Thursday, February 26, 2009

स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया ...

स्लमडॉग मिलेनियर ह्या चित्रपटाला ऑस्कर मिळाले हे सर्वांना माहित आहेच, त्यावर गेले 4 दिवस टीव्हीवर रतीब चालु आहे ...
पण काही "मान्यवरांच्या " खर्‍याखुर्‍या मनातल्या प्रतिक्रीया जाणुन घेण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली व ह्याबद्दल चर्चा केली. आमचे कॉन्टॅक्ट्स व कनेक्शन्स लै भारी असल्याने आम्हाला हे शक्य झाले ...पहा बर कोण काय काय म्हणते ते ...


डिस्क्लेमर : हे काल्पनिक व विरंगुळा आहे हे सांगायलाच नको, उगाच त्यावरुन डोक्याला त्रास नको.

==================================

* आर्य चाणक्य :
मुळात स्लमडॉगला ऑस्कर मिळाले नसते तर त्याच्या यशस्वीतेला धोका होता, अनेक कारस्थाने रचुन का होईना ऑस्कर मिळणे महत्वाचे होते. ऑस्कर न मिळणे म्हणजे भारतीय पार्श्वभुमीवर बेतलेल्या चित्रपटाच्या व पर्यायाने त्यामधल्या कलाकारांच्या कारकिर्दीला धोका, म्हणजेच संपुर्ण चित्रसॄष्टीला धोका, एकंदर करमणुकीला धोका, सामाजीक स्वास्थ्याला धोका , संपुर्ण प्राणीमात्रांना धोका ...असे चालु राहिले तर काळाच्या ओघात माणुस ही जमात नष्ट होण्याचा धोका ...!

* लोकमान्य टिळक :
स्लमडॉगने ऑस्कर मिळवणे ह त्यांचा जन्मसिद्ध हक्क होता आणि त्याने तो बजावला ...मी मुळात स्लमडॉग हा सिनेमाच पाहिला नसताना त्याच्यावर प्रतिक्रीयांची टरफले मी का टाकु ?

* न्यायमुर्ती रानडे :
ऑस्कर मिळवणे ही स्लमडॉगची आर्थीक, सामाजीक, मानसिक व सैद्धांतिक गरज होती. आपल्याला फक्त त्यांनी सरळ मार्गाने ऑस्कर मिळवले आहे का हेच पहायचे आहे. अन्यथा त्याची योग्य ती न्यायालयीन चौकशी देशातल्या संविधानाच्या सन्मानासाठी होणे आवश्यक ठरते.

* महात्मा गांधी :
स्लमडॉगने ऑस्कर मिळवताना कसलाही कायदेभंग केला नाही अथवा असहकाराचा नारा दिला नाही. भुतलावर निर्माण होणार्‍या प्रत्येक चित्रपटाला ऑस्कर मिळणे हाच प्राणीमात्रांच्या जीवनातील एका अद्भुत घटनेचा एक सुंदर अविष्कार असेल.मात्र शांततामय मार्गाने व सविनयाने काढलेला कुठलाही चित्रपट हा तुम्हाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याचा आत्मानंद देईल.

* शाहु महाराज :
इथे जेव्हा प्रत्येक्षात मुंबईमध्ये झोपडपट्टीत कुत्र्यासारखे जीणे जगणार्‍या माणसाची तुम्हाला किंमत नाही तर आम्ही त्या दिडदमडीच्या स्लमडॉग सिनेमाने ऑस्कर मिळाले ह्याची कशाला पत्रास ठेवायची ?

* जवाहरलाल नेहरु :
स्वतंत्र भारतात निर्माण होनार्‍या कुठल्याही सिनेमाला ऑस्कर मिळवण्याचे पुर्ण स्वातंत्र्य आम्ही घटनेद्वारे त्यांना बहाल केले आहे. शिवाय त्यात लहान मुलांनी उत्तम काम केले आहे असे ऐकुन आहे.लहान मुले म्हणजे देवाघरची फुले.

* अटलबिहारी वाजपेयी :
स्लमडॉगने ऑस्कर मिळवणे हेच "इंडिया शायनिंग" आहे, सध्या मी ह्याच परिस्थीतीवर आणि पर्यायाने देशाच्या उदात्ततेवर कविता करत आहे, लवकरच काव्यसंग्रह प्रसिद्ध होईल.

* लालकृष्ण आडवाणी :
हुं, त्यात काय विषेश ?मी एवढी रथयात्रा केली, १०० ठिकाणी झोपडपट्टीतुन हिंडलो, अनेक ठिकाणी रथ अडवला गेला तेव्हा कुणी आमचे कौतुक केला का ? उलट मी "जीनांचे" नाव घेतल्यावर सर्व बाजुंनी टिका झाली.
असो. हे माझे वैयक्तीक मत आहे.
पक्षाचे जे काही धोरण आहे त्याप्रमाणे जावडेकर प्रतिक्रीया देतील.

* अर्जुनसिंग :
मिळाले का ? बरे झाले ..!
नाही तर मी म्हणतच होतो की "ऑस्करवाल्यांनी बाहेरच्या देशात चित्रीत झालेल्या / बेतलेल्या चित्रपटांना त्यांच्या मुळ कॅटॅगिरीत आरक्षन ठेवावे" म्हणुन...

* शरद पवार :
पक्षाच्या व सरकारच्या धोरणात बसते का नाही ते पाहुन व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन योग्य ती प्रतिक्रीया द्यावी लागेल. तसाही चित्रपट उद्योग हा भारतातील सहकार व व्यापार क्षेत्रातील एक महत्वाचा घटक आहे, तळागाळ्यातल्या सर्वसामान्य गोरगरिब जनतेच्या मनोरंजनाचा तो एक मार्ग आहे.
सध्यातरी सर्व पर्याय खुले आहेत एवढेच सांगतो.

* बाळासाहेब ठाकरे :
जय महाराष्ट्र , मुंबईतल्या मराठी माणसांच्या प्रयतनातुन उभारल्या गेलेल्या स्लमडॉग ह्या चित्रपटाला ऑस्कर हे मिळायलाच हवे. कसे मिळत नाही तेच बघतो. माझा कडवट शिवसैनिक आदेशाची वाट पहात आहे.
बर्‍या बोलाने दिलेत ते उत्तम. अन्यथा तुमच्यासारख्या पोटार्थी, भिकारड्या, नेभळट, पुचाट व गांडुळासारख्या औलादीला कसे वटणीवर आणायचे ते आम्हाला चांगलेच माहित आहे.
कानात सांगुन कळत नसेल तर कानाखाली वाजवुन समजवावे लागेल ...

* मनोहर जोशी :
स्लमडॉगला ऑस्कर मिळाले ही घटना अथवा तो चित्रपट मी प्रत्येक्ष पाहिला नाही. परंतु माननीय बाळासाहेबांच्या आदेश व परवानगीशिवाय हा चित्रपट निघणे व त्याला ऑस्कर मिळणे ह्या घटना शक्य नाही हे मी निश्चितपणे सांगु इच्छितो.

* सोनिया गांधी :
हा महात्मा गांधींचा, श्रीमती इंदिरा गांधींचा, राजीवजींचा व त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन आमच्यामागे व पर्यायाने स्लमडॉगमागे उभे राहणार्‍या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे.

* सुशीलकुमार शिंदे :
हॅ हॅ हॅ, स्लमडॉगला ऑस्कर मिळाले काय ? हॅ हॅ हॅ.
सर्वात प्रथम स्लमडॉगसारख्या तळागाळातल्या व मागास वर्गाचे चित्रण दाखवणार्‍या चित्रपटाला पाठिंबा देऊन त्यांना संधी देण्याबद्दल सोनिया गांधींना धन्यवाद.हा स्लमडॉगचा सन्मानच आहे.

* राज ठाकरे :
स्लमडॉग सारख्या हिंदी-इंग्रजी भाषा असलेल्या मिश्र चित्रपटाला ऑस्कर मिळणे म्हणजे इतर भाषांना कानफाटीत देणे नव्हे.महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट "मराठीतच" दाखवला गेला पाहिजे व त्याला धनदांडग्या परप्रांतियांच्या मल्टीप्लेक्समध्ये "प्राईम टाईम" मध्ये दाखवले गेले पाहिजे, कसे दाखवत नाही ते मी बघतोच ...!

* अमर सिंग :
ऑस्कर पुरस्कार हे काय फक्त अमेरिकेत चित्रपट काढणार्‍यांचे बापजादांचे आहेत काय ?
स्लमडॉगलासुद्धा तिथे सन्मानाने राहता आले पाहिजे, घटनेत तसे उल्लेख आहे ...
वेळ पडल्यास आझमगडहुन २०००० माणसे आणतो पण अमेरिकेतल्या प्रत्येक थेटरात स्लमडॉग झळकवतोच.बघु कोण आडवे येते ते ...

===================================

* पुर्वप्रकाशित : मिसळपाव.कॉम .... स्लमडॉगला ऑस्कर आणि मान्यवरांच्या प्रतिक्रीया.

Wednesday, February 11, 2009

तुम्हाला आंतरजालावरचा प्रसिद्ध प्रतिसादकर्ता व्हायचे आहे काय ? ...भाग-२

तर मंडळी आता आम्ही आमच्या लेखाचा दुसरा भाग मोठ्ठ्या आनंदाने, उत्साहात आणि नेहमीच्याच जोशात प्रसिद्ध करत आहोत. पण पहिला पार्ट कुठे आहे असे विचारुन आम्हाला अडचणीत नका आणु.पहिला भाग म्हणजे तुम्हाला आंतरजालावरचा प्रसिद्ध प्रतिसादकर्ता व्हायचे आहे काय ? ...भाग-1 हा तुम्ही वाचला असेलच.
असो.
तर आमच्या मागच्या लेखाप्रमाणे ह्या भागात सुद्धा नवोदितांनी मिपावर सुप्रसिद्ध प्रतिसादकर्ता होण्यासाठी प्रतिसाद कसे लिहावेत ह्यासंबंधी " ४ शब्द" लिहणार आहोत. ( कोण आहे रे तो किबोर्ड बडवुन हासणारा ?, काहीही करतात लेकाचे. )
३. जनातलं - मनातलं :
जनातलं-मनातलं म्हणजे हलकफुलकं लेखन ज्यात कव्य, जडबंबाळ चर्चा यांना व्यवस्थीत काट मारुन मस्तपैकी कथा, ललित लेख, अनुभव, किस्से, स्फुट वगैरे लिहतात तेच. आता आले ना लक्षात हे म्हणजे नक्की काय ते, थोडक्यात नाव जरी लै भारी असले तरी हा प्रकार अगदीच साधासुधा व गोरगरिबांचा आहे. जर तुम्ही सुक्ष्मात जाऊन निरीक्षण केलेत तर तुम्हाला आंतरजालावरच्या दर ३ लेखामागे १ लेख हा "जनातलं मनातलं " ह्या सदरात आल्याचे दिसेल, थोडक्यात हा भाग महत्वाचा. बर्‍याच वेळा आपला लेख नक्की "काथ्याकुट / कविता / आणखी काही " ह्या पैकी कशात मोडतो हे ( वेळीच ) लक्षात न आल्याने बरेच लोक तो थम्ब रुलप्रमाणे "जनातलं मनातलं" ह्य सदरात बिनधास्त टाकुन देतात. असो. ह्यावर कसे प्रतिसाद द्यावेत ह्याचेसुद्धा मी थोडे वर्गीकरण केले आहे.

जर लेखन "कथा" ह्या वर्गात मोडत असेल तर प्रतिसाद देण्याच्या व्याख्या थोड्या भिन्न आहेत. पहिल्यांदा ( जमल्यास ) कथा वाचुन ती नक्की कसली आहे ह्याचा निर्णय करावा. म्हणजे ती भयकथा आहे की सिरीअस आहे की विनोदी आहे की विडंबन करुन कुणाच्या टोप्या उडवणारी आहे ह्याचा निर्णय करुन घ्यावा. नाहीतर काय होते एखादी "भयकथा" असते आणि त्याला तुम्ही चुकुनच " व्वा, काय टोप्या उडवल्यात , हसुन हसुन खुर्चीवरुन पडलो " असा प्रतिसाद देऊन बसता व त्या बिचार्‍या लेखकाचा चेहरा कथेतल्या भुतापेक्षा भयानक होऊन बसतो. तर काळजी महत्वाची हे लक्षात आलेच असेल.
जर कथा ही विनोदी असेल तर तुमचे काम सोपे होते, फक्त " अशक्य , ठ्ठ्या ऽऽऽऽऽ , फु ट लो , आग्गायायाया ऽऽऽ , कळफलकावर + मॉनीटरवर वर कॉफी सांडली , खुर्चीवरुन पडलो , हसुन हसुन मेलो " अशी ५-६ आतिशयोक्तीपुर्ण वाक्ये जवळ बाळगावीत. पण फक्त एवढेच लिहुन प्रतिसाद पुर्ण होत नाही, त्या लेखातीलच २-४ वाक्ये निवडुन ती आहे तशी आपल्या प्रतिक्रीयेत टाकुन त्याखाली वरील तुकडे वापरल्यास प्रतिसादाला "वजन येते" असा अनुभव आहे. सम्जा जर वाक्ये सुचली नाहीत तरीही काळजी नाही, नुसत्या "लोळुन लोळुन हसलो ह्या अर्थाच्या" स्मायली टाकल्या तरी काम भागते. ह्यातलेसुद्धा काहीही करायचा कंटाळा आला असेल तर एखादी भलीमोठ्ठी प्रतिक्रीया निवडावी ( ह्या देणार्‍यांची संख्या मोप आहे, फिकर नॉट ) आणि त्यालाच "असेच म्हणतो , +१ " असा प्रतिसाद टाकुन मोकळे व्हावे ( मात्र ह्याला आम्ही कर्मदरिद्रीपणा म्हणतो. असो ).

जर लेखक एखादा "आंतरजालावरील थोर व्यक्ती " असे तर मात्र " व्वा , भाईकाकांची आठवण आली ( पुलं म्हणणे म्हणजे घोर पाप बरे का. ) , चिंवी जोश्यांची शैली वाटते , हा प्रकार तुम्हाला चांगला जमतो " वगैरे लिहावे लागते, नाहीतर तुमच्या प्रतीक्रीयेला काडीइतकी किंमत नाही, तुम्ही नाही लिहले तर अजुन दुसरे कोणीतरी लिहतेच व लोक त्याला "सहमत आहे" असा उपप्रतिसाद देत राहतात, म्हणुन "स्टाईकर्स ऍडव्हान्टेज " कधीही सोडु नये ...
जेवढा मोठ्ठा प्रतिसद तेवढे तुम्ही जास्त फेमस हे लक्षात आले मग पुढे काही अवघड नाही.

जर कथा ही भयकथा "कॅटेगिरी" तली असेल तर मामला जरासा कठीण आहे, ह्यांना प्रतिक्रीया देण्यासाठी अभ्यास लागतो. नुसत्या " भयानक, दरदरुन घाम सुटला , सरसरौन काटा आला अंगावर , कच्चकन दचकलो " ह्या अगदीच सर्वसामान्य प्रतिक्रीया झाल्या. जर आपली छाप जमवायची असेल तर उगाच आपलं लेखकाची एखाद्या "प्रसिद्ध भयकथा लेखकाशी " तुलना करणे आवश्यक ठरते.
उदा : शेवट जरा मतकर्‍यांसारखा (उल्लेख असाच करावा, जर तुम्ही "रत्नाकर मतकरी यांच्यासारखा" असे लिहलेले तर तुम्ही नवशिके आहात हे आंतरजालावरचे पोरटे सुद्धा ओळखेल ) केलेला वाटतोय, पण व्यवस्थीत जमते आहे तुम्हाला....किंवा... तंतोतंत धारपच, मला वाटतं त्यांची "अखेरचा प्रमाद ( म्हणजे काय कुणास ठाऊक ? ) " ही कथा ह्याच अंगाने जाते...किंवा... ते त्या "मुडदे की जान खतरे मे है / सुखी नदीं मे बहती हुई लाश" मधल्या कथानकासारखे वाटते नाही ?
असे प्रतिसाद टाकणे आवश्यक बनते, म्हणाजे काय होते की लेखकाच्या अंगावर मुठभर मास चढुन तो आपला सुमडीत "हॅहॅहॅ, कसेच कसे. त्यात शेवटी माणुस मरुन भुत होत नाही तर भुताला उ:शाप मिळुन त्याचा माणुस होतो व ते दोघे लग्न करतात " असे स्पष्तीकरण देत बसतो, तुम्ही आपलं " हम्म, पण शैली तशी वाटली बॉ,असो." असा ठेका सोडु नका ...
हे एकदा जमले की झालेच ...!

तिसरा प्रकार आहे तो म्हणजे "मुक्तक अथवा सिरीअस लिखाण " करणार्‍याचा ...
महत्वाची सुचना : वर दिलेल्या "शँपल प्रतिक्रीया / सल्ला " ह्याचा वापर इथे अजिबात करु नये. ह्याचा साज पुर्ण वेगळा आहे. नेहमीप्रमाणे ( जमल्यास ) पुर्ण कथा वाचुन काढावी, शक्यतो हा प्रकार "मान्यवर व जाणाकार" व्यक्तीच हाताळत असल्याने ह्यांच्या लेखाला वजन असते, उगाच फालतु प्रतिक्रीया इथे टाकल्यास तुमच्यावर "बदनाम " व्हायची दुर्दशा येऊ शकते.सर्वसाधारण अशा लेखाला " सलाम ..! , केवळ अ प्र ति म , खल्लास वगैरे वगैरे " प्रतिक्रीया प्राथमीक अवस्थीत टाकता येतील. पण आता तुम्ही जम बसवायचे ठरवल्याने तुम्हाला हे अलाऊड नाही.
आता तुम्ही थोडाश्या कलात्मक, नाजुक व साहित्यीक प्रतिक्रीया टाकाव्यात अशी अपेक्षा असते. म्हणजे बघा की " जणु रणरणत्या वाळवंटातुन जाताना एकदम गार वार्‍याची झुळुक अंगावर आली असे वाटले , लेख वाचताना प्रयत्नाने आवरुन ठेवलेला अश्रुंचा बांध शेवटच्या परिच्छेदामुळे अनिर्बंध वहात गेला , ह्या उत्सवात अक्षरश: बेहोश होऊन न्हाऊन निघालो , खांडेकरांच्या कलात्मकतेच्या आणि हळुवारपणाच्या अंगाने कथा वहात जाते , आसपास चाललेल्या कल्लोळातसुद्धा एकदम सुन्न होऊन गेलो " अशा व तत्सम प्रतिक्रीया टाकणे आवश्यक ठरते. जेवढे जास्त "अनाकलनीय" लिहताल तेवढेच जास्त वजन पडते. साध्या सरळ प्रतिक्रीयेला जास्त भाव मिळत नाही. असो.

अजुन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे काही वेळेला लेखकाचे " अप्रतिम बॉस , आत्तापर्यंत लेखणी का म्यान केली होतीत ? / रुद्ध प्रतिभा भरभरुन वाहु देत / तुमचे नाव वाचले आणि लेख वाचायला घेतल, नेहमीप्रमाणे निराशा झाली नाही. " वगैरे वगैरे प्रतिक्रीया टाकाव्यात, ह्याला समर्थन तर मिलतेच शिवाय तुम्ही लेख्काच्या "बडी लिस्ट" मध्ये जायला मोकळे होता.

शेवटचा "अनकॅटेगराईझ्ड प्रकार " म्हणजे उगाच आपले काहीही लिहणार्‍यांचा, ते आपले उगाच " पुण्यात गादी कुठे मिळेल ? पंखा कुठे दुरुस्त करायचा ? सगळ्यात भारी शेवपापडी /अनारसे कुठे मिळतात ? संघाने चालवलेला गांधीवाद . सलमानने कत्रिनाला काय म्हटले " अशा विषयांवर काहीबाही खरडतो तो, ह्याला विषयांचे बंधन नाही, तुम्ही काहीही लिहु शकता.ह्याला जास्त भाव मिळत नसल्याने "तुम्ही ह्याकडे ढुंकुनही न पहाणे योग्य" ठरेल. तिकडे फिरकुच नका.
उलट आपल्यासारख्याच एखाद्या पप्रथितयश प्रतिसादकर्त्याचा खरडवहीत "काय फालतुपणा चालला आहे, अक्षरशः उबग आला आता , आयला गिरणी लावल्यासारखे लेख पाडतात " अशा पिंका टाकुन द्याव्यात, आपली चर्चा मस्त रंगते व "भोचकपणे आपल्या खव वाचणार्‍यांना" आपण फार "अभिरुचीसंपन्न, चोखंदळ, साहित्याचे खरे वारसदार, गुणग्राहक " वगैरे असल्याचा उगाच गैरसमज होतो व आपली "इज्जत वाढते" , मग हा "गैरसमज" हळुहळु पसरवायला हीच मंडळी मदत करतात. मधुन आधुन त्यांच्याही खरडवह्यात "काय मग, काय नवे लिखाण ? " असे लिहुन यावे त्यावर रिप्लाय म्हणुन " बस का मालक, चेष्टा करता का गरिबाची ? आम्ही कसले लिहणार , आम्ही तर तुमचे फॅन. बोला कधी लिहताय ? " अशी खरड आलीच म्हणुन समजा. त्यावर उत्तर म्हनुन फक्त " लवकरच, सध्या थोडा बिसी आहे, मनासारखे लिहायला निवांत वेळ पाहिजे हो " असे ठोकुन द्यावे. म्हणजे पुढ्च्या वेळी तुम्ही काहीही लिहले तरी "ह्यांचा तुमची तोंड फाटुस्तोवर स्तुती" करणारा प्रतिसाद नक्की ...

४. कलादालन :
हा एक नवा प्रकार मिपावरच प्रथम अस्तित्वात आला आहे, अजुन नाविन्य असल्याने तुम्हाला हात चालवायला बर्‍याच संधी आहेत. पण इथे मात्र फक्त फोटाँवर प्रतिक्रीया द्यायची असल्याने फाफटपसारा चालत नाही, मुद्द्याचे बोलावे लागते. आता हे कसे जमवावे ते सांगतो.नेहमीप्रमाणे टारुबाबाने सांगितल्याप्रमाणे "फो टू के व ळ अ प्र ति म , ४ नंबरचा फोटू झकास आला आहे , डोळ्यचे पारणे फिटले, डेस्कटॉपवर लावला आहे, मस्तच " ह्यासारख्या प्रतिक्रीया टाकुन ठेवाव्यात.

आता महत्वाचा मुद्दा, प्रत्येक प्रतीक्रियेच्या खालीच लगेच "अवांतर " ह्या सदराखाली आपला मोठ्ठेपणा, शहाणपणा , गर्व दाखवणार्‍या कमेंट्स द्याव्यात. जसे की
"सेटिंग काय लावले हो ? नाही , जराशे दुसर वाट्तात फोटो, आय एस ओ ४००० वापरले असते तर अजुन ब्राईट आले असते. असो."
"लेन्स कुठली हो ? फोकस कसा मारलात ? जरा अजुन क्लोजअप हवा होता असे वाटते."
"जर फ्लेश वापरला नसता तर एक नैसर्गीक तजेला आला असता ..."
"शटर स्पीड थोडे जास्त झाले असे वाटते, एवढ्या प्रकाशाला थोडे कमीच वापरा पुढ्च्या वेळी ..."
ह्या प्रतिक्रीया ठोकल्या की तुम्ही म्हणजे अगदी जगप्रसिद्ध फोटोग्राफरचा आव आणायला रिकामे. लोक सुद्धा ह्यावर मनोसोक्त भांडतात. बिचारा लेखक सुद्धा आपल्याला "टेक्नीकल डिटेल्स्ची" काडीइतकी माहिती न्सल्याचे मान्य करतो व तुम्हाला सांगायची विनंती करतो. तुम्ही मात्र " हम्म, सांगायला हरकत नाही तसे, पण सध्या एवढा मोठ्ठा लेख लिहायला वेळ नाही, बघतो सवडीने " असे ठोकुन द्यावे. लोक वाट बघत बसतात पण कुणी विचारायची हिंमत करत नाही. थोडक्यात तुम्ही जिंकलात स्पष्टपणे ....

अजुन एक प्रकार म्हणजे "फोटोम्च्या स्थानावर / लोकेशन वर कमेंट्स" द्यायच्या ...
उदा :
" का हो तिथल्या डाळिंबच्या बागा अजुन तशाच आहेत का ?"
"आम्हाला आमच्या ट्रीपची आठवण झाली, तुम्ही ज्या दगडाचा फोटो दिलात त्यावरुन पडुन माझा कपाळमोक्ष होता होता वाचला होता."
"आयला, डोंगर अजुन तशेच्या तसेच, मी गेलो होतो ४० वर्षापुर्वी, कमाल आहे."
"त्या ट्युलिप्सच्या फुलांचा ज्युस / मोरांबा मिळतो त्या शेडच्या मागे, घेतलात का ?"
"तुम्ही नशिबवान खरे, आम्ही गेल्या वेळी गेलो होतो तेव्हा तेथे चक्क बर्फ होता, मग आमच्या हीने / ह्यांनी त्यावरुन स्कीईंग करता करता पाय मोडुन घेतला होता. असो."
"त्या राजवाड्यची मागची पडकी विहीर पाहिलीत का ? अप्रतिम आहे बॉस .... "
असे जर तुम्ही बोललात तर लोक तुमच्याकडे "काय दर्दी माणुस आहे ?" ह्या नजरेने पाहतील. शिवाय तुम्ही गेलाबाजार निम्मे तरी जग हिंड्ला आहात हे १० लोकात सिद्ध होते. शिवाय तुम्हाला ह्यांची फारच माहिती आहे असा "गैरसमज" भराभर पसरुन तुमचे नाव होते.मग लोक तिकडे जाताना तुम्हाला विचारतात " शेठ, चाल्लो आहे मसणात, काय काय पाहुन घेऊ, तुम्ही अनुभवी लोकं म्हणुन तुमचा सल्ला घ्यावा म्हटले" ...
अशा प्रकारे हा हा म्हणता तुम्ही ह्या प्रकारात "दादा" म्हणुन ओळखले जायला लागता ....

Tuesday, January 27, 2009

मी "स्थानीक की परप्रांतीय " ??? - आपण सारेच अर्जुन ...

हा काही लेख वगैरे नाही, गेल्या काही वर्षातील अनुभवांच्या आधारावर माझ्याच मनात आलेल्या ह्या मुक्त भावना आहेत, ह्याला फारतर मुक्तक किंवा बाष्कळ बडबड असे नाव देता येईल.

पुण्यात" स्थानीक" असणारे मराठी मन ....
बेंगलोरमध्ये "परप्रांतीय" असणारे मराठी मन ....
.
.
आज पुण्यात एका नव्या कंपनीत जॉइन झालो, नवे नवे लोक भेटले, बॉसने टीमशी ओळख करुन दिली. अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडले तर सगळे "आपले" लोक आहेत. बाकीचे जे "उपरे" आहेत ते काही जास्त नादी लागत नाही ह्यांच्या असे दिसतेय. गेले उडत साले, मरणाचे शिष्ठ व अतिशहाणे आहेत, आपण आपल्या लोकांशी जुळवुन घेतलेले बरे. बॉससुद्धा मराठी आहे हे बेश्ट झाले, आता जास्त अडचण होणार नाही. आपल्या लोकांबरोबर, आपल्या भाषेत काम करताना कस्सं मोकळंमोकळं वाटतेय.....
शेवटी एकदा आलो बेंगलोरमध्ये, च्यायला ह्या "अंडुगंडु गुडगुडु" च्या भाषेच काम जरा अवघडच दिसतेय, कसं जमणार हे देवाला ठाऊक. आज कंपनीत जॉइन झालो, च्यामारी सगळी कोंगाडी जनता भरली आहे. बॉसही कानडीच आहे, साल्याने बरोबर आपले आपले लोक खेचुनघेतलेत. असो. बाकी "हिंदी भाषीक" ३-४ जण आहेत हे एक चांगले झाले, जरा त्यंच्याबरोबर मिक्स होता येईल. ह्या कन्नडिगांचा ग्रॄप एकदम सॉलीड दिसतोय, खायला-प्यायला-गप्पा मारायला सगळे कसे मिळुन मिसळुन असतात, गेले उडत, कुणाला व्हायचयं त्यांच्यात मिक्स ?
=============================================

आज मिटिंगमध्ये बॉस सगळ्यांना नवे काम समजावुन सांगताना बहुतेक अनावधनाने सलग ५-६ वाक्ये मराठीत बोलला, मला काही प्रॉब्लेम नाही झाला पण हे "भय्ये" लगेच उठुन " हमें समझा नहीं, हिंदी मे या तो अंग्रेजी मे बतावो " असे म्हटले, साले एक नंबरचे हलकट आहेत, गेली १-२ वर्षे पुण्यात आहेत मग २-३ वाक्ये समजायला काय प्रॉब्लेम आहे ? का शक्य तिकडे आपला "उपरेपणा" दाखवायलाच हवा ? आता ह्यांची चांगलीच ताणली पाहिजे. बोस बिचारा सज्जन, त्याने माफी मागुन पुन्हा इंग्लिशमध्ये समजावले ....
आयला हे दाक्षिणात्य लोकं आहेत की भिंताडं, साला मिटिंगमध्ये सुद्धा आपल्याच भाषेत बोलतात, कंपनी काय ह्यांच्या घरची आहे काय ? नाही, भाषेबद्दल जाज्वल्य अभिमान वगैरे असायलाच हवा पण कॉर्पोरेट जगतात मात्रॄभाषाच बोलणार म्हणुन कसे चालेल ? आता ह्यांच्यासाठी मी कन्नड शिकायची का ? ते काही, आत्ता लगेच उठुन स्पष्ट बोलले पाहिजे.च्यामारी, चांगले सज्जनपणे "कन्नड येत नाही" हे सांगितले तर एकेकाच्या चेहर्‍यावरचे भाव कसे बदलले पहा, जळके आणि आत्मकेंद्री साले.....
==============================================
आज मित्रांबरोबर जंगली महाराज रोडवरच्या मॅक्डी मध्ये जेवायला गेलो. तिथल्या काउंटरवरच्या बाहुलीने डायरेक्ट हिंदीत बोलायला सुरवात केली , एक मित्र जरा सायकीक आहे, त्याने काउंटरवर जाऊन डायरेक्ट मराठी सुरु केले, तिला काही समजेना हा काय बोलतोय ते, हा शहाणा मराठीवरच अडुन बसला, शेवटी बाबापुता करुन त्याला बाहेर आणला. असो. पण महत्वाचा मुद्दा असा की मराठी प्रांतात हॉटेल काढत असताना मराठी भाषा येणारे कर्मचारी भरती करणे हे कंपनीचे कर्तव्य नाही का ? "हिंदी" ही काय महाराष्ट्राची राज्यभाषा अगर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे काय ? ह्यांचे काही तरी करायला हवे ....
आज जेवायला फोरममधल्या "पिझ्झा हट"ला गेलो होतो, च्यायला डायरेक्ट डोक्याला शॉट निघाला. गर्दी होती म्हणुन आधी ऍडव्हान्स बुकिंग करायला एक माणुस बाहेर उभा होता. अहो आश्चर्यम , त्याला "हिंदी" येत नाही. त्या शहाण्याने फक्त "कन्नडमध्येच" बोलेन असा नववर्षाचा प्रण केला असावा. शेवटी जास्त वाद नको म्हणुन "इंग्रजीत" बोलुन विषय संपवला. पण मुद्द्याची गोष्ट अशी की पिझ्झा हट सारख्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने "इंग्रजी अथवा राष्ट्रभाषा" बोलणारे लोक प्राधान्याने नौकरीला ठेवणे जरुरीचे नाही का ? सर्वांनाच कशी स्थानीक भाषा येईल ?
==============================================
च्यायला कंपनीतल्या रुपालीला डोक्याचा भाग नाही, एवढी मराठी पब्लिक असताना ही त्या भैय्या "संजय त्रिवेदी" बरोबर फिरते आहे. आमचं एक सोडा हो पण इतर मराठी पोरं काय मेली काय ? च्यायला फुकट डोक्याला शॉट निघतो असे काही पाहिले की, हे साले भैय्ये कामापुरती जवळ करतील तिला, नंतर मग कोण तु असे विचारायला कमी करणार नाहीत. छे, रुपालीला सांगायलाच हवे ही, पण ती तर कुठे मराठी पब्लिकमध्ये मिसळते, तिला तेच हवे आहेत. मरु देत
हापीसातली "सौम्या" भारी आहे राव, आजकाल जरा जास्तच आपल्याबरोबर फिरत आहेत. गप्पा मारायला, टीपी करायला, बरोबर जेवायला एकदम स्सह्ही कंपनी सापडली. पण बाकी कन्नड पब्लिक आमच्याकडे असं मारक्या म्हशीच्या नजरेने का पहात असतं ? जळतात साहे, त्यांना सौम्या काडीइतका भाव देत नाही ना म्हणुन.तिला आज विचारलं की "बै, बाकीचं कन्नड पब्लिक बोंबलतं का ? " म्हणुन, ती म्हणाली काहीच काळाजी नकोस करु, ती ह्या गोष्टींना किंमत देत नाही. असं पाहिजे राव, माणुस जोडणे महत्वाचे, आपापल्या लोकांबरोबरच रहायचे असा हट्ट म्हणजे कठिणच आहे. सौम्या एकदम "उच्च विचाराची आणि फ्री माईंडेड " आहे बो, आपण मानलं ....
==============================================
राजसाहेब म्हणतात ते करेक्ट आहे, काय प्रॉब्लेम आहे स्थानीक भाषेत दुकानांच्या पाट्या असायला. स्थानीक भाषेला प्राधान्य आणि महत्व असायलाच हवे. समजा गावाकडुन एखादा खेडुत आला तर त्याला काय घंटा समजतं आहे हे इंग्लिशमध्ये काय लिहले आहे ते, मराठीच हवे तिथे....
आज एका मित्राकडे जरासे लांब गेलो होतो. च्यामारी, ह्या स्थानीक बसेस आहेत की चेष्टा ? सगळ्या पाट्या, आतले कर्मचारी "फक्त कन्नड" वालेच, आमच्यासारख्यांनी काय करायचे ? पोहचलो कसेबसे. ऍड्रेस आहे व्यवस्थीत पण झोल असा आहे की हे "लँडमार्क्स" शोधायचे कसे ? सगळीकडे जिलब्या पाडल्यासारखे कन्नड लिहले आहे, काडीइतके समजत नाही. नाही, जरी दाक्षिणात्यांचा हिंदी विरोध गॄहीत धरला तरी ह्यांना "इंग्रजीत" लिहायला काय प्रॉब्लेम आहे ? नाहीतरी सगळीकडे हे इंग्रजी झाडत असतातच ना ?
==============================================
आज "नॉन मराठी पब्लिक" आलं होतं फ्लॅटवर, मस्त दंगामस्ती केली सगळ्यांनी मिळुन, आता जेवायला कुठे जायचे म्हटले तर अजुन दंगा सुरु झाला. चांगलं ह्याना "मथुरा" मध्ये चला म्हणतोय, मस्त मराठमोळी भाकरी पिठलं थालपीठं वगैरे खाता येईल. हे म्हणतायतं की पंजाबी खायचं म्हणुन, रोज रोजच पोळी-भाजी खाऊन कंटाळा आला म्हणे. जाऊ दे, गाढवाला काय गुळाची चव ?च्यायला जेवतानाही शांत जेवत नाही, उगाच मोठ्ठ्यामोठ्ठ्या गप्पा मारतात लेकाचे, म्हणे काय तर "आमच्या भागात पराठे, रबडी , दम सब्जी , कचोरी वगैरे वगैरे" भारी मिळती म्हणे. आता इथे आहात ना, मल गपचुप खावा ना इथले, एवढे शिंपल समजत नाही लेकाच्यांना, मरु देत ....
च्यायला आजकाल सकाळ सकाळ सौम्याबरोबर ब्रेकफास्टला जायचे म्हणजे संकटच आहे बॉ, काय खाणार तिथे जाऊन हा प्रश्न दररोज पडतो. आयला रोज सकाळी डोसा / ईडली / वडा सांबार खायचे म्हणजे काय चेष्टा आहे का राव ? काहितरी व्हरायटी हवी का नको ? रोज तिच टेस्ट बोर होत नाही काय ? मी म्हटले सौम्याला "आमच्या पुण्यात ये, मस्त कांदापोहे, वडापाव, भजी खायला घालतो. एकदम झ्याक टेस्ट असते" .....
==============================================

तर असं आहे एकंदरीत, मीच सध्या फार मोठ्ठ्या मानसीक द्वंद्वात आहे की माझी नक्की "विचारसारणी" कशी आहे ?
अजुनतरी मला समर्पक आणि समाधानकारक उत्तर सापडले नाही ह्या प्रश्नाचे ...पाहु भविष्यात काय काय घडते ते ...
**** डिस्केमर ***
१. लेखाच्या अनुषंगाने आलेली व्यक्तींची नावे ही "काल्पनीक" आहेत अथवा "बदलली "आहेत, त्याचा वास्तवीक जीवनाशी संबंध लावण्याचा प्रयत्न करु नये.
२. कुणावर टिका करायची ह्या हेतुने हे लिखाण केलेले नाही.
३. मनातले विचार आहे तसे मांडत असल्याने काही अपशब्द आले असण्याची शक्यता आहे, त्याला माझा इलाज नाही.
**** डिस्केमर संपले ****

Sunday, January 25, 2009

महाराष्ट्र कोणाचा ? काही तर्क, काही आडाखे ... भाग - १

गेल्या काहीदिवसापुर्वी झालेल्या मुंबईवरच्या राक्षसी आतंकवादी हल्ल्याची स्वाभावीक प्रतिक्रीया म्हणुन भारताचे गॄहमंत्री श्री. शिवराज पाटील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. विलासराव देशमुख व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री ना. आर. आर. पाटील यांना राजीनामा द्यावा लागला व त्यांच्याजागी दुसर्‍या व्यक्तींनी ह्या पदांची सुत्रे संभाळली.असो. तो आपला विषय नाही.

महाराष्ट्रात नेतॄत्वबदल घडत असताना अनेक "पेल्यातली वादळे" उठली, काही जागच्या जागी शमवली गेली तर काहींचे रुपांतर मोठ्ठ्या वादळात होऊन त्यांनी महाराष्ट्राचे राजकारण अंतर्बाह्य ढवळुन काढले. सध्याच्या स्थीतीत जुने नेतॄत्व जाऊन त्यांची जागा नवे रक्ताचे नेते श्री. अशोक चव्हाण व राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले जाणकार व धुरंधर नेते श्री. छगन भुजबळ ह्यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली. हा नेतॄत्वबदल अदगी सहजासहजी व आरामात झाला नाही, त्यासाठी पक्षश्रेष्ठींना बरीच डोकेफोड करावी लागली व अनेकांना समजावता समजावता त्यांना नाके नऊ आले असेल ह्यात शंका नाही. तरीही कोकणातले बाहुबली नेते श्री. नारायण राणे ह्यांनी काँग्रेस पक्षातील त्यांच्या मुस्कटदाबीला वैतागुन शेवटी काँग्रेसला "जय महाराष्ट्र" ठोकला व नव्या दिशेकडे पाऊल उचलले. ही नवी दिशा कोणती ह्याची अजुन खात्रीलायक माहिती नाही पण यामुळेही बराच फरक पडणार आहे हे नक्की ...

तर ह्या सगळ्या पार्श्वभुमीवर माझ्या डोक्यात "पुढील विधानसभा निवडणुकीत राजकीय चित्र काय असेल ?" ह्याचा किडा आला. ह्या मुद्द्याचा मी केलेला अभ्यास व त्याच माझे विश्लेषण ह्याच्या संबंधीत हा लेख आहे.
***** डिस्लेमर *****
माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी व्यक्तीशः , आर्थीक, कौटुंबिक वा कसलाही संबंध नाही. यापुढील लिखाण मी त्रयस्थाच्या नजरेने लिहणार आहे त्यामुले माझ्यावरच्या "पक्ष समर्थकाच्या आरोपाला" मी आत्ताच केराची टोपली दाखवत आहे. तसेच ह्या लेखात व्यक्त झालेल्या सर्व भावना व्ययक्तीक माझ्याच आहेत. ह्याचा अन्य कशासी संबंध लाऊ नये ही आग्रहाची विनंती.
*****
*** काँग्रेस पार्टी ***

सगळ्यात आधी आपण सगळ्यात जुन्या, सद्यस्थीतीत विधानसभेत सर्वात मोठ्ठी संख्या असणार्‍या व स्वातंत्र्योत्तर काळानंतर बहुतांशी ९० % महाराष्ट्राचा राज्यशकट हाकणार्‍या "काँग्रेस" चा विचार करु....
"काँग्रेस का हाथ, आम आदमी के साथ" ही घोषणा देऊन हा पक्ष वर्षानुवर्षे निवडणुका लढवीत व जिंकत आला आहे. जरी हा पक्ष त्यांच्या धोरणात आम्ही "आम आदमी" च्या कल्याणासाठी वचनबद्ध आहोत असा घोष करत असला तरी ह्यांच्यात "आम " असे काहीच नाही, सर्व काही "श्रीमंत, साहेबांच्या आवेशात, सरंजामशाहीयुक्त" असा ह्या पक्षाचा थाट आहे. अगदी लहानतल्या लहान पातळीवरच्या निर्णयासाठीसुद्धा "हायकमांड" च्या आदेशाची वाट पाहण्याबाबत ह्यांचा लौकीक आहे.तसे पहायला गेले तर हे हायकमांडचा मक्ता आत्तापर्यंत बहुसंख्यवेळा "गांधी परिवार वा त्यांच्या विश्वासातल्या व्यक्ती " ह्यांच्याकडे असल्याचा इतिहास आहे, सद्य परिस्थीतीसुद्धा ह्याला अपवाद नाही. राज्यस्तरावरचे महत्वाचे निर्णय घेणारे बहुसंख्य "हायकमांड" मधले नेते हे "अमहाराष्ट्रीय" आहेत हे सत्य आहे व त्यांचे महाराष्ट्राबाबतचे अज्ञान वेळोवेळी त्यांनी घेतलेल्या अपरिपक्व निर्णयांमध्ये व केलेल्या निवडीमधुन दिसुन आले आहे.
राज्यपातळीवर ह्या पक्षाची सुत्रे साधारणता "देशमुख/पाटील/कदम/चव्हाण" ह्यांच्याकडेच अलटुन पालटुन एकवटलेली दिसतात. असो.

तसे पहायला गेले तर गेली ८-९ वर्षे सलग मुख्यमंत्री हा कॉग्रेसचाच आहे पण त्यांच्या हातुन लक्षात राहण्यासारखे एकही भरीव काम अजुन झाले नाही. ह्यांचा बहुसंख्य वेळ आपली खुर्ची संभाळाण्यात व मजबुत करण्यात गेला. अंतर्गत राजकारणातुन सारखे "नेतॄत्वबदलाचे वारे " वाहणे व त्यातुन सारख्या दिल्ल्लीच्या वार्‍या घडुन पक्षश्रेष्ठींपुढे लोटांगणे घालुन आपली खुर्ची वाचवण्याचे प्रयत्न केल्याचे सोडुन मला श्री. विलासराव देशमुखांचे इतर कोणताही "महत्वाचे कार्य" विचार करुनसुद्धा डोळ्यापुढे येत नाही. आता तर त्यांची ऐन निवडणुकीच्या तोंडाला खुर्ची गेली आहे. वाचकांना जर आठवत असेल तर मागच्या निवडाणुकीच्या तोंडावर असेच देशमुखांना हटवुन "इमानी" सुशीलकुमार शिंद्यांना खुर्ची दिली होती व त्यांनी "माझ्यासारख्या दलिताला हा बहुमान देऊन सोनियाजींनी राष्ट्राला एक ठाम संदेश दिला आहे" अशी सरळसरळ जातीयवादी मुक्ताफळे उधळुन आपल्या पक्षाच्या "जातीयवाद विरोधी इमेज" ला काडी लावली होती. शेवटी पुन्हा निवडणुक विजयानंतर चांगल्या कारभारासाठी देशमुखांना परत आणावे लागले व शिंद्यांची रवानगी "राज्यपाल" म्हणुन आंध्रावर केली गेली. असो. पुन्हा एकदा तेच घडताना दिसत आहे. ह्या पदाला अगदीच नवखे असे "अशोक चव्हाण" हे सध्या ही जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. त्यांच्या वडीलांच्या रुपाने त्यांच्या घराण्याने हे पद पुर्वी भुषवले आहे पण कदाचित ह्यांच्या निवडीमागचा निकष नसावा हे मानायला हरकत नाही. आता सद्यस्थीतीत अशोक चव्हाणांकडे "दिवस ढकलण्याशिवाय" दुसरा पर्याय नाही, ते काही करु पाहतील तर तेवढा वेळही नाही व शिवाय टिकेच्या भितीने व अपयशाच्या शंकेने पक्षश्रेष्ठीही नव्या धाडसी निर्णयांना परवानगी देण्याची शक्यता कमीच आहे. थोडक्यात अशोक चव्हाणांना केवळ "नाईट वॉचमन" ची भुमिका पार पाडावी लागेल हे स्पष्त आहे. म्हणजे अधीक पडझड होऊ न देता ही इनिंग कशीबशी संपवणे हा त्यांना पद देण्यामागचा हायकमांडचा स्वच्छ आणि सरळ हेतु आहे असे दिसते आहे.

तसे पहायला गेली तर गेल्या कार्यकीर्दीत काही भरीव कार्य न झाल्याने आता निवडणुकीत मतदारांना काय उत्तरे द्यायची हा सर्वात महत्वाचा मुद्दा काँग्रेससमोर असणार आहे.मागच्या निवडणुकीत "मोफत विजेची घोषणा ( मग भले ती बाळासाहेब ठाकर्‍याकडुन चोरलेली का असेना )" करुन बसलेल्या ह्या सरकारला राज्याला मोफत सोडा पण अखंड वीज पुअरवता पुरवता नाके नऊ आले, सध्या राज्याच्या अनेक भागात ८-१२ तास वीज गायब असते हे ढळढळीत सत्य आहे.
सगळीकडे पाणी पुरवु म्हणावे तर अजुनही बर्‍याच ठिकाणी पिण्यालायक शुद्ध पाण्याची कमतरता आहेच.
तरुणांना रोजगार देऊ असा वायदा केला असताना त्यांच्या डोळ्यादेखत अनेक कंपन्या,कारखाने व आस्थापने राज्याबाहेर निघुन गेली ही त्यांची हारच आहे व त्यातुन सध्या बेरोजगारीची समस्या जास्तच बिकट होताना दिसत आहे. नवे रोजगार उपलब्ध करण्याचे सोडा पण सध्या असलेले संध्या टिकवण्यात आलेले अपयश हेच खरे सत्य आहे. शिवाय "सरकारी नोकर्‍यातही" महाराष्ट्राचा हक्काचा वाटा उपलब्ध करुन देण्यात सरकार अपयशी ठरल्याचे चित्र आहे, मग त्यासाठी स्वतः राज ठाकर्‍यांना उभे रहावे लागले व कसल्याही मार्गाने का असेना हा माणुस आपल्याला नोकरी मिळवुन देऊ शकतो हा विश्वास राजने लोकांच्या मनात निर्माण केला व ज्यांची खरी ही जबाबदारी आहे ते सरकार मात्र "हात चोळत व राज ठाकर्‍यांचे हात बांधत" शांत बसले हे लोकांनी डोळ्याने पाहिले.
गरिब व कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या "आत्महत्या" हा विषय गेल्या काही वर्षात जास्त बिकट बनला व त्यावरही काही भरीव योजना देण्यात सरकारला अपयश आलेले दिसते आहे व विरोधी पक्ष या मुद्द्यावर विधानसभेत नेहमीच सरकारची सालटे काढण्यात आघाडीवर असतो. उलट मदतीची अपेक्षा असताना सरकारी पातळीवरुन "त्या आत्महत्या केलेया शेतकर्‍यांच्या बाबत ते कर्जबाजारी, जुगारी, दारुडे " असल्याचे हास्यास्पद व निराशाजनक दावे केले गेले व सरकारने स्वतःचे हसे करुन घेऊन स्वतःच्या पायावर धोम्डा मारुन घेतला. आता ह्यांना कसे तोंड दाखवावे हा मुद्दा आहेच.
महागाई तर दिवसेंदिवस वाढत आहेच व त्याला "जागतीक मंदीचे" गोंडस नाव देऊन आपल्यावरची जबाबदारी झटकण्याची मनोवृत्ती सुद्धा ह्याच सरकारमध्ये दिसुन आली.
ह्या सरकारची "शिक्षणक्षेत्रात" थोडीफार भरीव कामगिरी अथवा तसे प्रयत्न दिसत आहेत हे जरी सत्य असले तरीपण राज्यातील प्राथमीक शिक्षकांना "घाण्याच्या बैलासारखे" सारखे कामाला गुंतवुन ( पदच्युत्त ) शिक्षणमंत्री श्री. वसंत पुरके अनेक वेळा टिकेचे धनी झाले. त्यांच्या काही अजब आणि अशक्य निर्णयांनी वेळोवेळी शक्य तितका जास्त गोंधळ उडवुन दिला होता.
एकंदरीत ह्यावेळी मैदान मारणे हे तितके सोपे राहिलेले नाही .....

आता पाहुयात पक्षाच्या अंतर्गत राजकारणाकडे, एक बलवान व प्रभावशाली ( व आयात ) नेते श्री. नारायण राणे ह्यांनी पक्षाला राम राम ठोकुन अजुन एक आठवडा सुद्धा उलटला नाही. उलट त्याचे "शिमागोत्तर कवित्व" अजुन बर्‍याच ठिकानहुन ऐकायला येत आहे. नारायण राणेंनी शिवसेना सोडताना आणि सोडल्यावर वर्षभर वातावरणनिर्मिती जोरदार केली होती व आता शिवसेनेच्या ताकदीला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला नेता मिळाला म्हणुन काँग्रेस खुष होते. सगळ्या पोटनिवडणुकांत आपले माजी शिवसैनिक आमदार निवडून आणण्याचा बेत 'दादां'नी निष्टेने तडीस नेण्याचा धडाका लावला. अखेर श्रीवर्धनच्या पोटनिवडणुकीत राण्यांचे शिवसेनेत असल्यापासूनचे प्रतिस्पर्धी मनोहर जोशींनी चतुर चाली रचून राण्यांचा वारू अडवला. पण यामुळे राणे यांची पक्षात येण्यामागची "मुख्यमंत्रापदाची इच्छा" ही लपुन राहिली नाही, वारंवार शक्य त्या मार्गांनी ती त्यांनी व्यक्त केलीच होती. खुद्द सोनिया गांधी यांच्या सभेत "खुर्च्यांची फेकाफेक" झाल्यावर काँग्रेस हायकमांडला जाग आली व त्यांनी राणे यांना दाबण्यास सुरवात केली. आता कुठल्याही मार्गाने "पद" मिळत नाही हे लक्षात येताच राणे सध्याच्या पदांना लाथ मारुन बाहेर पडले. खरा सामना आताच आहे कारण राणे ह्यांनी ते काँग्रेस्मध्ये असताना एक "दबावगट ( उर्फ विलासराव देशमुख विरोधीगट ) " तयार केला होता, आता त्यांच्यातली चलबिचलता वाढत जाईल. शिवाय राणे सध्या "वेळ येताच एकेकाची अंडीपिल्ली बाहेर काढतो " अशा धमक्या देत आहेत व त्यामुळे कित्येक जणांचे जीव टांगणीला लागले असतील ह्याचा अंदाज येतोच आहे. पुढे काय होणार ह्याचे उत्तर काळच देईन पण हे "राणे प्रकरण" काँग्रेसला जड जाणार हे नक्की. शिवाय त्यांच्याबरोबरच सध्या पक्षात असणारे पण "मुख्यमंत्रापदाची इच्छा" असणारे पतंगराव कदम, रोहीदास पाटील, अशोक चव्हाण, खुद्द विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे असे अनेक नेते असल्याने मुकाबला तगडा आहे ह्यात शंका नाही. पण ह्यांच्या "शह-काटशहाच्या खेळात" कदाचित काँग्रेसची नाव जलसमाधी घेऊ नये म्हणजे झाले. आपल्या प्रतिस्पर्ध्याला झोपवण्यासाठी "विरोधी पक्षांची मदत" घेणे हा कॉग्रेस संस्कॄतीचा एक भाग, पाहु आता ह्याचे किती प्रयोग होतात ते. घोडामैदान जवळच आहे.....

आता विचार करुयात पक्षाच्या समर्थक असणार्‍या सर्वसामान्य मतदारवर्गाचा. नक्की कोण ह्या पक्षाला मतदान करते हा मुद्द्याचा आणि महत्वाचा प्रश्न आहे.
गेली वर्षानुवर्षे काँग्रेसने आपली प्रतिमा "सगळ्यांना सामावुन घेणारा" अशी टिकवण्यात यश मिळवले आहेत त्यामुले अजुन त्यांचे समर्थक सर्वच जातीत व धर्मात जवळजवळ सारख्या प्रमाणात आढळतात. तरीपण सध्याच्या परिस्थीतीत "मुस्लीम समाज" हा प्रामुख्याने काँग्रेसला मतदान करत आला आहे / करत राहिल ह्यात शंका नाही. कुणीही कितीही दावा केला तरी ह्या वर्गाला काँग्रेसपासुन दुर खेचणे अजुन समाजवादी पार्टी, बसपा अथवा इतर कुणालाही शक्य झाले नाही. काँग्रेसने वेळोवेळी "जातीय व बेरजेची राजकारने" खेळत अनेक दलित नेत्यांना आपल्या पक्षात सामावुन घेऊन त्यांच्यामार्गे मते खेचण्याचा प्रयत्न केला. ह्यात त्या नेत्यांचा काही फायदा झाला नाही हे सत्य असले तरी ह्या प्रकाराने काँग्रेसला नक्की तारले हे नक्की. काँग्रेसचा नेहमीचा पारंपारीक मतदार असलेला "शेतकरी" ह्यावेळी मात्र थोडा रागावलेला दिसतो, कारण त्याच्यासाठी काहीच केले नाही अशी त्यांची भानवा आहे. नेते फक्त आपल्या "कारखान्यांची राजकारणे" करीत राहिले असा झालेला ग्रह दुर करणे व त्यांची मते मिळवणे हे नक्कीच आव्हान असणार आहे.प्रामुख्याने ह्या वर्गातुन "एकगठ्ठा मतदानाचा " प्रभाव दिसतो म्हणुन ह्यांचा उल्लेख केला आहे, बाकी तसे येतातच ...

बाकी काँग्रेसला निवडणुकीसाठी रसद म्हणुन पैसा व ग्रास रुट लेव्हलला काम करणारे कार्यकर्ते ह्यांची भरपुर बेगमी ह्या पक्षाकडे आहे. ठिकठिकाणचे साखरसम्राट, शेतकरीनेते, विकासमहर्षी, कर्मयोगी ह्यांनी हा पक्ष खचाखच भरलेला आहे ...

एकंदरीत मागच्या निवडणुकीपेक्षा ह्यावेळी परिस्थीती काँग्रेससाठी "कठिण" आहे हे नक्की.आता नक्की जागा किती मिळतील ह्याचा अंदाज व्यक्त करायला मी काही "न्युजचॅनेलवरचा भविष्यवाला पोपट" नाही त्यामुळे क्षमस्व पण जागात +/- १० जागांचा फरक पडणार हा माझा अंदाज आहे.

=====================

बाकी पक्षांचा व राजकारणाचा आढावा पुढच्या काही भागात.विस्तारभयावास्तव मी हा भाग इथेच थांबवतो, पुढचा भाग शक्य तितक्या लवकर .....
( *** क्रमश : **** )

Thursday, January 15, 2009

तुम्हाला आंतरजालावरचा प्रसिद्ध प्रतिसादकर्ता व्हायचे आहे काय ? ... भाग - १

मित्रांनो, आपण नेहमीच आंतरजालावर अनेक प्रकारचे लिखाण पाहतो. सध्या ब्लॉगविश्वाला ग्लॅमर आल्याने व त्याची मार्केटमध्ये चांगलीच बुम असल्याने दररोज अक्षरशः ढीगाने नवे ब्लॉग तयार होत आहेत.स्वाभावीकच ह्या असंख्य ब्लॉग्सवर रोज नवे लिखाण येत असते.

आपण बर्‍याच वेळा शक्य तितके वाचुन काढतो, बरेच काही आपल्याला आवडुन जाते व त्याला "प्रतिसाद" द्यावा अशी इच्छाही होते. बरं, ह्या प्रतिसादाचा उपयोग पुढेमागे आपली स्वतःची "ओळख" तयार करायला सुद्धा होऊ शकतो ही यातली गोम लक्षात घेतलीत तर तुम्हाला "प्रतिसाद" देण्यामागचे राजकारण समजेल. जरा नजर टाकुन बघा ना काही प्रसिद्ध ब्लॉग्सवर, कसे ढिगाने लोक लिहतात व त्यांना प्रतिसाद सुद्धा येतात, ह्या नेहमीच लिहणार्‍या व ते वाचुन नेहमीच प्रतिसाद देणार्‍या लोकांचा एक मस्त गॄप म्हणजे आजच्या प्रचलीत भाषेत "कंपु" तयार होतो, एकदा का तुम्ही ह्या "कंपुत" शिरलात की मग मग बर्‍याच गोष्टी साध्य होतात ( असो. कंपुबाजीविषयी नंतर केव्हातरी ).

तर कळीचा मुद्दा असा आहे "समोरच्याच्या लक्षात राहिल असा प्रतिसाद कसा द्यावा ? किंवा तुम्हाला आंतरजालावरचा प्रसिद्ध प्रतिसादकर्ता व्हायचे आहे का ?"
घ्या तर आमचे काही सल्ले ...!
तसे पहायला गेले तर आमचे आंतरजालीय मित्र "टारझन" ह्यांनी मराठी आंतरजालविश्वावरील एक अग्रणी संस्थळ असणार्‍या "मिसळपाव.कॉम" वर एक फर्मास लेख टाकला आहे ह्याविषयावर, तो आपल्याला "इथे" पाहता येईल ...

ह्याला जोडुनच आमचे पदरचे २ पैसे ...!
.....(मी टिप्स देऊ शकतो ह्याचाच अर्थ मी आंतरजालीय संस्थळावरचा यशस्वी प्रतिसादकर्ता आहे हे सुज्ञांच्या लक्षात आलेच असेल, ज्यांना हे मान्य नाही ते हे विधान त्यांना झालेल्या "जळजळीतुन" आले आहे हे आम्ही इथे स्पष्टपणे नमुद करु इच्छितो. )

१. काथ्याकुट :
काथ्याकुट म्हणजे काय तर लष्कराच्या भाकर्‍या भाजणे. कधीतरी आपली माऊली वैतागुन म्हणते बघा " झाले तुकडे मोडुन, आता निघालं कार्ट लष्कराच्या भाकर्‍या भाजायला" , बस हेच ते.
फक्त फरक असा पडतो इथे की लोकं इथे कंपन्यात मस्त एसीची हवा खात, कंपनीतुन हायस्पीड नेट वापरुन, कंपनीच्या काम करण्याचा वेळात कामाला फाट्यावर मारुन "मेगाबाईट्स च्या मेगाबाईट्स " वाद घालत असतात ...
बरं, त्याला खास विषयांचे बंधनही नाही, अगदी अमेरिकेच्या आर्थीक धोरणापासुन ते सोमालियाच्या यादवीपर्यंत , ब्रिटनी स्पियर्सच्या मराठी बॉयफ्रेंडपासुन ते पुण्यात गणपतीला घातलेल्या स्वेटरापर्यंत ... अगदी कशावरही तुम्ही वाद घालु शकत असाल तर तुमचे ह्या प्रकारात स्वागत आहे.
आजकाल ह्या विभागाला फार चलती आहे, सगळ्यात जास्त प्रतिसाद खेचणार्‍या विभागामधला हा एक विभाग, ह्या साहित्यला प्रतिसाद न देण्याची घोडचुक करणे म्हणजे "दैव आलेय द्यायला आणि कर्म नाही घ्यायला" असा प्रकार आहे. तेव्हा ह्याला जरुर प्रतिसाद द्यावा.
ह्याचे २ प्रकार पडतात,
पहिला प्रकार म्हणजे उगाच १-२ ओळीत काहीतरी खरडुन मग कोंबड्या झुंझवण्याची मजा पहात बसणारा प्रकार. मग विषय काहीही असला तरी तो मात्र ज्वलंत, धगधगता, व्यवस्थीत चिरफाड करता येईल असे असला म्हणजे आपले काम सोपे होते.
आपण पहिल्या ५-६ प्रतिसादांची वाट पहायची, आपोआपच त्यात आरामात २ विरोधी सुर नक्की निघतात, मग १०-२०-३० / छापा-काटा करुन आपण कोणत्या बाजुला आहेत हे ठरवावे, एकदा का हा निर्णय झाला मग कसली भिती नाही. मात्र बाजु निवडताना आप्ले विरोधक जास्त असतील ही काळजी घ्यायला हवी.
सुरवात करतानाच एखाद्या आधीच पडलेल्या आपल्या विरोधी प्रतिसादातले एखादे वाक्य निवडुन त्याला लगेच "स्पष्ट असहमत, हे वास्तवीक असे पाहिजे " ह्या अर्थाचा प्रतिसाद द्यावा.
उदा : जर चर्चा "निवासी /अनिवासी " असेल तर तत्काळ "आम्हाला आमचा देश प्यारा, भाकरीसाठी परकीयांपुढे शेपटी हलवणे आम्हाला मान्य नाही" ह्या अर्थाचे वाक्य ठोकुन द्यावे, मात्र हे करत असताना आपण हा प्रतिसाद "अमेरिका, युरोप, युके" इथे ऑफीसात बसुन लिहीत नाही ना ह्याची मात्र खात्री करुन घ्यावी, उगाच ४ लोकात शोभा होते ना. एकदा का हे जमले की आपोआपच "विरोधी प्रतिसादांचे आग्यामोहळ" अंगावर धावुन येते, तुम्ही जास्त काही करु नका, ओच तोच मुद्दा वेगवेगळ्या शब्दात मांडत रहा, म्हणजे असे की " आम्ही भारतातच राहुन मीठ भाकरी खाऊ, तुमचा पिझ्झा / पाश्ता तुम्हाला लखलाभ होवो किंवा म्हातार्‍या आईवडीलांची काळजी घेणे हे मला हिरव्या नोटांपेक्षा जास्त महत्वाचे वाटते किंवा तुमच्या प्रासादापेक्षा माझी झोपडीच मला प्रिय वगैरे वगैरे " असे प्रतिसाद टाकावेत. लोक अजुन खवळुन उठुन पानपानभर प्रतिसाद खरडतात, मग हळुच कुणाच्यातरी "ग्रीनकार्डावर टिका " करणारे पिल्लु सोडु द्यावे, चर्चा अजुन भडकते व लोक पुढे तुम्ही अजुन काय खरडतात / दिवे लावताय ह्याची वाट पाहतात ...
खुप कंटाळा आला की मग शेवटी " छ्या, काहीपण म्हणा पण आपल्या देशातच चिंग होऊस्तोवर बिअर पिऊन मग गाड्यावरची भुर्जी खाण्याची मजा काही औरच.... " असा प्रतिसाद टाकुन द्यावा, अजुन ज्वाळा भडकतात ...लोक जर वैतागुन वैयक्तीक खरडी / व्यनी टाकु लागले तर शेवटी " माझ्याकडुन मी थांबतो, ह्यापुढे कसल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही " असा समारोप करावा. पण ह्या समारोपातच " जय हिंद, जय महाराष्ट्र " सारखी घोषणा टाकुन आपले देशप्रेम पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी दवडु नये.
हा हा म्हणता तुम्ही "वाद विवादातले प्रसिद्ध प्रतिसादकर्ते" होऊन जाल ...

आता दुसरा प्रकार म्हणजे "नमनालाच २ पाने भरतील एवढे लिखाण टाकुन काथ्याकुट", ह्यात जरा मुद्दे स्पष्ट असल्याने आपल्याला वाव कमी मिळतो पण यासाठी हार मानायची गरज नाही. शक्यतो लेख पुर्ण वाचु नये, वाचुन त्यातले जास्त काही कळेल असेही नाही. फक्त गाठीला असावेत म्हणुन २-४ मुद्दे नजरेखालुन घालुन ठेवावेत.
जर चर्चा "राजकारण" ह्यावर असेल तर त्वरेने "छ्या, राजकारण म्हणजे गटार" असे जाहीर करुन मोकळे व्हावे. मग सर्वात प्रथम ( जीव तोडुन २ पानं लेख खरडलेला ) लेखक भडकतो व मग बाकीचे, त्यांना व्यवस्थीत अंगावर येऊ द्यावे, मग पुन्हा एकदा "राजकारण्यांची औकाद, पक्षाचा इतिहास, नेतृत्व " ह्याविषयी एखादे आक्षेपार्ह्य वाक्य सोडुन द्यावे. म्हणजे " राहुल गांधीची अजुन पात्रता नाही / काँग्रेसमध्ये घराणेशाही सोडुन अजुन काय आहे दुसरे / बीजेपीने हिंदुत्व मुद्दा सोडुन द्यावा / राज ठाकरेने परतुनी घरट्याकडे जावे " असा सुर काढावा म्हणजे ह्याचा बाजुचे व विरोधकांचे पुन्हा ह्यावर जुंपते. तुम्ही मात्र शांत रहा, जमल्यास गुगलुन काही मिळाल्यास अजुन काही "जळजळीत सापडल्यास " ते "चु.भु.द्या.घ्या." ह्या टीपेसकट टाकुन द्यावे. चर्चा रंगत जाते ...

लोकांना जरी चर्चा लक्षात राहिली नाही तरी "उलटसुलट / भडखाऊ / आक्रस्ताळी " विधाने करणारे तुम्ही जरुर लक्षात राहता व हा हा म्हणता तुमचा "वितंडवादी भांडखोर प्रतिसादकर्ता " म्हणुन लौकीक वाढु लागतो.
*
*****
*
२. काव्यविभाग :
ह्यात प्रतिसाद देण्याआधी २ शक्यता विचारात घ्याव्यात.

पहिली म्हणजे तुम्हाला काव्य कळते का ?
ह्याचे उत्तर होय असल्यास कधीही पहिला प्रतिसाद "कविता आवडली" असा चुकुनही टाकु नये, मग तुमच्या काव्य समजण्याचा काय घंटा उपयोग ? त्याऐवजी चुका शोधण्याचा प्रयत्न करीत रहा, म्हणजे उदा. तुम्ही " आशय उत्तम आहे पण वॄत्तात / मात्रेत मार खाल्लात, शेवटच्या २ कडव्यात जरासा तोल ढासळला , चांगला प्रयत्न आहे पुढील प्रयत्नास शुभेच्छा, थोडीशी भडक वाटते आहे, यमक जुळवण्याचा नादात कवितेचा गाभा ढासळला , जर अलाण्या फलाण्याच्या जागी फलाणे फलाणे टाकले तर जमुन जाईल , आशय व्यवस्थीत समजला नाही, फारच विस्कळीत वाटली " ह्यापैकी एखादी प्रतिक्रीया पुन्हा एकदा १०-२०-३० करुन टाकुन द्यावी. मात्र नक्की काय करायला हवे हे "गुलदस्त्यात" राहु द्यावे, स्पष्टपणे सल्ला मुळीच देऊ नये.
तुम्ही फारच पट्टीचे असाल तर मात्र त्याच धाग्यात उत्तर देताना लगेच " प्रति कविता " रचुन दाखवावी व वरुन "हे जमते का पहा " असे ठेऊन द्यावे. मग मात्र "प्रतिभेला सलाम, तोडलतं, खल्लास " असे प्रतिसाद मुळ कवितेला यायच्या ऐवकी तुम्हालाच येतात व हा हा म्हणता तुम्ही "काव्य ह्या प्रांतातले दादा/अधिकारी " म्हणुन ओळखले जाऊ शकता.असो.

आता दुसरा प्रकार म्हणजे तुम्हाला काव्यातले काहीही कळत नाही, तुम्ही चक्क माठ आहात तर काय करावे. सर्वात प्रथम जी येईल त्या कवितेला वर टारझन म्हणतो तसे प्रतिसाद देत सुटावे पण ह्यात एक गोम आहे, इथे प्रत्येक प्रतिसादात " आम्हाला काव्यतले काहीही कळत नाही जे जगजाहीर आहे / आयला, आम्हाला कविता करायला फतरे जमत नाही / ज्या दिवशी कविता करत येईल त्यादिवशी मारुतीला २१ नारळं वाढवीन " हे पालुपद जोडुन द्यावे. मात्र तुम्हाला काव्यातले कळत नसुन तुम्ही असे प्रतिसाद कसे देता असा प्रश्नाल्यास सोईस्कर मौन पाळावे.
मधुन आधुन "कवितेल दुरुस्त्या" सुचवाव्यात, म्हणजे जसे की "ढळले च्या जागी कोसळले किंवा कळले कसे होईल ? / धावती गाढवे च्या जागी ...... जाऊ द्या, बोलण्यासारखे नाही ते " असे विचारत रहावे. तुमचे चुक आहे तुम्हालाही माहित असते पण कवी / कवयत्री मात्र जाम खुष होऊन स्पष्टीकरण वगैरे देतात व तुम्हाला भाव मिळतो, लगेच त्यांचे आभार मानुन मोकळे व्हावे. तुम्हाला काय व किती कळले ही बाब आधीही महत्वाची नव्हती व आताही नाही, आपले अस्तित्व जाणवुन दिल्याशी मतलब.
जर तुम्ही पुढच्या यत्तेतले असाल तर "खरडवह्यातुन" ह्या कवितेबाबत कवीशी "चर्चा" सुद्धा करु शकता, मात्र त्यासाठी थोडी हिंमत व थोडा अर्धवटपणाचा आव मात्र आणावा लागेल. ह्यातुन तुम्ही त्या कवी / कवियत्रीच्या "बडी लिस्ट / गुड लिस्ट " मध्ये सुद्धा शिरकाव करु शकता ...

तर कविता कळो अथवा न कळो प्रतिसाद हा दिलाच पाहिजे ...
असो.

( विस्ताराच्या भयाने इथेच थांबतो. बाकीचे पुढ्च्या भागात ...! )

क्रमश :