Monday, June 22, 2009

पिझ्झा हटमधली एक संध्याकाळ ....

.
आमचा एक अनोखा छंद आहे, गर्दीतला गडबडीत आणि धांदलीत स्वतःच्या विश्वात मग्न असणारा सामान्य माणुस न्याहाळण्याचा. आता ह्यात आम्ही स्त्री, पुरुष, लहान, थोर, गरिब , श्रीमंत असा कुठलाही भेदभाव करीत नाही. रोजच्या धावपळीच्या जीवनात अनेकवेळा गर्दीच्या ठिकाणी जावे लागते, थोडे थांबावे लागते, थोडा काळ व्यतीत करावा लागतो आणि मग इथे आम्ही आमचा छंद पुरवुन घेतो. अर्थात हे करत असताना समोरच्याला त्रास अजिबात त्रास होणार नाही अथवा अवघडल्यासारखे वाटणार नाही ह्याची पुर्ण काळजी आम्ही घेत असतो, हो ना, नाहितर "कसा टक लाऊन पाहतो आहे बघ मेला, घरात आई-बहिणी नाहीत वाटतं, मुडदा बशिवला ह्याचा ...." वगैरे मुक्ताफळे ऐकण्याची हौसही नाही व सोसही नाही.


गेल्या काही दिवसापुर्वी इकडे भयानक पाऊस झाला व तो ही विकांताला, त्यामुळे नेहमीचे व्यस्त कार्यक्रम सोडुन झक मारत घरातच बसावे लागले ( व रुममेट्सचे टोमणे ऐकुन न ऐकल्यासारखे करावे लागले ) . नेमका हाच मुहुर्त साधुन आमच्या कुक-बुवानेही मस्तपैकी टांग दिली , ऐनवेळी असा घोळ घालण्याच्या बाबतीत त्याने अगदी धोनीच्या हातावर हात मारला आहे . संध्याकाळच्या जेवणाचा काहीच सर्वमान्य तोडगा निघण्याची चिन्हे न दिसल्याने मी ( मनमोहनसिंग साहेबांसारखा ) सर्वसंमती होऊ शकणारा "पिझ्झा ऑर्डर करु" हा उपाय सुचवला, सहाजिकच पुढची सर्व कार्यवाही करण्याही जबाबदारी माझ्यावर आली. "३० मिनीटात पिझ्झा घरपोच" ह्या सुविधेला आम्ही फोन केला, त्यावरच्या सुंदर व मोहक ( आवाजाच्या ) कन्येने आमची सर्व माहिती व्यवस्थित विचारुन घेतली व शेवटी पडलेल्या आवाजात "पावसामुळे आम्ही होम डिलीव्हरी करणे तात्पुरते स्थगित केले आहे" असे अत्यंत दु:खद आवाजात आम्हाला सांगितले व रुममधले टोळभैरव पुढच्या कार्यक्रमाचा अंदाज आल्याने खदाखदा हसले . शेवटी त्या कन्येने अजुनच दिलगिरीच्या सुरात त्यांच्या अडचणींचा पाढा वाचायला सुरवात केल्याने आता ही स्वतःच आपल्या रुमवर येऊन पटकन राईस्-रस्सम बनवुन देते की काय ह्या शंकेने घाबरेघुबरे होऊन आम्ही स्वतःच तिथे जाऊन ऑर्डर आणायचे ठरवले.

आता बाबासाहेब पुरंदर्‍यांच्याच भाषेत सांगायचे तर अर्जुनाच्या धनुष्यातुन सुटणार्‍या तीरांचा कहारीपणा घेऊन पाऊस संततधार कोसळत होता, रणदुंदभींच्या कल्लोळासारखाच पावसाचा व रस्त्यावर धावणार्‍या गाड्यांचा आवाज अवघे आसमंत भरुन टाकत होता, पोतराजाच्या कडाडणार्य आसुडासारखी वीज कडाडत होती आणि विद्युल्लतेच्या चपळाईने लख्खकन चमकत होती, नुकतीच जुलमी मोगलाईची टोळधाड येऊन गेल्यासारखे रस्ते शांत आणि निर्मनुष्य दिसत होते, सह्याद्रीच्या बेलाग कड्यावरुन बेदुंधपणे कोसणणार्‍या पाण्याच्या अवखळ लोटासारखे रस्त्यावरुन पावसाचे पाणी आपली वाट काढत मुक्तपणे वहात होते, (लाईट गेल्याने ) किर्र अंधार होता. अशातच २ निघड्या छातीचे वीर ( पक्षी : मी आणि माझा मित्र ) अंगावर कांबळे ( पक्षी : रेन जॅकेट्स ) पांघरुन हळुवारपणे पावले उचलत ( चिखल उडु नये म्हणुन ) गुपचुपणे गड ( पक्षी : आमची रहाती इमारत ) उतरले, त्यांनी इकडेतिकडे बघुन अंदाज घेत घोड्यावर ( पक्षी : दुचाकीवर ) मांड ठोकली व औरंगजेबाच्या तंबुवर चमकणारा सोन्याचा कळस कापुन काढायला धावणार्‍या संताजी/धनाजींच्या अधिरतेने त्यांनी "पिझ्झा हट" ह्या गडाकडे सुसाटपणे धाव घेतली.
( हा हा हा, लै भारी वाटते असे लिहायला, आता बास झाले पण )

पोहचल्यावर आत गेलो तो ही ऽऽऽऽ गर्दी , पुण्याची शनिवार्-रविवारची चुल न पेटवण्याची परंपरा ह्यांनीही बरोबर उचलली आहे, त्यामुळे तिथे "अवघा हिंदु एकवटला ... च्च च्च .. अवघे जन एकवटले" असे झाले होते ( च्यामारी, सामना पेपर वाचणे जरा कमी केले पाहिजे ). थम्ब रुलप्रमाणे आमची जी ऑर्डर फोनवरुन घेतली गेली होती ती मध्येच पावसात विरघळुन गेल्याने इथपर्यंत पोहचली नव्हती, पिझ्झा हटवाल्यांनी अनेक मधुर शब्दांची पेरणी करत झालेली चुक मान्य करत लांबड लावायला सुरवात केली व वाट पहायची विनंती करायला सुरवात केली (बुद्धुच आहेत लेकाचे, असल्या पडत्या पावसात हातचे सोडुन पळत्याच्या पाठीमागे बाहेर निघुन जायला आम्ही काय तेलगु देसमचे नेते वाटलो की त्यांना ? ) . शेवटी त्यांचे तुपात घोळवुन बडबड एवढी वाढली की आम्ही त्यांना समाजवाद्यांच्या आवेशात " भुकेल्यांना ४ प्रेमाच्या शब्दांपेक्षा पटकन मिळालेल्या भाकरीच्या तुकड्याचे (पक्षी: पिझ्झा पीसेसचे) महत्व आणि कौतुक जास्त असते" असे सडेतोड बोल सुनावणार होतो ( पण हे आंतरजाल नव्हे असे लक्षात आल्याने ) व त्यांनी फुक्कटची पेप्सी ऑफर केल्याने आम्ही ( लाच घेतलेल्या कस्टम अधिकार्‍यासारखे ) हसत " हॅ हॅ हॅ, होते असे कधीकधी, त्यात काय एवढे, आम्ही वाट पाहु " म्हणत तिथेच वाट पहाणे पसंत केले ...

पुन्हा त्यांनी नमनालाच घडाभर तेल घालुन आमची "ऑर्डर घेतली" व आम्हाला एक कोपर्‍यात असणारा एक मस्तपैकी कोच दाखवला व तिथे बसुन वाट पहाण्याची विनंती केली. ( तिथे असलेल्या सुंदर कन्या पाहुन ) आमचा मित्र आमच्या आधीच तिथे पोहचला ( आणि सगळीकडचाच "चांगला व्ह्युव्ह मिळेल" अशी ) जागा पाहुन त्याने तिथे ठाण मांडले. आम्ही आपले मुंबईतल्या लोकलच्या चौथ्या सीटवर बसणार्‍या मनुक्षाचा अवघडलेलापणा घेऊन उरलेल्या जागेत बसुन घेतले.समोर पाहिले तर अनेक लोक दिसत होते ( हो हो, अनेक सुंदर कन्याही दिसत होत्या (कॄपया फोटोंचा आग्रह करु नये, अपमान होईल ) पण तो महत्वाचा मुद्दा नाही ) , आमच्या "व्यक्तिनिरीक्षणाची" हौस भागवण्याची सुयोग्य जागा ह्याहुन दुसरी सापडली नसती. आम्ही आपले स्वतःवरच " यही है राईट प्लेस ( राईस प्लेट नव्हे ) बेबी, आहा ..." म्हणत खुष झालो. मित्राची काळजी करण्याची गरजच नव्हती, "अशा ठिकाणी" कसा टाईमपास करावा हे त्याला सांगणे म्हणजे साबा करिमने गांगुलीला ऑफसाईडला गॅप कसा काढावा हे शिकवण्यासारखे आहे.
तो त्याच्या "उद्योगाला" लागला व आम्ही शांतपणे समोरचे निरीक्षण करु लागलो ....

* क्रमश : *
( आजकाल वय झाल्याने ( गैरसमज नको, एका जागी न बसवण्याच्या तारुण्याबद्दल कैफाबद्दल ( कत्रिना नव्हे, पुन्हा अजुन गैरसमज नकोत ) बोलतो आहे मी ) एका बैठकीत पहिल्याएवढे लिखाण होत नाही.

Monday, June 8, 2009

एंजल्स & डेमन्स ...

डॅन ब्राऊनच्या गाजलेल्या व अत्यंत आवडलेल्या "दा विंची कोड" ह्या चित्रपटानंतर ज्याची आतुरतेने वाट पहात होतो तो "एंजल्स & डेमन्स" काल चित्रपटगॄहात जाऊन पाहिला, त्याच्या आधीच पुस्तक मिळवुन पुर्वाभ्यास केला होता त्यामुळे चित्रपट पहाताना जास्त मज्जा आली ...जरुर आणि जरुर पहावा असा हा चित्रपट आहे.

टीप : स्पॉयलर्स नाहीत, बिनधास्त वाचा ... ***********************************************
चित्रपटची सुरवात होते ती २ अत्यंत वेगळ्या जगातल्या आणि वेगळ्या पातळीवरच्या घटनांमधुन, धर्म आणि विज्ञान ह्यातल्या महत्वपुर्ण घडामोडींवर प्रकाश टाकुन चित्रपट सुरु होतो.

रोममध्यल्या "व्हॅटिकन सिटी"मध्ये सध्या पदावर असलेल्या "पोप"चे निधन होते व त्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व प्रथा पाळुन पुढील धर्मसत्ता सांभाळणार्‍या एका नव्या पोपची निवड करणार्‍या "कॉन्क्लेव्ह" ह्या कार्यक्रमाची आखणी केली जाते. जुन्या पोपचा वैयक्तीक आणि सर्वात जवळचा सेवक असलेला धर्मगुरु ज्याला "केमरलिंगो" ह्या नावाने ओळखले जातो तो कार्लो व्हेन्ट्रेसा ह्या विधीची सुरवात करतो. ह्या विधीसाठी संपुर्ण जगातुन ख्रिश्चन धर्माचे अत्युच्च असे १६५ कार्डीनल्स हे व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल होतात, आख्ख्या जगभरातला मिडिया ह्या संपुर्ण विधीचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी रोममध्ये हजर असतो व त्यांना सोबत असते ती लाखो श्रद्धाळु ख्रिश्चन धार्मिक लोकांची.
ह्या घडामोडींपासुन अत्यंत दुर व अत्यंत तटस्थ अशा एका "सर्न (European Organization for Nuclear Researc)" नावाच्या जिनेव्हामधल्या संस्थेमध्ये मात्र वेगळीच धांदल उडाली असते. "हे विश्व देवाने बनवले आहे, मर्त्य मानवाला शुन्यापासुन नविन काही ( Creation of Something from Nothing ) बनवणे शक्य नाही " ह्या संकल्पनेला तडा देणारे काम इथे चालु असते, शात्रज्ञ लिओनार्डो व्हेट्रा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली "अँटीमॅटर" तयार करण्यात येतो, ही मानवाची नवीच झेप. ज्या देवाने घडवलेल्या "बिग बँग" प्रक्रियेतुन विश्व निर्माण झाले त्यावेळी तयार झालेल्या अँटीमॅटरचे यशस्वी उत्पादन मानव पुन्हा करतो हीच महत्वाची घटना. मात्र हा अँटीमॅटर अत्यंत किमती, अत्यंत जोखमीचा व अत्यंत स्फोटक अशी त्याची ख्याती.
ह्या घटनेनंतरच काही तासांमध्ये ह्या कडेकोट सुरक्षा असलेल्या प्रयोगशाळेतुन डॉ. व्हेट्रांची अत्यंत गुढ हत्या होते व हत्या करणारा खुनी बहुमुल्य आनि धोकादायक असे "अँटीमॅटर" त्याच्या सुरक्षा करणार्‍या कॅनिस्टरसह घेऊन तिथुन गायब होतो.

ह्या दोन्ही घटनांपासुन मानसीक व शरिरीकपणे अत्यंत दुर असलेल्या हॉवर्डमधील सिम्बोलॉजिस्ट ( मराठी शब्द ? ) व इतिहासतज्ज्ञ प्रा. रॉबर्ट लँग्डन यांना स्वीस गार्डकडुन ( व्हॅटिकन सिटीचे रक्षक ) "अत्यंत आणिबाणीची परिस्थीती" असे सांगुन तातडीचे बोलावणे येते.

इकडे व्हॅटिकनमध्ये दाखल झालेल्या कार्डिनल्सपैकी अत्यंत महत्वाचे आणि भविष्यातले पोप होऊ शकणार्‍यापैकी ४ कार्डिनल्सचे अत्यंत गुढ पद्धतीने "अपहरण" झालेले असते. अजुन एक गोष्ट म्हणजे सुरक्षेसाठी लावलेल्या एका कॅमेर्‍यामध्ये सर्नमधुन चोरी गेलेले "अँटीमॅटर" दिसलेले असतात. अपहरणकर्त्याने फोन करुन ४ कार्डिनल्सच्या दर तासाने एक ह्या पद्धतीने त्यांच्या सार्वजनिकस्थळी खुनाची व सर्वात शेवटी अँटीमॅटरचा वापर करुन संपुर्ण व्हॅटिकन नष्ट करण्याची धमकी दिली असते. अपहरणकर्ता स्वतःची ओळख "इल्युमिनाटी * ( खाली थोडे विस्तारीत स्पष्टीकरण देतो ) गटाचा सदस्य" म्हणजे "व्हॅटिकन चर्चचा महान,अत्यंत जुना परंतु ताकदवान आणि हुशार शत्रु" अशी करुन देतो.

मागण्या ???
मागण्या काहीच नसतात व काही तडजोड ही तो नाकारतो, त्याच्या मते जे चर्चने ४०० वर्षापुर्वी ४ शास्त्रज्ञांच्या हत्या करुन व त्यांच्या मॄतदेहाची सार्वजनिकस्थळी विटंबना करुन जे क्रौर्य दाखवले त्याचा हा सरळसरळ "सुड" आहे, सुड घेताना त्यात कसलीही तडजोड अथवा सौदा होऊ शकत नाही.

ह्याच परिस्थीतीची उकल करण्यासाठी, अपहरणकर्त्याचा व अँटीमॅटरचा शोध घेण्यासाठी प्रा. रॉबर्ट लँग्डन आणि सर्नमधील शात्रज्ञ "व्हिटोरिया व्हेट्रा" हे व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल होतात. ह्या सर्व शोध सत्राची व व्हॅटिकनमध्ये घडणार्‍या इतर धार्मिक घटनांचे नेतृत्व स्वतः "केमरलिंगो" हा धार्मिक अधिकारी करत असतो.

आता सुरवात होते अनेक गुढ, धक्कादायक, अंगावर रोमांच आणणार्‍या घटनांना ....
रॉबर्ट लँग्डनच्या मते जर अपहरणकर्ते खरोखर इल्युमिनाटी गटाचे सदस्य असतील तर त्यांची स्वतःची अशी एक पद्धत आहे आणि ती काटेकोरपणे पाळण्याबद्दल इल्युमिनाटींची ख्याती आहे. ह्या जगाची निर्मीती "पंचतत्वांमधुन" झाली ह्यावर अत्यंत गाढा विश्वास असणारे‍या इल्युमिनाटी त्यांच्या संदेशात व कार्यक्रमात ह्या पंचतत्वांचा जरुर वापर करत असल्याने त्या दिशेने शोध घेतल्यास आपण नक्की त्यांना पकडु असे लँग्डनला वाटते. इल्युमिनाटींच्या पद्धतीनुसार ४ खुन व अँटीमॅटर्चा स्फोट ह विवीक्षित ठिकाणीच होणार व ते शोधण्यासाठी अपल्याला एक "कोडे सोडवावे" लागेल असा लँग्डनचा विश्वास असतो, एका खुणेवरुन दुसरी, त्यावरुन तिसरी असे शोधत जाऊन आपण त्या अपहरणकर्त्यापर्यंत जरुर पोहचु असे लँग्डन सर्वांना पटवुन देतो.


ह्या शोधसत्राचा पहिला दुवा हा "व्हॅटिकन अर्काईव्ह्ज"मध्ये असलेल्या महान खगोलतज्ज्ञ गॅलेलियोच्या "सत्याचा नकाशा (Diagramma della Verità : Diagram of Truth)" ह्या पुस्तकात मिळणार असल्याने सर्व नियम, रुढी, गुप्तता झुगरुन देऊन केमरलिंगो लँग्डनला ते पाहण्याची परवानगी देतात.त्यात मिळालेल्या कोड्याची उकल केल्यावर त्यांना खुनाच्या पहिल्या जागेचा अंदाज येतो व ते धावत तिकडे पोहचतात, पण इथे मात्र त्यांच्या शत्रुने त्यांच्यावर सरळसरळ मात केलेली असते. पंचतत्वांमधल्या पहिले तत्व असलेल्या "जमिन" याचा उपयोग करुन पहिल्या कार्डिनलची हत्या करण्यात आली असते व त्याचा मॄतदेह तिथे पडला असतो.
इथे असलेले "एंजल्सचे पुतळे" आणि "पंचतत्वे" ह्यांच्यातील संबंधच आपल्याला पुढचा दुवा देतील ह्या धारणेतुन लँग्डनचे शोधकार्य चालुच राहते ते मिळालेल्या संकेतांनुसार एका जागेवरुन दुसरीकडे धाव घेत असतात.मात्र त्यांचे नशिब त्यांना साथ देत नाही, अजुन २ कार्डिनल्सची पंचत्त्वांनुसार "हवा व अग्नी" ह्यांचा वापर करुन अत्यंत निर्घुण हत्या होते व खुनी पळुन जाण्यात यशस्वी होतो.
चौथ्या आणि शेवटच्या कार्डिनल बॉजियांना वाचवण्यात लँग्डन यशस्वी ठरतो मात्र अत्यंत धोकादायक असा खुनी आणि त्याच्याबरोबर असलेले "अँटीमॅटर" ह्यांचा अजुन अजिबात पत्ता नसतो, ते गुढ अजुन कायमच असते.

इकडे चर्चच्या रुढीनुसार नव्या पोपच्या निवडीसाठी आवश्यक असणारे "कॉन्क्लेव्ह" त्या ४ कार्डिनल्सच्या अनुपस्थिती सुरु झालेले असते व स्वतः केमरलिंगो सर्व परिस्थीतीवर बारीक लक्ष ठेऊन असतो. त्याच्या व्हिट्टोरिया व्हेट्राबरोबर झालेल्या चर्चेत आलेल्या शंकानुसार मरण पावलेल्या पोपच्या शरिराची पुन्हा तपासणी करण्यात येते व इथे आश्चर्याचा धक्का म्हणजे हा पोप नैसर्गिकरित्या मरण पावला नसुन त्यांची हत्या झाली आहे असा निष्कर्ष निघतो. हे एकुण प्रकरण गंभीर आहे, इल्युनाटींचा अजुन पत्ता नाही, अँटीमॅटरचा धोका अजुन आहे ह्या सर्व शक्यता लक्षात घेऊन केमरलिंगो कॉन्क्लेव्ह चालु असलेल्या "सिस्टीन चॅपेल" इथे धाव घेऊन, परंपर मोडुन, विधी थांबवुन तिथे असलेल्या सर्व कार्डिनल्सना सध्या घडत असलेल्या घटनांची कल्पना देऊन विधी थांबवण्याची विनंती करतो. "देवावरची श्रद्धा मोठ्ठी की विज्ञानाचे अस्तित्व खरे ? संकटातुन तुम्हाला विज्ञान वाचवते की देवावरची श्रद्धा ? विज्ञान हे देवाच्या विरुद्ध आहे की ते परस्परांना पुरक आहेत ? न जाणो अजुन विज्ञान बाल्यावस्थेत असल्याने अत्यंत गहन असलेल्या देव आणि धर्माला समजण्यास नालायक ठरत असेल तर तो त्यांचा अक्षम्य गुन्हा मानायचा का ? ह्य विज्ञानप्रेमींना धर्माच्या प्रवाहात समावुन घेतले तर ते बरोबर नव्हे का ?" असे एक भावुक व तात्विक भाषण करुन तिथे जमलेल्या सर्व काडिनल्सना विधी थांबवण्यची व इल्युमिनाटीबरोबर ( विज्ञानप्रेमी ) समझोता करण्याची घोषणा करण्याची विनंती करतो. पण त्याच्या हाती निराशा पडते, देवाच्या ताकदीवर गाढ श्रद्धा असलेले व देवच आपले रक्षण करेल ह्यावर प्रगाढ विश्वास असलेले "स्कुल ऑफ कार्डिनल्स" आपला कॉन्क्लेव्ह हा विधी पुढे चालु ठेवतात ...

काही वेळानंतर खुद्द "केमरलिंगो"वर खुनी हल्ला होतो, करणारा त्याच्या जवळचाच माणुस निघतो व तो "इल्युमिनाटीचा हस्तक" आहे असे ठरवुन त्याला ठार मारले जाते, खुद्द केमरलिंगो जखमी होतो.
इकडे खुनावरुंन खुणा, दुव्यावरुन दुवे शोधत असलेल्या लँग्डनला अखेरीस येश मिळते. ते अँतिमॅटर हुडकण्यात यशस्वी ठरतात, ते अँटिमॅटर असलेले कॅनिस्टर त्यांना सापडते व खुन्याचाही बंदोबस्त होतो ....

पण इथे अजुन एक नवा टर्न ...
अँटिमॅटर संभाळनार्‍या कॅनिस्टरची बॅटरी फक्त ५ मिनीटे शिल्लक राहिली असते, ते संपल्यावर आतल्या अँटिमॅटरचा व बाहेरच्या मॅटरचा संपर्क होऊन एक महाविस्फोट होण्याची शक्यता निर्माण होते, हातात असतात फक्त ५ मिनीटे व पणावर लावले असते अख्खे व्हॅटिकन सिटी, ख्रिश्चन धर्मातले सर्वोच्च अधिकारी, लाखो लोक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लोकांचा धर्मावरील विश्वास ...

ही आव्हान पेलायला उपस्थित असतात स्वीस गार्डचे काही कडवे रक्षक, प्रा. लँग्डन, व्हिट्टोरिया व्हेट्रा आणि स्वतः केमरलिंगो ....

पुढे ???
पुढे काय होते ???
अँटीमॅटर संभाळले जाते की त्याचा स्फोट होतो ? स्कुल ऑफ कार्डिनल्सचा पोपसंबंधी काय निर्णय होतो ? आत्त्तापर्यंत अखंड कष्ट व परिश्रमाची उच्च पातळी गाठलेल्या प्रा. लँग्डन आणि केमरलिंगो यांचे काय होते ?धर्मावरील श्रद्धेचा विजय होतो की विज्ञानातील सत्याचा ???

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला थेटरमध्ये चित्रपट पहुनच मिळतील. आत्ता मी इथे काही लिहणे म्हणजे "मिस्टरी स्पॉईल" करण्यासारखे होईल, तेव्हा आपण हा चित्रपट जरुर थेटरमध्येच पहावा.
माझ्याकडुन इतकेच....

शौर्य आणि क्रौर्य , धर्म व धर्मातील रुढीवरील विश्वास आणि विज्ञान , धोकेबाजपणा आणि पराकोटीची स्वामीनिष्ठा , सत्तापदांचा मोह आणि निरिच्छपणे केलेली सेवा, कमालीची गुप्तता आणि त्यांची उकल ह्या सर्वांचे सुम्दर मिश्रण असणारा हा एक नितांतसुंदर चित्रपट म्हणजे "एंजल्स आणि डेमन्स ", जरुर पहा आणि कसा होता ते मला आवश्य कळवा ...
धन्यवाद ...!!!!

* इल्युमिनाटी :

हा ख्रिश्चनिटीमधल्या चर्चया विरोधात असणार्‍या काही कडव्या लोकांच्या म्हणजे मेसन्सच्या गटामधला एक लहान गट, प्रामुख्याने ह्या गटात त्या त्या काळातले महान शात्रज्ञ, शिल्पकार, कलाकार, तंत्रज्ञ लोक वगैरे असत. ब्रदरहुड ह्या अजुन एका चर्चविरोधी गटाकडुन मिळणार्‍या मदतीमुळे अनेक नव्या संकल्पना ह्या इल्युमिनीस्ट लोकांनी मांडल्या. बव्हेरियन राजाच्या आर्थीक मदतीचा स्त्रोत अखंड चालु असल्याने ह्यांनी बरेच संशोधनात्मक कार्यही केले.हे सर्व "विज्ञानवादी" लोक होते.मात्र ह्यांचे संशोधन हे "बायबलमधल्या संकल्पनांच्या विरोधात" गेल्याने व्हॅटिकन चर्चच्या रोषास हे इल्युमिनाटिस्ट बळी पडले, ह्यांच्यावर बंदी आली व सदस्यांचे प्रचंड छळ झाले व अनेक हत्याही झाल्या ..."गॅलालियो, केपलर, न्युटन,लिओनार्ड दा विंची, व्हिस्टन चर्चिल" वगैरे इल्युमिनीस्ट होते असा एक समज आहे ...


( वाचकांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असल्यास मी एक "मेसन्स आणि इल्युमिनाटी" ह्यांच्यावर सखोल भाष्य करणारा लेख टाकेन, अर्थात वेळ आणि गरज ह्यावर सर्व अवलंबुन असेल. मात्र खरोखर जाणण्याची इच्छा असेल तर जरुर लिहीन )

Saturday, May 2, 2009

रिक्षावाले, संप आणि आम्ही ...

आज सकाळी (जरासे अंमळ उशीरानेच) उठलो, नेहमीच्या सवयीनुसार आधी लॅपटॉप चालु करुन नेट चालु केले व काय चालु आहे ह्याची चाचपणी केली. सकाळ-सकाळ एका महत्वाच्या बातमीने आमचे लक्ष वेधुन घेतले(काळजी नको, अजुन कोण नवा चप्पल्/बुट फेकीचा नवा बकरा झाले नाही. त्याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.) ते म्हणजे "दरकपातीच्या निषेधार्थ पुण्यातले २५००० रिक्षावाले संपावर ....".
हीच बातमी जवळपास सगळ्या पेपरमध्ये आणि सोशल वेबसाईटवर दिमाखात झळकत आहे. बरोबर आहे ना, अहो हा प्रश्न "पुण्याशी" निगडीत आहे ना, मग त्याला "वैश्विक प्रश्नाचा" दर्जा नको द्यायला ? आज ही बातमीकडे दुर्लक्ष केल्याची गुस्ताखी पुणेकरांनी माफ केली तर उद्या "पुण्यात ह्यावेळी कडाक्याची थंडी" ही बातमीही तुम्ही लेको मिडीयावाले छापणार नाही,नरकात जाल, कुठे फेडाल असली पापं ?
असो. तर मुद्दा पुणेकर हा नसुन पुण्यातल्या रिक्षावाल्यांचा संप असा आहे ...

बातमी वाचुन आमचे अंमळ मनोरंजन झाले व धक्काही बसला, रिक्षावाल्यांनी आम्हाला धक्का देण्याची ही दुसरी खेप. मागे एकदा आम्हाला बेंगलोरमध्ये रात्री ८.३० वाजता एक रिक्षावाला चक्क यायला तयार झाला, हिंदीतही व्यवस्थित बोलला, मीटर प्रमाणेच भाडे घतेल, उरलेले सुट्टे मात्र ३ रुपये परत केले व वर जाताना "गुड नाईट सर" असे म्हणाला तेव्हा असाच धक्का बसला होता, त्या धक्क्याने आम्ही एवढे अंतर्बाह्य हादरुन गेलो होतो की रिक्षातुन उतरल्यावर आजुबाजुच्या माणसांचा आम्ही फुल्ल टल्ली होऊन कसेबसे रिक्षातुन घरापर्यंत परत आलो आहोत व अजुन लटपट लटपट चालत आहोत असा (कन्नडमधुन) गैरसमज झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 बातमी सविस्तर वाचल्यावर आमच्या असे लक्षात आले की " रिक्षाच्या भाड्यामध्ये (पक्षी : दरामध्ये, मी रिक्षावाल्याला भाड्या असे म्हटलो नाही, तो शब्दच तसा आहे.) प्रति किमी मात्र १ रुपायाने कपात करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (बापरे, काय अवघड शब्द आहे, च्यायला असल्या जड सरकारी शब्दांविरुद्ध एकदा संप पुकारावा लागणार ) दिल्याने त्याच्या निषेधार्थ पुण्यातल्या सुमारे २५००० रिक्षावाल्यांनी (सुमारे म्हणजे अंदाजे, रिक्षाच्या "सुमार दर्जाशी" ह्याचा काही संबंध नाही) बेमुदत संप पुकारला आहे. "
मला नाही कळाले.
रिक्षावाल्यांचा संप म्हणजे काय व तो कसा जस्टिफाईड असु शकतो ?

रिक्षा ह्या व्यवसायावर पोट कुणाचे अवलंबुन आहे ? 
गरज कुणाला आहे ?
ह्याच चालीवर उद्या समजा भिकार्‍यांनी कमीत कमी मात्र १० रुपये भीक मिळावी म्हणुन, पुण्यातल्या दुकानातल्या ग्राहकांनी त्यांना दुकानात सन्मानजनक वागणुक मिळावी म्हणुन, दारुड्यांनी एका बाटलीबरोबर सोडा/थम्सप फ्री मिळावे म्हणुन ,अन्नछत्रातल्या यात्रेकरुंनी जेवणात ताटात तुपाची धार कमी पडते आहे म्हणुन्,भंगार गोळा करणार्‍यांनी भंगार वस्तुतल्या खालावत्या क्वालिटीचा निषेध म्हणुन संप पुकारावा हे जस्टिफाईड आहे का ?
तसा जर ह्यांना हक्क नसेल तर मनमानी करुन वागणार्‍या, अडवणुक करणार्‍या,ग्राहकांना कस्पटासमान वागणुक देऊन त्यांच्याशी उद्धट व्यवहार करणार्‍या, मनाला येईल ते भाडे मागणार्‍या, ग्राहकाची गैरसोय न पाहता एखाद्या रुटवरचे भाडे नाकारणार्‍या ह्या डोईजड रिक्षावाल्यांना "मात्र १ रुपये/किमी" च्या दरकपातीसाठी संप करणे बरोबर वाटते का ?

रिक्षा पंचायतीच्या पदाधिकार्‍यांच्या मते ... जाऊ दे, आधी ह्या "पंचायत" वाल्यांना पाहु. हे लोक नक्की कोण ? भाषणबाजी आणि आडवणुक सोडली तर ह्यांचा रिक्षा ह्या व्यवसायाशी संबंध काय ? हे नक्की काय करतात ? ह्यांचा पोटापाण्याचा धंदा हा रिक्षा अथवा तत्सम आहे का ? वर्षातुन एकदा चौकात भलामोठ्ठा मंडप टाकुन सत्यनारायण घालणे व त्यावेळी रिक्षांची मिरवणुक काढणे ह्याव्यतिरीक्त ही पंचायत रिक्षावाल्यांसाठी नक्की काय करते ? एखाद्या पक्षाच्या मंचावर ह्यांच्या नेत्यांनी जाणे व रिक्षावाल्यांनी त्या पक्षाचे झेंडे रिक्षांवर लाऊन मग्रुरी करत गुंडागर्दी करणे हे कलम रिक्षा पंचायतीच्या अधिकॄत घटनेत लिखीत स्वरुपात आहे का ? नसल्यास मग पंचायत अशा समाजविरोधी तत्वांच्या विरोधात का संप करत नाही ?
जसे १ रुपायाने भाडे कमी होणे हा मुद्दा रिक्षावाल्यांसाठी महत्वाचा ठरतो तसेच रिक्षाच्या ग्राहकांसाठी " सन्मानजनक वागणुक, शुद्ध व सज्जन आचरण असणारे व कमीत कमी उर्मट आणि शिव्यागाळी न करणारे रिक्षावाले, मीटरप्रमाणे भाडे, सर्व मार्गांवर हव्या त्या वेळी सेवा , एखाद्या विशिष्ठ मार्गावर सेवा न नाकारणे, रिक्षामध्ये मद्यपान धुम्रपान आणि इतर व्यसने न करणे, रिक्षांचा दर्जा सुसह्य राखणे" ह्याविषयी पंचायतीकडे काही कार्यक्रम आहेत का ? का ह्या गोष्टी त्यांच्या "रिक्षाकुलाला बौलु लागेल" अशा कॅटॅगिरीत येतात ?

मुळात ५ रुपयाने डिसेल कमी झाले असताना १रु./किमी दरकपात कशी अन्यायकारक ठरते हेच मला समजेना, हे लोक आता सुटे भाग व ऑईलची दरवाढ, दंडाच्या रकमेत वाढ वगैरे सांगत आहेत. योगायोगाने मी ह्याच क्षेत्रातला असल्याने (१ मिनीट, मी रिक्षावाला नाही, वाहननिर्मीती उद्योगातला म्हणत आहे) ह्या गोष्टींची महागाई किती वाढली व ह्याचा दरसाल कितपत खर्च येतो ह्याची मला व्यवस्थित कल्पना आहे. हे सरळसरळ वडाची साल पिंपळाला लावण्यासारखे आहे. हां, इथे जर सर्व जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किमतींचा विचार केला तर आपला रिक्षावाल्यांना सॉफ्ट कॉर्नर असु शकतो.
पण हे सगळे केव्हा ?
जेव्हा रिक्षावाले शुद्ध आणि सरळ "मिटरप्रमाणे" भाडे आकारतील तेव्हा ....
आयला दर भाड्यामागे १०-१५ रुपये जास्त मागायचे, मिटर फास्ट करुन ठेवायचे, डिसेलच्या जागी रॉकेल मिश्रीत इंधन वापरायचे आणि वरुन "१ रुपया दरकपातीविषयी" बोंबाबोंब करायची हा कुठला न्याय ?

पुण्यतल्या सो कॉल्ड २५००० रिक्षांपैकी किती रिक्षा मात्र "डिसेल्"वर चालतात ? कारण आम्ही "सी एन जी"वर चालणार्‍या रिक्षा रस्त्यावर धावत असल्याच्या बातम्या वाचतो. रिक्षावाल्यांच्या व्याख्येनुसार शहराच्या आउटसाईडला ( म्हणजे अख्ख्या पुण्यात ) मिटरप्रमाणे भाडे चालत नाही, मग हा १रु/किमी दर येतोच कुठे ? जर ६-आसनी रिक्षावाले ह्यात सामिल असतील तर त्यांनी कॄपया मिटरवर चालणारी ६-आसनी रिक्षा दाखवावी, आम्ही स्वखर्चाने त्यांचा "महावस्त्र(पक्षी:शाल) व श्रीफळ" देऊन सत्कार करु व मिटरपेक्षा १० रुपये जास्त बक्षिशी देऊ.किती रिक्षांचे मिटर योग्य मापकाप्रमाणे रिडिंग दाखवातात ? कारण आम्ही शि. नगर ते स्वारगेट ह्या मार्गावर "२२ रुपये ते ४० रुपये ह्याप्रमाणे कितीही मिटरप्रमाणे भाडे" दिल्याचे आठवते.
मग असे असताना १रु/किमी दरकपातीची एवढी बोंबाबोंब करुन पब्लिकला वेठीस का धरत आहेत हे रिक्षावाले ?
प्रामाणीकपणे कष्ट करुन जगणारे रिक्षावाले ह्यात भरडले जातात हे मान्य आहे पण तरीसुद्धा त्यांना मिळणारा पैसा हा तितकासा अन्यायकारक नाही हे सत्य आहे ...

मग हा एवढा माज आणि मस्ती कशासाठी ???
त्याचे कसे आहे की आज्-उद्या सुट्टी आहे म्हणुन आपण घरी बसुन आरामात "माजले आहेत हे रिक्षावाले भ**, एकेकाला चाबकाने फोडुन काढायला हवे, हवे तर घरी बसा म्हणावं, गेले उडतं" अशा आरामात प्रतिक्रिया देऊ, सध्या कसे सगळे गारगार आहे.
पण सोमवारी जेव्हा रणरणत्या उन्हात सकाळी हापीसाला जाताना गच्च भरलेली बस ३ वेळा सोडावी लागेल तेव्हा साहेब तुम्हाला "ए भैय्या, हिंजवडी चलेगा क्या ? " असे रिक्षावाल्यालाच विनवावे लागेल हे सत्य आहे. कितीही नाकारले तरी पुण्यातले "सार्वजनिक परिवहन" हे अत्यंत भिकार आहे हे सत्य आहे, ते तुम्हालाही माहित आहे आणि रिक्षावाल्यांनाही. तुम्ही त्याचा दर्जा सहन करत फार वेळ प्रवास करु शकणार नाही हे रिक्षावाल्यांना व्यवस्थित माहित असल्याने त्यांचा हा माज आहे ...

असो, त्यालाही पर्याय नाही..
एवढीच अपेक्षा करु की ह्याची पुढची पायरी ही रिक्षावाल्यांच्या आंदोलनात न होऊन दगडफेक, जाळपोळ, प्रवाश्यांची अडवणुक वगैरे प्रकारात होऊ नये ...
नुकत्याच निवडणुका झाल्याने अशा गोष्टी अशक्य नाहीत अशी शक्यता वाटते ...

"जे जे होईल ते पहावे, न्हेले रिक्षावाले तरच हापीशी जावे ..."

बाय द वे, रिक्षावाले हा लेख वाचण्याची शक्यता नाही ना ? नायतर पुढच्या पुणे वारीत मला रिक्षावाल्यांच्या माझ्यावर संभाव्य बहिष्कारामुळे पदयात्रा करण्याची पाळी येईल. तसे असेल तर सांगा, लगेच नाव बदलुन "रिक्षावाल्यांच्या समर्थनार्थ " अजुन एक खणखणीत लेख लिहायला बसतो. काय करणार बाबा, सवाल पुणे मे प्रवास का है...

* पुर्वप्रकाशित : मिसळपाव.कॉम ... 
ह्या लेखाला तिथे आलेल्या प्रतिक्रिया आपण "इथे" पाहु शकता ...

Wednesday, April 8, 2009

देवांचे भांडण आणि "आय पी एल" ...

सध्या आम्ही विवीध मराठी संकेतस्थळांवर लिहताना एक स्वाक्षरी करतो, त्याचा तजुर्मा "एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो" असा आहे. तात्पर्य काय की माणसाने कुठल्याही "सजिव" व्यक्तीला देव मानु नये, कारण पुढेमागे ह्या देवाने काही चुका अगर अपराध केला मग त्याच्यावर होणार्‍या चौफेर टिकेन आपणही दुखावलो जातो व शिवाय आपलाही वैचारीक गोंधळ होतो. सबब "कुणालाच देव मानु नये" असे आम्ही बर्‍याच वेळा ठरवतो ...पण आमच्या अनेक पालथ्या धंद्यापैकी एक म्हणजे उठसुठ कुणालातरी "देव मानणे" हा आहे ...
आता हा विषय निघायचे कारण म्हणजे सध्या आम्हीच देव मानलेल्या २ देवांची भांडणे. सध्या "शाहरुख खान" आणि "सुनील गावसकर (लोकांनी आडनावाचे एवढी विडंबने केली आहेत की गावसकरही गोंधळात पडणार नक्की)" ह्या आमच्या २ देवांचा वाद गाजतो आहे. पहिल्यांदा ही २ नावे एकत्र वाचुन आम्हाला वाटले की स्वतः सुनील गावसकर हा (रोहन गावसकरला काही केल्या क्रिकेट जमत नसल्याने जसे थोरल्या बच्चननी धाकल्या बच्चनचे करियर सावरायला जसा ऍक्टिव्ह सहभाग घेतला तसा) "कोलकता नाईट रायडर्स" कडुन खेळणार की काय ? पण तसे नव्हते, त्याचे काय झाले की गावसकरांनी जॉन बुकाननच्या ( शाहरुखच्या टीमचा कोच) निर्णयांविरुद्ध आपल्या लेखणीतुन तोफ डागली. कारण काय तर गावसकरचे क्रिकेटप्रेम. पण विषय इथे संपला नाही कारण शाहरुखने एक पत्रकारपरिषद घेऊन गावसकरांविरुद्ध "त्यांना काय टी-२० क्रिकेट कळते ? ते कधी खेळले नाहीत तर मग त्यांनी बोलणे योग्य नाही. हवे तर स्वतःचा संघ बनवुन (पक्षी पैसे मोजुन) काय हवे ते करा" असे अकलेचे तारे तोडले ...मुद्दा असा की त्यांच्या भांडणात त्यांचे काहीही जात नाही मात्र हे दोघेही आम्हाला "देवासमान" असल्याने कुणाची बाजु घेऊन लिहावे हा प्रश्न आहेच.


(शाहरुखच्या मते) शाहरुखचे असे म्हणणे आहे की गावसकर टेन्टी-टेन्टी क्रिकेट खेळले आहेत का ? मग ते त्याच्या डावपेचाबद्दल का बोलतात ? शाहरुखची गोष्ट वेगळी आहे. लोक कसे जाहीरपणे "गुप्तदान" देतात तसा तो आयुष्यभर जाहीरपणे "गुप्त २०-२० क्रिकेट" खेळत आला आहे. त्याच्या मनात आले तर आजही तो "२०-२० चा बादशहा" म्हणुन स्वतःला जाहीर करु शकतो व शिवाय भारताच्या टीमचा कोच म्हणुन भारताला विश्वकप जिंकुन दिला असा चित्रपटही तो काढु शकतो. गरज पडल्यास त्यात तो स्वतः शर्ट काढुन भर मैदानात पीचवर "कोरबो कोरबो कोरबो रे, जितबो जितबो जितबो रे" सारखे आयटम्स सॉन्ग काढुन त्यात विंचु डसल्यासारखे बेफाट नाचु शकतो. त्याला कोण आडवणार ?

(शाहरुखच्या मते) गावसकरांनी त्या टेस्टमध्ये काय ज्या असतील त्या १०००० रन्सा काढुन काय तीर मारला का ? मनात आणले तर शाहरुख प्रत्येक देशात १०००० रन करणारे प्लेयर पगार देऊन नोकरीला ठेऊ शकतो. त्यांनी परदेशात "शतके" वगैरे काढली पण त्यात काय मोठेसे ? शाहरुखही परदेशात "स्टेज शो" करत असतोच की, उलट क्रिकेटच्या १० पट जास्त गर्दी व पैसा हे स्टेज शोज खेचतात.गावसकर हे स्वतः मैदानाच्या गॅलरीत उभारुन माकडउड्या मारु शकतात का ? ते सिनेसॄष्टीतल्या "पडेल नटांचा/नट्यांचा जथ्था" घेऊन ग्राउंडवर "पेज-थ्री" पार्टी करु शकतात का ? आपल्या संघाने केलेल्या संधीच्या मातीचे समर्थन ते चाचरत पाचकळ विनोद करुन करु शकतात का ?ते करोडो रुपये देऊन विकत घेतलेले खेळाडु गल्लीतल्या पेक्षा टुकार खेळत असताना आनंदाने उड्या मारु शकतात का ? ते क्रिकेटचा फायदा घेऊन आपल्या चित्रपटांचे प्रमोशन व जमल्यास लगेहाथ प्रतिस्पर्ध्यांची (बरोबर ओळखलेत, बच्चन आणि आमीर शिवाय आहेच कोण ?) " टांग ओढु शकतात का ?ह्या प्रश्नांची उत्तरे "नाही" अशी असतील तर मग "गावसकरांना २०-२० क्रिकेट कळते" असे कसे म्हणता येईल ?


मुळात गावसकरांची तर काय चुक. हा सद्गॄहस्थ बिचारा आयुष्यभर प्रामाणेकपणे क्रिकेट खेळला, देश्-विदेशात हजारो धावांची रास रचली. त्यावेळी कसलीही शिरस्त्राणे नसताना तोफखान्यासारख्या वेगवान गोलंदाजीसमोर टिच्चुन उभा राहिला. अनेकवेळा एकहाती भारताची क्रिकेटमधली अब्रु संभाळली. त्यानंतर त्यांनी क्रिकेट ऍकॅडमी वगैरे काढुन सेवा करण्याचा प्रयत्न केला. आजही ते एक अभ्यासु आणि विचारशील समिक्षक म्हणुन जमेल तसा क्रिकेटच्या प्रगतीला हातभार लावायचा प्रयत्न करतात ...


मग चुक झाली कुठे ?

उत्तर आहे की त्यांनी २०-२० व ते ही "आयपीएल" सारखी सर्कस ह्यात लक्ष घालले.

गावसकरसर इथेच तुम्ही चुकलात ? ह्या असल्या जत्रेतल्या तमाशावर तुमच्यासारख्या महान व्यक्तीने बोलवे हेच चुकले ? मनमोहनसिंग कधी तासगावच्या पतसंस्थेच्या अपहाराबद्दल बोलतात का ? सर अब्दुल कलाम कधी तालुकापातळीवरच्या विज्ञानस्पर्धेच्या निकालात झालेल्या वशिलेबाजीविषयी आपले मत मांडतात का ? लता मंगेशकर कधी "चिंचपोकळीची गानकोकीळा" ह्या सोसायटीच्या कार्यक्रमावर टिका करतात का ? संजीव कपुर कधी ताथवडे खुर्द गावातल्या जत्रेच्या वेळी भाजीत पडलेल्या जास्तीच्या मिठाबद्दल बोलतो का ? ओबामा कधी आझमगढच्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांतील गैरप्रकाराचा निषेध करतात का ?नाही ना ? मग सर आपण कशाला असल्या "तमाशाकडे" लक्ष दिलेत ? जाऊ द्यात ना, काय करायचे ते करु द्यात ना त्यांना ...

सिंपली ईत्स नन ऑफ युवर बिसनेस ...!!!


मुळात हे "इंडियन प्रिमीयर लीग" हे डोईजड झालेल प्रकरण आहे. पॅकर सर्कसने जसे क्रिकेट बाजारु केले होते ही त्याची पुढची पायरी आहे. आता तर हे लोक ह्या देशातल्या "निवडणुकांना" ही जुमानायला तयार नव्हते, मग त्याची नक्की "लायकी" आपण काय समजायची? पैशाच्या राशी ओतुन देशोदेशीची क्रिकेटपटु इकडे आणलेत , आता त्यांच्या टकरा लावायच्या अगदी माजलेल्या वळुंच्या चालीवर, त्याची प्रचंड जाहिरात करुन ही माती सोन्याच्या भावात विकायची आणि आपल्या तुंबड्या भरुन घ्यायच्या असा हा सरळसरळ धंदा आहे. ह्यात इतके "सिरीअसली" घेण्यासारखे काही नाही. वाटले तर फारफार तर टीव्हीवर खातखात हा तमाशा बघण्याचा लायकीचा आहे ...मुळात आपण क्रिकेट बघतो का कारण त्यात खेळाडु देशप्रेमाने भारुन वगैरे खुन्नस लाऊन खेळतात असा आपला एक सर्वसाधारण समज आहे (क्रोनिये आणि अझर कंपनीने आपल्याला कधीच वेड्यात काढले आहे हा भाग वेगळा, आता तर अझर निवडणुक लढवतो आहे, म्हणजे तो क्रिडामंत्री होऊन खेळाडुंनी कसे देशासाठी खेळावे ह्यावर बौद्धिके देणार तर. चालायचेच). पण इथे "देश" आहेच कुठे ? शहरांची नावे गुंफुन ह्या देशातल्या धनदांडग्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विकत घेतलेले संघ आहेत हे. मग त्याच्यासाठी सर तुम्ही कशाला स्वतःला त्रास करुन घेताय ? खेळाडुंचे तरी काय "जिकडे खोबरे तिकडे चांगभले" असे असल्याने त्यांना कोलकल्त्याकडुन खेळले काय किंवा मुंब्राकडुन खेळले काय, काहीही फरक पडत नाही ? पुढेमागे समजा भर मैदानातच एखाद्या फलंदाजाला नोटांचे पुडके दिले तर तो बॅट फेकुन फिल्डींगला उभा राहणार नाही ह्याची गँरेंटी पुढे देणे शक्य नाही ? सगळा पैशाचा बाजार हा. त्यात अजुन लोकप्रियता कमी पडते की काय असे वाटल्याने "हरभजन" चक्क "श्रीशांतच्या" मस्तपैकी श्रीमुखात भडकावुन देतो व ह्याची व्यवस्थित जाहिरात होऊन टकरांना अजुन जास्त लोक येतात ...


आता राहता विषय राहिला ह्या संघांच्या मालकांचा.

ते कोण आहेत ?ते आहेत पक्के व्यवसायीक. जरा ह्यांची नावे तर पहा विजय मल्ल्या, शाहरुख खान, अंबानी, शिल्पा शेट्टी, नेस वाडीया + प्रिती झिंटा ...

ह्यांनी खणखणीत पैसे मोजुन संघ विकत घेतले आहेत, त्यामुळे ह्यांना वाटेल ते ते करणार. आहे कुणाची ह्यांना आडवायची हिंमत आणि नैतीक जाणीव ?

समजा उद्या विजय मल्ल्याला वाटले की द्रविडमध्ये काय दम नाही म्हनुन त्याने देवेगौडानां कर्णधार करुन सलामीला उतरवले आणि त्यांच्या जागेवर द्रविडला डुलक्या घ्यायला लावल्या तर मल्ल्यांना कोण रोखणार ?

समजा प्रिती अगर शिल्पाला आपल्या मैत्रिणींचा संघ खेळावायची इच्छा झाली तर शेन वॉर्नला शिल्पाच्या मैत्रिणींशे गुलुगुलु गप्पा माराव्या लागतील (तसा ह्याचा अनुभव ह्यात "दांडगा" आहे बरं) आणि युवराज ह्यांचे फोटो काढत हिंडेल. आहे कोणाची टाप ह्यांना जाब विचारण्याची ?

उद्या अंबानीला वाटले की आपल्या टीमने स्पोर्ट्स वेअर न घालता "सफारी" घालुन क्रिकेट खेळावे तर ह्यांना खेळावे लागेल. हरभजनला सफारी घालुन बॉलिंग करताना पहायची तुमची हिम्मत आहे का ?

समजा शाहरुखने गांगुलीला "नॉन प्लेयिंग कॅप्टन" केले आणि मैदानात फरहा खान, अर्जुन रामपाल, करन जोहर,करिना कपुर, दिपीका पदुकोणे वगैरेंची तीम मैदानात उतरवली आणि मॅच चालु असताना मध्येच करिना आणि समोरच्या तीमची प्रिती ह्यांनी भर मैदानात "झिम्मा-फुगडी" खेळायला सुरु केले तर त्यांना विचारणारे आपण कोण ?

समजा कुणी "मंदिरा बेदीला" करारबद्ध केले आणि ती तिची जगप्रसिद्ध "चोळी ( की जी प्रेक्षकांचे अंग अंग जाळी )" घालुन समजा "अंपायर" म्हणुन उभी राहिली तर का म्हणुन विचारणारे आपण कोण ?
थोडक्यात, ह्याला सिरीअसली क्रिकेटचा दर्जा दिला जावा का ?

नसल्यास, गावसकर सर तुम्ही कशाला असल्या फालतु गोष्टीत लक्ष घालता ?

सिंपली इट्स नन ऑफ युवर बिसीनेस. यु आर नॉट कर्न्सर्न्ड टु इट ऍट ऑल ...!!!


त्यामुळे शाहरुखला ४ कर्णधार खेळवु दे, नॉन प्लेयिंग कॅप्टन करु देत, गांगुलीला स्टंम्प म्हणुन उभे करु देत अथवा स्वतःचा कर्णधार होऊन मैदानात झेंडु फुटल्यागत नाचु देत. शेवटी हा "धंदा" आहे व तो कसा करायचा हे शाहरुख नक्की जाणतो व आपल्याला हे न लक्षात आल्याने व आपण क्रिकेटच्या प्रेमापोटी बोलत असल्याने असे झोल झाले आहेत ...

असो, तुर्तास; पप्पु ... सॉरी सॉरी .. किंग खान कान्ट रॉन्ग साला ...!!!

Monday, April 6, 2009

आमची गध्धेपंचविशी आणि थोडी बाष्कळ बडबड ...

परवाच म्हणजेच मागच्याच आठवड्यात (च्यायला, बघता बघता ८ दिवस झाले. अख्खे आयुष्य असेच झटपट निघुन जाणार असे दिसतेय. जाऊ देत, आयुष्यात खंत तरी किती गोष्टींची बाळगायची) बर्‍यापैकी उत्साहात आणि आनंदात आमचा वाढदिवस "घडुन" गेला. एकदाचे आम्ही २५ वर्षाचे झालो. (आयला वय जाहीर केल्याने ब्लॉगचे वाचक कमी होणार नाहीत ना ? "छोटा डॉन" हा "स्त्री आयडी" वाटत नसल्याने तशी शक्यता कमीच आहे म्हणा. असो). ह्यालाच आम्ही "गध्धेपंचविशीत आलो" असेही म्हणता येईल. आता इथे "घडुन जाणे" ह्या क्रियापदाला एक नैतिक अधिष्ठान (म्हणजे काय कोण जाणे, पण एकदाचा हा शब्द वापरला, द्या टाळी) आहे. त्याचे कसे आहे की आपले वाढते वय लपवणे हा (प्रामुख्याने) स्त्रियांचा व (आजकाल शाहरुखने फेअर & हँडसम क्रीमची ऍड केल्यापासुन) पुरुषांचासुद्धा (आयुष्यातल्या अनेक पालथ्या धंद्यापैकी एक प्रमुख) धंदा आहे. त्यामुळे वाढत्या वयाची आठवण करुन देणारा "वाढदिवस" हा बर्‍याच जणांना नकोसा झाला आहे असे आमचे विचारांती, अनुभवांती, व्यासंगांती मत झाले आहे (हा, मात्र ह्यादिवशी अभक्ष्यभक्षण व अपेयपेयपान ह्याला प्रत्यवाय नसावा). तर मुद्दा असा की वाढदिवस साजरा करणारे आपण कोणी नसतो, तो सत्यनारायणाच्या पुजेसारखा घडुन जातो. असो.

वाढदिवस नेहमीप्रमाणे चांगला थाटामाटात साजरा झाला (ह्याचा आदल्या दिवशी आमच्या गावाजवळ सापडलेल्या हजारो लीटर अवैध देशी-विदेशी मद्याच्या साठ्याशी काहीही संबंध नाही). सर्व काही सोपस्कार पुर्ण करुन आम्ही दुपारी (जेवणामुळेच्या)अंमळ सुस्तीत "चिंता करितो विश्वाची "असा चेहरा करुन बसलो होतो (ह्यालाच काही दुष्ट लोक "असा काय शुंभासारखा चेहरा करुन बसला आहेस ?" म्हणुन हिणवत होती, चालायचेच). मनात (भलत्यासलत्या) विचारांचा ( की अविचारांचा ? ) कल्लोळ उडाला होता (कदाचित ह्या "कल्लोळाचा" आवाज हा सामान्य जनांना "घोरण्यासदॄष्य" वाटत असल्याने मातोश्रींनी आम्हाला "घोरु नकोस, शांतपणे झोप" असा आमचा मुड घालवणारा सल्ला दिला असावा. चालायचेच) . बरेच काही मनात येत होते आणि विचारांचा प्रवाह हा धीरगंभीर नाद करीत आमच्याच मस्तकावर कोसळत होता. आम्ही एका निर्वाणीच्या क्षणी लॅपटॉप घेऊन ह्या उदात्त विचारांच्या निर्मळ झर्‍याला लेखणीवाटे वाट करुन द्यायचा विचार केला. पण ह्या कॄतीचा "पुर्वेतिहास" हा तेवढा प्रेरणादायी नसल्याने आम्ही हा बेत त्वरित डाव्यांच्या/मायावतींच्या पाठिंब्यासारखा मागे घेतला ( आता नको ती आठवण, मागे एकदा आम्ही आमचा ब्लॉग आमच्या आप्तांना वाचायला दिल्यावर त्यांच्या कुजकट कमेंट्समुळे आम्हाला २ दिवस रुमालात तोंड लपवुन फिरायची नामुष्की आली होती. असो). आम्ही ह्या कानाची त्या कानाला खबर न देता आमची "लेखनाची इच्छा" ही पवारसाहेबांच्या मनातल्या पंतप्रधानपदाच्या इच्छेसारखी मनात दाबुन ठेवली व वरकर्णी काही घडलेच नाही असा (कलमाडींसारखा) चेहरा करुन बसलो ....

आता हापीसात ( कुणी नसल्याने व कामही तितकेसे नसल्याने ) भयंकर रिकामा वेळ सापडल्याने आम्ही आम्ही आमचे असंबद्ध आणि बाष्कळ विचार कागदावर उतरवायचे ठरवले. प्रामुख्याने आम्ही "गध्धेपंचविशी" ह्या आयुष्यातल्या महत्वाच्या कालखंडाच्या सुलभतेच्या दॄष्टीने व अर्थात मानवतेच्या रक्षणाच्या हेतुने काही विचार मांडत आहोत. "तरुण हेच देश घडवत असतात " हे सर्वमान्य असल्याने सरकारनेसुद्धा ह्या बाबींचे विवीध पैलु तपासुन योग्य तो निर्णय घ्यावा असा आमचा आग्रह आहे ....

१. "गध्धेपंचविशीतले" तरुण हे आयुष्यातल्या महत्वाच्या कालखंडातुन मार्गक्रमण करत असल्याने त्यांच्या मार्गात फुल ना फुलाची पाकळी म्हणुन त्यांचे कामाचे तास त्वरित "अर्धे" केले जावेत तसेच विकांत हा ३ दिवसाचा करावा ...
हा महत्वाचा कालखंड आस्थापनाचे भविष्य घडवण्यात जात असल्याने तरुणाला स्वतःला घडवायची संधी मिळत नाही व पर्यायाने देशाच्या घडवणुकीवर अनिष्ट परिणाम होतो.असे "न घडलेले" तरुण आपल्या देशाचे भविष्य काय "घंटा घडवणार" ?

२. सध्या महागाई ही (पवारसाहेबांच्या गोंधळात टाकणार्‍या विधानांच्या वेगापेक्षा डब्बल) वेगाने वाढत असल्याने आजकाल "संवाद माध्यमं" महाग झाली आहेत, सबब "गध्धेपंचविशीतल्या" तरुणांना (ते काम करत असतील तर) आस्थापनातल्या फोनचा अमर्याद वापर करण्याची परवानगी असावी. मोबाईल फोन्सचे बिल प्रतिमास हे नाममात्र (म्हणजे मुंबई महानगरपालिका मुंबईतली मौक्याची जागा ज्या कवडीमोल दराने बिल्डर्स आणि कंपन्यांच्या घशात घालते त्या) दराने आकारावे ...
आस्थापनात फोनवरच्या वापराला आक्षेप घेतला तर त्याची "मानवी हक्काची पायमल्ली" ह्या गंभीर आरोपालाखाली चौकशी व्हावी (हवे तर ह्या आंदोलनासाठी सेटलवाडबाईंना त्या अजुन "पंचविशीत आहेत" असे सरकारी प्रमाणपत्र उपलब्ध केले जावे.)

३. स्वत:ला घडवण्यासाठी रात्री/अपरात्री चिंतन करीत रस्त्यावर हिंडणार्‍या "गध्धेपंचविशीतल्या तरुणांना" अडवुन त्यांना अपमानास्पद, मानहानीकारक व गंभीर प्रश्न करणार्‍या पोलीसांची बदली ही गडचिरोली/चंद्रपुरला करावी अथवा त्यांना भारताच्या सिमेवर घुसखोरांना "अडवण्यासाठी" पाठवुन द्यावे ...

४. उठसुठ "आजची बिघडलेली तरुणाई, ढासळती मुल्ये, विस्मॄतीत गेलेले संस्कार" ह्यावर तरुणांना बौद्धीके देणार्‍यांना "रासुका"खाली अटक करुन त्यांची रवानगी तुरुंगात केली जावी.

५. चॅनेल व्ही, एम टीव्ही , फॅशन टीव्ही अथवा तत्सम तरुण घडवण्यास मदत करणार्‍या चॅनेल्सला "राष्ट्रीय चॅनेल्स्"चा दर्जा दिला जावा, त्यावर अधिक प्रबोधक ( का उन्मादक ) कार्यक्रम कसे येतील ह्यासाठी एक "उच्चस्तरीय ( की हुच्चस्तरीय ) कमिटी" नेमली जावी ...

६. विवीध शितपेये अथवा मादक द्रव्ये ह्यांना त्वरित "शासकीय दुध योजनेच्या" समकक्ष आणुन त्यावर सरकारी अनुदान दिले जावे व ठिकठिकाणी ह्यांचे वाटप सुलभ व्हावे ह्यासाठी "सरकारमान्य विक्री केंद्रे" काढावीत ...
आजच्या घडीला उपलब्ध असलेल्या विवीक्षित "सरकारमान्य क्षक्षक्ष विक्री" केंद्राचा दर्जा हा (काँग्रेसपक्षापेक्षा) खालवला असल्याने त्याच्याकडे त्वरित लक्ष दिले जावे ...

७. बर्गर, पिझ्झा, पास्ता, चायनीज ह्यां जंकफुड्सना "राष्ट्रीय खाद्यान्नाचा" दर्जा दिला जावा ...स्वस्त "झुणका-भाकर केंद्राच्या" धर्तीवर सवलतीत वरील पदार्थ विकणार्‍या वस्तुंची ठिकठिकाणी केंद्रे खोलावीत ...

८. सार्वजनिक स्थळी "प्रेमलाप" करण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाच्या कॄतीला "ऐतिहासीक घोडचुक" असल्याचा दर्जा दिला जावा व ह्याचे प्रायश्चित्त म्हणुन ठिकठिकाणी "प्रेमविहार उद्याने" बांधली जावीत. चौपाटी, पुण्यातला झेड ब्रीज सारख्या स्थळांना "कपल्स ओन्ली" म्हणुन आरक्षित केले जावे ...

९. "टाईम्स ऑफ इंडिया" ह्या अग्रगण्य वॄत्तपत्राने त्यांच्या प्रमुख आवॄत्तीचा आकार ३२ पानांवरुन ४ पानी करावा व त्या बदल्यात "पुणे/मुंबई/बेंगलोर टाईम्स" ह्या आवॄत्यांच्या पानांची संख्या ४/६ वरुन ३६/४० वर न्हेली जावी ....

१०. तरुणांच्या फॅशनेलबल, झकपक, मॉड अशा असलेल्या वरंतु फाटक्या, ढिगळे लावलेल्या अशा अल्पवस्त्रांवर उर्फ शॉर्ट्सवर नाके मुरडणार्‍यांना "तालिबानी" ठरवुन त्यांची रवानगी अमेरिकेच्या "ग्वाटेनामोच्या तुरुंगात" केली जावी ...

११. आजकाल पळुन जाऊन लग्न करणे ही बर्‍याच जणांची सामाजीक व मानसीक जबाबदारी बनल्याचे व ह्यातुन त्यांना बराच सामाजीक, मानसीक व काही अंशी शारिरीक त्रास सहन करावा लागतो असे आमच्या लक्षात आले आहे.म्हणुन आम्ही अशा जोडप्यांना किमान "पद्मश्री" हा सन्मा दिला जावा व त्यांना त्रास देणार्‍यांना "रासुका" लावावा ही सुधारणा सुचवत आहोत ...
(अक्षयकुमारला जर पद्मश्री मिळत असेल आणि वरुण गांधीला जर रासुका लागत असेल तर उपरोक्त गोष्टी अशक्य नाहीत असे आमचे मत आहे.)

१२. पॅरीस, ऍमस्टरडॅम, लंटन, काश्मिर, कुलु मनाली, उटी यासारखी स्थाने "केवळ तरुणांसाठी" म्हणुन आरक्षित केली जावीत. इथे तरुणांच्या "सवलतीत" अथवा जमल्यास "सरकारी खर्चाने फुकटात" सहली आयोजीत कराव्यात ...
ह्यासाठीचा आवश्यक असणारा पैसा हा अनेक मंत्रीमहोदयांच्या सर्दी-पडश्याचा इलाज हा "न्युयॉर्कला सर्जनकडुन" न करता "मौजे पिंपळवाडीच्या वैंदुकडुन" केला तर सहज उभा रहाण्यासारखा आहे ...

१३. बॉली/हॉलीवुडमध्ये वयाच्या २७ व्या वर्षानंतर पुरुषांना व २५ नंतर स्त्रियांना सक्तीची निवृत्ती द्यावी. नव्या "दमाच्या" पिढीला संधी ही मिळायलाच हवी.सिनेमागॄहात जमल्यास सर्व सीट्स ह्या "कॉर्नर सीट्स"मध्ये बदलुन घ्याव्यात, हवी असल्यास त्यात आस्थापनात असतात तशी क्युबिकल्स उभारण्यास प्रत्यवाय नसावा ...
तिकीटांची "विक्री" न करता त्यांना "स्वागतमुल्य" ठेवावे, ज्याची जेवढी इच्छा आहे तेवढे दान तो टाकेल ...
(तसेही पैसे देऊन पहाण्याचे लायकीचे चित्रपट निघतात कुठे ? शिवाय पैसे देऊन थेट्रात खास शिन्माच पहातो कोण ? )
*********************

तुर्तास इतकेच, बाकी आठवेल तसे.
गध्धेपंचविशीतल्या तरुणाईचा जय हो ....!!!