपवुन फिरायची नामुष्की आली होती. असो). आम्ही ह्या कानाची त्या कानाला खबर न देता आमची "लेखनाची इच्छा" ही पवारसाहेबांच्या मनातल्या पंतप्रधानपदाच्या इच्छेसारखी मनात दाबुन ठेवली व वरकर्णी काही घडलेच नाही असा (कलमाडींसारखा) चेहरा करुन बसलो ....

आता हापीसात ( कुणी नसल्याने व कामही तितकेसे नसल्याने ) भयंकर रिकामा वेळ सापडल्याने आम्ही आम्ही आमचे असंबद्ध आणि बाष्कळ विचार कागदावर उतरवायचे ठरवले. प्रामुख्याने आम्ही "गध्धेपंचविशी" ह्या आयुष्यातल्या महत्वाच्या कालखंडाच्या सुलभतेच्या दॄष्टीने व अर्थात मानवतेच्या रक्षणाच्या हेतुने काही विचार मांडत आहोत. "तरुण हेच देश घडवत असतात " हे सर्वमान्य असल्याने सरकारनेसुद्धा ह्या बाबींचे विवीध पैलु तपासुन योग्य तो निर्णय घ्यावा असा आमचा आग्रह आहे ....

१. "गध्धेपंचविशीतले" तरुण हे आयुष्यातल्या महत्वाच्या कालखंडातुन मार्गक्रमण करत असल्याने त्यांच्या मार्गात फुल ना फुलाची पाकळी म्हणुन त्यांचे कामाचे तास त्वरित "अर्धे" केले जावेत तसेच विकांत हा ३ दिवसाचा करावा ...
हा महत्वाचा कालखंड आस्थापनाचे भविष्य घडवण्यात जात असल्याने तरुणाला स्वतःला घडवायची संधी मिळत नाही व पर्यायाने देशाच्या घडवणुकीवर अनिष्ट परिणाम होतो.असे "न घडलेले" तरुण आपल्या देशाचे भविष्य काय "घंटा घडवणार" ?

२. सध्या महागाई ही (पवारसाहेबांच्या गोंधळात टाकणार्‍या विधानांच्या वेगापेक्षा डब्बल) वेगाने वाढत असल्याने आजकाल "संवाद माध्यमं" महाग झाली आहेत, सबब "गध्धेपंचविशीतल्या" तरुणांना (ते काम करत असतील तर) आस्थापनातल्या फोनचा अमर्याद वापर करण्याची परवानगी असावी. मोबाईल फोन्सचे बिल प्रतिमास हे नाममात्र (म्हणजे मुंबई महानगरपालिका मुंबईतली मौक्याची जागा ज्या कवडीमोल दराने बिल्डर्स आणि कंपन्यांच्या घशात घालते त्या) दराने आकारावे ...
आस्थापनात फोनवरच्या वापराला आक्षेप घेतला तर त्याची "मानवी हक्काची पायमल्ली" ह्या गंभीर आरोपालाखाली चौकशी व्हावी (हवे तर ह्या आंदोलनासाठी सेटलवाडबाईंना त्या अजुन "पंचविशीत आहेत" असे सरकारी प्रमाणपत्र उपलब्ध केले जावे.)

३. स्वत:ला घडवण्यासाठी रात्री/अपरात्री चिंतन करीत रस्त्यावर हिंडणार्‍या "गध्धेपंचविशीतल्या तरुणांना" अडवुन त्यांना अपमानास्पद, मानहानीकारक व गंभीर प्रश्न करणार्‍या पोलीसांची बदली ही गडचिरोली/चंद्रपुरला करावी अथवा त्यांना भारताच्या सिमेवर घुसखोरांना "अडवण्यासाठी" पाठवुन द्यावे ...

४. उठसुठ "आजची बिघडलेली तरुणाई, ढासळती मुल्ये, विस्मॄतीत गेलेले संस्कार" ह्यावर तरुणांना बौद्धीके देणार्‍यांना "रासुका"खाली अटक करुन त्यांची रवानगी तुरुंगात केली जावी.

५. चॅनेल व्ही, एम टीव्ही , फॅशन टीव्ही अथवा तत्सम तरुण घडवण्यास मदत करणार्‍या चॅनेल्सला "राष्ट्रीय चॅनेल्स्"चा दर्जा दिला जावा, त्यावर अधिक प्रबोधक ( का उन्मादक ) कार्यक्रम कसे येतील ह्यासाठी एक "उच्चस्तरीय ( की हुच्चस्तरीय ) कमिटी" नेमली जावी ...

६. विवीध शितपेये अथवा मादक द्रव्ये ह्यांना त्वरित "शासकीय दुध योजनेच्या" समकक्ष आणुन त्यावर सरकारी अनुदान दिले जावे व ठिकठिकाणी ह्यांचे वाटप सुलभ व्हावे ह्यासाठी "सरकारमान्य विक्री केंद्रे" काढावीत ...
आजच्या घडीला उपलब्ध असलेल्या विवीक्षित "सरकारमान्य क्षक्षक्ष विक्री" केंद्राचा दर्जा हा (काँग्रेसपक्षापेक्षा) खालवला असल्याने त्याच्याकडे त्वरित लक्ष दिले जावे ...

७. बर्गर, पिझ्झा, पास्ता, चायनीज ह्यां जंकफुड्सना "राष्ट्रीय खाद्यान्नाचा" दर्जा दिला जावा ...स्वस्त "झुणका-भाकर केंद्राच्या" धर्तीवर सवलतीत वरील पदार्थ विकणार्‍या वस्तुंची ठिकठिकाणी केंद्रे खोलावीत ...

८. सार्वजनिक स्थळी "प्रेमलाप" करण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाच्या कॄतीला "ऐतिहासीक घोडचुक" असल्याचा दर्जा दिला जावा व ह्याचे प्रायश्चित्त म्हणुन ठिकठिकाणी "प्रेमविहार उद्याने" बांधली जावीत. चौपाटी, पुण्यातला झेड ब्रीज सारख्या स्थळांना "कपल्स ओन्ली" म्हणुन आरक्षित केले जावे ...

९. "टाईम्स ऑफ इंडिया" ह्या अग्रगण्य वॄत्तपत्राने त्यांच्या प्रमुख आवॄत्तीचा आकार ३२ पानांवरुन ४ पानी करावा व त्या बदल्यात "पुणे/मुंबई/बेंगलोर टाईम्स" ह्या आवॄत्यांच्या पानांची संख्या ४/६ वरुन ३६/४० वर न्हेली जावी ....

१०. तरुणांच्या फॅशनेलबल, झकपक, मॉड अशा असलेल्या वरंतु फाटक्या, ढिगळे लावलेल्या अशा अल्पवस्त्रांवर उर्फ शॉर्ट्सवर नाके मुरडणार्‍यांना "तालिबानी" ठरवुन त्यांची रवानगी अमेरिकेच्या "ग्वाटेनामोच्या तुरुंगात" केली जावी ...

११. आजकाल पळुन जाऊन लग्न करणे ही बर्‍याच जणांची सामाजीक व मानसीक जबाबदारी बनल्याचे व ह्यातुन त्यांना बराच सामाजीक, मानसीक व काही अंशी शारिरीक त्रास सहन करावा लागतो असे आमच्या लक्षात आले आहे.म्हणुन आम्ही अशा जोडप्यांना किमान "पद्मश्री" हा सन्मा दिला जावा व त्यांना त्रास देणार्‍यांना "रासुका" लावावा ही सुधारणा सुचवत आहोत ...
(अक्षयकुमारला जर पद्मश्री मिळत असेल आणि वरुण गांधीला जर रासुका लागत असेल तर उपरोक्त गोष्टी अशक्य नाहीत असे आमचे मत आहे.)

१२. पॅरीस, ऍमस्टरडॅम, लंटन, काश्मिर, कुलु मनाली, उटी यासारखी स्थाने "केवळ तरुणांसाठी" म्हणुन आरक्षित केली जावीत. इथे तरुणांच्या "सवलतीत" अथवा जमल्यास "सरकारी खर्चाने फुकटात" सहली आयोजीत कराव्यात ...
ह्यासाठीचा आवश्यक असणारा पैसा हा अनेक मंत्रीमहोदयांच्या सर्दी-पडश्याचा इलाज हा "न्युयॉर्कला सर्जनकडुन" न करता "मौजे पिंपळवाडीच्या वैंदुकडुन" केला तर सहज उभा रहाण्यासारखा आहे ...

१३. बॉली/हॉलीवुडमध्ये वयाच्या २७ व्या वर्षानंतर पुरुषांना व २५ नंतर स्त्रियांना सक्तीची निवृत्ती द्यावी. नव्या "दमाच्या" पिढीला संधी ही मिळायलाच हवी.सिनेमागॄहात जमल्यास सर्व सीट्स ह्या "कॉर्नर सीट्स"मध्ये बदलुन घ्याव्यात, हवी असल्यास त्यात आस्थापनात असतात तशी क्युबिकल्स उभारण्यास प्रत्यवाय नसावा ...
तिकीटांची "विक्री" न करता त्यांना "स्वागतमुल्य" ठेवावे, ज्याची जेवढी इच्छा आहे तेवढे दान तो टाकेल ...
(तसेही पैसे देऊन पहाण्याचे लायकीचे चित्रपट निघतात कुठे ? शिवाय पैसे देऊन थेट्रात खास शिन्माच पहातो कोण ? )
*********************

तुर्तास इतकेच, बाकी आठवेल तसे.
गध्धेपंचविशीतल्या तरुणाईचा जय हो ....!!!

Tuesday, March 10, 2009

उपवासाची साबुदाण्याची बॅचलर थालिपीठे ... उर्फ डॉन्याचा सल्ला.

ही आमची पाककॄती आम्हाला महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी अनेकविध पदार्थांची नावे सांगुन आमचा जीव टांगणीवर लावणार्‍यांना , आंतरजालावर त्याचे फोटो टांगुन आमची गोची करणार्‍यांना , फराळ करतान आमची आठवण काढणार्‍यांना आणि न काढणारे अशा सर्वांना अर्पण ...!!!
तर मेहरबान, कदरदान, खानदान आणि ए.आर. रेहमान ( ऑस्कर मिळलयं म्हटलं त्याला, आहात कुठे ? ) सादर आहे एक धमाल रेसिपी " उपवासाची बॅचलर साबुदाणा थालिपिठे" ...
आता हे "...उर्फ डॉन्याचा सल्ला" असे का लिहायचे ?ह्याचे कारण असे आहे की असे लिहल्याशिवाय पाककॄतीला वजन येत नाही असा ह्या क्षेत्रातली डॉन असलेल्या मेघनाचा सल्ला आहे. असो, आपल्याला काय लेखाला वजन आल्याशी मतलब ;)
***********************
तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे काय ह्याचा पुर्ण विचारान्ती आणि होशोहवासमध्ये ( हो, कारण उपवास सोमवारी होता आणि त्याआधीचा दिवस म्हणजे रविवार ;) ) निर्णय घ्यावा ( हो ना, अन्यथा उपवास नसेल तर उपवासाचे पदार्थ पदराला खार लाऊन करतो कोण ? ज्या गावाला जायचेच नाही त्याचा डिटेल पत्ता काढण्यात काय हाशील ? ) , एकदा का बार उडवायचा ठरले की मग अजिबात मागे हटणे नाही ...
तर आपला "उपवास" आहे हे नक्की झाले मग आता उपवाला चालणारे, इथे मिळणारे, लवकर तयार होणारे आणि स्वस्त असणारे पदार्थ हुडकायला सुरवात करावी व सर्व चाचपणी करुन झाल्यावर आपल्याला "साबुदाणा खिचडी" करायची आहे हे ठरवुन घ्यावे. काळजी नको, मी जरी वर टायटल "थालपीठ" असे टाकले असताना इथे मी "खिचडी" लिहणे म्हणजे महाशिवरात्रीच्या प्रसादाचा पर्यायाने भांगेचा प्रताप नव्हे, ते पुढे कळेलच ..!!!

* साहित्य :
साधारणता १ किलो साबुदाणा
१ /४ किलो शेंगादाणे
1/२ किलो बटाटे
15 -२० हिरव्या मिरच्या
बचकभर जीरे ,
३-४ चमचे जीरेपुड ,
तुप / तेल ( प्रमाण ? छ्या, दारु पिताना काय तुम्ही प्रमाण पाहुन पिता काय ? ) ,
मीठ, तिखट हाताला येईल तसे ( जे मीठ आणि तिखट यांचे व्यवस्थीत प्रमाण सांगु शकतात ते काश्मिर समस्येवर अचुक उपाय सुचवु शकतात ),
२ लिंबं,
एक मोबाईल, एक लॅपटॉप ( इंटरनेट कनेक्शन असलेला ) , एक टीव्ही.
१ ट्रॉपीकाना ऑरेंज ज्युसची बाटली ( कशाला ? नंतर सांगेन ),
आपल्यासारखेच टुकार ५-६ मित्र,
१ ऐनवेळी टांग मारणारा पगारी स्वैपाकी उर्फ कुक
महत्वाचे : रिकामा ३-४ तासाचा वेळ

सर्वात प्रथम उठुन हापीसात गेल्यावर गेल्यागेल्या "आज माझा उपवास आहे" हे जाहीर करावे व स्वतःचे कौतुक करुन घ्यायला सुरवात करावी. दररोज ज्यांच्याबरोबर ब्रेकफास्टला जाताय ( नावे ? आम्ही नाय सांगणार बॉ, लाज वाटते आम्हाला ) त्यांनी आज ठामपणे " नाही" म्हणुन सांगावे, फारच आग्रह झाला व समोरची व्यक्ती अगदीच सोडेनाशी झाली तर त्यांच्याबरोबर जाऊन आपण फक्त "मोसंबी ज्युस" प्यावा व हाच सर्वात उच्च आणि श्रेष्ठ उपहार आहे ह्यावर त्यांचे बौद्धिक घेऊन त्यांना काव आणावा, ते वैतागुन तुमचे ज्युसचे बील स्वतःच भरतील. आख्खा दिवस शक्यतो ज्युस ,फळे, सहकार्‍यांनी "काहितरी खाऊन हे" म्हणुन केलेला आग्रह ह्यावर काढावा.आज उपवास आहे ह्यासबबीखाली हापीसातुन लवकर घरी निघावे व पुढच्या तयारीला लागावे ...

अर्थातच आपल्या फ्लॅटवर साबुदाणा नावाचा प्रकार नसतोच, मग आधी त्याला हिंदी/इंग्रेजीत काय म्हणतात हे आठवायचा प्रयत्न करावा, शेवटी "सागु / सॅगो " हे इंग्रजी नाव आठवल्यावर शंभु महादेवाचे नाव घेऊन खरेदील निघावे. आपले मराठी व इंग्रेजी मिश्रीत हिंदी व त्यांचे शुद्ध कन्नडा अशी २-३ ठिकाणी खडाजंगी झाल्यावर शेवटी एक किलोभर "सब्बक्की उर्फ कन्नड साबुदाणा" घेऊन यशस्वीरित्या घरी यावे.मग लॅपटॉप उघडुन आंतरजालावर कुठे काही रेसिपी दिली आहे का ह्याची चाचपणी सुरु करावी, सर्वात शेवटी मिपाकर असलेल्या चकली यांचा ब्लॉग उघडुन "उपवासाचे पदार्थ" हे पान खोलावे, त्यात साबुदाणा खिचडी हे पाहुन घावे व आपल्याला जमेल इतका कॉन्फीडंस आला की मग पुढ्च्या तयारीत लागावे ...

सर्वात प्रथम साबुदाणा स्वच्छ धुवुन घ्यावा, मग तो "भिजण्यासाठी" एक पातेल्यात मुबलक पाणी घेऊन त्यात टाकुन द्यावा. ब्लॉगवर लिहलेली "उरलेले पाणी काढुन टाकावे" ही सुचना सोईस्कर विसरुन जावी. आपण लै भारी काम केले ह्या आनंदात फटाफट मित्रांना "खिचडी जमते आहे रे " असा समस टाकुन रिकामे व्हावे, त्यांचा फोन येण्याची शक्यता गॄहीत धरुन पटकन कमीत कमी तासभर गप्पा मारता येतील अशा व्यक्तीला फोन लावावा, आपण मस्त गप्पा मारत बसावे व मित्रांच्या "वेटिंगवर असलेल्या कॉल्स" कडे सोईस्कर दुर्लक्ष करावे. शेवटी बसुन, झोपुन, लोळुन, उभे राहुन अथवा कसेही फोन हातात पकडायचा व बोलायचा कंटाळा आला की फोन बंद करावा व मित्रांना परत फोन करुन "काय झाले?" असा प्रश्न करुन काही "प्रेमळ शब्दांची व स्तुतीपर वाक्यांची देवाणघेवाण" करावी, सर्वात शेवटी त्यांना येताना बरोबर आणायच्या पदार्थांची अशी लिश्ट द्यावी की त्यांना त्यापेक्षा पुण्याला जाऊन खिचडी खाऊन येणे परवडेल असे वाटले पाहिजे. असो.
त्यात एका मित्राच्या बोलण्यात "भिजवताना उरलेले पाणी काढुन टाकलेस का ?" असा उल्लेख ऐकल्याबरोबर धावत किचनमध्ये जावे पातेल्यात तयार झालेला " साबुदाण्याचा लगदा" पाहुन डोक्याला हात लावावा व हातासरशी लवकर का बोलला नाही म्हणुन मित्राला ४ शिव्या घालुन घ्याव्यात ...

छे , आता सर्वच गंडले, रात्रीचे जेवण बोंबलणार ह्या कटकटीने टेन्शन आल्यास लॅपटॉप उघडुन मिपामिपा खेळत बसावे अथवा क्रिकेट गेम खेळत बसावी. आत सर्व काही शंभु महादेवाच्या हातात आहे असे मानुन आपण आपले काम ( म्हणजे गेम खेळणे ) मन लाऊन करावे ...

आपण केलेल्या "समस"चा इफेक्ट म्हणुन एखादा मित्र लवकर घरी आल्यस त्याला आल्याआल्या किचन मध्ये न्हेऊन तो "लगदा" दाखवावा व त्याला झीट आणावी. मग तो ज्वर ओसरला की आता ह्याचे काय करता येईल ह्यावर प्रबोधक चर्चा करावी, मित्राची " तो लगदा गॅसवर तापवुन पाहु का ?" ही कल्पना ३-४ शिव्यांच्या आधारे फेटाळुन लावावी ...
मग दोघांनी मिळुन "चकली ब्लॉगवर" अजुन काय शक्य आहे ते पहावे ...
आता खिचडी जमणे अशक्य अशी २-३ ठिकाणी फोन करुन खात्री झाल्यावर आपण आता मस्त "साबुदाणा थालपिठे" करु असे ठरवुन घ्यावे व त्याच्या तयारीत लागावे ...

सोईस्करपणे आपल्या सध्याच्य्या अल्पवस्त्रस्थितीचे कारण पुढे करुन मित्राला बटाटे आणायला हाकलावे व तोवर मी शेंगादाणे भाजतो अशी त्याला खात्री द्यावी. म्हटल्याप्रमाणे कढाई गॅसवर ठेउन, गॅस फुल्ल करुन त्यात शेंगादाणे ओतावेत व ते भाजताना सतत हलवावे लागतात ही महत्वाची गोष्ट विसरुन आपण शांतपणे हॉलमध्ये जाऊन टीव्ही लावावा व त्याचवेळी कुणाला तरी फोन करुन आत्मानंदी तल्लीन व्हावे. थोड्या वेळाने मग काहीतरी तडतड आवाज व जळाल्याचा वास आला की धावत किचनमध्ये जाऊन गॅस बंद करावा व मित्र यायच्या आत जळालेले शेंगदाणे डस्टबिनमध्ये टाकुन द्यावेत, आता मात्र आणिबाणीची परिस्थीती आली असे समजुन थोड्याश्या गांभिर्याने "शेंगदाणे भाजणे" हे कार्य पुर्णत्वाला न्ह्यावे. मित्र आल्यावर त्याच्याकडुन बटाटे घेऊन ते उकडायला कुकरमध्ये लाऊन द्यावेत.

थोड्या वेळाने आणखी १ बॉडीबिल्डर मित्र आल्यावर त्याला आधी हरबर्‍याच्या झाडावर चढवुन त्याला "शेंगादाणे कुटायच्या" कार्याला बसवावे व तोवर आपण आपला क्रिकेटचा गेम पुर्ण करत रहावा....
अजुन १-२ मित्र आल्यावर व त्यांनी आपला व्यवस्थीत उद्धार करुन ते आता सफिशियंट वैतागले आहेत ह्याची खात्री झाल्यावर सर्व तयार असलेले रॉ मटेरियल घेऊन "साबुदाण्याची थालिपीठे" करायला सुरवात करावी ...

एक मोठ्ठी परात घेऊन त्यात उकडलेल्या बटाट्यांचा लगदा करायला घ्यावा, मनोसोक्त बटाटे स्मॅश करुन झाल्यावर त्यात मगाशी तयार झालेला साबुदाण्याचा लगदा + शेंगादाण्याचा कुट + लिंबाचा रस + जीरे आणि जीरेपुड + मीठ + तिखट हे हाताला येईल त्या प्रमाणात मिसळावे. चव जमली आहे की नाही हे तपासण्याशीठी चमचा-चमचा ह्या हिशोबाने टेस्ट करत रहावे व जेव्हा २ वाट्या मिश्रण असेच फस्त होईल तेव्हा ते योग्य जमले आहे असे जाहीर करावे ...
शेवटी हा ( म्हणजे मी ) आता थालिपीठी तयार करणार अशी मित्रांची खात्री झाली व ते निवांत बसले की " अरेच्च्या, मिरच्यांचा ठेचा टाकायचा राहिलाच चुकुन " अशी त्यांना आठवण करुन द्यावी. मग ते चिडुन मिरच्या कुटत असताना आपण शांतपणे हात धुवुन, फ्रीजमधली ज्युसची बाटली काढुन आरामात मिपामिपा खेळत बसावे. त्यांनी ज्युस मागीतल्यास तो उष्टा आहे व उपासाला असे चालणार नाही असे सांगुन एक मोठ्ठा घोट घेऊन तो ज्युस "क्लासऽऽऽऽ" आहे हे जाहीर करावे.शेवटी मिरच्यांचा लगदा मनोसोक्त आधीच्या तयार मिश्रणात मिसळत बसावा ...

मग कंटाळा आला की ते सर्व घेऊन किचनमध्ये जावे. गॅस चालु करुन एक नॉनस्टीक तवा गरम करायला ठेऊन द्यावा व पुन्हा बाहेर जाऊन टीपी सुरु करावा, तवा तापला आहे ह्याची खात्री मित्रच करतील पण मित्रसुद्धा तापले आहेत ह्याची खात्री अपणच करावी , मग आपण एकदम टेचात उठुन किचनमध्ये जावे व कुणाला तरी "एक प्लास्टीकच्या कागदाचा तुकडा आण रे" असा हुकुम सोडावा. तो बिचारा हुडकत बसतो, नियमाप्रमाणे त्याला लवकर सापडत नाहीच. मग आपण इतर मित्रांबरोबर त्याचा व्यवस्थीत उद्धार करुन घ्यावा...
शेवटी सर्व सारंजाम जमला की तयार मिश्रणाचे "मध्यम आकाराचे गोळे" तयार करुन घ्यावेत, ह्या कामात मित्र तुम्हाला खात्रीने मदत करतील. मग त्या कागदाला थोडेसे तुप लाऊन त्यावर हा गोळा ठेवावा व व्यवस्थीत थापुन साधारणता गोल व समान जाडीचा असा पराठासदॄष्य आकार बनवावा. तुप सोडण्यासाठी त्याला मध्ये बोटाने छोटेसे भोक पाडुन ठेवावे ...
मग तो परठा न मोडता तव्यावर तुप सोडुन त्यावर टाकण्याच्या अवघड कामाला सुरवात करावी. शंभु महादेवाला तुमची दया आल्याने हे काम व्यवस्थीत पार पडते.आता हे पलटुन भाजण्यचे काम एका नवशिक्या मित्राकडे सोपवुन द्यावे व आपण संजीव कपुरच्या आवेशात त्याला सुचना करत रहाव्यात. त्याच्या हातुन थालिपीठ तुटते , कधी कच्चे रहाते, कधी कागदावरुन तव्यावर जायच्या ऐवजी निम्मे ओट्यावर पडते पण आपण सन्यस्त दृष्टीने हे सर्व एंजॉय करावे, जो काही समाचार घ्यायचा आहे तो बाकीचे मित्र घेतील ...

आपला थोडा थालपिठे लाटायच्या कार्यात व मित्राचा भाजण्यात हात बसल्यावर मात्र पुढचे सर्व व्यवस्थीत पार पडते. पण त्याआधी वाया गेलेल्या थालपिठांचे दु:ख मानु नये, थॉमस अल्वा ऍडीसननेसुद्धा विजेचा बल्ब बनवताना ९९९ वेळा चुक केली होती हे लक्षात असु द्यावे ...

सर्व थालिपीठे तयार झाल्यावर एका ताटलीत हे थालिपीठ + दही + बटाटा वेफर्स + तुप + द्राक्षे घेऊन आरामात तंगड्या पसरुन टीव्ही पहात मित्रांबरोबर थट्टा मस्करी करत व आज काय काय "पाहण्यालायक" दिसले ह्या महत्वाच्या विषयावर चर्चा करत हादडावे. अशा कठोर व्रताने महाशिवरात्र भरभरुन पावते व शंभुमहादेव तुमच्यावर प्रसन्न होतो असे डॉनबाबा बेंगलोरी ह्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहले आहे ....

महत्वाची गोष्ट : फोटो ; आंतरजालावर फोटोविना पाककॄती म्हणजे बॅटविना तेंडुलकर, अंगभर कपडे घालुन मल्लिका शेरावत किंवा निरपेक्ष लिहणारे सुमर केतकरच ...
थोडक्यात अशक्य व अमान्य ...पण वरच्या पाककृतीवरुन आपल्याला जर याचा "फोटो काढता येईल" अशी खात्री असेल तर आपल्या पायाचा फोटो आम्हाला पाठवावा, आम्ही तो फोटो व आमच्या पाककॄतीचा फोटो त्वरित आंतरजालावर टाकु... ;)

Tuesday, March 3, 2009

स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... भाग-२

नमस्कार मंडळी,
ह्या आधीचा भाग आपल्याला स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ... इथ पहायला मिळेल ...
नुसता कोरडेपणाने दुसरा भाग सुरु करणे हे अभद्रपणाचे लक्षण, म्हणुन काही मसाला टाकत आहे ..सर्वांनी आत्तापर्यंत राजकीय प्रतिक्रीया पाहिल्या / वाचल्या, पण कोणी "वॄत्तपत्रांकडे" लक्ष दिले का ? भले त्यांनी दमदार अग्रलेख छापले असतील पण संपादक मनातुन काय म्हणतात ते पहा ...
=============================

* सुमार केतकर , लोकसत्ता :
कल्पनेच्या तीरावरील जग सेल्युलॉईडच्या पट्टीवर जिवंत करण्यात आयुष्य घालवलेल्या कलावंतांच्या आयुष्याला सोनेरी किनार प्राप्त करून देणार्‍या या ऑस्करच्या सोहळ्यात एकदम ८ पुरस्कार मिळवुन निर्भेळ यश मिळवणर्‍या स्लमडॉगचे अभिनंदन. गेल्या निवडणुकीत माननीय सोनिया गांधीच्या नेतॄत्वाखाली काँग्रेसने असेच यश मिळवले होते पण ते भाजपा आणि त्यांच्या बगलबच्च्यांना पहावले नाही, त्यांनी थयथयाट करुन सोनियाजींना पंत्रप्रधान होण्यापासुन रोखले.
"...ऍण्ड ऑस्कर गोज टू स्लमडॉग मिलेनियर!' या घोषणेनंतर लॉस एंजलिसच्या कोडॅक थिएटरबरोबरच नरिमन पॉईंटवरच्या उत्तुंग इमल्यापांसून धारावीतल्या झोपडपट्टीपर्यंत आणि बनारसच्या दशाश्वमेध घाटापासून झुमरीतलय्यातल्या हवेलीपर्यंत सर्वत्र जल्लोष झाला. भारताच्या धर्मनिरपेक्ष एकात्मतेचे हे एक उत्तम उदाहरण आहे. मात्र मोदी आणि विहिंप यांनी गुजरात बरोबरच आता कर्नाटक राज्यही हिंदुत्वाची प्रयोगशाळा बनवुन तिथे अमानुष हिंसाचाराचे तांडव चालवले आहे व धार्मीक सौर्हाद्याच्या गळ्याला नख लावले आहे, महाराष्ट्रात तर ठाकर्‍यांचा कुणानाही न जुमानता नंगा नाच सुरुच आहे. अशा परिस्थीतीत आपल्याला एका समर्थ नेतॄत्वाची गरज आहे व त्यासाठी आमच्या मते सोनिया गांधींपेक्षा योग्य उमेदवार देशात शोधुन सापडणार नाही.
शेवटी पुरस्कार घेताना रेहमान म्हणतो "'आयुष्यभर मला प्रेम व तिरस्कार यांच्यातून निवड करावी लागली. मी कायम प्रेमाचाच पुरस्कार केला आणि म्हणूनच मी आज येथे उभा आहे! ". धर्माधिष्ठीत राजकारण करणार्‍यांना ही एक सणसणीत चपराक आहे. “धर्म ही अफूची गोळी आहे" असे कार्ल मार्क्सने म्हटले आहे. पण आत ह्याच लालभाईंनी अणुकराराच्या मुद्द्यावर ऐनवेळी पाठिंबा काढुन घेऊन युपीएचा कात्रजचा घाट करण्याचा प्रयत्न केला व त्यांना भाजपा व जात्यंध राजकारण करणार्‍या मायावतींची फुस होती. पण सोनिया गांधींनी एकाच तडाख्यात सर्वांना आस्मान दाखवले.
आता काही मंडळी भारताच्या इमेजचे हनन केले म्हणुन स्लमडॉगच्या नावाने कंठषोश करत आहेत, चांगल्या कामात नाक कापुन अपशकुन करण्याचा हा प्रकार, ह्याला कट असेच म्हणणे योग्य ठरेल. असाच कट भाजपा व त्यांच्या पिल्ल्यांनी मुम्बई हल्ला घडला त्या वेळी करुन सरकारचा राजीनामा मागितला होता, डाव्यांनी अणुकराराच्या मुद्द्यावर सरकारला कट करुन अडचणीत आणले होते. सोनिया गांधींना व पर्यायाने काँग्रेसला अडचणीत आणुन भारतीय लोकशाहीच्या मुळावर उठणार्‍या असल्या हलकट प्रवॄत्तीचा आम्ही निषेध करतो.
असो.
स्लमडॉग चे अभिनंदन ...!!!

* डॉ. वरुण टिकेकर :
कसल्याही लोकशाहीवादी निवडणुकीतुन झालेल्या निवड प्रक्रीयेत मिळणारे यश हे निर्भेळच असते, म्हणुनच स्लमडॉगचे अभिनंदन. आता भारताच्या सांप्रत काळात एकंदरच समाजवादी व उदारमतवादी विचारप्रणाली नामशेष होत असताना स्लमडॉगने असे यश मिळवणे ही एक स्पॄहणीय घटना आहे. लोकहितवादी आगरकर, टिळक व न्या. रानडे ह्यांनी समाजात रुजवलेला उदारमतवाद व सामाजीक सौर्हाद्य ह्याची जर पुन्हा रुजवणी झाली तर भविष्यात यशाच्या अनेक पायर्‍या आपण चढु याबद्दल मनात किन्तु नाही ...

* स्वानंद आगाशे , पुणे सकाळ :
स्लमडॉगने पुरस्कार मिळवुन अख्ख्या जगात आपले नाव करणे ही महत्वपुर्ण घटना आहे. तसेही जगात आजच्या घडीला स्लमडॉग सोडला तर पुणे सोडुन पहाण्यासारखे आहेच काय ? पुण्यातल्या राजकारण्यांनी बीआरटी, रस्ते, पाणी ह्यासारखे मुलभुत प्रश्न आधी सोडवणे गरजेचे आहे. पुणे महोत्सव हा कुणाच्या नेतॄत्वात व्हावा हा मुद्दा गौण आहे. लवकरच आम्ही सप्तरंगमध्ये ह्याबद्दल लिहणार आहोत ...
स्लमडॉगच्या निमीताने युवा पिढीला बोलते करण्यासाठी पुन्हा "युवा सकाळ" सुरु होत आहेच...

*रोखठोक राऊत, सामना :
मराठी माणसाचा मानबिंदु असणार्‍या मुंबईवर बेतलेल्या स्लमडॉगला ऑस्कर मिळण्याची घटना ही अभुतपुर्वच म्हणावी लागेल. काही दळभद्री, पोटार्थी, भिकारड्या, नेभळट व भाकरी शैली असणार्या पत्रकारजंतुंनी आधी ह्याविरुद्ध बरीच आरडाओरड केली होती. तो चित्रपट परकीय आहे म्हणुन का त्यावर असा हल्ला करावा ? ही लोकशाही आहे का मोगलाई ? व्यक्तीस्वातंत्र्याला नख लावणा-या या औरंगजेबी प्रवृत्तींना जागीच ठेचले पाहिजे. असल्या सुपारीबाज व मराठी माणसाच्या मुळावर उठणार्‍या प्रवॄत्तीला आत्ताच जागा दाखवली पाहिजे. काही निवडक धनदांडग्या व आपमतलबी लोकांच्या दाड्या कुरवाळण्याचे प्रकार थांबणार कधी ???

* शरदकुमार राऊत, राज्यसभा खासदार, स्तंभलेखक मटा :
एकंदरीतच सर्वंकष विचार केला तर ही घटना स्पृहणीय आहे असेच म्हणावे लागेल. स्लमडॉगचा सन्मान हा फक्त चित्रपटाचा नसुन समस्त भारतीय जनतेचा व त्यातल्या त्यात झोपडपट्टीत हलाखीचे जीवन जगणार्‍या लढावय्यांना दिलेली आदरांजलीच म्हणावी लागेल. मटानायक उद्धवजी यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना नेहमीच अशा वर्गाच्या मागे उभे राहिली आहे, आत्तापर्यंतचा इतिहास जर आपण सुक्ष्मदॄष्टीने पाहिला तर आपल्याला ठायीठायी ह्या गोष्टी जाणवतील ....
( मग ते बराच वेळ उद्धवजी, अफझल गुरु, नरेंद्र मोदी, गोध्रा, ओबामा, मायावती , भाजपा, समाजवाद , सांस्कॄतीक एकता, शिवसेनेचे कार्य , महाराष्ट्राची प्रगती, मुंबईचे स्थान, मुंबई हल्ला, निष्क्रीय राज्यकर्ते ह्या विषयांवर बोलत राहिले ...
शेवटी मुळ मुद्दा काय होता हे विसरुन गेल्याने त्यांनी एकदम गंभीर मुद्रा करुन थोडेसे खाकरुन आम्हाला "आता निघा" असा सिग्नल दिला. )

* मिखील वागळे , आयबीएन लोकमत :
अरे ऑस्कर देत नाय म्हणजे काय ? स्वतःला समजता कोण ? भारतीय समाज व चित्रपटांना कमी लेखणे थांबणार कधी , किती दिवस ह्या गोष्टींवर टिका करणार ? माझ्यावर तर अनेकदा टिका होते, आरडाओरड होते परंतु मी कधी डगमगलो नाही. परंतु हे कोठेतरी रोखण्याची गरज आहे असे तुम्हांला वाटत नाही का? आपल्याकडे येथे अनेक मान्यवर आहेत, अपण त्यांचे विचार जाणुन घेण्यासाठी त्यांच्याकडे वळणारच आहोत. पण त्याआधी मी घेतो एक ब्रेक, आपण पहात आहात "आय बी एन लोकमत" .....
( असे म्हणुन त्यांनी २ ग्लास पाणी पिले, व दाढी खाजवत विचार करु लागले )
पुन्हा उसळुन ते म्हणाले " अरे असे पडद्याआडुन वार करणे ****चे लक्षण आहे, हिंमत असेल तर स्वतः चित्रपट बनवुन ऑस्कर मिळवुन दाखवावा. मी इतकी वर्षे पत्रकारीतेत आहे, स्पष्ट बोलायला मी कुणाच्याही **ला घाबरत नाही... हा शुद्ध *** आरोप झाला.."
( शेवटी आम्ही त्यांना हा "आजचा सवाल" कार्यक्रम नाही असे भीतभीत सुचवले, त्यांनी मुद्रा एकदम क्रुद्ध केल्याने आम्ही तिथुन काढता पाय घेतला )

* ब्रिटीश नंदी , लोकप्रभा :
ऑस्कर मिळाले ही चांगलीच गोष्ट आहे ह्यात वाद नाही पण महत्वपुर्ण मुद्दा असा की आपण ह्यातुन काही शिकलो आहोत का ?मी माझी "ब्रिटीश नंदी" ही मालिका ह्यात हेतुन सुरु केली होती, जनजागरण ...!!!
पण कुठलेही मत मांडताना मग ते वॄत्तपत्रात असो वा चित्रपटाद्वारे तेव्हा संयम आणि मर्यादाशीलपणा तसेच एकंदर सामाजीक क्षोभाचे भान राखणे अत्यावश्यक ठरते. माझ्या मते इथे स्लमडॉग थोडासा मार खातो. तरीही हरकत नाही ...
अभद्र, असभ्य भाषेत संवाद वा चित्रण, तसेच श्लीलतेच्या मर्यादा ओलांडणारी आयटम सॉग्स वा खळबळजनक गॉसीप्स दाखवुन मलिदा खाणार्‍या व स्वतःची तुंबडी भरणार्‍यांचा आम्ही निषेध करीत आहोत. हे प्रकार जर थांबले तर ऑस्कर बरोबर जनाश्रयही मिळेल असे आम्ही अंतरात्म्याला साक्ष ठेऊन प्रतिपादन करु इछितो ...
========================================
जय हो ...!!!

विषेश आभार : नामवंत वॄत्तपत्रांचे अग्रलेख, बातमीदार ब्लॉग व आजानुकर्णाचा एक जुना लेख ...!